शनिवार, ७ फेब्रुवारी, २०१५

प्रवास .... अनवट वाटेचा !

                                                     






    गेल्या कित्येक दिवसांची प्रतीक्षा आता लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हं दिसत होती. पण नक्की काही दिवसांचीच का ? काळाची गणना करायचं तर मी खूप आधीच सोडून दिलं होतं. ज्याक्षणी काळाची परिमाणं हि मनुष्यनिर्मित व विशिष्ट अर्थाशी निगडीत असल्याचे उमगलं तेव्हाच. त्यामुळं दिवस, आठवडे, महिने हि परिमाणं आता माझ्या खिजगणतीतही नव्हती. परंतु, बराच काळ लोटला आहे एवढे मात्र निश्चित !



    तशी माझी अपेक्षा फार काही मोठी नाही. या पृथ्वीतलावर राहणाऱ्या असंख्य मनुष्यप्राण्यांपैकी एक मी. माझी असून असून महत्त्वकांक्षा ती काय असणार ? तर मी राहतो या परिसरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तूमात्रावर माझी सत्ता. अगदी अनियंत्रित ! ज्याला स्थानिक कायद्याचेही बंधन नको अशी. अशी सत्ता मिळवण्यासाठीचे प्रचलित मार्ग सोडून मी अनवट वाट चोखळली. कारण, प्रचलित मार्गांची अखेर कोणापुढे तरी झुकण्यात होते याची मला कल्पना होती आणि कोणासमोर मानेतच काय पण कमरेत वाकणेही आपल्या रक्तात नव्हते !



    त्यामुळे वेगळ्या मार्गाची चाचपणी सुरु झाली. त्या, त्या क्षेत्रातील तज्ञांशी भेटून याविषयी आडून – आडून माहिती मिळवण्याचा मी प्रयत्नही केला. पण जे भेटले ते सर्वजण ‘ त्या मार्गाचे ‘ मार्गदर्शक तर नव्हतेच, पण माझ्यासारखेच ते अनभिज्ञ होते. सुरवातीलाच पदरी निराशा पडल्याने माझा उत्साह काहीसा मावळला. परंतु, इच्छित ध्येय गाठण्याची जिद्द अजून हरली नव्हती. मनाशी ठामपणे निर्णय घेत, आता इतरांचे मार्गदर्शन न घेता स्वतःहून वाट शोधण्याचं मी ठरवलं. पण हि वाट शोधायची तर कशी ?



    कथा – कादंबऱ्या किंवा चित्रपटांत अशा वेळी एखादा गरीब पण विद्वान असा वृद्ध वा तरुण ब्राम्हण किंवा साधू – महर्षी, तांत्रिक – मांत्रिक मदतीला आल्याचे आपल्या परिचयाचे आहे. पण प्रत्यक्ष जीवनात असे कोणी मदतीला येत नाही. कारण, मुळात अशी विद्वान आणि जाणकार माणसे अस्तित्वातच नसतात आणि असली तरी आपल्या उपयोगाची अजिबात नसतात ! म्हणून अशांना टाळून लिखित ग्रंथांकडे मी मोर्चा वळवला. या देशात कसरीने जेवढी पुस्तकांची पानं खाल्ली नसतील तेवढी मी वाचून काढली. अगदी डोळे लालीलाल होऊन डोळ्यांवर चाळशी चढून तिच्या चढत्या क्रमांकात वेळोवेळी वाढ होत गेली. परंतु हाती काय लागलं ?



    काहीच नाही. काळ मोठ्या झपाट्याने उलटून जात होता पण माझ्या इच्छित ध्येयाच्या प्राप्तीयज्ञात त्याने कसलाही खंड पडत नव्हता. आता आशे – निराशेचेही काही वाटत नव्हते. कारण, आशा काय आणि निराशा काय, दोन्ही केवळ शब्दच आहेत ! या शब्दांनी आपल्याला जो अपेक्षित अर्थ असतो, तो व्यक्त होतोच असे नाही. एवढं मी समजून चुकलो होतो. भाकरी – चपातीचे तुकडे मोडण्यापेक्षा पुस्तकांची पानं खाऊन शेवटी एकदाचा मला, माझं पूर्वनियोजित ध्येय गाठण्याचा मार्ग सापडला. तो मार्ग साधासुधा नव्हता. मनावर कसलेही नियंत्रण न ठेवता, कोणतेही तांत्रिक विधी वा उपचार न करता संधी मिळेल तेव्हा, ज्या अवस्थेत असू त्या अवस्थेत ध्यान लावण्याचा !




    अतिशय बिकट मार्ग ! उठता – बसता, खाता – पिता, झोपता मी या मार्गाचे पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागलो. खरोखर तुम्हांला सांगतो, काळवेळाचे भान तर मी आधीच हरपून बसलो होतो पण जगाचे काय देहाचेही अस्तित्व मी विसरत चाललो होतो. अशीच माझी साधना सुरु होती. शेवटचा माणसांत कधी मिसळलो होतो, शेवटचे शब्द कोणते उच्चारले होते याचेही मला स्मरण राहिले नव्हते. अशा प्रदीर्घ तपश्चर्येला इच्छित फळ मिळाले आणि मला साक्षात्कार झाला !



    या सृष्टीत वाईट आणि चांगली अशी कोणतीच अलौकिक, दैवी शक्ती अस्तित्वात नाही. या सृष्टीचा नियंता वाईट – चांगले, सत्य – असत्य असा कसलाच भेद मानत नाही आणि त्याला प्रसन्न करून घेण्याचा कोणताच मार्ग प्रचलित नाही. साक्षात्कार तर झालाच. पण जोडीला काहीतरी दिसलं होतं. कानावर काही शब्दही पडले होते. जे दिसलं, ऐकलं तो भ्रम होता का ? या शंकेला मनातून ताबडतोब नकारार्थी उत्तर आलं. ध्येय साधण्याचा मार्ग मला मिळाला होता. आता फक्त जे ऐकलं, पाहिलं त्यावर अंमल करायचं बाकी होतं !



    मनोइच्छित फलप्राप्तीच्या पूर्वतयारीसाठी प्रथम काही गोष्टी करणं गरजेचं होतं. कितीतरी काळाने मी आरश्यासमोर उभा राहून स्वतःला पाहत होतो. केसांच्या जंगलातून फक्त चष्मा व त्यातील दोन डोळेच दिसत होते. अंगावरील कपड्यांचा मुळचा रंग कधीच लोपून गेला होता. परंतु, त्या सर्वांची मला पर्वा नव्हती. मला माझे ध्येय गाठण्याची घाई होती. तेव्हा स्वतःविषयीच्या विचारांत वेळ न घालवता बाथरूमात जाऊन अंघोळीचा प्रयत्न केला. प्रयत्न यासाठी, कारण अंघोळ नेमकी कशी करायची हेच मी विसरून गेलो होतो. त्यानंतर अंगात बसतील असे कपडे चढवून आणि खिशात बसतील एवढे पैसे घेऊन बाहेर पडलो ते थेट सलूनमध्येच शिरलो !



    तिथे गेल्यावर बोलायचे काय हा प्रश्न मला पडला. कारण, आपल्याला जे करून हवं आहे ते नेमक्या शब्दांत मांडायचे कसे हेच मुळात मी विसरलो होतो. परंतु, तिथल्या खुर्चीवर बसल्यावर एक शब्दही बोलण्याची मला गरज पडली नाही. त्या ठिकाणी किती वेळ उलटून गेला माहिती नाही. मधल्या अवधीत मला अंमळ झोप लागली होती. जेव्हा जागा झालो तर पाहतो तो काय ....



    समोरच्या आरशांत एक अनोळखी प्रतिबिंब. चष्मा आणि अंगावरचे कपडे तेवढे परिचयाचे. बाकी सारं काही अपरिचित ! माझे मूळ रूप मीच विसरून गेलो होतो. प्रथमच मी स्वतःला निरखून पाहत होतो. त्यानंतर भानावर येत मी आसपास पहिले तर आजूबाजूला केसांचा, मोडक्या कात्र्या – कंगव्यांचा खच पडला होता. मी खुर्चीवरून उतरून मागे वळून पाहिले तर तीन – चार जण हाताला काहीतरी चोळत वाफळत्या तुकड्याने शेकत असल्याचे दिसले. मी जवळ गेलो. मला जवळ आल्याचे पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेऐवजी भीतीच जास्त दिसली. मी त्यांच्या हातांकडे पाहिले तर हातांची बोटं चांगलीच सुजली होती. अनाहूतपणे माझा हात खिशाकडे गेला असता त्यांनी हातानेच नकार दर्शवत मला कोपरापासून हात जोडले. कदाचित हा माझ्या आजवरच्या साधनेचा परिणाम असावा !



    सलून मधून आल्यावर परत एकदा अंघोळीचा कार्यक्रम बऱ्यापैकी उरकून घेतला. यावेळी मागल्या खेपेपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे अंघोळ करता आली. त्यानंतर कपडे घालून इच्छित ध्येयप्राप्तीच्या साधनेचे ठिकाण धुंडाळण्यास बाहेर पडलो. शहरवस्तीतून बराच दूरवर चालत आलो तरी ‘ जे पाहिलं ‘ होतं ते काही दृष्टीस पडेना. अखेर बरीच पायपीट केल्यावर रस्त्यापासून एका बाजूला जरा दूरवर अशा ठिकाणी ‘ दिसलेल्या ‘ स्थळासारखे ठिकाण दिसले. ते नजरेस पडताच वेगाने धावत मी तिकडे गेलो.



    आजूबाजूला उन्हाचा रख जाणवत असला तरी त्या स्थळी मात्र कमालीचा गारवा होता. एक दगडी बांधकामाची मोडकी वास्तू. त्या वास्तूच्या चिरांच्या आधाराने वाढलेल्या वेली आणि झुडपांचे जाळे. त्यामुळे कदाचित तिथे गारवा नांदत असावा. जे ठिकाण ‘ दिसलं ‘ होतं ते तर आता प्रत्यक्षात माझ्या समोर होते. नव्हे त्या वास्तूत मी होतो. आता फक्त ‘ ती प्रतिमा ‘ तिथे मूर्त स्वरुपात हवी होती. माझे आतुरतेने उत्सुकलेले डोळे ती मूर्ती शोधत होते. फार सायास त्यासाठी न पडता त्या वास्तूच्या थोडे आत गेल्यावर एका कोपऱ्यात ती मूर्ती मला आढळली. जशी ‘ दिसली ‘ अगदी तशीच !



    काळ्या दगडात खोदलेली. तीन तोंडं असलेली. त्या तिन्ही तोंडांना मिळून एक सोंडेसारखे काही. मधल्या तोंडाच्या कपाळावर एक उंचवटा. खाली गच्च भरलेलं पोट. सोंड आणि पोट परिचयाचं असल्याने मनात नकळत माझ्याच एक शंका अवतीर्ण झाली पण लगेच कानी पडलेले शब्द आठवले. त्या शब्दांची याद येताच मनातील शंका कुठच्या कुठे दूर पळाली. अखेर, मला जे हवं होतं ते मिळवण्याची संधी अशी माझ्या दृष्टीक्षेपात तरी आली होती. परत एकदा त्या मूर्तीला नीट पाहून मी तिथून बाहेर पडलो. आता अखेरच्या साधनेसाठी काही वस्तूंची गरज होती.



    सर्वप्रथम मी प्राणी संग्रहालयात गेलो. कारण, मुख्य विधीसाठी घुबडाची अतिशय गरज होती. आख्खे प्राणी संग्रहालय धुंडाळल्यावर मला एका पिंजऱ्यात घुबड आणि त्याचा रखवालदार दोन्ही एकदमच भेटले ! मी घुबडाकडे पाहून मग रखवालदाराकडे पाहिले आणि भलताच सजीव चुकून आत असल्याची मला जाणीव झाली. परंतु मनातलं चेहऱ्यावर न दाखवता मी त्याला, मला जे हवं होतं त्याची मागणी करत त्याच्या हाती काही पैसे टेकवले. तेव्हा झाकली मुठ खिशात नेत त्याने अजून चार – दोन तास वाट पाहण्यास सांगितले. ते चार न् दोन सहा असे मिळून सात – आठ तास घालवल्यावर अखेर घुबडाने प्रसन्न होऊन आपले पोट रिकामे केले. घुबडाचा तो ‘ प्रसाद ‘ रखवालदाराने मला एका प्लॅस्टीकच्या थैलीत गुंडाळून दिला. तो खिशात ठेवून आनंदाने मी अक्षरशः उड्या मारत मारत कत्तलखाना गाठला. पुढील ‘ यज्ञाकरता ‘ लागणारे काही पदार्थ मला येथूनच गोळा करायचे होते. त्या ठिकाणी बरीच शोधाशोध आणि घासाघीस केल्यावर जनावरांची मोठमोठी हाडे मला तासून मिळाली. ती एका पिशवीत घेऊन मी तडक स्मशानभूमी गाठली.



