सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

संजय म्हणाला ..... ! ( भाग – ६ )





    अलीकडे धर्म - संस्कृती रक्षकांनी बराच जोर धरल्याचे दिसून येते. यामागे अराजकीय संघटनेच्या राजकीय उपसंघटनेचे केंद्र व राज्य सरकारात निवडून येणे, हे प्रमुख कारण मानले जात असले तरी ते पूर्णतः खरे नाही. धर्म – संस्कृती रक्षक मंडळं पूर्वीही होती व आजही आहेत. फरक इतकाच कि संपर्क माध्यमांनी ती वारंवार आपल्या नजरेसमोर येऊन धडकत असल्याने ‘ आत्ताच यांचे पेव कसं फुटलं ? ‘ हा प्रश्न आपल्याला पडून राहतो.

    या सर्व धर्म – संस्कृती रक्षकांची देखील एक मौज आहे. यांना ना धर्म माहिती असतो ना संस्कृती. मग कशाचे रक्षण करायचे वा का करतात, ते त्यांनाच ठाऊक. त्यात आणखी जोडीला देवालाही आणून बसवतात. प्रत्यक्षात देव, धर्म व संस्कृती हे तिन्ही प्रकार परस्परांहून अधिक भिन्न आहेत. इतके कि, यांच्यातील साम्य शोधू पाहता फार कमी साम्यस्थळं आढळून येतील. वा कदाचित एकही नाही.

    प्रथम आपण देवाचं उदाहरण पाहू. तुम्ही मूर्तिपूजक आहात / नाही हा प्रश्न थोडा बाजूला ठेवू. तुम्ही देव मानता ना, मग त्या देवाला तुम्ही कधी पाहिलंय, अनुभवलंय का ?

    एक जन्मतः अंध व्यक्ती ज्याप्रमाणे आपल्या कल्पनाविश्वात काही प्रतीकं निर्माण करून त्यांच्या सहाय्याने आपली वाटचाल सुरु ठेवते, तद्वत आपलं चाललेलं आहे. कोणता देव कसा दिसतो, काय खातो – पितो हे आपल्याला मुळीच माहिती नाही. फक्त देव म्हणजे सर्वशक्तिमान, आपल्यापेक्षा श्रेष्ठ. तेव्हा आपल्याहून त्याचं सर्वच वेगळं असणार असं गृहीत धरून आपण त्याची रचना केली. मग ती मूर्त असो वा अमूर्त !

    या कल्पनाविश्वाला वास्तवाची जोड देण्यासाठी मग आपल्या दृष्टीने मौल्यवान असलेले धातू, वस्त्रं, खाद्यपदार्थ त्याला अर्पण केले जातात. तसं बघायला गेलं तर आदिम मनुष्याची देवभक्ती व आत्ताची आपली देवभक्ती यांत काडीचाही फरक नाही. तो देवाच्या भीतीने, सुखाने जगण्याच्या लालसेने देवपूजा करायचा. आपणही तेच करतोय. फक्त संदर्भ बदलले आहेत. आता हि पूजा कशी करायची ? तर सर्वांत उत्तम व सर्वत्र जे उपलब्ध आहे ते देवाला अर्पण करायचं. आता हल्ली महागड्या वस्तू देवाला अर्पण करण्याची फॅशन निघाली आहे, पण त्या बद्दल न लिहिलेलंच बरं !

    देवाच्या या सर्व पूजा प्रकरणात धर्म वा संस्कृतीचा संबंध सहसा येत नाही. इथे फक्त श्रद्धा व भाविकतेचा संबंध येतो. मग देवाचे रक्षण धर्म – संस्कृती रक्षक कसे करतात ? किंबहुना त्याची गरज आहे का ?

    धर्म म्हणजे काय आहे ? तर धर्म म्हणजे माणसानं कसं राहावं, वागावं, बोलावं यांची नियमावली. शाळा – कॉलेजातही अशी नियमावली असते. त्या नियमावलीचे आपण काय करतो ? धर्माचेही तसंच करायला पाहिजे. पण तसं होत नाही. यामागील कारण काय असावं ?

    संस्कृतीमध्ये माणसाची खाद्य, वस्त्र, आभूषण इ. घटकांचा अंतर्भाव होतो. एका समुहात परिस्थितीनुसार वा विशिष्ट काळात / परिस्थितीत कोणी काय खावं अथवा खाऊ नये असं नियमन केलं तर ती त्या समूहाची संस्कृती होते. धर्म नाही. एखाद्या समूहाने विशिष्ट वस्त्रं परिधान करण्याचा नियम बनवला व तो अंमलात आणला गेला तर ती त्याची संस्कृती होते. धर्म नाही. मग अशा संस्कृतीची धर्मासोबत गाठ का बांधली जाते ?

    देव, धर्म, संस्कृती यांपैकी धर्म हि संस्था अपवाद केल्यास देव, संस्कृती हे प्रवाही आहेत. निसर्ग प्रतीकांत असलेला देव मूर्तीस्वरूपात आला. आता फोटोंचे युग आहे. पुढचे माहिती नाही. पण बदल आहे.

    संस्कृतीचे म्हणाल तर शरीरसौंदर्याकरता घातले जाणारे अलंकार म्हणून वस्त्रांचा वापर करण्यात येऊन आता ते मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यातही आणखी इतके विविध प्रकार आहेत कि, एकाच वस्त्राचा आभूषण, शरीरसंरक्षक म्हणूनही वापर करता येतो. यात अजूनही बदल होत जातील. शिवाय वस्त्रांची निर्मिती होण्याआधी इतरही अनेक वस्तू परिधान करण्याची परंपरा होती व आजही आहे. जे वस्त्रांचे, तेच खाद्याचे !

