रविवार, ३ मार्च, २०१९

प्रासंगिक ( ६ )




    सगळं कसं ठरवून केल्यासारखं झालं नाही.. पुलवामा हल्ला मात्र तेवढा अनपेक्षित होता. एका क्षणात ४० हुन अधिक जवान भारताने शत्रू राष्ट्र पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात क्वचितच गमावले असतील. सीआरपीएफ जवानांची ने - आण करताना अक्षम्य चुका झाल्याची कबुली वगैरे दिली गेली, जात आहे. गुप्तचर खात्याने मात्र आपले हात यापूर्वीच झटकत दोष सीआरपीएफवर ढकलून दिलाय, ते मात्र या गदारोळात फारसं कोणाच्या लक्षात आलेलं नाही. चालायचंच.. छोट्या छोट्या गोष्टी विसरण्याची आपल्याला सवयच आहे.. आम्हांला सोस आहे भव्यदिव्यतेचा.. नेमकं हेच हेरून एयर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. यामध्ये हळूच तीनशे, साडेतीनशे दहशतवादी मारले गेल्याची पुडी सोडण्यात आली. सगळे कसे हुरळून गेले.. पाकिस्तानचा सूड घेतला वगैरे.. पण त्याच वेळी काश्मिरात दहशतवादी हल्ले सुरूच असल्याचे मात्र दुर्लक्षित करण्यात आले, किंबहुना आत्ताही ते चालूच असतील पण त्यात मरणारे / मारणारे कोणाच्या खिजगणतीतही नाहीत. हेही चालायचंच.. बॉर्डरवर हे सगळं चालू असताना देशभरात एकप्रकारचं उन्मादी वातावरण क्रिएट केलं जात होतं.. युद्धज्वर तसा प्रत्येक देशातील जनतेत हा असतोच.. किमान युद्धजन्य स्थिती अनुभवण्याची एक सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनी असते अन् ती यावेळी बव्हंशी पूर्णही झाली. मुंबईसारख्या पाकिस्तान निकट शहरांना रेड अलर्ट देण्यात वगैरे आले. याचा फायदा घेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अधिवेशनच गुंडाळले.. इथे आठवण येते विन्स्टन चर्चिलची.. जर्मनीच्या विमानांनी इंगलंडवर बॉंम्बफेक चालवली होती. त्यावेळी पठ्ठ्याने ना राजधानी सोडली ना नेहमीचं प्रशासकीय कामकाज थांबवलं. हिटलर तर मरेपर्यंत बर्लिनमध्येच राहिला.. मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने हा भेकडपणा का दाखवावा ?
   