    पण त्या स्मशानात अगदीच स्मशानवत शांतता होती. तिथे हवं ते काही सापडलं नाही. तेव्हा ती सोडून दुसरी – तिसरी अशा कित्येक स्मशानभूम्या धुंडाळल्या. पण एकही ‘ जिवंत ‘स्मशानभूमी काही सापडायचं नाव नाही ! कमाल आहे. शहरात एवढी गर्दी असूनही स्मशान इतके रिकामे !! मनाशी आश्चर्य करत मी हार न मानता मानवी देहाचं सार्थक करणारी स्थळं शोधत राहिलो. पार पायाचं पीठ पडेपर्यंत पायपीट केली तेव्हा मला एक ‘ जिवंत ‘स्मशानभूमी सापडली. मी आनंदाने सर्व श्रम, वेदना विसरून त्या स्मशानात धावलो. माझा आवेग पाहून त्या जळत्या जीवाच्या भेटीकरता मी येत असल्याच्या गैरसमजातून तेथील चौकीदाराने मला कवळा घालून अडवले. तेव्हा कुठे मी भानावर आलो. उत्तेजनाचे आरंभीचे क्षण उलटून जाताच धीरगंभीर, संयत स्वरात त्या चौकीदारास माझी इच्छा सांगत त्यांस कोपऱ्यात नेले आणि त्याच्या खिशात मुठभर नोटा कोंबल्या. तेव्हा त्याने काही तास थांबा म्हणून मला सांगितले. ते ‘ तास ‘ भयंकर बेचैनीत मी कसेबसे घालवले. अखेर चिता शांत होताच चौकीदाराने मला हवी होती तशी ‘ राख आणि कोळसे ‘ एका थैलीत बांधून दिले.



    त्यानंतर उर्वरित सटरफटर वस्तू गोळा करून मी थेट त्या वास्तूकडे गेलो. आत जाताच विधी करण्याच्या जागेची थोडी साफ – सफाई करून त्यावर स्मशानातील राखेने काही आकृत्या बनवल्या. वर्तुळे निर्माण केली. जशी ‘ दिसली ‘ अगदी तशीच ! त्या वर्तुळांत मी बसलो व आकृत्या बनवल्या होत्या त्यावर होमकुंडाचे तयार भांडे ठेवले. काळ आणि माणसं खूपच बदलली होती. पूर्वी यज्ञाचे होमकुंड तयार करायला लागायचं आणि आता रेडीमेड ! होमकुंड व्यवस्थित ठेवल्यावर त्यांत प्राण्यांच्या अस्थी रचून त्यावर स्मशानातील कोळसे टाकले. जगातील निष्पाप प्राण्यांच्या मुत्राचे काही थेंब त्या विधीसाठी अत्यावश्यक असल्याने शहरात दिसेल त्या पशुला पकडून त्याचे मुत्र गोळा करून आणले होते. त्यात घुबडाची ‘ विष्ठा ‘ मिसळून तयार केलेले ते ‘ पवित्र तीर्थ ‘ मी त्या होमकुंडाभोवती, वर्तुळांभोवती शिंपडले. जागृत होणाऱ्या शक्तींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे ‘ कवच ‘ अत्यावश्यक होते. सर्व काही तयार झाल्यावर होमकुंडातील अस्थिसमिधा पेटवण्याकरता काही वाळक्या काटक्या व पालापाचोळा त्यात टाकून कुंड प्रज्वलित केले. कोळसा, अस्थि, पाला – पाचोळा, काटक्या आणि बरीचशी चरबी यांमुळे अग्नी चांगलाच पेटला. त्या आगीच्या उजेडात ती त्रिमुखी मूर्ती भयंकर सुंदर दिसत होती.



    हवनकुंड पेटताच मी त्या मूर्तीस्थित सृष्टी नियंत्याला आवाहन करण्यास आरंभ केला. उच्चारले जाणारे शब्द नव्हते. होता तो फक्त ध्वनी. जो मी ‘ त्यावेळी ‘ ऐकला होता. हळूहळू त्या ध्वनीची तीव्रता वाढू लागली. आसापासचे वातावरण बदलू लागले. वेगवेगळे गंध दरवळू लागले. हवाही विचित्र बनली. कधी थंडगार तर कधी अतिउष्ण ! काळाच्या साऱ्या मित्या उलगडू लागल्या. चित्रविचित्र आवाज, आकृत्या, चेहरे देह अवतीर्ण होऊ लागले. काय नव्हतं त्यात ?



    चेटकीण – हडळ सम विद्रूप, विचित्र चेहरे असलेल्या स्त्रिया मोठमोठ्याने खदाखदा रडत होत्या. पिशाच्चसम पुरुष ढसाढसा हसत होते. दूरवरून कुत्र्यांचा सुरात गाण्याचा आवाज येत होता. कोकिळेचे बेसुर विव्हळणे ऐकू येऊ लागले होते. एखाद्या नवख्या साधकास विचलित करण्यासाठी ते पुरेसं होतं. परंतु मला ‘ साक्षात्कार ‘ झालेला असल्याने सर्व सत्य मी जाणत होतो. अर्थात सत्य तर शेवटी शब्दचं ना !



    हि सर्व मंडळी मोठ्या आवेगाने माझ्यावर झडप घालण्यासाठी धा - धावून येत होती. परंतु त्या ‘ संरक्षित ‘ वर्तुळात मी असल्याने त्यांचा नाईलाज होत होता. पहिला हल्ला व्यवस्थित परतवला गेला होता. पण त्यांचे प्रयत्न थांबले नव्हते. अनेक मार्गांनी ते मला विचलित करु लागले होते. आत्यंतिक मनोनिग्रहाने मी त्यांची आक्रमणे परतवून लावत होतो. अखेर त्यांनी निर्वाणीचे शस्त्र उपसले !



    किळसवाण्या पदार्थांनी भरलेली ताटं, असह्य गंधयुक्त द्रावणाची भांडी तिथे प्रकट होऊ लागली. विविध दगड – धोंड्यांनी, मातीने भरलेल्या पेट्या अवतीर्ण होऊ लागल्या. या दृश्य वस्तूंनी माझे मन क्षणभर मोहित झाले खरे ! कारण नजरबंदीच्या या खेळातील ‘ प्रत्यक्ष दिसणाऱ्या दृश्य भासमान रुपामागील सत्य स्वरूप ‘ मला स्पष्टपणे जाणवत होते. अर्थात, आजवरच्या साधनेतून एवढी शक्ती मी निश्चित कमवली होती. त्यामुळे क्षणभरातच मी मोहावर विजय मिळवत त्या पदार्थांकडे दुर्लक्ष करत ध्वनीचा उच्चार अधिक वेगाने व मोठ्याने करू लागलो.



    माझ्या कृतीत व  उच्चारांत खंड न पडल्याने रागाने चवताळून त्या भयंकर विद्रूप रूपातील स्त्रिया माझ्या दिशेने धावल्या. त्यांच्या त्या विद्रूप रूपातील सौंदर्याने, संतापाने जागृत झालेल्या मीलनोत्सुक भावाने माझे मन आणि शरीर काही क्षण मोहित झाले. उच्चाराचा वेग मंदावू लागला. आवाजाची तीव्रता कमी होऊ लागली. पाठोपाठ त्यांचे विद्रूप चेहरे रूप बदलू लागले. तशी वास्तवाची जाणीव मला झाली आणि मनातले विचार झटकून, बंड करून उठलेल्या शरीराकडे दुर्लक्ष करून साधना जारी ठेवली आणि अक्षरशः मोठमोठ्याने मी ओरडू लागलो. अखेर ....




    .... त्या भयंकर सुंदर त्रिमुखी मूर्तीत चैतन्य अवतीर्ण होऊन ती ‘ साजिवंत ‘ झाली. आपल्या मूळ स्थानावरून उठून ती देवता माझ्याकडे चालत आली. तिच्या नजरेला नजर भिडवत माझे ध्वनी उच्चारणे सुरूच होते. रौद्रपणे गडगडाटी आरोळ्या ठोकत त्या देवतेने माझ्या डोक्यावर आपला हात ठेवला आणि ....


     .... क्षणभरात माझ्या कंठातून बाहेर पडणारा ध्वनी बंद होऊन माझे शरीर हवेत विरघळू लागले. अगदी मी स्वतःलाच दिसेनासा झालो. काही क्षणांत मी त्या वातावरणात पुरता मिसळून गेलो आणि नंतर पाहतो तो काय ? सर्व कसं शांत झालं होतं. तिथे ती मूर्ती आपल्या मूळ जागी तशीच होती. वास्तूच्या आवारातल यज्ञविधीच्या कसल्याच खाणा – खुणा दिसत नव्हत्या. इतकेच काय पण मला माझ्याच शरीराचे कसलेच अस्तित्व जाणवत नव्हते. ‘ मी ‘ असल्याची मला जाणीव होती पण ‘ असण्याच्या ‘ कसल्याच संवेदना जाणवत नव्हत्या !     

 

शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

आम्ही तर ( फेक ) आचार्य !


    दिवस चमत्कारांचे आहेत. दिवस नमस्कारांचे आहेत. आपल्या समोर नम्रपणे हात जोडून चरणस्पर्शासाठी वाकलेला मनुष्य आपणांस जमिनीशी कधी समांतर करेल याचा अंदाज देखील यायचा नाही. अशा या जगावेगळ्या ( मुलाखा वेगळ्या म्हणणार होतो पण परत ' मराठी माणूस संकुचीत वृत्तीचा ' असल्याची ओरड व्हायची ! ) जगात माझ्याबरोबरही चमत्कार होईल असे वाटले नव्हते. पण झाला. साधा सुधा नाही तो पण भयंकर मोठा असा चमत्कार घडला.

    मला माझ्या गतजन्मातील स्मृती तुटक स्वरूपात आठवू लागल्या. त्या स्मृतीची माला गुंफल्यावर एके दिवशी रात्री मला दृष्टांत झाला. एक दिव्य ज्योत माझ्या नेत्रांसमोर तरळली व त्या ज्योतीतून काही शब्द उमटले. त्या शब्दांचा अर्थ लागेपर्यंत तो ज्योत अंतर्धान पावली आणि आम्ही खाडकन जागे झालो. आम्हांस कळून चुकले कि, आम्ही अवतारी पुरुष आहोत. आजवर ज्या काही प्रचंड घडामोडी घडून आल्या त्यामागे आमचीच ' कलागत वृत्ती ' कार्यरत होती. अर्थात, खुद्द प्रभुनेच मला सांगितले कि, " वत्सा तू निमित्तमात्र आहेस. कर्ता करविता मीच आहे ! " तेव्हा हातून घडून गेलेल्या कृत्यांचा आम्हांस अजिबात खेद वाटत नाही. अहो स्वकृत्यांचा खेद - खंत वाटेल तो अवतारी पुरुष कसला !


    त्या दिवसापासून ( ' नेमक्या कोणत्या ' हे विचारू नये. आम्हांस सर्व दिवस - काळ समान ! ) आम्हांस, आमच्या हातून घडलेल्या महत् कृत्यांच्या आठवणी आठवण्याचा जणू छंदच जडला. परंतु, आमच्या स्मृतीशृंखलेत एक फार मोठी त्रुटी अशी आहे कि, गतकाल आम्हांस अगदी अल्प क्षण आठवतो. मागचा - पुढचा संदर्भ नसलेल्या स्थितीत. परंतु, जो काही आठवतो तो अगदी लख्खपणे नजरे समोर तरळतो. किती उदाहरणे म्हणून तुम्हांस मी सांगू ?