    बदलत्या काळानुसार खाद्यजीवनही बदलत गेले. पूर्वी अज्ञात असलेला झाडपाला, फळे आता भाज्या म्हणून सर्रास वापरात आणल्या जातात. मांसान्नाचेही तेच ! यामध्ये बदल होतात. नाही असे नाही. विशिष्ट पदार्थांच्या निर्मिती / उत्पादनाचा तुटवडा पडला कि, त्याच्या जागी पर्यायी पदार्थाची आपोआप योजना होतेच. मिळून संस्कृती ही प्रवाही आहे निश्चित ! तिला बंधन नाही. मग अशा प्रवाही देव, संस्कृतीला नेमका कशाचा धोका आहे ? नेमकं कशापासून यांचं संरक्षण करण्याचे वारंवार आवाहन केले जाते ?

    समूह जीवनाचे नियमन करण्यासाठी जी संस्था बनवण्यात आली --- त्या धर्मसंस्थेच्या चालकांनी, अनुयायांनी मोठ्या कुशलतेने देव अन् संस्कृतीशी धर्माची सांगड घालून खरेतर देव, संस्कृतीला धर्माशी जखडून घेत त्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपवत त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. जो आजही सुरु आहे व पुढेही राहील. यामागील मुख्य कारण म्हणजे धर्म संस्थेचा स्वार्थ !

    आजच्या काळात राज्यघटना प्रकार उदयास आल्याने अलिखित धर्माच्या घटनेला तशीही किंमत नाही, हि गोष्ट धर्मचालकांना चांगलीच माहिती असल्याने त्यांनी पूर्वीपेक्षाही अधिक अशी धर्माची देव – संस्कृतीशी सांगड घालण्याचा निकराने प्रयत्न चालवलाय. यामुळे राज्यघटना उपलब्ध असूनही धर्मामुळे तिला कसलीच किंमत नसल्याचे वास्तव आहे. धर्माला हे बळ कोणी दिले ? तर देव अन् संस्कृती या दोन घटकांनी ! हे दोन्ही विषय माणसाच्या जिव्हाळ्याचे आहेत. यांचेच अपहरण करत धर्मसंस्था आपलं बळ वाढवत होत्या, आहेत व राहतील.

    उदाहरणार्थ, अल्लाने सर्व जगाची निर्मिती केली. इथपर्यंत मान्य. मग त्या अल्लाला सर्वांनी मानलंच पाहिजे व मोहम्मदला प्रेषित मानलंच पाहिजे हा आग्रह का ? देव म्हणून अल्लाचे अस्तित्व मान्य. पण त्यालाच माना व मोहम्मदला प्रेषित माना हे धर्मसंस्थेचं मानवी जीवनावर अतिरेकी आक्रमण. त्याहीपुढे धर्मसंस्था सांगेल तेच खायचं, परिधान करायचं. म्हणजे संस्कृतीही गेली धर्माच्या खड्ड्यात !

    हेच उदाहरण हिंदू, ख्रिश्चन आणि इतर धर्मियांना देखील लागू पडते. हिंदूंच्या कोणत्याही देवाने वा देवभक्ताने कसं वागायचं वा कोणाला माना / ना मानायचं सांगितलं नाही. हे कार्य धर्मसंस्थेने आपल्या हाती घेतलं. पाठोपाठ त्यांनी काय खावं – प्यावं तसंच काय परिधान करावं यावरही निर्बंध आणण्याचे प्रयत्न केले. परंतु देश मोठा. संपर्कसाधनांचा अभाव. यांमुळे निर्बंध सर्वांना सारखेच लागू न पडता त्यांस मर्यादा येऊन संस्कृती वैचित्र्य / वैविध्य मात्र निर्माण झाले. अर्थात, हे इथंच घडलं असेही नाही. इस्लाम वा ख्रिस्ती धर्म – संस्कृतीतही हेच घडून आल्याचं आपणांस दिसून येईल.

    धर्माचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे धर्म हा प्रवाही नाही. तसं पाहिलं तर राज्यघटनाही प्रवाही नाही. मुळात नियम हे प्रवाही नसून बंदिस्तचं असल्याने त्यांत अनैसर्गिक असं काही नाही. जुने, कालबाह्य, प्रस्तुत प्रसंगी आचरणात आणता न येणारे नियम गुंडाळून ठेवून त्या जागी नव्या नियमांची रचना वा दुरुस्ती करता येते. हा मार्ग सर्वांना माहिती आहे. परंतु, धर्मरक्षक मात्र या नियमाची अंमलबजावणी कधीच करत नाहीत. यामागील कारण काय असावे ?

    धर्म प्रवाही राहिला असता धर्मसंस्था मानवी समाजाशी संघर्ष न करता शांततामय सहजीवन दीर्घकाळ व्यतीत करू शकते. परंतु हि गोष्ट, वस्तुस्थिती धर्मरक्षक मुळीच लक्षात घेत नाहीत. कारण त्यांना जे कवच लाभले आहे, ते कवच प्रवाहीपणात बिलकुल टिकून राहणार नाही अशी त्यांना भीती आहे व ती रास्त आहे. मुळात बदल हा सृष्टीचा नियम असताना तुम्हांलाच तेवढा न बदलण्याचा अधिकार कसा ? हा प्रश्नचं उपस्थित केला जात नाही. व केला तरी त्याचा आवाज क्षीण असतो. कारण, अशा जीवघेण्या प्रश्नाला देव, संस्कृतीची ढाल बनवून धर्म नेहमीच तोंड देत आला आहे.