    पण मुख्यमंत्रीच का ? सध्याच्या घडीचे देशातील पोलादी पुरुष म्हणून स्वतःचा गौरव करून घेणारे स. पंतप्रधानांनी तरी काय वेगळं केलं ? नुकतीच भारत पाकिस्तान फाळणी झाली होती, का होणार होती ते मला आता आठवत नाही. तेव्हाच्या बंगालमध्ये जातीय दंगली पेटल्या होत्या. पेटता बंगाल विझवण्यासाठी मोहनदास गांधी नावाचा वेडा मनुष्य .. ( हवं तर टकल्या म्हणा, थेरडा म्हणा किंवा त्याच्या आई माईचा उद्धारही करा. ) हातात फक्त एक काठी ( ती पण चालताना आधार म्हणून बरं का ! ) घेऊन गेला होता. अर्थात, छुपे अंगरक्षक वगैरे प्रकार सोबत असेल हा तर्क जरी ग्राह्य धरला तरी म्हातारा अशा प्रसंगी जीवावर उदार होऊन गेल्याचे मान्य करावेच लागेल.  या धर्तीवर जर खुद्द पंतप्रधान अगदी आपल्या ए टू झेड बॉडीगार्ड्स आणि लष्करी ताफ्यासह काश्मिरात जाऊन तळ ठोकून राहिले असते तर .... ? स्वतःचं समर्थ नेतृत्व करण्याची जी संधी होती, ती नेमकी हीच होती. जी पंतप्रधानांनी दवडली. पण... असो. ते जाहीर सभांमधून आपल्या दंडातील बेटकुळ्या फुगवून दाखवू लागले अन् तिकडे इम्रान खानने तीच संधी साधत एकीकडे शांततेची बोलणी करत दुसऱ्या हाताने पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या भारतीय वैमानिकाच्या प्रत्यार्पणाची भाषा करत तिसरीकडे काश्मिरातील दहशतवादी कारवाया कशा चालू राहतील याकडे लक्ष पूरवले. चाणक्य, मास्टरस्ट्रोक, चतुरस्त्र राजकारणी कोण ? इम्रान कि नरेंद्र ?? सुरवात होते पुलवामा घटनेपासून. नंतर मग जाणीवपूर्वक वातावरणनिर्मिती करत एयर सर्जिकल स्ट्राईक आणि त्यात भव्यदिव्य यश मिळाल्याची जाहिरात करत हळूच काही दिवसांनी असं काही आम्ही बोललोच नव्हतो.. म्हणजे हल्ल्यात तीनशे दहशतवादी मेले वगैरे.. भारत हा एक देश आहे. या देशाला आंतरराष्ट्रीय राजकारणात थोडीफार किंमत आहे, प्रतिष्ठा आहे किमान ती राखण्यासाठी तरी माणसाने आपली तोंडं उघडावी / आवळावी ? आयटी सेल चालवल्या प्रमाणे केंद्रातील मंत्र्यांनी, सत्तेत सहभागी पक्षाच्या नेत्यांनी केवळ लोकप्रियेस्तव भरपूर वलग्ना केल्या. काश्मीर पर्यटनावर बहिष्कार टाकण्याची घोषणाही त्यापैकीच एक.

    काश्मीरचे अर्थकारण मुख्यतः या पर्यटनावर चालते. तेच बंद झाले तर बेकार, बेरोजगारांचे तांडे कुठे जातील आणि काय करतील हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. आणि नेमकं त्यांना हेच हवं. यानिमिताने पुन्हा आवडता हिंदू - मुस्लिम वाद त्यांना जिवंत करता येईल. जेणेकरून यांचे महत्त्व राहावे. तुलनेनं विचार केला तर मग नक्षलवाद्यांना सामील होणाऱ्यांचे काय ? ज्या ज्या शहरात, गावात नक्षलवादी समर्थक, हस्तक मिळालेत ती ती गावं, शहरं यांच्या योजनेनुसार क्लीन केली तर.. खरंच करायला पाहिजेत ना.. एकजात मारून टाकली पाहिजेत सगळी.. अगदी हिटलरही लाजला जाईल अशी.. पण मग राज्यातील विविध मंत्री, आमदार, खासदारांचे काय ? तेही नक्षली गावं, शहरांचं प्रतिनिधित्व करतात. अगदी आपले मुख्यमंत्री देखील ! खेरीज प्रत्येक गाव - खेड्यांत, शहरात विखुरलेला आयटीसेल वर्गही.. केवळ मुस्लिम अथवा कश्मिरी द्वेषापोटी त्यांच्या कत्तलीची भाषा करून आपण कोणत्या भस्मासुराला जन्म देतोय हे आता तरी लक्षात येतंय का ? याच धर्तीवर मग नागालँड, ओरिसा, पंजाब.. कुठे आणि किती ?? अंती देश म्हणून काय शिल्लक तरी राहील का ? राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक प्रदेश नाही तर व्यक्ती म्हणजे राष्ट्र हे आत्ता तरी आपण समजावून घेणार आहोत का ?