    गोकुळातील कृष्णाला बासरी उत्कृष्ट वाजवता येते असे तुम्ही मानता. पण त्याला बासरी आणि ऊसातील फरक कोणी समजावून सांगितला माहिती आहे का तुम्हांला ? उत्तरी राम व दक्षिणी मारुतीमधल्या दुभाष्याची भूमिका कोणी बजावली हे कोणास ठाऊक आहे का ?
राम - रावण यांच्या अहिंसक युद्धांत रावणाच्या पोटाला गुदगुल्या करण्याची मसलत रामाला कोणी सुचवली ? आता हि गोष्ट वेगळी कि, हिंसाप्रिय मंडळींनी रावणाची बेंबीच उध्वस्त करण्याची कथा लिहिली. बाकी, स्त्रियांच्या नाभीकमलांशी खेळायचे सोडून पुरुषांच्या बेंबींशी खेळणारे महाभाग कोण होते कोणास ठाऊक ? जाऊ द्या. आम्हांस आत्मप्रौढीची वा प्रसिद्धीची अजिबात गरज नाही. पर्वा नाही. नाहीतर आज तुम्ही ज्या घटना अलौकिक मानता, त्या घडण्यामागील आमच्या हस्ताचा क्षेप तुम्हांस स्पष्ट दिसला असता.


    ज्याला तुम्ही आज राजा शिवाजी म्हणता, त्या शिवाजीला आगऱ्याहून निसटून जाण्याची युक्ती आम्हीच सांगितली. इतकेच नव्हे तर दक्षिणेतील तुरीच्या शेंगा शिवाजीच्या वतीने आम्हीच औरंगजेबाच्या हाती दिल्या व कच्च्या शेंगा न सोलता खाताना, " अशा शेंगा मी जन्मात कधी खाल्ल्या नव्हत्या " असे तो म्हटल्याचेही आम्हांस स्मरते. पण कोणा उपटसुंभ इतिहासकाराने तुरीच्या शेंगा खाण्याची गोष्टच अतिरंजित केली. मूर्ख लेकाचा ........ माफ करा. या जन्मीचे संस्कार सुटत नाहीत. मूढ बालक कुठला ! 
 
    शिवाजीच्या परिवाराशी आमचा बऱ्यापैकी स्नेहसंबंध होता. संभाजी संस्कृत आमच्या समोरच शिकला. एकदा त्याने औरंगजेबाला संस्कृत भाषेत एक सुंदर असे खंडकाव्य लिहून पाठवले. मूढ औरंगला संस्कृत सारख्या देववाणीचे ज्ञान कुठे ? तो खंडकाव्य घेऊन दक्षिणेत आला व त्या खंड काव्याचे खंडित अर्थ लावत इथेच निजधामास गेला.


    आमचा प्रिय औरंग देहत्याग करून परलोकवासी झाल्याने आम्ही उद्विग्न होऊन देशांतरास गेलो. तिथून थेट अवतीर्ण झालो ते पानपतावर. काय भयानक कुंड पेटलं होतं ते ! इकडे अब्दाली इस्लामचे दिव्यतेज आणखी प्रखर करण्याकरता अन्न - पाणी त्यागून उपास करत होता. दिवसातून पाच काय पन्नास वेळा तो व त्याचे अनुयायी नमाज पढत होते तर तिकडे सदाशिवराव पेटलेल्या हवनकुंडात समिधांवर समिधा टाकत होता. कोणत्याही परिस्थितीत हिंदू धर्माचे प्रज्वलित झालेले दिव्यतेज त्यांस लुप्त होऊन द्यायचे नव्हते. इकडे माथी जमिनीला टेकत होती तिकडे काटक्या यज्ञात पडत होत्या. अखेर, भुईला लागलेली मस्तके जिंकली. कारण समिधाच संपल्याने सदाशिवाने स्वतःचा देह एक समिधा कल्पून अग्निकुंडात झोकून दिला व आपसुक अब्दाली जिंकला ! 


    तुमच्या जोतीबा फुलेने शाळा उघडली. म्हटलं, चला एका नव्या युगाची नांदी झाली. पण कोणतीही गोष्ट सहजासहजी घडून आली तर तिचे महत्त्व पटत नाही. म्हणून जोतिबाच्या शाळेवर बहिष्कार टाकण्यासाठी समाजास आम्हीच प्रवृत्त केले. सरळ चार चौघांत जाऊन आम्ही प्रश्न टाकायचो कि, " अहो, बायका जर लिहू - वाचू लागल्या तर त्या नोकऱ्या करतील. आणि त्या नोकऱ्या करू लागल्या तर पुरुषांनी काय त्यांची लुगडी धुवायची ? " बस्स !कोणत्या पुरुषाला हा अवमान सहन होईल ? लगेच त्यांनी हाती लागेल ते म्हणजे --- दगड - धोंडे, माती, चिखल व काहीच मिळेना म्हणून गायी - म्हशींना मा - मारून त्यांना शेण टाकायला लावून ते उचलून फुले दांपत्यावर फेकले. उगीच नाही जोतीबा ' महात्मा ' झाला ?
 
    इतकेच काय, गंगाधररावांना त्यांच्या मुलाचे नाव ' केशव ' जरी असले तरी ' बाळ ' नावानेच पुकारण्यास कोणी सांगितले ? फार काय, तुमच्या त्या ' लोकमान्याला ', म्हणजे आमच्या बाळला आम्ही बोलता बोलता बोललो कि, " अरे बाळ, या इंग्रज सरकारचे डोकं काही थाऱ्यावर नाही बघ. दिवस भरलेत यांचे जणू ! " बाळ भलताच विद्वान. त्याने आमच्या संपूर्ण वाक्याचा अर्धा भाग घेऊन आपल्या वर्तमानपत्रात सरळ छापून कि हो टाकला ! तेव्हाच आम्ही ओळखले कि, प्रसार माध्यमं अर्ध्या हळकुंडाने पिवळी होण्याचा काळ लवकरच येणार आहे. त्याचीच प्रचीती सध्या तुम्ही घेत आहात !


    पुण्यात आम्हांस फार काळ राहणं आवडलं नाही. आमही परत स्थानांतर केलं व एका तेजस्वी युवकाच्या गृहात प्रकटलो. तो तरुण इंग्रजांच्या विरोधात प्रचंड प्रमाणात करावयाच्या क्रांतीच्या उपाय योजनांची आखणी करत होता. परंतु त्याचे मराठी लेखन अतिशय अशुद्ध. तो ' इ / ई ' असे न लिहिता ' अि / आी ' असे लिहायचा. आम्ही त्यांस बजावले, " अरे, विनायका असे अशुद्ध लिहू नको." पण तो ऐकेल तर शपथ ! अखेर इंग्रजांनाच त्याच्या क्रांतीकार्या ऐवजी भ्रष्ट भाषिक लेखनाची दखल घ्यावी लागली व जोवर त्याची लेखनपद्धती सुधरत नाही तोवर त्याला अंदमानात एकांतवासाची शिक्षा सुनावली. विनायक पण मोठा हट्टी. अंदमानात त्याने एकांतवास पत्करला पण आपली लेखनपद्धती काही बदलली नाही. 

 
    त्या तरुणाचा सहवासात आम्ही अगदीच कंटाळलो. जेव्हा बघावं तेव्हा त्याला कशाचा तरी ध्यास असायचा. कसला ते माहिती नाही. पण तो सदोदीत आपल्याच कल्पनासृष्टीत रममाण असायचा. त्याला तसाच स्वप्नांच्या जगतात सोडून आम्ही दुसरीकडे प्रस्थान ठेवले.


    एका ठिकाणी आम्ही अवतीर्ण झालो. नुकताच परदेशातून आलेला एक इसम चिंताक्रांत अवस्थेत बसला होता. त्याची ओळख करायला गेलो तर तो परिचित निघाला. किंबहुना त्याचे नाव देखील आम्हीच ठेवले होते. मोहनदास ! त्याला चिंतेचे कारण विचारले असता, त्याला देशाचे राजकीय नेतृत्व करण्याची महत्त्वकांक्षा असल्याचे समजले. आम्ही डोळे मिटले. मग उघडले. आणि त्यांस सांगितले, " वत्सा, तू सर्व प्रथम वस्त्रांचा त्याग कर. जैन मुनींप्रमाणे जन्मजात अवस्थेत न राहता फक्त लज्जा रक्षणार्थ वस्त्रं परिधान कर. आणि ' बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ' या उक्तीच्या विरोधात वाग. किंबहुना कोणत्याच शब्दावर कायम राहू नको कि सापडू नको. " आमच्या त्या उपदेशाचे अमृत मिळताच मोहनदासचे चार डोळे ( दोन चर्येवरचे व दोन चष्म्याचे ) लकाकले. पुढे तो अल्पावधीत ' बापू ' झाला. 

 
    मधल्या काळात आम्ही असेच भ्रमंती करत असताना आमच्या भीमाची भेट झाली. महाभारतातल्या भीमाप्रमाणेच हाही विशाल देहाचा स्वामी ! पण देहाप्रमाणे बुद्धीही विशाल. कुंती त्या बाबतीत कमनशिबी निघाली ! आम्ही भीमास म्हटलं, " काय रे बाबा, काय चाललंय तुझं ? " तेव्हा नवीन ग्रंथलेखनाच्या विचारात असल्याचे त्याने सांगितले. पण लेखनास विषय मिळत नव्हता. तेव्हा आम्ही म्हटलं कि, " भीमा तू वर्णव्यवस्थेच्या विरोधात आहेस तर शूद्र - अतिशूद्रांवर ग्रंथ लेखन कर. " आमचे बोल ऐकताच भीमाचे नेत्र अत्यानंदाने चमकून उठले. 


    तेथून आम्ही थेट केशवरावांकडे गेलो. तिथे पहिले तर ते आपल्या लेखन कार्यात मग्न. त्यांचा एक मुलगा काहीतरी तंतुवाद्य वाजवत होता तर दुसरा कागदावर रंगरंगोटी करत होता. आम्ही त्या चित्रकाराकडे गेलो व विचारले, " बाळ, तुझं नाव काय ? " तो आमच्याकडे रोखून बघत उद्गारला, " माझं नाव ? बाळ ! " तेव्हाच आम्ही ओळखलं ' बोले तैसा चाले ..' या उक्तीतला हा पुरुष आहे. आणि नाव ' बाळ ' असल्याने याच्या पावलांची व बडबडीची दखल तशीच घेतली जाणार ! 

 
    मुंबईचा कंटाळा आल्याने देशावर आम्ही प्रस्थान ठेवले. एका गावाच्या धर्मशाळेत आम्ही मुकाम ठोकला व त्या गावची तालीम पाहण्याचा विचार आमच्या मनात आला. आम्ही तडक तालमीच्या दिशेने गेलो. तिथे पाहतो तर आबालवृद्ध पुरुष मंडळी अंगाला तेल - माती लावून एकमेकांना घट्ट आलिंगनं देत त्यातून सुटण्याची धडपड करत होते तर, एक पोरगं अंगावरील कपडे न काढता हातात तेल घेऊन जिभेला लावत होतं. आम्ही त्यांस त्याचे कारण विचारले असता उत्तर आले नाही पण, त्याच्या बाजूला असलेला मुलगा म्हणाला, " आवं म्हाराज, त्यो तसाच हाय. हि मान्सं आंगाला त्येल लावत्यात - त्यो जीबंला. पन फरक म्हंजी आंगाला त्येल लाव्ल्येली एक येळ सापडत्यात पण जीबंला त्येल लावल्येला ह्यो पठ्ठ्या काय सापडत न्हाय ! " आम्हांस त्या मुलाच्या शब्दांची प्रचीती लवकरच आली. जिभेला मनसोक्त तैलस्नान घालून ते पोरगं आखाड्यात उतरलं आणि पाचच मिनिटांत पाच - पन्नास जणांना उताणं पाडून घरी पण निगुन गेलं. जाताना तोंडातल्या तोंडात " शरदांच चांदणं ..." असं काहीतरी पुटपुटत गेलं.


    तर अशा ह्या आमच्या अवतारी जीवनातील काही स्मृती. तूर्तास इतक्याच स्मरतात. बाकी, आठवताच जगासमोर मांडण्याचा आमचा मानस आहे. काय आहे, दामोदरदासला मुलाचे नाव विवेकानंदाच्या मूळ नावावर नाव ठेवण्यास सांगितल्यापासून आमच्यातील सिद्धी हळूहळू लुप्त होऊ लागल्याने चरितार्थासाठी आपल्या पुर्वानुभावांचे व कर्मांचे लेखन प्रसिद्ध करून चार मोहरा गाठीशी बांधण्याचा विचार आहे. दिवस अन् काळ किती भर्रकन उलटतो. नाही !    