    म्हणजेच, खरा धोका नेहमीच धर्मसंस्थेला राहिला असून तिच्या बचावाकरता देव, संस्कृतीचा मुद्दाम वापर केला गेलाय. देव कोणत्याही स्वरूपात माना / न माना. त्याने देवाला काही फरक पडत नाही व तुम्हांलाही. परंतु आम्ही सांगू तोच देव व जसं सांगू तशीच त्याची उपासना करावी असं सांगणारा धर्म असतो.

    जगण्यासाठी खावं हि माणसाची खरी संस्कृती. कोणता पदार्थ कसा --- म्हणजे शिजवून, भाजून, उकडून, तळून खावा हे माणसाचं स्वातंत्र्य. संस्कृती. परंतु आम्ही सांगू तोच पदार्थ, त्याच पद्धतीने खावा अथवा आम्ही ज्याला निषिद्ध मानू ते खाऊचं नये असं सांगणारा धर्म आहे.

    धर्म आपलं सर्व जीवन नियमन करू पाहतो पण आपण धर्माचे नियमन करू शकत नाही. कारण, धर्म हि तशी राजसत्ता आहे व कोणतीही राजसत्ता स्वतःला श्रेष्ठ समजून नेहमीच दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणं पसंत करते. या वर्चस्ववादी वृत्तीने नेहमीच मूर्खपणाचा --- प्रत्यक्षात हुकुमशाही वृत्तीचा कळस गाठला आहे. मानवी समूहाला सर्वांत मोठा धोका या मानवनिर्मित संस्थेचाचं आहे.



शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

माणसाचा देव





    दिवस सणांचे. उत्साहाचे आणि दुःखाचेही. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गणपती येत आहेत. यानिमित्ताने आस्तिक – नास्तिक, प्रतिगामी – पुरोगामी – सनातनी पंथीय मंडळी वादांची धुळवड खेळतील याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. तसेही महाराष्ट्राला वादाचे वावडेही नाही वा नाविन्य. पण खंत एका गोष्टीची वाटते कि, वादातून निष्पन्न काहीही न होता लोकांचे क्षणिक मनोरंजन मात्र होते. असो, जगाची चिंता आपण का करावी असे म्हणत मी आता मुख्य विषयाकडे वळतो.

    कोणताही सण तोंडावर आला कि त्यानिमित्त होणाऱ्या उधळपट्टीची चर्चा हि अनिवार्य असते व यंदाही हा क्रम पाळला जाणार यात शंका नाही. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी गणेशोत्सव मंडळांनीही पुढाकार घ्यावा असेही आवाहन केले जात आहे. या आवाहनांना मंडळं अनुकूल प्रतिसाद देतीलही. परंतु या मंडळांपेक्षा भाविकांची व त्यांच्या देणग्यांची चर्चा मला महत्त्वाची वाटते.
देवाने सर्व सृष्टी बनवली. यात मग सजीव – निर्जीव दोन्ही प्रकारचे घटक आले, अशी भाविकांची श्रद्धा आहे तशीच माझीही. देवाने आपल्याला निर्माण केले हे जर सर्वमान्य आहे तर त्याला अमुकच गोष्ट वा वस्तू दिली असता तो प्रसन्न होईल असा निरर्थक आशावाद आपण मनात का बाळगतो ?

    दगड काय, सोनं काय किंवा तत्सम धातू काय. परमेश्वराला सर्व सारखेच. त्याच्या लेखी यांना किंमत काय ? मुळात या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सोने – चांदी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने आपल्या लेखी ते अमुल्य. पण देवाची अर्थव्यवस्था काय या सोन्या – चांदीवर अवलंबून आहे ? नाही ना. तरीही सोन्याची – चांदीची आभूषणं त्यांस अर्पण करण्यात आपण नेमकं काय साधतो ?

    आज मी भारतात आहे म्हणून देवाला नवस करताना ‘ अमुक इतक्या रुपयांची वस्तू तुला अर्पण करेन ‘ असं म्हणेन. पण तेच जर मी इतर देशात असताना म्हटलं व रुपयाच्या जागी त्या देशातील प्रचलित चलनाचे नाव घेतले तर .... ? देश, चलन हि संकल्पना देवाने बनवलेली आहे का ? त्याला भाषेचं बंधन आहे का ? या प्रश्नांचा कधीतरी विचार करायलाच पाहिजे.

    मला पेढे आवडतात म्हणून मी कोणत्याही देवाला नवस करताना ‘ तुला पेढे अर्पण करेन, माझं काम होऊ दे ‘ असं म्हणेन. काम होताच मी ते पेढे देईन. पण खाणार कोण ? प्रसाद म्हणून ते भाविकांत वाटले जाणार. देव तर प्रत्यक्ष नाही खाणार. पण जेव्हा आपण अर्पण केलेला पदार्थ इतरांच्या हाती प्रसाद रूपाने जातो तेव्हा वाटणारा आनंद, समाधान अवर्णनीय असले तरी यांमुळे खरोखरच देवाला तो पदार्थ पोचल्याची पोचपावती आपल्याला मिळते का ? 

    जर इतरांना प्रसादरूपाने खाद्यपदार्थ वाटण्यात आपल्याला आनंद मिळतो, संधान मिळते व कोणाचा तरी अंतरात्मा त्यामुळे सुखावला जाऊन ते देवाला मिळाले अशी आपण मनोमन समजूत करून घेतो तर मग आपल्या देवाचे अस्तित्व नेमकं कुठे आहे, हे आपल्याला माहिती असूनही आपण इतरत्र का भटकतो ?

    देवाच्या मूर्तीला नमस्कार केला नाही, प्रसाद घेतला नाही तर त्याचा कोप होतो. तो शिक्षा करतो असे सांगतात. मग त्याला नमस्कार करू न देणारे व प्रसंगी प्रसाद वाटपात हात आखडता घेणाऱ्यांना देव काय शिक्षा करतो बरे ? त्या विषयीच्या कथा कुठे आहेत ? पुराणे लिहिली आहेत का ?