    खैर.. हे सगळं असंच चालायचं.. निवडणूका होईपर्यंत.. नंतर निवडणूक झाल्या म्हणून.. कायमस्वरूपी तोडगा काढण्याची इच्छा असल्यास काढता येईल पण त्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्तीच आज आपल्यात नाही. लोकं अद्यापही आपल्या हक्कांबाबत जागरूक आहेत, कर्तव्यांप्रती नाहीत. ज्या दिवशी लोकांना आपल्या कर्तव्याची जाणीव होईल, त्या दिवशी सामाजिक प्रश्न सोडणवण्याची राजकीय इच्छाशक्तीही अस्तित्वात येईल. तोवर.. चलता है,चलने दो ...!

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८

मोहम्मद अझीज.... खुदा हाफिज !


                                                                     


    हल्लीच्या पिढीला हे माहिती नसतं ते माहिती नसतं असं म्हणण्याचा एक ट्रेंड आहे. पण हि गोष्ट खरी आहे कि, काही काही गोष्टी हल्लीच्या पिढीला खरोखरच माहिती नाहीत. त्यापैकी एक म्हणजे मोहम्मद अझीझ !
     थोड्या वेळेपूर्वीच मोहम्मद उर्फ मुन्ना अझीजच्या निधनाची बातमी ऐकली आणि काही क्षण मन सुन्न झाले. क्षणभरात त्याची कितीतरी गाणी मनात तरळून गेली अन त्याचवेळी आम्हाला सर्व काही मिळालं पण फेस व्हॅल्यू काढील मिळाली नाही.. लोकं आवाजाने आम्हाला ओळखतात पण चेहऱ्याने नाही.. हि त्याने एका इंटरव्युव्हमध्ये बोलून दाखवलेली खंतही आठवली. ज्यावेळी तो कॅमेऱ्यासमोर बोलला होता तेव्हाही ऐकताना वाईट वाटत होतं आणि आता तर..
    रफीच्या निधनानंतर त्याच्या स्टाईलमध्ये गाणाऱ्यांना शोधण्याची इंडस्ट्रीने एक मोहीम आखली त्या मोहिमेत शब्बीर कुमार, मुन्ना अझीज सारखे गायक वर आले. तसे पाहिले तर मुन्ना अझीज बंगाली इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करतच होता. शिवाय इथे रफी असतानाच त्याच्या आवाजाच्या बऱ्यापैकी जवळ जाणारा अन्वरही पाय रोवून होता. तुलनेनं पाहता अझीज कुठेच नव्हता. आवाजाच्या बाबतीत पाहिलं तर त्याचा आवाज बऱ्यापैकी जड. त्यामुळे रफीच्या पश्चात अन्वरच इंडस्ट्रीवर राज्य करणार हे उघड होतं. पण तकदीर नावाची चीजच और असते.
    अन्वरला यश पचवता आले नाही. शब्बीर कुमारला चान्स मिळूनही त्याचे मनमोहन देसाईसारख्या डायरेक्टर सोबत खटके उडून ' मर्द ' च्या टायटल सॉन्गसाठी अन्नू मलिकने मुन्ना अझीजला आमंत्रित केलं.. .. बाकी मग इतिहासच आहे.
    स. १९८५ च्या मर्द पासून . १९९५  च्या करण अर्जुन पर्यंत अझीजने एक दशक गाजवलं. तसं पाहिलं तर . १९९० च्या ' आशिकी ' मधून जन्मला आलेल्या कुमार सानू या बंगालच्याच वादळाने इंडस्ट्रीतील आधीचे सगळे प्रस्थापित गायक उधळून लावले होते. केवळ स्वतंत्र धाटणीचा आवाज म्हणून उदित नारायण त्या वादळात आणि नंतरही टिकून राहिला. तुलनेनं मुन्ना अझीज, शब्बीर कुमार, अमितकुमार वगैरे मंडळी इंडस्ट्रीतुन बाहेर पडायच्या मार्गावर होती / बाहेर पडली होती.
