शुक्रवार, २३ जुलै, २०२१

चाळीशी

चाळीशी.. एक अपरिहार्य वास्तव… वयाचा टप्पा.. सहजासहजी न ओलांडता येणारा… तसं पाहिलं तर आपण वयाच्या कोणत्याच टप्प्यावर एवढं विचाराक्रांत होत नाही. ज्या उत्साहाने पंचविशी स्वीकारली त्याच तिशी - पस्तिशी.. परंतु चाळीशीच्या बाबतीत तसं बोलायची सोय नाही.

इथं तुम्ही धड तरुण नसता की प्रौढ वयस्क. काहीशी मधली अवस्था असते. तारुण्याची उर्मी सरलेली नसते न् प्रौढत्वाची जाणीव आपल्या मनातून जात नसते. 

पस्तिशीपर्यंत मनात जपलेलं बालपण कुठेतरी हरवू लागतं.. जबाबदारीच्या जाणिवा तुमच्यातील मूल मारून टाकतात. तसं पाहिलं तर बालपण, तारुण्य या अवस्था कधी मला उपभोगता आल्या नाहीत, परंतु त्यांची खंत कधीच वाटली नाही. पण ही प्रौढत्वाकडे नेणारी.. सॉरी, त्यावर शिक्कामोर्तब करणारी चाळीशी मात्र अस्वस्थ करणारी नक्कीच आहे.

 देव आनंदने कधी पस्तिशी स्वीकारली होती का ? नाही म्हणजे कणेकरी लेखांवर मोठे झालेले आम्ही. त्यामुळे देव आनंद नेहमी पंचविशीतच मनाने राहिला असावा, अशी एक भाबडी समजूत आहे, म्हणून म्हटलं. पण मनाने चिरतरुण राहण्याची किमया मला वाटतं एखादा देवच करू शकतो. जसं मरेपर्यंत आशिक मिजाज राहणारा हसरत जयपुरी. पन्नाशी नंतरही तितक्याच उत्कट आतुरतेने ' कांटे नहीं कटते यह दिन यह रात.. ' म्हणणारा किशोर तरी कुठे वेगळा होता म्हणा.. खऱ्या आयुष्यात कधीही न भेटलेले पण नेहमी आपलेच वाटणारे हे खरे सहप्रवासी, आधारस्तंभ म्हणता येतील. असो. मनातील सर्वच भावना कधी कधी शब्दबद्ध करता येत नाहीत व करण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रेमपत्राचं जाहीर वाचन केल्यासारखं हास्यास्पद होतात. तेव्हा इथंच आवरतं घेतलेलं बरं ! 

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

फिल्मी मुशाफिरी ( भाग - ३ )


राजकुमार.. हा फिल्म इंडस्ट्रीचा खरोखर राजकुमार होता. मूळ नाव कुलभूषण पंडित. प्रथम नोकरी पोलिस खात्यात. तिथून स्वारी अभिनयाकडे वळली म्हणण्यापेक्षा फिल्म इंडस्ट्रीत प्रवेशली म्हणणंच सयुक्तिक ठरेल. कारण अभिनयाच्या प्रचलित मापदंडात तो कधीच कुठे बसला नाही. ना तो दादामुनी अशोककुमार प्रमाणे घरातील एक बुजुर्ग सदस्य वाटला, ना दिलीपकुमार प्रमाणे ट्रॅजेडी किंग ना धर्मेंद्र प्रमाणे ही मॅन बनला. जितेंद्र प्रमाणे उड्या मारत नाचणे त्याला कधी जमलेच नाही. देव आनंद प्रमाणे हिरोईनच्या अवतीभवती फुलपाखरासारखा तो बागडला नाही की अमिताभच्या अँग्री यंग मॅन इतका तो भडक झाला नाही. 

एवढं सगळं असूनही बॉलिवूडचा तो एक प्रतिथयश नट होता. त्याच्या नखऱ्यांचे खरे खोटे किस्से आजही चवीने चघळले जातात. तेही त्याने या दुनियेचा निरोप घेऊन जवळपास दोन अडीच दशके उलटल्यानंतर. यावरून लोकमनावरील त्याच्या गारुडाची कल्पना यावी. 


राजकुमारने आपल्या सुरवातीच्या काळात केलेला अभिनय मला नेहमीच थोडासा लाऊड वाटला. पण वक्त मधल्या राजू / राजाच्या रोलपासून त्याची स्वतःची एक स्वतंत्र अभिनयशैली जन्मास आली. 

खर्जातील आवाज आणि भाषेवरील कमांड. यांमुळे वेळ घेत एकेक शब्द मोजूनमापुन बोलण्याची त्याची अदा.. ती देखील अतिशय संयतपणे.. प्रेक्षकांना मोहून गेली.

कल्पना करा.. वक्त मधला " यह बच्चों के खेलने की चीज नहीं.." हा मदन पुरीला ( बलबीर ) उद्देशून म्हटलेला डायलॉग दिलीपकुमार किंवा अमिताभने म्हटला असता तर त्यातील उपहास, गर्भित धमकी आणि बेदरकारपणा ते दाखवू शकले असते का ? तीच कथा रहमानला ( चिनॉय सेठ ) उद्देशून बोललेल्या " जिनके अपने घर शीशे के हो.." या अजरामर संवादाची !


परंपरेनुसार राजकुमारलाही काही काळ नट्यांसोबत पडद्यावर रोमान्स करत गाणी म्हणावी लागली. पण त्यातील अपवाद वगळता त्याच्या पर्सनॅलिटीला फारशी सूट झाली नाहीत. बहुधा मन्ना डे खेरीज इतर कोणत्याच गायकाचा आवाज त्याच्या चेहऱ्याला फिट्ट बसला नाही, हेच त्यामागील कारण असावं. अपवाद हीर रांझा मधील यह दुनिया यह महफील गाण्याचा. पठ्ठ्यानं बहुधा फर्स्ट टाइम रफीच्या आवाजाला न्याय दिलाय ! 