    कोणी काहीही कथारूपाने लिहिल्याने अथवा सांगितल्याने आपण त्याचे पालन करावे इतकेही काही आपण निर्बुद्ध प्राणी नाही. तसं असतं तर अश्मयुगापासून आजवर आपण प्रगती – अधोगती साधली नसती. हजारो वर्षांच्या कालचक्रात इतर प्राण्यांप्रमाणे आपणही नामशेष झालो असतो.  

शुक्रवार, १० जुलै, २०१५

संजय म्हणाला .... ! ( भाग – ५ )




    बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले प्रमाणेच त्या व्यक्तीच्या नक्शेकदम पर चालण्याचा कोणत्याही धर्म – समाजाच्या मनुष्यांचा स्वभावच आहे. उदा :- मुस्लीम धर्मीय शक्य तितके महंमद पैगंबरच्या जीवनक्रमास आदर्श मानून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे आपले मराठी बांधवही पूर्वसुरींच्या चरित्रांतून स्फूर्ती घेताना दिसतो.


    उदाहरणार्थ, मराठी माणसाला व्यापार – धंदा जमत नाही असं म्हणतात. व ते बरोबरच आहे. अहो आमच्या तुकारामाला, नामदेवाला तरी कुठे धंदा करणे जमले ? व्यवसाय दिवाळखोरीत निघाल्यावर तुकाराम देव – देवस्की करत बसला तर नामदेव धंदा कसा करू नये या विषयावर मोफत भाषणे देत, शिबिरं भरवत देशभर फिरला.


    मराठी माणसं भांडकुदळ असतात असे म्हणतात. त्यात चूक ते काय ? आमचा इतिहास बघा. कोणा ना कोणाशी तरी भांडण्यातच आमच्या इतिहास पुरुषांचा जन्म गेला आहे. राजेशाह्या संपून इंग्रजांची एकतर्फी लोकशाही आली. तेव्हा आम्ही प्रथम आपसांत व सवड मिळताच इंग्रजांशी भांडतच होतो. शेवटी आमच्या भांडखोरपणामुळे इंग्रजांनी हा देश सोडला. कोण म्हणतं कि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला गेला तेव्हा देश स्वतंत्र झाला ? देशातला शेवटचा गोरा जेव्हा मुंबईतून बाहेर पडला तेव्हाच हा देश स्वतंत्र झाला अन ती मुंबई काय दिल्लीत आहे ?


    मराठी माणसं स्वार्थी आहेत असं म्हणतात. यात चुकीचं काहीच नाही. आमचा इतिहासच स्वार्थाचा आहे. उदाहरणार्थ, आमचा इतिहास बघितला तर आमच्या मराठी राज्यकर्त्यांना व्यापार – उद्योग, विज्ञान क्षेत्रांत कधीच प्रगती करता आली नाही. त्यामुळे आमची राज्यं नेहमीच आर्थिक अडचणीत सापडलेली असायची. मग आमचे राज्यकर्ते शेजारच्या राज्यांतील व्यापरी पेठा मारून आपल्या राज्याची आर्थिक घडी बसवायचे. विज्ञानाच्या बाबतीतही तेच !


    जर सर्व काही भव्य - दिव्य शोध आमच्या पूर्वजांनी लावले असतील तर मग आम्ही नव्याने का डोकी खपवायची ? हे दीडदमडीचे युरोपियन अनेक साधनांच्या आधारे शोध लावायचे. पण आमचे प्राचीन पूर्वज बसल्या जागी निद्रिस्त होऊन दिव्य चक्षुंनी सर्व विश्व, अंतराळ, आकाशगंगा फिरून यायचे व लिहून ठेवायचे असे म्हणतात. ‘ असं म्हणतात ‘ लिहिण्याचं कारण असे कि, हि माहिती आमच्या वडिलांनी दिली असून त्यांना त्यांच्या वडिलांनी दिली होती. सदर माहितीने भरलेले ग्रंथ आमच्या आजोबांच्या खापरपणाजाने वाचले होते. त्यानंतर कोणी ते वाचण्याचे कष्ट घेतले नाहीत. फक्त मौखिक आणि कर्णोपकर्णी परंपरेवरच आमचे ज्ञानार्जन चालू आहे. पण मुद्दा तो नाही तर आमच्या पूर्वजांनी सर्व आधुनिक शोध प्राचीन काळीच लावले हा आहे. पण या युरोपियन चांडाळांना सर्व श्रेय स्वतःकडेच घेण्याची भारी हौस. ठीक आहे. आम्हीही मग अज्ञानाचे सोंग घेत त्यांची चुकीची विद्या आत्मसात करून आमच्या पूर्वजांचे खरे शोध पडद्याआडचं ठेवतो. जेव्हा या युरोपियनांना आपल्या चुकांची जाणीव होईल व ते आमचे पाय धरतील तेव्हाच आम्ही खरे ज्ञान प्रकट करू. तोवर चलता है तो चलने दो !