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना अनावृत्त पत्र


    सन्मानानीय पंतप्रधान महोदय,

     तुम्हांला कधी पत्र पाठवेन असं माझ्या ध्यानी मनी काय स्वप्नातही आलं नव्हतं. पण आज हे प्रत्यक्षात घडत आहे. यावरून तुम्ही सत्तेत आल्यापासून आजवर कधीच न घडलेल्या घटना / चमत्कार घडण्याचा जो धडाका सुरु झाला आहे, तो आपला केवळ प्रसिद्धीचा फार्स आहे असं आजवर मी जे समजत होतो त्या समजाला चांगलाच छेद ( कि तडा ? जे असेल ते ! ) गेला आहे. ( वाक्य खूप लांबलचक झालं ना ? हि खरी भारदास्त आणि ५० - ६० वर्षांपूर्वीची विद्वानांची मराठी आहे. फक्त अनुस्वारांची कमी ! )


    प्रस्तुत पत्र मी मराठीत लिहितोय आणि तुम्हांला ( माझ्या माहिती प्रमाणे ) गुजराथी, हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त भाषा येत नाहीत. पण हरकत नाही. तुमचे सोशल मिडीयावरील नेत्र या मराठी पत्राचा तुम्हांला हव्या त्या भाषेत तर्जुमा करून देतील. असो, पत्रास कारण म्हटलं तर आहे आणि नाहीही ! तुमची पंतप्रधानपदी निवड  झाल्याबद्दल जवळपास सर्वांनी तुमचे अभिनंदन केले पण मी नाही ! अर्थात, त्याने फरक काय पडतो म्हणा ? पण यावरून मी तुमचा भक्त, कार्यकर्ता तर सोडा साधा मित्रही नाही, याची तुम्हांला कल्पना यावी. 


    तुम्ही या देशाचे पंतप्रधान बनल्यापासून धार्मिक दंगली, बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारी अधिकारी - मंत्र्यांचा संगनमतीय भ्रष्टाचार इ.चे न्यूजपेपर आणि न्यूज चॅनेल्स मधील प्रमाण तरी कमी झालं आहे. यावरून ' अच्छे दिन ' येऊ लागल्याचा मला अनुभव येत आहे.


    सध्या देशात व देशाच्या सीमेवर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक घडामोडी सुरु आहेत. परंतु , मला तुमचे लक्ष एका वेगळ्या मुद्द्याकडे वळवायचे आहे व तो म्हणजे भारताला कार्यक्षम पंतप्रधानांची जशी दीर्घ परंपरा लाभली आहे त्याचप्रमाणे ' शो ऑफ ' करणाऱ्यांचीही आहे. अगदी भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचाही त्याला अपवाद नाही !

    तुम्ही त्यांस अपवाद ठराल असे उगाच वाटून राहिले होते पण नाही. तुम्हीही त्याच वाटेचे वाटसरु निघालात ! परंतु , एकवेळ तुम्ही परवडले पण तुमचे अनुयायी नकोत अशी आता वेळ आली आहे. उदाहरणार्थ :- भारतातील मूर्ख, अडाणी, गांवढळ ( सुशिक्षित - अशिक्षित दोघेही ) लोकांना आजवर १०० वर्षांहून अधिक कित्येक समाजसेवकांनी, राजकीय नेत्यांनी स्वच्छतेचे धडे दिले. पण या मुर्खांनी त्यावर अस्वच्छतेचे बोळे फिरवले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यातील प्रत्येक सभेच्या अखेरीस लोकांना तुम्ही कळकळीने विनंती करायचा कि, ' सभास्थानावर कचरा फेकू नका. कचरा दिसला तर स्वतः साफ करा ! ' पण हे अडाणी लेकाचे थोडी ऐकणार ? त्यांनी दामदुपटीने कचरा करून टाकला.

    तुम्ही स्वतः हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला. परंतु, तुमच्या इतके घाणीमध्ये स्वतः उतरून स्वच्छता करण्याचं धाडस तुमच्या अनुयायांत कुठे हो ? त्यांनी स्वच्छ ठिकाणी झाडांच्या पाला - पाचोळ्याचा कचरा पसरवून अंगरक्षकांच्या गराड्यात तो झाडूने दूर करायचा नाटकीपणा आरंभला तो अजूनही चालूच आहे ! यामुळे जगात हसं कोणाचं झालं आणि होतंय हे न समजण्याइतके तुम्ही अडाणी नाही !   


    भ्रष्टाचाऱ्यांनी गोळा केलेल्या काळ्या पैशाला पाय फुटून तो परदेशात गेला. त्याला पकडून या देशात परत आणण्याचा विडा तुम्ही उचलला. पण तो काळा पैसा ज्या देशात ठेवला गेला असं आजवर सर्वजण समजत होते तो त्या देशातून कधीच गायब करण्यात आलेला हे आता सर्वांनाच कळून चुकलेलं आहे. फक्त उघड कोणी बोलत नाही इतकेचं !

    तुम्ही पंतप्रधान बनल्यापासून धार्मिक दंगे तर आता पूर्णपणे थंडावले आहेत. लोकं उगीचच बडोदा, दिल्ली विषयी अफवा उठवतात. त्यांची सवयच आहे ती ! असो, देशातील धार्मिक दंगे थंडावले पण आज महाराष्ट्रात काय चित्र दिसत आहे ? महाराष्ट्रच काय संपूर्ण देशातील मागास समजल्या जाणाऱ्या जाती - घटकांवरील अत्याचारात कुठे कमतरता आली आहे का ? त्यात खंड पडला आहे का ? बिलकुल नाही. तुमच्या समर्थ हातांत  देशाची शासन व्यवस्था असताना हे असे का व्हावे ?

    तुमच्या पक्षाचा जन्मदाता रा. स्व. संघ हा हिंदुत्वाच्या निव्वळ पोकळ गप्पा मारतो. म्हणे, ख्रिस्ती लोकं आदिवासींचं धर्मांतर करतात. अरे, जी गोष्ट ते हजार मैलांवरून येऊन सहजपणे करतात ती तुम्हांला इथल्या इथे करता येऊ नये ? पण हि गोष्ट त्यांना सांगणार कोण ? जिथे आदिवासींच्या व धर्मांतराच्या बाबतीत संघाची हि उदासीनता तिथे ते मागास समजल्या जाणाऱ्या जाती - घटकांविषयी काय करणार हे दिसत आहेच !  कधी तरी वेडाचे झटके आल्याप्रमाणे संस्कृतीरक्षणासाठी ते आजकालच्या मुला - मुलींवर दादागिरी करतात. करणारच म्हणा ते ! कारण, ज्या गोष्टी त्यांना उघड करता येत नाही त्या करण्याचा इतरांनी तरी आनंद का घ्यावा अशी स्वार्थी भावनाही त्यांच्या मनी असते.

     काँग्रेसपेक्षा भाजपा बरी, अशा भावनेने समाजातील सर्व जाती घटकांनी तुम्हांला निवडून दिले आहे. तेव्हा सर्व जाती घटकांचा विचार करून तुम्ही शासकीय निर्णय घ्याल अशी आशा आहे. परंतु , अशीही वेळ आणण्याची कृपा करू नये कि, मराठीत नव्या म्हणीची भर पडावी - ' काँग्रेसपेक्षा मोदी भयंकर ! '

    असो, पत्र खूप दीर्घ व कंटाळवाणे झाले. तुम्हांला वाचण्यासाठी तेवढा वेळाही मिळायला हवा. आम्ही काय ? रिकामटेकडे ! शाळा - कॉलेजांत थोडं फार विचार करायला व लिहायला शिकलो म्हणून पांढऱ्यावर काळं करत बसलो. इतकेचं ! कळावे.

                                       
                                                               आपला प्रकट विरोधक,           
                                                                संजय क्षिरसागर     

रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

माणुसकी हरवत चाललेली माणसं… !


    काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात जवखेडे खालसा येथे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा खून करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्याचा प्रकार घडला. घटना घडून गेली. विछिन्न देहांवरील अंत्यसंस्कार उरकण्यात आले. मरणारे लोक स्वभावाने चांगले होते, गावात त्यांचे कोणाशी भांडण नव्हते असे सर्टीफिकेट पोलिसांनी देऊनही टाकले. नंतर अचानक मृत व्यक्तींपैकी एकाचे गावातील स्त्री सोबत प्रेमसंबंध असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्यामुळे या प्रकरणाला निराळेच वळण लागले. पोलिसांची प्रस्तुत प्रकरणातील भूमिका संशयास्पद वाटावी अशीच आहे. कोणाच्या तरी दबावाखाली उलट - सुलट विधानं करून पोलिस खाते या प्रकरणाविषयी समाजाची दिशाभूल तर करत आहेच पण सोबतीला संशयाचे वातावरण निर्माण करून तणावाला चालनाही देत आहे.

     पोलिसांनी या बाबतीत ढिलाई दाखवू नये याकरिता सामाजिक संघटना व लोकांचे उत्स्फ़ुर्त मोर्चे निघत आहेत. या मोर्च्यांना नक्षलवाद्यांनी पुरस्कृत केल्याच्या पुड्या सोडण्यात येत आहेत. याच न्यायाने पाहिल्यास गोध्रा, बडोदा, मुंबई येथील दंगेही नक्षलवाद्यांनीच केले होते असे म्हणायचे का ? माझ्या मते, लोकसत्ता व तत्सम वृत्तपत्रांच्या ' विशेष प्रतिनिधींनी ' या प्रश्नांची समाधानकारक अशी ' खरी ' उत्तरं देऊन आमचे अज्ञान दूर करावे.

     या जगात, देशात, राज्यात माणसं मारली जाणं यात फारसं धक्कादायक असं काही राहिलं नाही. दररोज कितीतरी जणांचे खून पाडले जातात. कितीतरी अपघातात मरण पावतात तर कित्येकजण आजारपण, आत्महत्या इ. कारणांनी आपले प्राण गमावतात. मग जवखेडे येथील तीन माणसांचं मारलं जाण्यात नाविन्य ते काय ? किंवा या तिघांचीच हत्या जणू काही या राज्यात / देशात घडणारी पहिलीच हत्या आहे असा देखावा का निर्माण केला जातोय ? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. या ठिकाणी आपण थोडं विषयानंतर करू.

     दिल्लीमध्ये बस बलात्कार प्रकरण होण्यापूर्वी या देशात / दिल्लीत बलात्कार घडत नव्हते का ? दिल्लीचे प्रकरण घडून गेल्यावर देखील तिथे बलात्कार घडायचे बंद झाले का ? मुंबईचे शक्ती मिल प्रकरण घडून गेल्यावर देखील शहरांतील बलात्कारांचे प्रमाण घटले आहे का ? यांची उत्तरे नकारार्थी आहेत. मग दिल्लीच्या प्रकरणाला हवा देण्याचे कार्य कोणी केले ? तो जनतेचा स्वाभाविक उद्रेक होता असे गुळमुळीत उत्तर देण्याचा प्रयत्न होईल पण ते सर्वांशी खरे नाही.

     लोकांनी मोर्चे काढण्यापर्यंत तो जनतेचा भावनिक उद्रेक होता, इथपर्यंतचा भाग खरा आहे. त्याला मेणबत्ती मोर्चा वगैरे संघटित निदर्शनांचे हेतुपूर्वक रूप देऊन व मिडीयाला हाताशी धरून त्याची व्यापकता वाढवण्यात आली. प्रिंट व टेलिव्हिजनचा वापर करून लोकांच्या मनी त्या गुन्ह्यातील आरोपींविषयी व त्या आरोपींचा तपास करण्यात ढिलाई दाखवणाऱ्या पोलिसांच्या विषयी तसेच पोलिस खात्याच्या ढिलाईला वाव देणाऱ्या काँग्रेस सरकारविरोधी चीड निर्माण करण्यात आली. यातून साध्य काय झाले ते जगजाहीर आहे. पण यात मूळ प्रश्न सुटलेला नाही हे मात्र उघड सत्य आहे व ते सत्य नजरेआड करण्याइतपत माध्यमं हुशार आहेत.

    दिल्लीतील बलत्कार प्रकरण व जवखेडे प्रकरणाची जर तुलना केली तर असे लक्षात येते कि, मिडीयाची या दोन्ही घटनांतील भूमिका परस्परविरोधी आहे. दिल्ली प्रकरणातील मोर्चे हे जनतेचे पुरस्कृत होते पण जवखेडेचे नक्षलवादी पुरस्कृत. त्याआधी खैरलांजीचेही तसेच होते. याचा अर्थ असा कि, आम्ही जे सांगू, दाखवू, छापू तेच तुम्ही ऐकायचे, बघायचे व वाचायचे आणि मान्यही करायचे. बरे, हि एकट्या मीडियाची अक्कल नाही. ते पिंजऱ्यातले पोपट. त्यांना जो खाऊ देईल त्याच्या इशाऱ्यावर पोपटपंची करणार व आपण लोकशाहीचा आधारस्तंभ असल्याच्या बाता मारणार !