राजकुमारचा फिल्मी डान्स देखील त्याच्या अभिनयासारखाच होता. त्यात कुठेही धर्मेंद्रसारखा अवघडलेपणा नाही की  देवआनंद चंचलता नाही. मनात आलं.. थोडं थिरकलं की झाला नाच. पण त्यातही एक ग्रेस आणि अदब होती. जी त्याच्या पर्सनॅलिटीला मॅच व्हायची. उदाहरणार्थ,हिंदुस्थान की कसम मधील ' हर तरफ अब यही अफसाने है..' एक दोन ठिकाणीच जानीने पदन्यास केलाय.. पण तोदेखील उत्स्फूर्त वाटावा असा. त्यात कृत्रिमता अजिबात नाही. 


राजकुमारच्या अभिनयाबद्दल बोलताना मला त्याचा एक सीन आठवतोय. पिक्चर तोच आपला..वक्त. क्लायमॅक्सला राजू ( राजकुमार ) लाला केदारनाथला ( बलराज साहनी ) त्याच्या मुलांची ओळख करून देत असतो. त्या सीनमध्ये राजकुमारने अक्षरशः जीव ओतून ऍक्टींग केलीय असं मला नेहमीच वाटत आलंय. पण त्याचं बॅडलक म्हणजे त्याच्यासमोर बलराज साहनी सारखा तगडा अभिनेता होता. ज्याच्या हरवलेल्या मुलांच्या भेटीसाठी व्याकुळ लाला केदारनाथ समोर जानीचा राजू साफ झाकोळून गेला. 


एका टप्प्यावर आपण हिरोच्या भूमिकेत बसत नाही लक्षात येताच तो कॅरेक्टर रोलकडे वळला. पण खंगलेला बाप, आजा हे रोल त्याने क्वचितच केले असतील. मोस्टली तो खानदानी रईस किंवा सरकारी अधिकाऱ्याच्याच भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला. मग तो पुलिस पब्लिक मधला सीबीआय ऑफिसर जगमोहन आझाद असो की सूर्या मधील डिस्ट्रिक्ट कलेक्टर राजपाल चौहान !

तिरंगा मधील ब्रिगेडियर सुर्यदेव सिंह आणि सौदागरच्या राजेश्वर सिंग उर्फ राजुची मोहिनी अद्यापि कायम आहे.


राजकुमारने या दुनियेचा निरोप देखील आपल्या स्टाईलने घेतला. महाभारतातील भीष्माचे कल्पित इच्छामरण त्याला नव्हते पण आपण जाताना व गेल्यावर काय करावे हे ठरवण्याचे त्याच्या हाती निश्चित होते व त्याने तसेच केले. त्याचे निधन, अंतिम संस्कार घडून गेल्यावर कळलं की इंडस्ट्रीचा राजकुमार गेला ! 


राजकुमार हयात असताना व तो गेल्यावर त्याच्या फिल्मी उत्तराधिकाऱ्याचा शोध घेतला जाऊ लागला. काहींना मुकेश खन्ना त्याचा पडद्यावरील वारसदार वाटू लागला पण.. ती अदा, घमेंड, मग्रुरी, रग, बेफिकिरी आणि अदब.. मुकेश खन्नाच काय पण इतर कोणत्याही अभिनेत्यात परत दिसली नाही. कारण परमेश्वराने स्वतःच्या मर्जीने जगणारा व एक्झिटचे डिटेल्स ठरवणारा एकच अवलिया जन्माला घातला होता.. व तो म्हणजे राजकुमार ! 


जाता जाता… मराठी प्रेक्षकांत राजकुमारला पुन्हा एकदा भूतकाळातून वर्तमानात आणायचं कार्य झी मराठी वाहिनीवरील ' फु बाई फु ' च्या एका पर्वात अभिनेते सुनील तावडेंनी केलं. त्यांनी रंगवलेला राजकुमार व सागर कारंडेचा रजनीकांत. तुफान परफॉर्मन्स होता. त्याबद्दल या उभयतांचे मानावेत तितके आभार थोडेच आहेत !

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

फिल्मी मुशाफिरी ( भाग - २ )

सिनेतारकांना जसं सौंदर्याचं वरदान आहे तद्वत वाढत्या वयाचा शाप देखील आहे. साधारणतः तिशीच्या आसपास येताच किंवा तिशीपार होताच अभिनेत्रींच्या निवृत्तीचे सर्वांनाच वेध लागतात. पण त्याचवेळी पडद्यावरील हिरोच्या वाढत्या वयाचा, मंदावलेल्या हालचालींचा सर्वांनाच सोयीस्कर विसर पडत असतो.

नटीच्या चेहऱ्यावरील वाढतं वय डोळ्यांना खुपतं. पण नटाच्या वाढत्या वयाकडे दुर्लक्ष करून त्याच्यातील परिपक्व अभिनयाकडे पद्धतशीरपणे लक्ष वळवलं जातं. एखादीच विजयाशांती, श्रीदेवी किंवा साऊथची ऍक्शन क्वीन मलश्री आपला रुबाब टिकवून राहते. बाकीच्यांची ड्रीमगर्ल, धक धक गर्ल म्हणून बोळवण केली जाते.

कधीकाळी इंडस्ट्रीत स्त्री प्रधान चित्रपट बनत होते. पण पुढे नायिकांचं स्थान चार दो आँसू बहाके, नाच - बागडके चल दिए… मराठीमध्ये तर याहून भयाण परिस्थिती. 