    दुसऱ्याचं चांगलं होताना न बघवणे हा मराठी माणसाचा स्थायीभाव ( कि स्थायीस्वभाव ? जे काय ते ..) आहे असे म्हणतात व ते बरोबरच आहे. आमचा इतिहास बघा. यांत तुम्हांला भरपूर दाखले मिळतील. जे वरील विधानास पुष्टी देतील. उदाहरणार्थ, मोगलांनी एवढी मेहनत करून निजामशाही बुडवली पण शहाजीला मोगलांचे सुख बघवले नाही. त्याने फिरून निजामशाही उभारली. हे करताना याच निजामशाहीने आपल्या सासऱ्याचा बळी घेतल्याचेही तो विसरून गेला. शहाजीचे उदाहरण जुने आहे तर उत्तर पेशवाई बघा. एक पेशवा इंग्रजांकडे गेला तर पाठोपाठ इतरांनीही इंग्रजांकडे जाऊन पेशव्याहून अधिक चांगली वा त्याच्या बरोबरीने आपली व्यवस्था लावून घेण्याचाच प्रयत्न केला कि नाही ? या प्रयत्नात राज्य बुडालं पण बरोबरच्याला वरचढ होऊ द्यायचं नाही हे महत्त्वाचं ! लय लांब कशाला ? आमचे बारामती विद्यापीठाचे कुलगुरू शरद पवार यांनीही हाच आदर्श समोर ठेवलाय. सोनिया गांधींच्या काँग्रेसमध्ये पवार सोडून इतर मराठी माणसांचा उत्कर्ष होतोय पाहून त्यांनी स्वतःचीच काँग्रेस स्थापन करून दाखवली का न्हाय ! आता यामध्ये त्यांचे बळ घटले पण सोनिया काँग्रेसमधील मराठी नेत्यांच्या तुलनेने वरचे स्थान मिळवण्यात पठ्ठ्या यशस्वी झालाच ना ! मग बास.  तीच तऱ्हा आमच्या मनसे प्रमुख राज ठाकरेंची !


    मराठी माणूस हा इमानी, स्वामिनिष्ठ असल्याचा दाखला इतिहास देतो. उदाहरणार्थ, रामायणातील भरत हा तसा मराठीच ! दशरथाच्या महाराष्ट्रीयन बायकोचा मुलगा. हिचा तकिया कलाम ‘ काय, काय ‘ असल्यामुळे युपीच्या लोकांनी या शब्दाचा अपभ्रंश करत तिला ‘ कैकयी ‘ हेच नाव दिले. एकूण तेव्हाही उत्तर भारतीय मराठी माणसाचा द्वेषच करायची तर ! हि टीप ठाकरे बंधूंना दिलीच पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा कि, भरत हा अतिशय निष्ठावंत. त्यामुळेच भैया रामच्या पश्चात त्याच्या चपला सिंहासनावर ठेवून त्याने राज्याचा सांभाळ केला. तो देखील विश्वस्त म्हणून ! पण राजा नाही बनला. इतकेच काय पण बुडालेली निजामशाही पुन्हा उभी करण्याऐवजी शहाजी स्वतंत्र राज्य निर्माण करू शकला असता पण त्याने तसे केले नाही. बाजीप्रभू शिवाजी विशाळगडी पोहोचून तोफांचे आवाज करीपर्यंत जीव धरून बसला. शहाजी – बाजीची हि परंपरा आम्ही वेगवेगळ्या रूपांत – स्वरूपांत आजपर्यंत पाळत आलोय. राज्य बुडायची वेळ आली. छत्रपतीला हाताशी घेऊन राज्याचं बचाव करण्याची नाना फडणीसला उत्तम संधी असूनही धन्याच्या --- पेशव्याच्या विरोधात कसं जायचं म्हणून तो गप बसला. नानाचाच धडा इतरांनी गिरवला व राज्यनाश स्वस्थचित्ताने पाहिला. परंतु बेईमानी केली नाही. पुढे इंग्रजांचे राज्य आले. त्यांच्याही सेवेत आम्ही रक्ताचं पाणी केलं. ( रक्तभात लिहिणार होतो पण विश्वास पाटलांची हि रेसेपी काही आपल्याला जमत नाही बुवा ! ) इंग्रजी राजवटी विरोधात केल्या जाणाऱ्या कारवाया उलथून पाडण्यात, कट – कारस्थानं उकरून काढण्यात आम्ही रात्रंदिवस एक केला.


    शौर्य, चातुर्य यांत मराठी माणूस कुठेही कमी नसला तरी त्याच्या लाजाळू, अल्पसंतुष्ट, अतिविचारी वृत्ती / स्वभावामुळे तो जगाच्या स्पर्धेत नेहमीच मागे राहिला. आता हेच बघा कि, वाऱ्याच्या वेगाने बाजीराव दिल्लीला गेला. पण हिंदुस्थानच्या सार्वभौम बादशाहाचे शहर, ते लुटलं तर त्याला काय वाटेल इ. अतिविचारांनी शहराबाहेरचे चार दोन पुरे लुटून तो मागे आला. पुढे नादिर व अब्दालीच्या दिल्ली लुटींची  वर्णने वाचून पेशव्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली पण वेळ निघून गेली होती. पुढे सदाशिवराव दिल्लीला गेला पण रुप्याच्या पत्र्याखेरीज त्याच्या हाती काहीच लागले नाही. तेव्हा भाऊने दिल्लीच्या बादशाहचे तख्त फोडल्याचे लिहून आम्ही आमच्याच मनाचे सांत्वन केले.

इंग्लिश राजवटीत इंग्रजांना फक्त पक्षी उडतात हे माहिती असताना आमच्या मराठी माणसाने विमानं बनवून उडवून दाखवले. यापूर्वी हणमंत नावाचा शेवटचा मराठी माणूस रामायणात उडाला होता. त्यानंतर दहा हजार वर्षांनी हा चमत्कार घडवून आणला गेला. परंतु येथेही आमचे स्वभावगुण आड आले. विमान बनवून उडवण्याचा शोध लावूनही ती विद्या विकसित करणे आम्हांला जमलेच नाही. आम्ही आपले एक नेक कार्य करून दर्या में घालून गप्प बसून राहिलो.