    मिडीया जाऊ द्या, सोशल नेटवर्किंग साईट्सवरील सक्रीय विचारवंत - तरुणाईची यावरील प्रतिक्रिया काय आहेत ? जवखेडाचे मृत लोक तथाकथित ' दलित ' समाजाचे असल्याने फक्त ' दलितांनाच ' त्याविषयी सहानुभूती, चीड आहे. बाकीचे काय ? फार थोड्यांनी या घटनेविषयी निषेधाचा आवाज उठवला आहे. ज्यांनी आपले आत्मे विकले नाहीत, ज्यांच्यातील मनुष्यतव लोपलं नाही फक्त त्यांनीच ! बाकीचे मात्र बोटचेपी भूमिका घेऊन तटस्थ राहिले आहेत. हि घटना का घडली ? कशी घडली ? त्यामागील कारणं काय होती ? इ. प्रश्नांची उत्तरे जेव्हा मिळतील तेव्हा ते आपला निषेधरुपी वांझ संताप व्यक्त करतील. धन्य आहे अशा विचारवंतांची, तरुणांची !

    मारली गेली ती माणसं होती. मारणारीही माणसं होती. निषेध व्यक्त करणारीही माणसंच आहेत व निमूटपणे पाहणारीही माणसंच आहेत. हे सर्व पाहता खरोखर आपण सुधारत आहोत कि मागास बनत चाललो आहोत असा प्रश्न पडू लागला आहे. खून करण्यामागील कारणं काहीही असोत पण एखाद्याचा त्याच्या इच्छेविरुद्ध जीवन जगण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर मृतदेहांचे तुकडे करण्यात आले आहेत. अशा घटना दररोज घडतात हे मान्य करून देखील मी असे म्हणतो कि, जेव्हा अशा घटना आपल्या वाचनात येतात वा अवलोकनात येतात तेव्हा त्याविषयी फार काही नाही --- साधा निषेधाचा शब्द आपण नोंदवू नये ? देवी - देवतांचे व इतर फोटो Like करण्यासाठी जे हात तत्परतेने पुढे सरसावतात तेच हात अशा वेळी मागे का राहतात ?

    भ्रष्ट सरकार, प्रशासन व्यवस्था यांच्याविषयी तुमच्या मनात संताप, चीड आहेच ना ? या संतापाला, चिडीला वाट देण्याचे कार्य तुम्ही सोशल नेटवर्किंग साईट्सवरून करता. का ? तर या साईट्स शेवटी सरकारी खात्याच्या दृष्टीखालून जाऊन त्यांना जनतेच्या मनोभावना कळतात ते तुम्हांला माहिती आहे म्हणून ! मग जवखेडे करिता जेव्हा सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर केला जात आहे त्याकडे संशयाने का पाहिलं जात आहे ? उलट अशा प्रयत्नांना मनमोकळेपणाने ' One Click ' सहकार्य केल्यास सामाजिक सलोखा कायम राहण्यास मदतच होईल. परंतु हे आपल्याकडून घडून येणार आहे का ? नाही. कारण शेवटी ' आपण ' व ' ते ' हे भूमिका सहजासहजी बदलली जाणार नाही. या भूमिकेतील ' आपण ' कायम असून ' ते ' मात्र प्रसंगानुसार बदलतात. कधी मुसलमान. कधी ब्राम्हण. कधी दलित. कधी धनगर. कधी आदीवासी. तर कधी फासे पारधी !

     या भूतलावर माणसाचा जन्म / निर्मिती का झाली ? कधी झाली ? कशी झाली याचा शोध घेण्यात येत आहे. याची समाधानकारक उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील. पण माझ्या मते, या पृथ्वीवर माणसाइतका दुर्बल प्राणी दुसरा कोणी नाही. तो आता इतका दुबळा झाला आहे कि, आपल्या आदिम पूर्वजांप्रमाणे देखील जगू शकत नाही. अशा स्थितीत आपले जीवन अधिकाधिक सुखकारक व सुरक्षित व्हावे तसेच आपल्यातील दुर्बल ( शारिरिक अर्थाने ! ) घटकांचे देखील जीवन सुखमय व सुरक्षित व्हावे याकरता त्याने प्रयत्नशील राहाणे अपेक्षित आहे. पण वास्तव नेमकं उलट आहे. आपल्यातीलच रक्ता - मांसाच्या लोकांना काल्पनिक भेदांवर परकं मानून परस्परांचे अस्तित्व धोक्यात आणण्यचाच माणसाचा प्रयत्न सुरु आहे !

शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

बलात्कारी मानसिकतेचा एक शोध :- मुक्त व स्वैर विचार मंथन


    दिल्लीतील कुप्रसिद्ध बस बलात्कार प्रकरण घडल्यानंतर भारतीय जनता, मिडीया व थोड्या प्रमाणात सरकार खडबडून जागे झाले. बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी खास कायद्यांची निर्मितीही करण्यात आली व येत आहे. परंतु एवढे सर्व होऊनही बलात्काराच्या घटनांत काही घट होताना दिसून येत नाही. उलट त्यात वाढच होत चालली आहे. उजेडात येणाऱ्या घटनांचे प्रमाण गुप्त प्रकरणांच्या तुलनेने तसे नगण्यच आहे. त्यामुळे हे प्रकरण कितपत भयावह आहे याची वाचकांना कल्पना येईलच. बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची नेमकी मानसिकता काय असते ? तो बलात्कारास प्रवृत्त का होतो ? बलात्काराची कृती केल्यानंतर वा करताना त्याचे मन विकृतीकडे ओढ का घेते ? या व अशा कित्येक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा हा एक अल्प प्रयत्न.  

    निसर्गाने मनुष्यांत स्त्री - पुरुष हे दोनच पण मुख्य भेद पाडले आहेत. यांच्यात जसे भेद आहेत तसेच यांना परस्परांविषयी कमालीचे आकर्षण देखील आहे. मानसिक व शारिरिक ! प्रचलित अर्थाने हिंदू शास्त्रे पाहिली तर जवळच्या नात्यातील स्त्रियांच्या सहवासातही फार काळ एकांत न  करण्याची सूचना आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. मनुष्य टोळी जीवनातून स्थिर जीवनाकडे वळला तसतशी मातृसत्ताक पद्धती पितृसत्ताक तर बनलीच पण सोबतीला स्त्री - पुरुषांचे लैंगिक व्यवहार देखील नियंत्रण करण्यात आले. यापूर्वी नात्यांचा विचार न करता --- कारण ' नातं ' हि संकल्पनाच अस्तित्वात नव्हती --- संबंध ठेवले जात. परंतु ' कुटुंब संस्था ' विकसित होऊ लागल्यावर ' नातं ' हि संकल्पना जन्माला येऊन विकसित होऊ लागली. त्यामुळे हे अनिर्बंध लैंगिक संबंध नियंत्रित करण्यात आले खरे, परंतु पूर्णतः बंद होऊ शकले नाहीत. तेव्हा धर्मशास्त्रांच्या आधारे यांना निषिद्ध म्हणून घोषित करण्यात आले. कुटुंब संस्थेत ' विवाह ' संकल्पनेचा शिरकाव होऊन तिला अनन्यसाधारण महत्त्व आल्याने व अनिर्बंध लैंगिक संबंधाने होणारे कलह नियंत्रित करण्यासाठीही विवाहपूर्व व विवाहबाह्य तसेच बळजोरीने संबंध प्रस्थापित करणे नीतिबाह्य मानले जाऊ लागले. शास्त्राकार व समाजनियमन करणाऱ्यांच्या दृष्टीने ते आदर्श समाज विकसित करत होते. मात्र, जगात सदासर्वकाळी सर्वच व्यक्ती विवाह करून शारिरीक सुख प्राप्त करू शकत नव्हते, नाहीत. अशा लोकांच्यासाठी एका खास वर्गाची निर्मिती करण्यात आली. ज्याला सध्या ' वेश्या ' हे नाव देण्यात आले आहे. यामुळे समाजातील विवाहाद्वारे शारिरीक सुख उपभोगण्यास असमर्थ अशा पुरुषवर्गाची सोय झाली परंतु, स्त्री वर्गासाठी अशी काही तरतूद करता आली नाही.  

    पुरुष वर्गाने आपल्या सोयीने स्वतःला उपयुक्त अशा नियमांची, संस्थांची निर्मिती केली. त्याचप्रमाणे स्वतःला बंधनकारक अशा कायद्यांची देखील निर्मिती केली. परंतु , असे असूनही --- म्हणजे कामवासना शमविण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असूनही त्यासाठी स्त्रीवर्गावर बळजबरी करण्याची त्याची वृत्ती काही बदलली नाही. बलात्कार हे आधीही होत होते, आताही होतात पण पुढे घडू नयेत अशी मनोमन इच्छा आहे !  

    पुरुषाची कामवासना प्रबळ व अनावर झाली कि दिसेल त्या स्त्रीला वासनाशमनार्थ यंत्र समजून जवळ ओढण्याची त्याची ' आदिम - पुरुषी - रानटी ' वृत्ती उफाळून येते. यावेळी नात्याचा, परिस्थितीचा, वयाचा कशाचाही विचार केला जात नाही. असे का व्हावे ? 

    पुराणांचा दाखला घेतला तर देवाधिदेव देखील बलात्काराचा मोह टाळू शकले नाहीत. मध्ययुगीन काळातील इतिहास देखील काही फारसा वेगळा नाही. यानंतर आधुनिक भारताचा इतिहास सुरु होतो. अव्वल ब्रिटीश राजवटीत बलात्काराच्या घटना घडतच होत्या. या घटनांचे समाजमनातील पडसाद / प्रतिबिंब नंतर कथा - कादंबऱ्यांमध्ये उमटू लागले. आर्थिक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील स्त्रीवर्गाकडे सामाजिक, आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गातील कामांध पुरुष आशाळभूत नजरेने पाहू लागले. दरम्यान औद्योगिकीकरणाने समाजाला एक वेगळीच दिशा / गती मिळाली. त्यामुळे आर्थिक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक देखील शहरांकडे धाव घेऊन या दृष्टचक्रातून आपली सुटका करून घेऊ लागले. परंतु, या दृष्टचक्रापासून संपूर्ण मुक्तता मिळणे शक्य नव्हते व नाही. कारण,  बलात्कार हि व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. विशिष्ट मानसिकता आहे. जी सर्वसाधारणतः सुप्त असते पण संधी मिळताच प्रकट होते.

    औद्योगिकीकरणाने समाज बदलला. प्रवृत्त्या बदलल्या नाहीत. त्यांनी फक्त कात टाकली. शहरांकडे धाव घेणाच्या वृत्तीने ' संयुक्त / एकत्र कुटुंबसंस्था ' एकप्रकारे मोडीत तर निघालीच पण ' छोटे कुटुंब ' हि संकल्पनाही पूर्णतः विकसित झाली नाही. शहरांत किंवा रोजगार असलेल्या ठिकाणी घर विकत अथवा भाड्याने घेऊन संसार थाटणे सर्वांनाच शक्य होत नाही. अशा वेळी विवाहित स्त्री - पुरुषांचे वर्षातून ठराविक काळ एकत्र येणे, दुरावणे हे प्रकार घडून येतात. या गोष्टींचा वा कारणांचा बलात्कार वृत्तीशी संबंध जोडता येईल का ? किंवा हे कारण या कृत्यामागे असावे का ?

    गावात विवाहबाह्य संबंध ठेवणे तसे सोपेही आहे व अतिशय अवघड देखील. मात्र शहरात तसे होत असावे का ? आत्ताच्या काळात हि गोष्ट राजरोसपणे होते, पण आधीच्या --- ५० वर्षांपूर्वीच्या काळात ते शक्य होते का ?