ग्रामीण परंपरा दाखवणारा एक प्रवाह तर दुसरा शहरी सुधारकांचा. नंतर लाट आली तमाशापटांची. ती ओसरेपर्यंत माहेरच्या साडीने आसवांचे पूर वाहवले. सोशिक सून, कजाग सासू, ठसकेबाज नणंद, लंपट दीर आणि अंगानं वाढलेला डोक्यानं गेलेला नवरा. दोन अडीच तासांच्या रडारडीत खेळ खल्लास. नाही म्हणायला दादा कोंडके व नंतर अशोक - लक्ष्याचा विनोदी चित्रपटांचा सुखद आधार असला तरी पुढे पुढे त्यांचंही अति झालं न् हसू येईनासं झालं. या सगळ्या गदारोळात चित्रपटाला लागणारी एक चांगली सशक्त कथा व त्यातील नायिकेचं स्थान, हे मात्र दुर्लक्षित राहिलं...

बरं, आपल्याला काही फिल्म इंडस्ट्रीच्या हिस्ट्रीशी देणं घेणं नाही. आपण आपलं नट्यांपुरतंच बोलू.

फिल्मी नट्यांइतकं सोशिक जगात इतर कोणी असणार नाही.. असूच शकणार नाही. परदेशातील हाडं फोडणाऱ्या थंडीत अर्धवस्त्रांकीत अवस्थेत गाण्याचं शूटिंग करताना चेहऱ्यावर प्रणयातुर, लज्जित भाव दर्शवणे काय खायचं काम आहे ! 

त्यात दाक्षिणात्य सिनेमा असेल तर मग… हिरो गळ्यापासून पायापर्यंत पॅक असणार. नटीनं मात्र ट्रॅडिशनल हाफ साडी किंवा शॉर्ट स्कर्ट घालायचे. त्याच्या पायात बूट असले तरी तिच्या पायातील पैंजण दाखवण्यासाठी तिला बर्फात अनवाणी चालवणार किंवा चप्पल / सँडल देणार.

त्यामानाने मराठी तारका भाग्यवान असं जर तुम्ही म्हणणार असाल तर त्या भ्रमात राहू नका. जरी आपलं बजेट नट्यांना बर्फात नाचवण्याचं नसलं तरी गवतात, कुसळांत लोळवण्याचं जरूर असतं. आता बर्फ बरा की कुसळं… खैर, जाने भी दो. 

मागे एकदा टीव्हीवर जॅकी श्रॉफ उर्फ जग्गु दादाची मुलाखत बघत होतो. बोलता बोलता भिडू बोलला की, हिरो का कोणत्या तरी मुव्हीतील गाण्याच्या शूटिंग वेळी मीनाक्षी शेषाद्री तापाने आजारी होती. पण त्याही अवस्थेत ते रोमँटिक गाणं तिनं शूट केलं. इथं आपल्याला ताप आल्यावर अंगावर थंड पाण्याचे चार दोन थेंब पडले तरी काटा मारतो आणि इकडे…!

पण हे वरवरचं झालं. इंडस्ट्रीतील तारकांची दुसरी बाजू याहून भयानक असेल का? म्हणजे महिन्यातील ते काही दिवस, शूटिंगसाठी त्या वेळी ब्रेक घेऊ शकतात का ? वयानुरूप त्यांना लग्नाची, संसाराची इच्छा झाल्यास त्यांच्यासमोरच का लग्न की करियर ? हा प्रश्न उभा राहावा.

लग्नानंतर नट्यांना रोमँटिक सीन देता येत नाही, त्यांना संसारामुळे कामाकडे लक्ष देता येत नाही असं म्हटलं जातं. पण मग मौसमी चॅटर्जी, करीना कपूरचं काय ? त्यांना तर रोमँटिक सीन देताना काही प्रॉब्लेम आल्याचे दिसत नाही. हां.. आता रोमॅंटिक सीनची परिभाषा म्हणजे स्मूच, हाफ न्यूड ही असेल तर मग विषयच खुंटला ! 

कारण आपली पुरुषप्रधान संस्कृती. विवाहितनट असे सीन देऊ शकतो पण नटी नाही. नटाच्या वैवाहिक जीवनावर फारसा परिणाम होत नाही पण नटीच्या होतो वगैरे वगैरे. असो.

हे जरा जास्तच सिरीयस झालं. चेंज द टॉपिक.. बॉलिवूड इंडस्ट्रीत काही मजेदार योगायोग असेही घडतात. बेताबमध्ये सनी देओल सोबत पदार्पण करणाऱ्या अमृता सिंगने स्वप्नात देखील विचार केला नसेल की, याच सनीच्या बापाबरोबर तिला हिरॉईनचं काम करावं लागेल. असाच योगायोग रीना रॉय, जयाप्रदा, श्रीदेवी, माधुरी सोबतही घडला आहे. पण कोणत्या नटाच्या बाबतीत असा योगायोग घडलाय का ? की त्याने रियल लाईफ आई - मुलगी सोबत रील लाईफमध्ये प्रियकराचा रोल केलाय. उत्तर मिळाल्यास जरूर कळवा. तोवर अलविदा.. टेक केयर !!

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

फिल्मी मुशाफिरी ( भाग - १ )

लार्जर दॅन लाईफ अशा फिल्मी / रुपेरी पडद्याचे आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे. बालपण ते मृत्यू -- हरएक जीवनाचा टप्पा या रूपेरी पडद्याने व्यापला आहे. मनोरंजनापासून रोजीरोटीचे साधन असे याचे रूप आहे. कधीकधी विचार करतो की, हा रुपेरी पडदा जर आपल्या आयुष्यातून वजा झाला तर…! कल्पनाच करवत नाही.