    आम्हां मराठी माणसांना दुसऱ्याच्या क्षेत्रात लुडबुड करायची एक चांगली सवय आहे. आता हेच बघा, युपीच्या रामाची बायको लंकेच्या रावणाने नेली तर मराठी मारुतीचे काय गेले ? पण गप्प बसला नाही. त्या भांडणात पडून स्वतःची शेपटी मात्र त्याने जाळून घेतली. आमचा रामदास जन्मभर ब्रम्हचारी राहिला पण विवाहितांना प्रपंच कसा नेटका करावा याची शिकवण देत राहिला. आम्ही त्यांचेच वंशज. अमेरिका, चीन, ग्रीस, रशिया यांच्या आर्थिक प्रश्नांवर आम्ही चर्चा करतो व त्यावरील उपायही सुचवतो. प्रत्यक्षात आम्हांला आमच्या देशातीलच काय पण घरातील आर्थिक प्रश्नांची समज नसते. पण म्हणून काय झालं ? न्यूनगंड आम्ही मनाशी कधीच बाळगत नसतो. आता हेच बघा कि, दोन ठिकाणी लोकसभा निवडणुकीत जिंकून आलेल्या सेल्फी मोदींना आम्ही राज्यकारभार कसा करायचा असतो याचे मोफत, विनामुल्य, न मागता सल्ले देत असतो. प्रत्यक्षात आम्ही साधी वर्गातील प्रतिनिधीची देखील निवडणूक लढवली नाही. पण म्हणून काय झाले ? मोदी असेल देशाचा पंतप्रधान, निवडून तर आम्हीच दिले ना ?
 
    एकूण आम्ही तसे परोपकारी. तरीही लोकं उगाचच मराठी माणसाला नावं ठेवतात. अरे तुम्ही नुसता आमच्या दासरामाच्या दासबोधातील मुर्खांची लक्षणे वाचून बघा. म्हणजे मग कळेल मराठी माणूस काय चीज आहे ते !        

बुधवार, २४ जून, २०१५

धर्मनिरपेक्ष शासनाकडून काही अपेक्षा


धर्मनिरपेक्ष शासनाकडून काही अपेक्षा

१)    सर्व धर्मियांच्या सण – समारंभास कोणत्याही मंत्र्याने, विरोधी पक्षातील तसेच सभागृहात निवडून आलेल्या नेत्याने व शासकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहू नये. अपवाद पोलीस खात्याचा.
 

२)    कोणत्याही धर्मियांच्या सण – समारंभाच्या शुभेच्छा देऊ नये.
 

३)    धार्मिक स्थळांना भेटी द्यायच्या असल्यास सर्वसामान्य नागरीकाप्रमाणे धार्मिक स्थळी जावे. पदास अनुसरुन असलेला लवाजमा तसेच सुरक्षा रक्षकांचा ताफा जवळ बाळगू नये वा सोबत नेऊ नये.
 

४)    कोणत्याही धर्मियांच्या कार्यक्रमास एका रुपयाचाही शासकीय निधी देऊ नये.
 

५)    कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाच्या उभारणीस सरकारी खजिन्यातील एक रुपयाही खर्च केलं जाऊ नये.
 

६)    विविध धर्मांप्रमाणेच जातींनी नटलेल्या या देशातील महापुरुषांची स्मारके तसेच जयंती – पुण्यतिथी साजरी करण्याकरता सरकारने कोणतीही आर्थिक मदत, सवलत देऊ नये. त्याचप्रमाणे शासकीय सुट्टीही न दिली जावी.
 

७)    स्वातंत्र्योत्तर काळात ‘ राष्ट्रपिता ‘ वगैरे ज्या काही राष्ट्रीय अस्मितेशी निगडीत पदव्या आहेत त्यांची निःपक्षपाती चौकशी करून त्याविषयीचा अहवाल सर्वसामान्य जनतेच्या समोर जसाच्या तसा मांडण्यात यावा.
 

८)    मंत्री अथवा प्रशासकीय पदावर कार्यरत असताना पदाशी, कर्तव्याशी प्रामाणिक राहून कार्य करण्याचे प्रयत्न करावेत. जमत नसल्यास पदाचा राजीनामा देऊन तात्काळ सेवामुक्त व्हावे.
 

९)    शासनात सहभागी असलेल्या मंत्र्यांनी तसेच विरोधी पक्षातील व सभागृहात निवडून गेलेल्या नेत्यांनी पक्षनिष्ठा व चमचेगिरीला अवास्तव काय पण अजिबात महत्त्व देऊ नये.
 

१०)    निवडून आलेल्या सभागृहातील नेत्यांना जे दरमहा निर्वाह वेतन मिळते त्यातच त्यांनी आपला उदरनिर्वाह करावा. सर्वसामान्यांना ज्या सेवा ज्या किंमतीत मिळतात तशाच त्या नेत्यांनाही मिळाल्या पाहिजेत. अतिरिक्त फाजील सवलती अजिबात बंद केल्या जाव्यात.

थोडंफार सर्वसामान्य जनतेकडून अपेक्षित असे वर्तन
 

१)    बौद्धिक गुलामगिरी टाळावी.
 

२)    राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी जर खरोखरच तुमचे काम चोखपणे करत असतील तरच त्यांची पाठराखण करावी. अन्यथा त्यांना सक्तीने घरी बसवण्याकरता प्रयत्न करावेत.
 

३)    भ्रष्ट, गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकीय नेते, प्रशासकीय कर्मचारी केवळ आपले जातभाई या कारणास्तव त्यांची पाठराखण करून नये.
 