    ग्रामीण - शहरी माणसांचे मनोरंजन करणाऱ्या गोष्टींमध्ये साहित्य, सिनेमा, खेळ इ. प्रकारांचा समावेश होतो. वयात येणाऱ्या व एकलेपणा अनुभवणाऱ्या वर्गासाठी प्रेमकथा लिहिणारा वर्ग या काळात उदयास आला. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात हिंदी सिनेमाचे योगदान किती हा वादाचा मुद्दा असला तरी काळानुरूप बदलणाऱ्या भारतीय मानसिकतेचे प्रतिबिंब त्यात दिसून येते हे नाकारता येत नाही. सिनेसंस्कृती बाळबोध होती तेव्हा श्लील - अश्लील प्रकार त्यात होते वा नव्हते माहिती नाही. परंतु जसजशी ती विकसित होत गेली तसतशी हिंदी सिनेमातील स्त्री पात्राची भूमिका बदलत गेली. यशस्वी - अयशस्वी बलात्काराचा एक सीन हा आता सिनेमाचा अविभाज्य भाग बनूलागला. हि परंपरा स. २००० पर्यंत कायम राहून आता जवळपास नामशेष झाली. आत्ताच्या सिनेमात तर डायरेक्ट हिरो - हिरॉईनचा रोमान्स दाखवून बलात्काराला पूर्ण फाटा दिला आहे. म्हणजेच सेक्सचे स्वरूप बदलून ते पेश करण्यात येत आहे. असे का ? आधीचा सिनेमा ग्रामीण - शहरी भारताचे प्रतिनिधित्व करत होता. आत्ताचा फक्त शहरी भागाचे नेतृत्व करतो. काय आहे सध्याच्या शहरी भागाचे स्वरूप ?

    एकेकाळी विवाहपूर्व शारिरीक संबंध निषिद्ध मानणारा शहरी समाज आता बदलू लागला आहे. नव्या पिढीला जुन्या संस्था, नियमांची फारशी पर्वा नाही. आवश्यकताही वाटत नाही. इथे कोणाची वाट चुकली वा मार्ग फसला हे महत्त्वाचे नाही तर, प्रवृत्तीत बदल होत आहे याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शहरी तरुणाईचे प्रतिबिंब सध्याच्या सिनेमात दिसून येते इतकेच. पण असे असले तरी शहरात बलात्कार हे घडतातच. ते का ?

    सामान्यतः वृत्तपत्रे, बातम्या यांमधून ज्या काही बलात्काराच्या घटना उजेडात येतात त्यांचे दोन मुख्य भागपडतात . (१) नात्या अंतर्गत (२) नात्याच्या बाहेर. मात्र या दोन मुख्य भागांचे जे पोटभाग आहेत, त्यांत कमालीचे साम्य आहे व ते म्हणजे पीडित व्यक्तीचे अल्पवय असणे अथवा एका व्यक्तीवर अनेकांनी मिळून अत्याचार करणे.


    (१)    प्रथम आपण नात्याअंतर्गत घटकाचा विचार करू. जवळच्या नात्यातील संबंध सर्वत्र निषिद्ध मानले जात असले तरी ते अजिबात घडत नाहीत असे नाही. सहमतीने घडणाऱ्या संबंधांचा येथे विचार करणे योग्य नाही. मात्र बळजोरीने जे घडवून आणले जातात त्यांचा विचार करणे आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञांचे मत लक्ष घेत बालपणापासून एकत्र वाढलेल्या दोन विजातीय लिंगी व्यक्तींमध्ये शारिरीक आकर्षण फारसे नसते. पण नियमाला जसे अपवाद असता तसे इथेही आहेत. त्याशिवाय माणसाचा एक स्वभाव आहे व तो म्हणजे जी कृती करू नये असे त्यास बजावलेले असते ती कृती करण्याकडे त्याच्या अंतर्मनाचा ओढा असतो. याला ' बालसुलभ ' प्रवृत्ती देखील म्हणता येईल. त्यामुळेच अशा संबंधांचा विचार करण्याकडे व ते विचार कृतीत आणण्याकडे त्याचा कल झुकत असावा. सध्याचे सर्वत्र सहज उपलब्ध असलेले ई - साहित्य पाहिले तर इनसेस्ट रिलेशनवर आधारित कथांचे त्यात प्राबल्य दिसून येते त्यामुळेच ! आता या कथांची निर्मिती अशा विचारांना चालना देते कि, असे विचार अशा कथांना जन्म देतात हा भाग वेगळा. परंतु, जे तथ्य आहे, सत्य आहे ते स्वीकारले पाहिजे. 

    नैसर्गिक आकर्षण व निषिद्ध कर्म करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती यांमुळे नात्याअंतर्गत संबंधांच्या - बलात्काराच्या घटना घडून येतात. याचा उपभाग म्हणजे कमी वय असणे. सामान्यतः सहमतीपूर्वक संबंध हे समवयस्कांमध्ये तसेच चार दोन वर्षांचा फरक असलेल्यांमध्ये ठेवले जातात. मात्र, बलात्काराच्या घटनेत वयामध्ये कमालीची असमानता आढळते. पीडित व्यक्ती अत्याचारी व्यक्तीच्या बरोबरची, मोठी वा लहान असू शकते. समवयस्क वा वयाने मोठ्या व्यक्तीवरील अत्याचाराची मानसिकता थोडी समजू शकते परंतु अल्पवयीन --- ज्यात वय वर्ष दोन तीन पासून पुढे सुरु व वृद्ध --- वय वर्ष पन्नासच्या पुढील --- व्यक्तीवरील अत्याचार करणाऱ्याची मानसिकता नेमकी काय असावी ? वेगळेपणाचे ' थ्रील ' अनुभवणे हेच मुख्य कारण कि, प्रबळ वासना ? कि आणखी काही ? विवाह करून किंवा विवाहबाह्य संबंध ठेवण्यापेक्षा हा पर्याय काहींना कदाचित जास्त व्यवहारी देखील वाटत असावा. ज्यामध्ये कसलाही खर्च नाही कि जबाबदारी नाही. एकदा अत्याचार झाला कि, पीडित व्यक्ती लज्जेस्तव तो गुप्त ठेवते आणि मग पुढची सोय होऊन जाते. नात्याअंतर्गत ज्या बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या त्यामध्ये पहिला अत्याचार होऊन कित्येक महिने वा वर्षे  गेली होती हे लक्षात घेणे गरजेचे आहे.  

    नात्याअंतर्गत बलात्काराचा दुसरा उपविभाग म्हणजे एकावर अनेकांनी अत्याचार करणे. वास्तविक याच्या उजेडात येणाऱ्या घटना अतिशय नगण्य आहेत. मात्र तरीही हा प्रकार घडतो हे उघड आहे. यातील बव्हंशी घटना या मुख्य प्रकाराशी संबंधित आहेत. प्रथम यात पीडित व अत्याचार करणारी व्यक्ती अशा दोघांचा सहभाग असतो व तिसरी व्यक्ती घटनेची माहिती कळताच त्यात सहभागी होते. परंतु, सर्वांनी म्हणजे एकाहून अनेकांनी एकाचवेळी नात्याअंतर्गत व्यक्तीवर अत्याचार केल्याची घटना माझ्या वाचनात आल्याचे स्मरत नाही.  

    (२)     नात्याबाहेरच्या व्यक्तीवरील अत्याचाराच्या घटना घडतात त्यात देखील पीडीताचे वय अत्याचारी व्यक्ती इतके, कमी -- अत्यल्प व जास्त -- वृद्ध अशा स्वरूपाचे असल्याचे दिसून येते. विवाहाआधी शारिरीक सुख उपभोगण्यासाठी वासना शमनार्थ शय्यासोबतीसाठी पुरेसे पैसे नसल्याने, विवाहबाह्य संबंध ठेवण्याची इच्छा असून संधी न मिळाल्याने तसेच वासना शमनेचे सर्व मार्ग खुंटल्यावर व्यक्ती या थरास जात असावी का ? 

     ' खाली दिमाग सैतान का घर ' असे म्हटले जाते. या म्हणीचा शब्दशः अर्थ न घेता भावार्थ जर घेतला तर माणसाची विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे तिला इष्ट - अनिष्ट वळण लागल्यास अशी कृत्ये घडत असावीत का ? १० वर्षांखालील व्यक्तीकडे बघून वासना अनावर होतेच कशी हा भावनिक प्रश्न असला तरी १० वर्षांखालील व्यक्ती आपल्यावर घडलेल्या अत्याचाराचा बभ्रा करणार तरी कशी ? तिला भीती दाखवल्यास आपले काम सहज होऊ शकते हे व्यावहारिक कारण असू शकेल का ? आपल्या समवयस्क व्यक्तीवर बळजोरी केल्यावर ती बोंब ठोकेल वा तक्रार करेल. तेव्हा या कृत्यावर पडदा पाडण्यासाठी खुनाचा मार्ग अवलंबावा लागतो. म्हणजे आणखी एक गुन्हा आला. त्याऐवजी अल्पवयीन व अजाण बालक - बालिका यासाठी आदर्श ' लक्ष्य ' आहे. तीच मीमांसा वृद्ध व्यक्तीच्या बाबतीत देखील करता येईल. 

    बलात्काराच्या घटनेत एका व्यक्तीवर अनेकांनी मिळून अत्याचार करण्याच्या घटनांचे प्रमाण अधिक वाढले आहे. विशेष दखल घेण्याची बाब म्हणजे यात पीडित व्यक्ती फारच कमी प्रमाणात अल्पवयीन सदरात मोडणारे असून बव्हंशी घटनांत पीडित व्यक्ती व अत्याचारी व्यक्तींच्या वयात फारसा फरक नसल्याचे आढळून येते. तसेच सामुहिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अनेकदा अत्याचारी घटकांत अल्पवयीन व्यक्ती सहभागी असल्याचे दिसून येते. असे का ? समवयस्क व्यक्तीवर एकट्याने अत्याचार करणे आता अशक्य होऊ लागले आहे का ? कि समूहाचे मानसशास्त्र या ठिकाणी लागू पडते ? एकाचवेळी एकाच विजातीय लिंगी व्यक्तीविषयी एकाहून अधिक जणांना शारिरीक आकर्षण वाटू शकते का ? कि आपल्या सहकाऱ्यास त्याचे इच्छित लक्ष्य प्राप्त करून देण्यास्तव आरंभी सहभाग घेतला जातो व आपल्या सहकाऱ्याचे कामकृत्य पाहून इतरांची वासना प्रज्वलित होते ? सामूहिक अत्याचारात अल्पवयीन सहभाग का घेतात ? विजातीय लिंगी व्यक्तीविषयक नैसर्गिक आकर्षणाने कि समूहाच्या सोबतीने, अनुकरणवृत्तीने ? 

    सामूहिक अत्याचारात सहभागी असलेल्या अल्पवयीन व्यक्तीकडून पीडित व्यक्तीवर अत्याचाराहून अधिक भयंकर शारिरीक दुखापत करण्याचे प्रकरणही विशेष दखल घेण्याजोगे आहे. दिल्ली मधील कुप्रसिद्ध घटनेत बसमधील लोखंडी रॉड नाजूक भागातून शरीरात घुसवण्याचा प्रकार झाला. हि घटना तशी अलीकडची. पण जवळपास अशाच ' थीम ' वर आधारित बलात्काराची दृश्ये गैर भारतीय भाषांतील सिनेमात येऊन गेल्याचे किती जणांना माहिती आहे ? अशा प्रकारच्या दृश्यांचे लेखन करणाऱ्या व्यक्ती विकृत मानाव्यात कि अल्पवयीन, अज्ञ ? लहान मुल ज्याप्रमाणे रागाच्या भरात खेळण्यांची मोडतोड करते. तसेच अनेक विवाहबाह्य प्रकरणांत संबंध उजेडात आल्यावर प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी जेव्हा संबंध ठेवणारी व्यक्ती आपल्या प्रियपात्राच्या सहाय्याने / मूक संमतीने आपल्या पती / पत्नीचा खून करते तेव्हा तिरस्कार, घृणा, राग या व अशा कित्येक भावनांच्या आहारी जाऊन लैंगिक अवयवांचा विध्वंस देखील  करते. यामागील नेमकी मानसिकता काय असावी ? अशी व्यक्ती फक्त त्याच प्रसंगापुरती विकृत का बनावी ? 

     अल्पवयीन वा अजाण व्यक्ती हि शारिरीक हिंसाचारात अधिक निर्दयी असते. कारण, आपण जे कृत्य करत आहोत, त्याच्या परिणामांची त्यास कल्पना, पर्वा अजिबात नसते. परंतु अशीच कृत्ये जेव्हा परिपक्व वयातील सुजाण व्यक्ती करतात तेव्हा काय समजायचे ? 

    पीडित व्यक्तीने तोकडे कपडे परिधान केल्याने अत्याचारी व्यक्तीची वासना चाळवली जाते असे म्हटले जाते. हा खरोखर बिनबुडाचाच नव्हे तर बिनडोकपणाचा युक्तिवाद आहे. तोकडे कपडे घालणाऱ्या व्यक्तींपेक्षा अंगभर वस्त्रे परिधान करून देखील अत्याचारास बळी पडलेल्या पीडीतांची संख्या जास्त असल्याची वस्तुस्थिती लक्षात न घेत केलेलं हे विधान आहे.