खूप वर्षांमागे मी जॉनी वॉकरची मुलाखत बघितली होती. त्यात त्याने एक सुंदर दृष्टांत दिला होता. त्याचा सारांश असा की, परमेश्वर सर्वशक्तिमान असला तरी स्वप्नं बघण्याची शक्ती / देणगी फक्त माणसालाच मिळाली आहे. 


सिनेमाचंही असंच आहे. इथे पडद्यावर कधी वास्तवतेहून भयाण तर कल्पिताहून सुंदर चित्र उभारलं जातं. त्यात आपण आपल्या मगदुराप्रमाणे स्वतःला हरवून जातो. पडद्यावरील प्रसंगांचे आपल्या अंतरंगात प्रतिसाद उमटत असतात. कधी पडद्यावरचा फॅमिली ड्रामा पाहताना आपला परिवार आठवतो तर रोमान्स करताना जोडीदार. ( पण पडद्यावर हिरोकडून बुकलून घेणाऱ्या व्हीलनमध्ये क्वचितच कोणाला रियल लाईफमधील खलनायक दिसत असेल. )

कुठे दर्दभरे गीत वाजू लागले की आपल्या मनातील अव्यक्त भावनांचा प्रवाह बांध फोडून वाहू लागतो. किंबहुना दर्द ए दिल हलकं करण्याचं उत्तम साधन म्हणूनही फिल्मी संगीताकडे बघता येतं. 

फिल्मी कॉमेडीही अशीच. एकीकडे जॉनी वॉकर, किशोरकुमार, देवेन वर्मा तर दुसरीकडे जगदीप, मेहमूद, राजेंन्द्रनाथ हे नग म्हणजे दोन ध्रुव.

एका बाजूच्या विनोदाला सभ्यता, अव्यंग ( शारीरिक अर्थाने ) यांचे स्वतःहून आखलेले बंधन आहे तर दुसऱ्याला कसलेच निर्बंध नाहीत. रसिक दोन्ही एन्जॉय करतात तर भक्त - समीक्षक कुंथत बसतात. 


कॉमेडीचा विषय निघाला आहे तर ऍक्टिंगमध्ये सर्वात जास्त सिरीयस, टफ विनोदी भूमिका मानली जाते. याबाबतीत अनुक्रमे कादर खान, गोविंदा हे खरोखरी किंग आहेत. या दुकलीने जितक्या गांभीर्याने फिल्मी कॉमेडीला अतिशय सहजसुंदररित्या रुपेरी पडद्यावर सादर केलंय, तितकं क्वचितच कोणी केलं असेल. 


कॉमेडी प्रमाणेच अभिनयाचा खरा कस लागतो निगेटिव्ह, खलनायकी भूमिकेमध्ये. आपल्याकडे फिल्मी व्हिलनचे रोल्स स्टार्ट टू एन्ड एकांगी पद्धतीने लिहिले जातात. मनुष्य म्हटल्यावर राग, लोभ, दुःख, द्वेषादी स्वभावगुण आले. पण आपल्याकडे व्हिलनला राग, लोभ या दोनच छटा साकारण्यास मिळतात. क्वचित पडद्यावरील जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचे दुःख दर्शवण्याची संधी मिळते. पण ती एकूण भूमिकेच्या मानाने अगदीच नगण्य असते. 

यादृष्टीने पाहिलं तर ' शोला और शबनम ' मधील गुलशन ग्रोव्हरचा एक सीन मला आठवतो.

आख्ख्या सिनेमात गुल्लूने ' काली ' जबरदस्त रंगवला असला तरी जेव्हा त्याचा भाऊ ' बाली ' ( मोहनीश बहल ) जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणला जातो तेव्हा, काली मधल्या प्रेमळ वडील भावाच्या मनाची तगमग त्याने ज्या तऱ्हेने पेश केलीय त्याला तोड नाही. केवळ त्या सीन पुरते आपण कालीचे तोपर्यंत दृष्टीस पडलेले सर्व क्रौर्य विसरून जातो.

थोड्याफार फरकाने ' घातक ' मध्ये डॅनीचा कात्या पण.. सनीने त्याच्या भावांना मारल्यावर शोकमग्न होतो. 

' ओह डार्लिंग यह इंडिया ' मधला डॉन अमरीश पुरी, स्वतःच पेटवलेल्या दंग्यात आपला सणकी मुलगा ( जावेद जाफरी ) मरेल म्हणून बापाच्या काळजीने त्याला शोधताना दिसतो. सारांश, खलनायकी व्यक्तिरेखेचे इतर कंगोरे दर्शवण्यास देखील अंगी तितकेच उत्तम कलागुण लागतात.

 ( क्रमशः )

       

 


बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

प्रासंगिक ( ९ )

सध्या देशात जे काही चालू आहे, त्यामागे धार्मिक वर्चस्ववाद आहे. तुम्हांला कदाचित धक्का बसेल की आत्ताच्या काळात आणि धार्मिक वर्चस्वतावाद ! मग नक्कीच तो मुसलमानांचा असणार !! पण नाही. 

मुस्लिमांचा वर्चस्वतावाद स. १९४७ ला फळणीसोबतच संपुष्टात आला. जरी त्यांच्यातील काही माथेफिरूंच्या मनात या वर्चस्वतावादाच्या कल्पना घोळत असल्या तरी ती दिवास्वप्नं आहेत. कधीही साकार न होणारी.