४)    शेवटी हा देश, हे राज्य संपन्न झाले तर तुमच्याच पुढील पिढ्यांचे, वंशजांचे कल्याण होणार आहे हे पक्केपणी ध्यानी बाळगावे. तेव्हा आपल्या वंशजांच्या हितास हानिकारक, बाधा आणेल अशा प्रवृत्तींना अजिबात खतपाणी घालू नये.  

सोमवार, २७ एप्रिल, २०१५

अस्वस्थ मन



    स्वातंत्र्य मिळून ७० वर्षं उलटायच्या आतच आपण जागतिक महासत्ता होण्याची स्वप्नं पाहू लागलो हि खरोखरच अभिमानाची, गर्वाची गोष्ट आहे. जागतिक महासत्तेचे स्थान मिळवण्यास अमेरिका सारख्या राष्ट्रालाही अनेक पिढ्या खर्ची घालाव्या लागल्या ; पण आपल्या थोर, उदात्त व उच्च भारतीय संस्कृतीच्या बळावर आपण ते स्थान प्राप्त करण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो आहोत

    दळभद्री काँग्रेसने गेली साठ वर्षं या देशाचे शक्य तितके वाटोळं करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु आमच्या बोलघेवड्या मोदींनी अवघ्या काही महिन्यांत या देशाच्या शक्तीसामर्थ्याचा डंका जगाच्या कानाकोपऱ्यात घुमवला. आजवरच्या भ्रष्ट व अकार्यक्षम केंद्र सरकारमुळे परकीय कंपन्या आपल्या देशांत गुंतवणुकीस तयार होत नव्हत्या. त्याच कंपन्या आता दोन्ही हातांनी आपल्या देशाचे दरवाजे ठोठावत उभ्या आहेत. हीच स्थिती कायम राहिली तर या देशातून परत एकदा सोन्याचा धूर निघेल यात आमच्या मनी शंकाच नाही !

    परंतु, आम्हांला वाईट एका गोष्टीचे वाटते व ते म्हणजे आमचा मीडिया आहे --- वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे --- त्याच्या दृष्टीस चांगल्या गोष्टी काही पडतच नाहीत. जेव्हा टीव्ही सुरु करावा अथवा पेपर चाळावा तेव्हा लाचखोरी, खून, दरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, भ्रष्ट न्याय - प्रशासन - पोलिस व्यवस्था, मुजोर लोकप्रतिनिधी, ओला - कोरडा दुष्काळ यांच्याच बातम्या दृष्टीस पडत असतात. काय म्हणावे या कपाळ करंट्यांना ? यांना कोणी गुलाबाचे फुल दिले तर लेकाचे त्याचे काटे मोजून त्यांचे दुष्परिणाम सांगत बसतील. इतके दळभद्री !

    आता हेच बघा ना, आमच्या महाराष्ट्रात सेना - भाजपा - राष्ट्रवादी मिळून किती कार्यक्षमतेने व समर्थपणे राज्याचा कारभार व विकास करत आहेत हे त्यांच्या नजरेसच पडत नाही. जरा कुठे चार - दोन वर्षांची मुलगी पकडून एखाद्या तरुणाने वा वृद्धाने आपली वासना शमवली कि झाली ब्रेकिंग न्यूज ! लगेच दिल्लीची निर्भया वा मुंबईच्या शक्ती मिलच्या उजळणीला आरंभ ! वर्षानुवर्षे गुंड व राजकारण्यांच्या लाथा खाणाऱ्या पोलिसांनी जरा चेंज म्हणून एखाद्या गावा - घरात घुसून कोणाला मारहाण केली तर राज्याच्या पोलिस खात्याची लक्तरे वेशीला टांगली जातात ! रात्रंदिवस ड्युटी करणाऱ्या पोलिसांनी एखाद्या तरुणीला जबरदस्तीने पोलिस चौकीत अंगाखाली घेतले कि, पोलिसांच्या अब्रूचा पंचनामा ! एखाद्या गावी चाराठ दिवसांनी पाणी पुरवठा होत असेल तर लागलीच महाराष्ट्र दुष्काळग्रस्त झाल्याची हाकाटी उठवायची ! अरे, कोट्यावधी लोकसंख्या असलेल्या राज्यात हजार पाचशे माणसं तहानेने व्याकूळली म्हणून काय सबंध राज्यात कोरडा दुष्काळ पडल्याची बोंब ठोकायची असते ?

    मूर्ख लेकाचे शेतकरी कवडीमोल दराचे धान्य पिकवण्यासाठी हजारो - लाखोंनी कर्ज घेताना सरकारला विचारतात का ? नाही ना ? मग अवकाळी पावसाने पिकं झोपली वा पाण्याविना जळाली तर ते सरकारला जबाबदार का धरतात ? हलकट मीडियाही शेतकऱ्यांनाच साथ देत असतो. तरी बरे, आमच्या कार्यक्षम मंत्र्यांनी सुमारे ७० ते ९०% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्याचे जाहीर केलंय. तरीही काही बावळट माणसं घरगुती भांडणातून गळ्याला फास लावून घेतात व मीडिया त्यांस शेतकऱ्याची आत्महत्या म्हणतो !