    स्त्री - पुरुषांतील नैसर्गिक आकर्षण हे सर्वसंमत असेच आहे. मात्र कामभावनांचा निचरा ' दमन ' प्रक्रियेने न होता समाजमान्यमार्गांनी, नियमांनी व्हायला हवा. हेच सध्याच्या बलात्कार प्रश्नाचे एक उत्तर बनू शकते.



शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

मी कोण ?


    लेखाचे शीर्षक वाचून कोणाला देशपांड्यांचा ' असा मी ' आठवेल किंवा अत्र्यांचा ' मी कसा झालो ? ' आणि त्यावरून माझाही अशाच पद्धतीने लेखन करण्याचा मनोदय असल्याचा अंदाज बांधला जाईल. परंतु तसे नाही. प्रस्तुत ठिकाणी मला -- मी कोणत्या धर्माचा, जातीचा आहे याचा शोध घ्यायचा आहे. वास्तविक हे कार्य मी पुढील पिढीतील संशोधकांवर सोडू द्यायला हवे होते खरे, पण माझ्यावर संशोधन किंवा चार ओळींचे ( शोकात्मक वा निंदात्मक ) लेखन करण्याइतपत मी मोठा ( छोटा ) होईन असे मला तरी अजिबात वाटत नाही. तेव्हा आपल्या जिवंतपणीच हे कार्य स्वहस्ते उरकून घेण्याचा माझा विचार आहे.  


    रुढार्थाने पाहिल्यास माझा जन्म हिंदू धर्मातील ' महार ' जातीत झाला. दाखल्यावर त्याची नोंद हिंदू - महार ते पुढे हिंदू - बौद्ध आणि नंतर नवबौद्ध अशी उत्क्रांती सिद्धांतान्वये बदलत गेली. अर्थात हा बदल व गोंधळ केवळ कागदावर घडला असे नसून मानसिक व बौद्धिक पातळीवर देखील घडून आला, घडत आहे व कदाचित पुढेही घडत राहील. बहुसंख्यांकांच्या सोबतीने अल्पसंख्यांक राहिल्यास एकमेकांच्या चालीरीती, परंपरा, श्रद्धा इ. अंगांवर परिणाम हा होतोच. थोडक्यात त्यांची देवाण - घेवाण होते. उदा :- भारतात हिंदू हे बहुसंख्य व त्या तुलनेने मुसलमान, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन हे अनुक्रमे अल्पसंख्यक आहेत. यांपैकी हिंदू धर्मीय अपवाद केल्यास उर्वरित धर्मियांवर हिंदूंच्या चालीरीती, परंपरा, श्रद्धा इ. चा फार मोठा प्रभाव पडला आहे तर या धर्मियांच्याही काही मुल्यांचा हिंदुंवर बऱ्याच प्रमाणात प्रभाव आहे. याबाबतीत अगदी तपशीलवार विभागणी करायची झाल्यास हिंदू, जैन, बौद्ध व शीख हे हिंदुस्थानात जन्मलेले ( तत्कालीन संज्ञेनुसार ) असून ख्रिस्ती व इस्लाम हे आयात केलेले / लादलेले धर्म आहेत. ( या ठिकाणी आयात / लादलेले या शब्दांचा शब्दशः अर्थ घेऊ नये. ) त्यामुळे हिंदू, बौद्ध, जैन व शीख यांच्यातील संस्कृती, धर्म, श्रद्धा, संस्कार इ. याच मातीतील असल्याने फार थोड्या प्रमाणातील भेद अपवाद केल्यास हे तसे हिंदूच आहेत. मात्र मुसलमान व ख्रिश्चन हे आनुवंशिकरित्या हिंदू असले तरी धार्मिकदृष्ट्या गैरहिंदू आहेत.  


    आता या गैरहिंदूंवर हिंदूंच्या चालीरीतींनी, संस्कृतीने, श्रद्धेने कसा परिणाम केला ते आपण थोडक्यात पाहू. या ठिकाणी आपण इस्लामचे उदाहरण घेऊ. पैगंबर प्रणित इस्लामधर्मियांचे वर्तन व सध्याच्या भारतीय मुसलमानांचे वर्तन पाहिल्यास त्यात जमीन - अस्मानचे अंतर असल्याचे दिसून येते. याबाबतीत एकच उदाहरण देतो. इस्लामच्या जन्मभूमीत मृत व्यक्तीच्या कबरीवर दर्गे उभारून त्यांची उपासना केली जात नाही तर आपल्याकडे निव्वळ दर्ग्यांवर न थांबता महालांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. त्याशिवाय हिंदूंची दुखवट्याची, दिवस पाळण्याची पद्धतही उचलण्यात आली. प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर भारतीय मुसलमानांतही हिंदूंप्रमाणे जातींची निर्मिती होऊन त्यांची उतरंड निर्माण झाली. या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते कि, अल्पसंख्यांक कितीही धर्मनिष्ठ असले तरी बहुसंख्याकांच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकत नाहीत. कित्येकांना हि चर्चा विषयांतर वाटत असेल तर कित्येकांना लेखाचा विषय काय व हा लिहितोय काय असा प्रश्न पडला असेल. परंतु मी अजून भरकटलो नाही एवढे येथे नमूद करून मूळ मुद्द्याकडे येतो.

    इस्लामधर्मियांचे उदाहरण तुलनेसाठी घेऊन मला इतकेच सुचवायचे होते कि, जिथे मुसलमान हिंदू धर्माच्या प्रभावापासून मुक्त होऊ शकले नाहीत तिथे माझी काय कथा ? कोणी भेटले कि त्याला मी " नमस्कार " असे अभिवादन करतो. याचा आमच्या नवबौद्ध मंडळींना राग येतो. त्यांच्या मते मी " जयभीम " म्हणायला पाहिजे. पण बालपणापासून माझ्या आयुष्याची २० - २५ वर्षे " नमस्कारात " गेल्यावर " भीमाचा जय " कसा म्हणणार ?  बाबासाहेबांनी धर्मांतर केले त्यावेळी धर्मांतर करण्याची बुद्धी आमच्या आजोबांना झाली होती कि नव्हती माहिती नाही. परंतु घरातील परंपरा पाहता ती झाली नसावी असे माझे अनुमान आहे. त्यामुळे विवाहविधी अपवाद केल्यास सर्व काही हिंदू पद्धतीने साजरे होते. मूर्तीपूजेवर, देवाधर्मावर आपली श्रद्धा नसल्याने या बाबतीत माझी मते नवबौद्धांशी ५०% जुळतात. पण ५०% नाही. कारण, ज्यावर आपली श्रद्धा नाही, विश्वास नाही त्यावर टीका का करायची ? श्रद्धा कोणावर ठेवायची व कोणावर नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या ठिकाणी नाहक जबरदस्ती का म्हणून ?

    गेल्या वर्षी एकदा एका गावी माझे जाणे झाले. पूर्वाश्रमीच्या महारवाड्यात ( उच्चारी ' म्हारवडा ' ) देखील एक फेरी झाली. तिथल्या एका घरात मला कमालीचे विसंगतीपूर्ण दृश्य दिसून आले. घराच्या प्रवेशद्वारी चौकटीवर घोड्याची नाल ठोकण्यात आली होती तर घरामध्ये प्रवेश करताच समोरच्या भिंतीवर बाबासाहेबांचा भलामोठा फोटो लावलेला होता. आता आणखी एक गोष्ट येथे नमूद करतो कि, सदर घर हे अशिक्षित ( सरकारी व्याख्येनुसार साक्षर -- कारण नाव लिहिता - वाचता येते.) व्यक्तीचे होते. पण हि स्थिती सुशिक्षितांची नाही असे थोडी ! माझ्या परिचयाचे एक दलित साहित्यिक आहेत. मुळात मला एक गोष्ट समजत नाही, ' दलित ' हा शब्द अभिमानाने का मिरवला जातो ? दलित समाज, दलित साहित्य - साहित्यिक इ. जसा हरिजन हा शब्द तिरस्करणीय आहे तसाच दलित हा देखील आहे असे माझे ठाम मत आहे. तर मी काय सांगत होतो कि, माझ्या परिचयाचे एक अतिकट्टर असे नवबौद्ध साहित्यिक -- जे चारचौघांत नवबौद्ध धम्माचा पुरस्कार तर हिंदू धर्माची नालस्ती करत असतात. प्रस्तुत महाशय जहाल आंबेडकरवादी आहेत. त्यामुळे हिंदूंची मूर्तीपूजा त्यांना अजिबात खपत नाही पण दरवर्षी नेमाने कुळाचार म्हणून कुलदेवतेच्या दर्शनाला गुपचूप जात असतात. हा विरोधाभास कशाचे प्रतिक आहे ?

    व्यक्तिगत उदाहरण द्यायचे झाले तर माझा विवाह बौद्ध पद्धतीने झाला. त्यावेळी उपाध्यायाने प्रथम मला अगम्य अशा भाषेत मंत्रांचे उच्चारण करून नंतर त्यांचे मराठी भाषांतर करून सांगितले व मला त्यांचा उच्चार करावयास लावला. वास्तविक लग्नाच्या वेळी उपाध्याय अथवा मंत्रोच्चारणाकडे लक्ष द्यायला कोण लेकाचा शुद्धीवर असतो ? पण अशा बेसावध क्षणीही मला हि विसंगती जाणवली. जी भाषा नवबौद्धांना अपरिचित आहे त्या भाषेत विवाहविधीचे उच्चार का ? हे कोडे आजही मला उलगडले नाही. पण त्याचवेळी हे देखील लक्षात येते कि, हिंदू विवाह पद्धतीतील मंत्रोच्चारणाचा अर्थ विवाह करणाऱ्या हिंदूंना तरी कुठे माहिती असतो ? वर्षाचे बाराही महिने हिंदूंच्या सणांनी - व्रतांनी व्यापलेले आहेत. त्यातील किती सण साजरे करण्याचे नवबौद्ध टाळतात ? हिंदूंची वटसावित्री नवबौद्ध करतात कि नाही ? दिवाळी देखील त्याज्य नाही कि राखी पौर्णिमाही ! मग गणेशोत्सवात घरात गणपती बसल्यास त्यावर नवबौद्धांचा आक्षेप का ?

    गेल्यावर्षी सहज दादरच्या चैत्यभूमीवर जाण्याचा योग आला. तिथे आतमध्ये गेलो. तेथील दृश्य आजही माझ्या नजरेसमोर तरळत आहे. मी त्या इमारतीत प्रवेश केला. गोलाकार भिंतीतील प्रवेशद्वारातून आत गेलो व उभा राहिलो. समोर बाबासाहेबांचा अर्धपुतळा असून त्यांच्या पाठीशी बुद्धाची मूर्ती होती. बाबासाहेब आपल्या चार डोळ्यांतून माझ्याकडे बघत होते तर मी दोन डोळ्यांतून त्यांना पहात होतो आणि बुद्ध आपल्या नेहमीच्या व जगप्रसिद्ध मंदस्मितहास्यमुद्रेने आमच्या दोघांकडे बघत होता. एखाद्या मंदिरात जसे भारावलेले वातावरण असते जवळपास तसेच तेथेही होते. त्या ठिकाणी एक गोष्ट माझ्या सहज लक्षात आली व ती म्हणजे या ठिकाणी अगरबत्ती ऐवजी मेणबत्तीचा वापर होतो आणि चर्चमध्ये देखील मेणबत्त्या वापरल्या जातात ! अगरबत्तीचा त्याग व मेणबत्तीचा स्वीकार हे कोडं काही मला उलगडलं नाही. चैत्यभूमीजवळच स्मशानभूमीअसून तिथे मृतदेहांना अग्नीच्या हवाली केले जाते. त्यात नवबौद्धांप्रमाणेच महारांचाही समावेश आहे ! मृतदेहावरील अंतिम संस्कारांच्या विधीत हिंदू व बौद्ध धर्मात काय फरक आहे ? माझ्या घरात मला माहिती असल्यापासून माझे दोन आजोबा व एक आजी असे तिघेजण ' बॅक टू पॅव्हेलियन ' गेले खरे पण एकालाही सरणावर जळताना पाहणे माझ्या वाट्याला आले नाही. त्यामुळे अखेरच्या विधीची मला तरी कल्पना नाही. पण अंतिम संस्कारानंतर कार्य / दिवस, श्राद्ध इ. परंपरांचे पालन केल्याचे मात्र मला माहिती आहे. अर्थात, आता या परंपरांचे पालन न करण्याकडे नवबौद्धांचा कल असल्याचेही दिसून येऊ लागले आणि हि खरेच आनंदाची व कौतुकाची बाब आहे. कारण हिंदू परंपरेच्या प्रभावापासून सुटका करून घेणे तितकेसे सोपे नाही. मात्र त्यांनी हे कार्य प्रबोधनाने, वैचारिक जागृतीने करावे अशी माझी अपेक्षा आहे. जबरदस्तीने नव्हे !