ख्रिश्चनांमध्ये असा उपद्व्याप करण्याइतका जीव नाही. जैन, बौद्ध, पारसी, शीख इ. आपापल्या टापूत समाधानी आहेत. तसे वर्चस्वतावादापासून हेही अलिप्त नसले तरी मुळातच शक्ती क्षीण असल्याने यांच्या स्वप्नांना कवडीइतकी किंमत नाही. मग हा धार्मिक वर्चस्वतावाद आहे तरी कोणाचा ?


स. १९४७ पर्यंत या देशावर हिंदू राज्य करणार की मुसलमान ? या तंट्याकडे दोन गट काठावर बसून बघत होते. एक इंग्रज, जे राज्यकर्ते असल्याने हिंदूंच्या तुलनेने मुस्लिमांची तळी उचलून धरणारे व दुसरे वैदिक ! 

या धर्मियांची संख्या अत्यल्प. परन्तु हिंदू धर्मसाहित्यात यांनी अशी काही घुसखोरी करून  ठेवलीय की अद्यापि हिंदूंना हे आपल्यातीलच एक वाटतात. यामुळेच यांच्या हिंदुत्ववादी आवाहनास -- जे प्रत्यक्षतः वैदिकवादी असते -- मूर्ख हिंदू सहजी बळी पडतात. 


स. १९४७ पूर्वीही ते राजकीय पटलावर होते. त्यावेळी काँगेस त्यांच्या ताब्यात होती. पुढे गांधीयुगात तिचे वैदिक स्वरूप मावळून त्यास हिंदू चेहरा येऊ लागला. गांधीला लाख तुम्ही शिव्या घाला, पण त्याच्या राजनीतीमुळे -- मग भले ती हेकेखोर, विचित्र का असेना -- या देशाला निधर्मी राज्यघटना लाभली. पुढे गांधी हत्येनंतर काँग्रेसही रूप बदलत गेली. तिचे अवनत स्वरूप आज आपल्या समोर आहेच.


दुसऱ्या महायुद्धात सावरकरांनी भारतीय तरुणांना सैन्यात जाण्याचा संदेश दिल्याचे सांगितले जाते. ज्याचे उद्दिष्ट सावरकर समर्थक सावरकरी संदर्भाने स्पष्ट करत असतात. सावरकरांचा हा मंत्र वेगळ्या अर्थाने त्यांच्या वैदिक धर्मबांधव संघटनेने -- अर्थात संघाने अंमलात आणला. जेणेकरून संघीय विचारांचे तरुण प्रशासकीय सेवेपासून ते गल्ली बोळातील संघ विरोधी पक्ष - संघटनांमध्ये जाऊन बसले. त्याचे विकसित रूप आपल्यासमोर आज असे आहे की, देशात वैदिक संघाच्या प्रभावाखाली नसलेल्या पक्ष - संघटना अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत राहिल्या आहेत.


आज देशातील बहुतेक प्रमुख सूत्रं वैदिक संघाच्या हाती एकवटली आहेत. लोकशाहीचे खांब यांनी जवळपास पोखरून टाकले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की आपल्या मनसुब्यात ते यशस्वी झाले आहेत.


राजकीय पटलावर जोराने बाऊन्स बॅक करण्याची हिंदूंना अद्यापी संधी आहे. या कामी आपले विचार, भूमिका, तत्व त्यांनी पुन्हा एकदा घासून पुसून स्वच्छ करून पाहिले पाहिजेत. तुमच्यावर लादली जाणारी विचारसरणी, नेतृत्व तुम्ही लाथाडलं पाहिजे. तुमच्या प्रतिनिधीवर त्याच्या पक्षाचे वा प्रमुखाचे नव्हे तर तुमचे वजन, दडपण असले पाहिजे. 


मुठभरांची हुकूमशाही म्हणजे लोकशाही, हे सध्याचे चित्र तुम्हांला बदलायचं असेल तर थोडाफार त्याग करण्याची ; संयम, धैर्य राखण्याची शिस्त तुम्ही बाळगली पाहिजे. दुसऱ्याने लादलेल्या भावनिक मुद्यांकडे तुम्ही वास्तव नजरेने पाहिले पाहिजे. लक्षात घ्या, वैदिकांचे आजचे यश ही जवळपास चार दोन पिढ्यांच्या संघर्ष त्यागाची कहाणी आहे. मूठभर वैदिक जर हे कर्म करू शकतात तर बहुसंख्यांक हिंदू का नाहीत ? की आयुष्यभर पिढ्यान् पिढ्या गुलाम म्हणून जगण्यासाठी व ऊर बडवून घेण्याकरताच आपण हिंदू बनलोत याचा विचार व्हावा ! 



सोमवार, १७ जून, २०१९

प्रासंगिक ( ८ )



लोकसभा निवडणूक निकालानंतर देशात, राज्यात बऱ्याच घटना घडल्या. काही सामाजिक तर काही राजकीय स्वरूपाच्या. परंतु त्या प्रत्येक घटनेने आपल्या एकूणच व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह मात्र उपस्थित करून ठेवले.


मनुष्य जीवन निर्मिती नंतर त्याची प्रगतीकडे वाटचाल सुरु झाली. आदीमानव ते आजच्या जगातील मनुष्य. साऱ्यांची धडपड केवळ अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी.
प्रगतीचा निकष लावू पाहता जगातील एकूणएक मनुष्यमात्राच्या या तिन्ही गरजा भागल्या आहेत का ?
ज्यांना आपण प्रगत राष्ट्र म्हणतो, त्यांच्या प्रगतीचे मापक काहीही असले तरी, स्वराष्ट्रातील एकूणएक व्यक्तीच्या मूलभूत गरजा भागवू शकलेत का ?
त्या तुलनेनं आपण तर विकसनशील राष्ट्रांत मोडतो. मग आपली प्राथमिकता कोणत्या गोष्टीस हवी ?