    अरे, आमचे व्यापारी बांधव स्वतःच्या हिंमतीवर कर्जं काढून व्यवसायाची उभारणी करतात. व्यवसायात अपयश आलं तर प्रसंगी कर्ज देणाऱ्याला गळफास लावून घ्यायला भाग पाडतील पण, शासनाकडे तोंड वेंगाडत जात नाहीत आणि हे दळभद्री शेतकरी --- जरा कुठे ऊन जास्त पडलं, पाऊस कोसळला थंडीचा कडाखा वाढला कि आले सरकारच्या दारात भीक मागायला ! आणि हे पत्रकारही त्यांचाच कैवार घेतात. काय तर म्हणे, व्यापारी संघटीत आहेत अन शेतकरी असंघटीत ! मग आम्ही काय शेतकऱ्यांना संघटीत होण्यापासून रोखलंय ? पण या मूर्ख, अडाण्यांना संघटीत होणं, नेतृत्व निर्माण करणं व त्यावर दबाव कधी जमलेलंच नाही. त्याउलट या देशात - राज्यात सरकार कोणाचे का असेना --- नियंत्रण व्यापाऱ्यांचेच असतं हे काय कोणाला माहिती नाही ? आणि हि तर या देशाचीच नव्हे तर जगभरची परंपरा आहे ! पण आमच्या मीडियाचा एवढा अभ्यास कुठाय ?

    लाचखोरीच्या बातम्या तर अशा दाखवतात कि, जणू काही लाखांची लाच घेऊन त्या व्यक्तीने या देशाचे मोठेच नुकसान केलंय. शेदोनशे वा हजारपाचशेच्या लाचेची बातमी, काय बातमी आहे ? हजारो कोटींचे घोटाळे, भ्रष्टाचार होणाऱ्या या देशात - राज्यात शेदोनशे वा हजारपाचशेच्या लाच खाणे म्हणजे श्रीखंड सोडून शेण खाण्यासारखे आहे. या राज्याला काळिमा आहे. पण मीडियाला एवढी लाज कुठाय ?

    या राज्यातलाच नव्हे तर देशाचा --- जगभरातील मीडिया हा असा समाजावरून ओवाळून टाकलेला आहे.

    पण आम्ही मीडियाला का दोष द्यावा ? मीडियातील माणसं शेवटी या समाजातच वाढलेली आहेत ना ? आमचे राज्यकर्ते, पोलिस, प्रशासकीय अधिकारी, न्यायव्यवस्था - यंत्रणेतील कर्मचारी इ. सर्वजण या समाजाचेच घटक आहेत. त्यांच्यावरील संस्कारही या समाजानेच केले आहेत. मग हा जमीन - आस्मानाचा फरक का व कसा ?

    मोठे मासे लहान माश्यांना गिळतात असे म्हटले जाते व सृष्टीचाही तोच नियम आहे. या मत्स्यनीतीपासून माणसांना का वगळावे ? कारण, मनुष्य हा देखील प्राणीच आहे ना ? मग तो तरी का वेगळा वागेल ?

    कोणत्याही सरकारी - गैर सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना ' वरकमाई ' किती होईल याचा अंदाज आम्ही प्रथम बांधतो. आपल्याहून बलवानाच्या विरोधात आवाज न उठवण्याचे बाळकडू आम्हांला पाजले जाते. ज्यांना चारचौघे आदर्श मानतात, त्यांच्याच मागे निमुटपणे जाण्याची आमची पद्धत आहे. प्रत्येक गोष्टी - समस्येचा विचार केल्यास मेंदवाला सुरकुत्या पडतील व अशा वळ्या पडणं शरीर, परिवार नि समाजाला हानिकारक असल्यानं आपली अक्कल न चालवण्याचा धडा आम्हांला शाळेतच शिकवला जातो. घराबाहेर पडताच दिसेल ती तरुणी - स्त्री हि फक्त भोगण्याची चीज आहे याची शिकवण आम्हांला कुठेही मिळत असते. कधी - कधी तर आम्हांला घरच्या बायकाही निषिद्ध नसल्याचे उपदेश प्राप्त होत असतात. पुरुषार्थ हा फक्त बायकांवर गाजवायचा असतो. तोही जेमतेम १ - २ मिनिटं ! त्या दोनेक मिनिटांसाठी जीवाचा किती आटापिटा होतो, माहित्येय ? त्या क्षणिक सुखाने कोणाचे भावविश्व उध्वस्त होते तर कोणाला नशेची धुंदी चढते ! पण समाज उध्वस्त भावविश्वाला परत उभं राहण्यास मदत करत नाही. कारण, काचेचं भांडं एकदा फुटलं कि झालं, अशी त्याची धारणा आहे ना !

    लाळघोटेपणा, पाय चाटू वृत्ती तर आम्हां सर्वांच्या नसानसांतून खेळत असते. त्यामुळेच कि काय, कुठे काही वेडंवाकडं चाललं कि तिकडे काणाडोळा केला जातो. अगदी सवयीने. उलट अशा कृत्यांची कोणी चर्चा आरंभली कि, घडल्या प्रकारावर पांघरूण घालायला आम्ही हिरीरीने पुढे येतो. बेईमानी आमच्या रक्तातच आहे. न्याय - नीती - देश - कायदा वगैरे थोतांड आहे. त्यामुळे जिकडे बघाल तिकडे तुम्हांला एकचं चित्र दिसणार आहे. फक्त त्यातील तपशीलांत थोडाफार फरक असेल इतकेचं !

    भरकटलेल्या समाजाला वठणीवर आणण्याचं कार्य विचारवंतांचं असतं असे म्हणतात पण अलीकडच्या काळात ' विचारवंत ' हि उपाधी ज्यांस शोभून दिसेल असे किती मनुष्य या राज्यांत आहेत ? त्याउलट विचारवंताचा बुरखा परिधान केलेल्या विकाऊ इसमांचीच इथे चलती आहे. पण त्यांना तरी दोष का द्यावा ? समाजाचे हित साधले तर समाज काही त्यांचे घर चालवत नाही. शेवटी पोटासाठी माणसं जिथं आपले बुद्धी, शील, नातलग, अवयव विकतात तिथे स्वाभिमान आता काय चीज आहे ?