    व्यसनांचा जगभरातील सर्वच धर्मांनी जवळपास निषेध केलेला आहे. मात्र निषिद्ध मानलेले मद्यपान हे इतर धर्मियांप्रमाणेच नवबौद्धांनी देखील आपलेसे केले आहे. ज्याचा बाबासाहेबांनी देखील निषेध केला होता. बुद्धाच्या विचारसारणीशी अनुयायांची फारकत समजू शकते पण बाब्साहेबांच्या आवाहनावर इतकी विरुद्ध प्रतिक्रिया का म्हणून ? मनुष्याने स्थिर जीवनास आरंभ केल्यापासून किंवा मनुष्य जीवनास आरंभ झाल्यापासून ताण - तणाव हे त्याच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. ( आणखी एक हिंदू विधी ! ) या ताण - तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी माणसाने जे उपाय शोधले त्यातील एक जालीम उपाय म्हणजे मद्यप्राशन ! यांमुळे टेन्शनपासून माणसाची सुटका कशी होते काय माहित पण याचे सेवन करण्यास सर्वधर्मीय मांडली आपापले मतभेद विसरून आतुरतेने पुढे सरसावतात. दारूच्या ग्लासात सर्व जाती - धर्मातील भेद मिटले जातात. माणसांची एकी कुठे होते ? तर कोणत्या पवित्र स्थळी नाही तर दारूच्या अड्ड्यावर ! हा पराभव कोणाचा ? धर्मसंस्थापकांचा, महापुरुषांचा कि संस्कृतीचा ??

रविवार, १५ जून, २०१४

संजय म्हणाला …! ( भाग - ४ )


      
                     दिवस …. रविवारचा. वेळ …. दुपारची. स्थळ …. अस्मादिकांचे बेडरूम कम वाचनाची खोली.
      खोलीचे वर्णन :- गादीवरील बेडशीट विस्कटलेली. सकाळचा पेपर चावून ( कि चघळून ? जे काय असेल ते ) चोथा झाला आहे. चार - दोन इतिहासाची ( एक प्रकारे कच्च्या भांडवलाची ) पुस्तके बाजूला पडली आहेत. अस्मादिक हाती वही - पेन घेऊन प्रतिभा साधनेस बसले आहेत. लॅपटॉपवरील प्रीती झिंटाचे फोटो तन्मयतेने पाहत प्रतिभेची साधना करण्याचा प्रयत्न केला जातोय पण स्फूर्ती काही केल्या येत नाही. अखेर वैतागून खिडकीच्या बाहेर आकाशाकडे शून्यात नजर लावून ( म्हणजे नेमके कुठे ? कोणास ठाऊक पण शब्दप्रयोग भारी आहे. ) पाहण्याचा प्रयत्न होतो आणि शेवटी स्फूर्तीदेवता प्रसन्न होऊन लेखक महाशयांच्या हातातील लेखणीतून कागदावर शब्दरूपी मोत्यांची ( उपमेला मोती वापरणे हा आपला एक काल्पनिक श्रीमंतीचा प्रकार ! ) उधळण करते.

              आजकाल लेखन करून पोटं भरण्याचा जमानाच उरला नाही. गेल्या जमान्यातील ते पुलं म्हणून कोण होते, त्यांची विनोदी प्रकारची पुस्तके जाम खपून ते ' कोट्याधीश ' झाल्याची बातमी समजल्यावर आपण ठरवलं कि, आपण लेखकंच बनायचं. आता लेखक बनण्यासाठी काही कोर्सेस, क्लासेस सुरु झाले आहेत, पण हि सोय आम्हांला तेव्हा उपलब्ध नव्हती. मग उचलेगिरीचा सर्वमान्य फंडा आपण स्वीकारला. ' अस्मादिक, आम्ही ' अशी भारी शब्दयोजना स्वतःसाठी वापरायला सुरुवात केली. मधीमधी कंसात वाक्यं टाकायची कोट्याधीशांची पद्धतही अलगदपणे उचलली. पन साला लेखन काही जमेनाच ! दरम्यान ' टवाळा आवडे विनोद ' हे एका प्रसिद्ध संताचे वचन डोळ्याखालून गेल्याने आपन टवाळकी सोडायचे ठरवले अन पाच - पन्नास खरडलेल्या वह्यांची पाने फाडून त्यांची विल्हेवाट लावून आपण गंभीर अशा साहित्याकडे वळलो. ( अर्थात स्वतः केलेलं लेखन फाडावं लागणारा या महाराष्ट्रातील पहिला लेखक मीच आहे. पण ' संत सूर्यामुळे ' आमचे नाव लक्षात कोण घेतो ? )
                             गंभीर आणि जड अशा लेखनासाठी तशाच जडविद्वानांची पुस्तके वाचणे भाग होते. तेव्हा अशा लेखकांच्या ग्रंथांचा ( गंभीर विषयावरील लेखन ' ग्रंथ ' असतो आणि हलकं - फुलकं हे ' पुस्तक ' ) जोमाने अभ्यास केला. त्यातून ' पानिपत असे घडले ' हा अवाढव्य ग्रंथ जन्माला आला खरा ( ' … अन प्रकाशक खड्ड्यात गेला.' माझ्या सत्यवचनी जरा गप्प बैस. ) पण नुसती लेखक म्हणून मान्यता मिळाली, ' विद्वान लेखक ' म्हणून नाही. ( जाऊ द्या. आपलंच दुःख किती उगळावं ! ) तेव्हा आता कथा - कादंबरी लेखनास आरंभ करण्याचा विचार केला. अर्थात, त्याचाही आपण परत जोमाने अभ्यास सुरु केला. ( म्हणजे उचलेगिरी ! ) महाराष्ट्रातील परिचित व अपरिचित अशा पाच - पन्नास कथा - कादंबरीकारांच्या साहित्याचा अभ्यास करून आणि ' बटाट्याच्या चाळीतील श्री. पोंबुर्पेकरांच्या ' प्रतिमेस वंदन करून कथा लेखनास आरंभ केला अन …. माशी शिंकली !
                 कथेतील पात्रांची नावं काय ठेवायची हा मोठाच प्रश्न पडला. नायिका फडके, जोशी प्रभूती घराण्यातील दाखवली व तिचे पवार, शिंदे, पाटील, काळे इ. पैकी एका घराण्यातील नायकाशी प्रेमसंबंध दाखवले तर ब्राम्हणी संघटना ' आमच्या मुली काय फक्त प्रेमंच करत हिंडतात कि काय ? ' म्हणून गळा धरतील अशी भीती. बरं, नायिका पवार, पाटील, कदम कुळातील दाखवली अन तिचा नायक कांबळे, पानतावणे, भोईर, कोळी अशा घराण्यातील दाखवला तर कमरेला नसलेल्या तलवारी परजत मराठा संघटना ' आमच्या घरंदाज मुलींची बदनामी करतोस काय ? ' म्हणून मान कापायच्या ! जिथे नायक - नायिका ठरवण्यासाठी एवढा विचार करावा लागतो तिथे खलनायकांचे काय करायचे
           कथानक ग्रामीण असेल तर व्हिलन पाटील असायला हवा, पण आता मराठा संघटनांची भीती ! बरे, इनामदार किंवा सावकार घालावा तर आता ब्राम्हणी संघटना मुद्द्यांपेक्षा गुद्द्यांवर अधिक भरवसा ठेवू लागल्या आहेत. दलित समाजातील पात्र खलनायक बनवावे तर ' हजारो वर्षे आमच्यावर चाललेला अन्याय अजूनही सुरु असल्याची ' घोषणा करत त्यांच्या पाच - पन्नास संघटना तुटून पडायच्या. अरे मग, आता आम्ही नायक - नायिका - खलनायक बनवायचे तरी कोणाला ? ( सही ! काय मस्त डायलॉग जमला आहे यार !! हा कोणीतरी रस्त्यावर उभं राहून मोठ्यानं ओरडून बोलायला पाहिजे. ) मुसलमानाला गुंड बनवावे तर हिंदू - मुस्लिम सलोखा बिघडतो. म्हणजे तीही वाट बंद. ख्रिस्त्यांना व्हिलन करण्यासाठी घाटावरून गोव्यात जावे लागेल, ते आपल्याला परवडणार नाही. जी बोंब ग्रामीण पार्श्वभूमीची तीच थोड्याफार फरकानं शहरी भागाची ! जिकडे पहावं तिकडे आता जातींच्या संघटना बनत चालल्या आहेत. तेव्हा आता प. पू. महेश कोठारेंचे स्मरण करून नायक - नायिका - खलनायकांची नावं ठेवण्याचा विचार आहे.
             उदा :- नायक - रम्या उर्फ रमेश. किती शिकला माहिती नाही. नोकरी - धंद्याचा पत्ता नाही. केसांचा कोंबडा किंवा भांग पाडून तो सदानकदा पोरींच्या मागे फिरत असतो. नायिका - ज्योती, मंदा, नंदा ( यांपैकी एक किंवा असलेच काहीतरी एक नाव. पण नायिकेला टोपण नाव नसतं बरं का ! ) कॉलेजात जाते. कितवीला ते माहिती नाही. हातात एकचं वही अन पेन. सोबत चार दोन मैत्रिणी. ( यांच्या व नायिकेच्या चढ - उतारांसहीत पोषाखसंपन्न देहांचे वर्णन फडके, काकोडकर, सोनवणी यांच्या कादंबऱ्यांमधून उधार घेण्यात येईलंच ! ) खलनायक - धोंडू खेकडे उर्फ धोंड्या खेकडा. याला खेकडे खाण्याचा भारी शौक. हा सारखा खेकडे खात असतो व उरलेल्या वेळात व्हिलनगिरी करतो. पण नेमके काय करतो माहिती नाही. तरीही पेपरांत याचे कुख्यात गुंड म्हणून नाव येते व माणसांत याची दहशत असते. याशिवाय दुय्यम खलनायक म्हणून नाना लोणीवाले हे राजकीय पात्र आहेंच. हे खेकड्याला व आपल्या वरिष्ठांना सदानकदा लोणी लावत असतात. तर अशा या भयानक दुकलीचा आपल्या नायक - नायिकेसोबत कसा सामना होतो आणि ते त्यातून कसे निभावून सहीसलामत सुटतात याचे वर्णन ' लोणीदार खेकडा ' या आपल्या आगामी कादंबरीत वाचकांना वाचावयास मिळेल.
                 अर्थात, जिज्ञासू वाचकांची जिज्ञासा थंड करण्यासाठी या कथानकाची थोडक्यात रूपरेषा येथे देतो :- रम्या वासुगिरी करत मंदाच्या प्रेमात पडतो. मंदा कॉलेजात शिकत समाजसेवा करत असते. शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम करून ती जमलेला पैसा कॅन्सर, एड्स, कावीळ ( ज्या रोगाचे जास्त बळी पडतील तो रोग टाकण्यात येईल. ) औषधोपचारासाठी देते. स्वतः किरकोळ अंगयष्टीची असूनही ती नेमाने रक्तदान करत असते. या सर्वांतून वेळ मिळाला कि, ती रम्यावर प्रेम करते. इकडे खेकड्याची माणसे पोलिस चकमकीत जखमी होतात. त्यातील काहींना रक्ताची नितांत गरज असते. तेव्हा ब्लड बँकेत जाऊन रक्त आणण्यापेक्षा रस्त्याने जाणाऱ्या चार - पाच तरुणींना उचलून नेतात. यात एक आपली नायिका असते. पुढे खेकडा त्यांचे रक्त काढून आपल्या माणसांचे प्राण वाचवतो पण त्या तरुणींचे काय होते ? खेकडा त्यांना सोडतो कि आणखी काय करतो ? आपला नायक, नायिकेचा शोध कसा लावतो इ. प्रश्नांची उत्तरे मात्र वाचकांना ' लोणीदार खेकड्या ' तंच मिळतील.