देश पातळीवर तेच राज्य पातळीवर या न्यायाने पाहता, राज्यात बऱ्याच ठिकाणी तीव्र पाणीटंचाई, चारा टंचाई आहे. हातातील सत्तेच्या बळावर वर्तमानपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांवरून या बातम्या दूर सारून राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू पाहत आहे. त्यातच विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मंत्रिमंडळ विस्तार व त्याकरता फोडाफोड करून जमवलेल्या आमदार - नेत्यांचे भपकेदार शपथविधी व त्यांच्या भरमसाठ वर्णनांनी भरलेली वर्तमानपत्रं अन् तासन् तास रसहीन वाळकं हाडूक चघळल्या प्रमाणे चालणाऱ्या वृत्तवाहिनीवरील चर्चा.
ज्यांच्या खांद्यावर लोकशाहीचा, किंवा हि पारिभाषिक संज्ञा जरी बाजूला ठेवली तरी ही जी सर्व माध्यमं आज उपलब्ध आहेत.. अगदी हे सोशल मीडिया देखील. त्याचा अंती उद्देश काय ? तर हाच कि, समाजातील एकूणएक घटकाची, मनुष्यप्राण्याची अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यास प्रयत्नशील राहावे. सरकारचे, सरकारवर अंकुश ठेवणाऱ्या जनशक्तीचे लक्ष वेधणे. प्रत्यक्षात दिसतं तर काय ?
मार्केटिंग कंपन्यांनी केलेल्या क्रिकेट मॅचेसच्या प्रचारातील उन्माद.
ज्या राज्यात लग्न ठरलेली मुलगी, लग्नाच्या दिवशी अंतरपाटाजवळ उभं राहायचं सोडून तशीच नववधुच्या वेशात तळ गाठलेल्या विहरीतून पाणी काढण्यासाठी धडपडत असते.. त्याच राज्यातील सरकारांत सहभागी पक्षाचे नेते परराज्यात राम मंदिर बांधावे याकरता केंद्र सरकारकडे अध्यादेश काढण्याची, कायदा करण्याची भीक मागतात. त्यांना या जनतेची, या आयाबहिणींची फिकीर नसते, ज्यांच्या पुढे ते मतांचा जोगवा मागत फिरलेले असतात. आणि हे केवळ सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षांतही तेच सुरू आहे. आणि या राजकीय बगळ्यांची जीहुजरी करणारेही तेच आहेत -- ज्यांना दुष्काळाच्या तीव्रतर झळा बसलेल्या आहेत. घरात नाही पाणी, आम्ही साहेबांचे इमानी हेच यांच्या आयुष्याचे सूत्र व हीच त्यांची कमाई.

अमुक एका जाती जमातीची व्यक्ती डॉक्टर झाली म्हणजे तिने मोठी सामाजिक क्रांती केली व या क्रांतीचे आपण एक साक्षीदार, भागीदार आहोत हे न समजता जणू काही तिने चोऱ्यामाऱ्या करून डॉक्टरेटची डिग्री मिळवली म्हणून तिला जीव देण्यास भाग पाडण्याइतपत आम्ही प्रगती केली आहे.
काल परवा कुठल्या तरी मंदिरात दानपेटीतील पैसे चोरल्याच्या आरोपावरून अल्पवयीन मुलास तापलेल्या फरशीवर नग्नावस्थेत बसवून त्याच्या पार्श्वभागाची सालटं काढण्यात आली. कोणत्या कारणास्तव मानवी क्रौर्याने ही मजल गाठली माहिती नाही पण जातीय स्वरूप लादून त्या मुलाच्या कोवळ्या मनात जे आयुष्यभराचं जातीयतेचं जहाल विष आम्ही कालवलंय त्याचा उतारा कोठून आणणार ?
सनदी अधिकाऱ्याची परीक्षा देणारे, सुशिक्षित समजले जाणारे तरुण अमुक एका धर्माच्या तरुणीवर बलात्कार करण्याची इच्छा मनोमन बाळगून राहतात. नव्हे ती चारचौघांत बोलून त्यावर कौतुकाचा वर्षावही प्राप्त करून दाखवतात.
हे सर्व पाहिल्या - ऐकल्यावर खरोखर विचारावं वाटतं स्वतःला कि, खरंच आपण कुठे चाललोय ?
जगण्याच्या स्पर्धेत काही गोष्टी क्षम्य असतात हे जरी मान्य केलं तरी इतक्या क्षम्य असाव्यात कि, जिथे मनुष्य व पशुतील सीमारेषा धुसूर व्हाव्यात ?
हीच जर का आपली प्रगतीची व्याख्या असेल तर यापेक्षा ती आदिम जीवनातील अधोगती बरी. निदान त्याला आपल्या मूलभूत गरजांची तर जाणीव होती. इथे मूळ संवेदनाच नसल्याने संवेदनशीलतेचा प्रश्नच नाही. ही मढ्यांची दुनिया आहे. जिवंत माणसाला इथे स्थान नाही !

शनिवार, ४ मे, २०१९

फिल्मी दहीवडा (१)





    इंटीमेंट सीन्स हा आपल्या फिल्मी दुनियेचा एक अविभाज्य घटक आहे. तुम्ही कितीही नाकं मुरडली तरी याच्याशिवाय तुमचा सिनेमा पूर्णच होऊ शकत नाही. मूकपट कि बोलपट हे माहिती नाही पण भारतीय सिनेमात पहिलं ऑन स्क्रीन चुंबन दृश्य देविकाराणीने दिल्याचं मानलं जात असलं तरी तिच्याही पूर्वी सीता देवी, ललिता पवार यांनी किसींग सीन दिल्याची माहिती मिळते.

    इंटीमेंट चित्रीकरणातही आपल्याकडे तसा भेदभाव असतो. म्हणजे हिरो हिरोईनच्या प्रणयात दोन फुलं एकमेकांवर आदळतात. जर त्यांची सुहागरात असेल तर घुंघट उठा के मुखडा दिखाकर बत्ती बुझ जाती थी... किंवा मग जास्तच धाडसी म्हणजे हाथों में हाथ असलेल्या स्थितीत बेड भोवतालच्या फुलांच्या माळांपैकी एक चार दोन तोडताना दाखवल्या कि समजायचं झालं याचं !
    त्याउलट व्हिलन आणि व्हॅम्प यांच्या प्रणयात शक्य तितका धसमुसळेपणा, खेचाखेची, गुडघ्यापर्यंत उघडे पाय.. हेलन, बिंदू, अरुणा इराणी ते शेवटी कुनिका लाल पर्यंत येऊन या प्रथेचा अंत झाला. आजकाल हिंदी सिनेमात पूर्वीसारखे रसिक व्हिलनच उरले नाहीत तर व्हॅम्प तरी कुठून येणार म्हणा !
    प्रणय प्रसंग वा कल्पना भारतीयांना नव्या नाहीत. जगाला कामसुत्राचे धडे एका भारतीयानेच दिले असे आम्ही अभिमानाने सांगत असलो तरी स्वतः मात्र संभोगाचे ज्ञान सध्या परदेशी बी पॉझिटिव्ह बघून, अतिशयोक्तीही झक मारेल अशा संभोगकथा वाचून घेत असतो. यावरून आमच्या उच्च अभिरुची संपन्नतेची कल्पना यावी.
    फिल्मी दुनियेतील मंडळीही या आमच्या समाजाचाच घटक असल्याने त्यांचीही मानसिकता फारशी वेगळी नाही. त्यामुळेच हिंदी सिनेमात जे जे आजवर इंटीमेंट सीन्स येऊन गेलेत त्यातील मोजके वगळता इतर सर्व वर्स्ट कॅटेगरीत मोडणारेच आहेत.          

    उदाहरणार्थ रेखा, स्मिता पाटील, नीना गुप्ता या इंटिमेट सीन्सच्या बाबतीत बेस्ट एक्ट्रेस होत्या असं माझं मत आहे आणि यांच्या वाट्याला तशी दृश्यंही आली. पैकी प्रथम आपण स्मिता पाटीलचे सीन्स विचारात घेऊ.
     

    जयाप्रदा, राजेश खन्ना आणि स्मिता पाटील यांचा ' दिल ए नादान ' नावाचा एक सिनेमा होता. पिक्चर आपण पाहिलेलं नाही. त्यामुळे स्टोरी माहिती असण्याचा प्रश्नच नाही. फक्त एवढं माहित्येय कि, जयाप्रदा राजेश खन्नाची हिरोईन असते. ( क्या नॉलेज है ! व्वाह !! ) तर सीन असा आहे कि, कुठल्या तरी कारणांनी राजेश खन्ना जयाप्रदाला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. तेही रात्री. आणि नेमकं त्याच वेळी जयाप्रदा घरात नसते. मग हिरो सभ्य माणसाप्रमाणे निघून जायच्या गोष्टी करतो तर अतिसभ्य संस्कारी स्त्री प्रमाणे स्मिता त्याला थांबवते... कुठे घडतं हे असं ?.. एवढ्यात पाऊस वगैरे चालू होतो आणि बाहेर मुसळधार पावसात नाचकाम आणि रोमान्सची कसरत करत एक युगुल गाणं म्हणत असतं... आणि राजेश खन्नाला स्मिताच्या जागी जयाप्रदा दिसू लागते. ( इथं खरं तर डोक्यावर हात मारून घ्यायला पाहिजे पण.... समोर जया आणि स्मिता लागोपाठ दिसत असतील तर.. कोण एवढा विचार करतो ! ) गाण्यासोबत याचं जे काय व्हायचं ते होऊन जातं. या घटनेला आमचं काही ऑब्जेक्शन नाही. पण... इंटीमेंट सीनमध्ये रोमँटिक म्हणून राजेश खन्नाच्या चेहऱ्यावर जे भाव येतात ना.. ते पाहून स्वाभाविक मनातून प्रतिक्रिया उमटते.. बाबारे ! तू काही करतोयस कि तुला काही होतंय ?  
    सेम आराधनातील रूप तेरा मस्ताना प्रमाणे. समोर शर्मिला सारखी अर्धवस्त्रांकित ललना समोर असूनही राजेश खन्नाने चेहऱ्यावर सॅड + रोमान्स सम भाव दर्शवत गाण्याची वाट लावून टाकली होती.  पण... आराधना हा फिल्मी भाषेत बीता कल था.. तिथे राजेश खन्ना यंग होता तर इथे त्याच्या डोक्यावरचे केस विरळ होऊ लागलेले. समोर ऐन ज्वानीतली स्मिता पाटील आणि याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे सो कॉल्ड रोमँटिक भाव.. जे पाहिल्यावर मोठ्याने विचारावसं वाटतं.. बाबा  रे ! तू रोमान्स करतोय कि तुला काही होतंय..  मी तर म्हणतो याच्यापेक्षा बॉलीवूडचा आद्य इम्रान हाश्मी धर्मेंद्र बरा. इस बंदे को कोई फर्क नही पडता सामने कौन है.. बस अपना एन्जॉयमेंट चले.... असो.
              

    स्मिता सोबत याहून वर्स्ट इंटीमेंट सीन देणारा दुसरा हिरो म्हणजे ओम पुरी. हा आर्ट फिल्मचा इम्रान हाश्मी. पिक्चरचं नाव आक्रोश. टिपिकल आर्ट फिल्म परंपरेतला. सीनमधील कपडे आणि डायलॉग्ज वरून दोघेही दारिद्र्यरेषेखालील वाटतात. ( मी पिक्चर पाहिला नाही, हे आधीच सांगून ठेवतोय. ) सुरवातीला भांडण, शिवीगाळ, मारहाण व नंतर प्रणय, हा फॉर्म्युला डायरेक्टरने वापरलाय. कदाचित बिचाऱ्याची, गरिबांच्या प्रणयाविषयी हीच कल्पना असावी. मोजून दीड दोन मिनिटं ओम पुरी व स्मिता पाटील इंटीमेंट, प्रणय म्हणून जे काही करतात.. ते पाहिल्यावर साला सेक्स या शब्दाशीच आपली नफरत होऊन जाते. एवढ्यासाठीच का केला होता हा सारा अट्टाहास असं काहीसं मनात येऊन जातं.

   
सेम स्टोरी रेखाची. उत्सव मधील रेखाचे प्रणय प्रसंग किती कुशलतेने चित्रित केलेत. या संपूर्ण चित्रपटात रेखा जितकी सुंदर दिसलीय तितकी दुसऱ्या कोणत्याच नाही. तर अशा एव्हरग्रीन रेखाला घेऊन आस्था मध्ये अनुक्रमे नवीन निश्चल व ओम पुरी सोबत दोन प्रणयदृश्यं चित्रित करण्यात आली.
    
    पहिल्या प्रसंगात नवीन निश्चल एका आर्थिकदृष्ट्या गरजू, विवाहित स्त्रीचे काही तास विकत घेऊन तिला कामकलेचे धडे देतो व नंतर ती गरजू स्त्री आपल्या प्राध्यापकसम नवऱ्यास ते धडे देते. अशी बऱ्यापैकी देवाणघेवाण असलेले दोन इंटीमेंट.
    
पहिल्याच्या बॅकग्राउंडला कुठलं तरी एक अध्यात्मिक भजन टाकून त्याची वासलात लावलेली असते. उरलेली कसर रेखाला अतिशय वाईट पद्धतीने चित्रित करून भरून काढली जाते. आपलं आणि रेखाचं दुदैव इतक्यावर थांबत नाही. ओम पुरी सोबत रेखाला परत तेच रिपीट करावे लागते. हे बघत असताना आपण फक्त WTF एवढचं म्हणत असतो.
    ओम पुरीचं एक बरंय. स्मिता, देबाश्री, रेखा ते मल्लिका शेरावत ! म्हणूनच मी याला आर्ट फिल्मचा इम्रान हाश्मी म्हणतो. एक मल्लिका सोडली व देबश्री अर्धी धरली तर अडीच नट्यांसोबत पठ्ठ्याला स्क्रीन एन्जॉय करता आली.
             
  
 देबाश्री रॉय वरून आठवलं. तिचा आणि कंवलजीत सिंगचा एक सिनेमा होता. नाव आठवत नाही.. पण कंवलजीत आठवतोय... तोच जो सत्ते पे सत्ता मधील अमिताभच्या सहा भावांपैकी एक आणि अमिताभ बच्चनपेक्षा ऊंच. अमिताभहुन अधिक ऊंच कोणी असू शकत नाही या माझ्या बालपणीच्या कल्पनेला सुरुंग लावणारा दुष्ट राक्षस.... तर या कंवलजीतने देबाश्री सोबत अर्ध्या एक मिनिटाचा इंटीमेंट दिला आहे. तो पाहिल्यावर.. आपल्या दोन्ही हातांच्या मुठी घट्ट आवळल्या जाऊन जोराने आपल्याच कपाळावर आदळतात.
    
असाच एक आपल्याच हातांनी आपलं थोबाड बडवून घेण्यास भाग पाडणारा सीन सुचित्रा पिल्लई आणि  अनुप सोनीने -- तोच तो, जो सोनीवरच्या क्राईम पेट्रोलमध्ये येतो -- दिला आहे. हे असले सीन्स पाहिल्यावर.. हि लोकं अशी का वागतात.. का करतात ? वगैरे बालसुलभ प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाहीत.

    इंटीमेंट सीन्स उत्सव प्रमाणे -- नीना गुप्ताचा अपवाद करता -- कलात्मकरित्या रंगवला जाऊ शकतो किंवा आपल्या जुन्या प्रतीकात्मक पद्धतीनेही. याचे एक उदाहरण म्हणजे वीराना तील तो फेमस सीन. जो देशातील पंचविशीपार तरुणांच्या मनात घर करून राहिला आहे. पण निव्वळ कलात्मकतेचाच निकष लावायचा झाल्यास द ग्रेट शोमन राज कपूर शिवाय पर्याय नाही. त्याचं पांढऱ्या ओलेत्या साडीतील आरस्पानी सौंदर्याचं वेड सोडलं तर सत्यम शिवम सुंदरम चं टायटल song त्याने ज्या प्रकारे चित्रित केलंय त्याला तोड नाही. म्हटलं तर ते भक्तीगीत आहे. म्हटलं तर प्रणयगीत !
       तसं पाहिलं तर इंटीमेंट सीन्स देणे काही खायचे काम नाही. समोरच्या एक्ट्रेसला कुठेही असुरक्षित वाटणार नाही, अवघड वाटणार नाही याची दक्षता बाळगूनच असे सीन्स द्यावे लागतात. हां.. आता क्वचित नटांकडून मर्यादा उल्लंघनही झालंय किंवा गैरफायदा घेण्याचे प्रकारही घडलेत. पण त्याची चर्चा परत कधीतरी... तूर्तास इतकेच !