    यादृष्टीने पाहिले तर अवघी पाच वर्षांची सांगीतिक कारकीर्द मुन्ना अझीजची म्हणता येईल. पण या अल्पावधीत देखील बऱ्यापैकी श्रवणीय गाणी तो गाऊन गेला. अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञीक, साधना सरगम सारख्या तेव्हाच्या नव्या दमाच्या तर लता मंगेशकर, आशा भोसले सारख्या दिग्गज पार्श्वगायिकांसोबतची त्याची बरीच गाणी गाजलेली आहेत.   त्याच्या काळातील जवळपास सर्वच पहिल्या फळीतील अभिनेत्यांसाठी त्याने पार्श्वगायन केले. त्याचप्रमाणे एक काळ गाजवून सोडलेल्या राजेश खन्ना, दिलीपकुमार, शम्मी कपूर सारख्या अभिनेत्यांकरताही त्याने प्लेबॅक दिला.
    विशेषकरून दिलीपकुमारसाठी कर्मा, इज्जतदार, सौदागर आणि किला या (बहुतेक) चार सिनेमांसाठी पार्श्वगायन केले. पैकी, कर्मा आणि सौदागर मधील गाणी बऱ्यापैकी गाजली आजही ती परिचित आहेत. फक्त त्यातले प्लेबॅक सिंगर नावाने किंवा चेहऱ्याने कोणाला माहिती नाहीत. ( उदा :- मनहर उदास ) असो.
    राम लखनचे टायटल सॉन्ग असो कि त्याच चित्रपटातील माय नेम इज लखन, त्रिदेव आणि विश्वात्मामधील सनी देओलच्या वाट्याला आलेली गाणी, चालबाज मधील कविता सोबतच्या तेरा बिमार मेरा दिल या गाण्यातील मुन्ना आणि कविताची जुगलबंदी मस्त आहे. तशीच ती गोविंदा - नीलमच्या ' चलो चले दूर कही ' मध्ये पण दिसून येते. अनुराधा पौडवाल सोबतचे ' 'तेरी मेरी प्यार भरी बातों में ' देखील सुश्राव्य आहे. खुदा गवाह माधील अमिताभच्या वाट्याला आलेल्या गाण्यांपैकी ' तु मुझे कुबुल ' पुन्हा एकदा गाजू लागलं आहे. लक्ष्मीकांत - प्यारेलालचा तो ऑर्केस्ट्रा, वाद्यांची अचूक निवड हे सारं जरी यामागे असलं तरी गायक - गायिकांची पुण्याईही नाकारता येत नाही. तीच बाब ' मय से मीना से ना साकी से ' गाण्याची. एक मध्यमवयीन इसम या गाण्यावर गोविंदासारखा नाचला आणि रातोरात या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल होऊन आठवणींच्या समृद्ध अडगळीत पडलेलं हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं. तसं पाहिलं तर मुन्ना अझीजच्या गाण्यांविषयी लिहिण्या - बोलण्यासारखं बरंच काही असलं तरी त्या सर्वच गाण्यांचा इथे परामर्श घेता येत नाही, हे खेदाने कबूल करावं लागत आहे. असो.
    एक पार्श्वगायक म्हणून मोहम्मद अझीजचं इंडस्ट्रीतील योगदान काय ? हा प्रश्न तसा सर्वांच्याच मनात आहे. ज्यांना रफीच्या आवाजावर प्रेम आहे त्यांना रफीची नक्कल करणारे नेहमीच प्रिय वाटत आले आहेत. ज्यांची रफीवर श्रद्धा आहे ते रफीच्या पलीकडे कोणाला गायक म्हणून मानायला तयार नाहीत. ज्यांना रफीच्या आवाजाचे वावडे होते त्यांना शब्बीर काय अन मुन्ना काय, नेहमीच बेसुरे वाटत आलेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर खरोखर प्रश्न पडावा कि मुन्ना अझीजचे या इंडस्ट्रीमधील नेमकं योगदान तरी काय आहे ?
    ज्या काळात मोहम्मद अझीज प्लेबॅक सिंगर म्हणून नावारूपास आला त्यावेळी इंडस्ट्रीवर किशोरकुमारचं साम्राज्य होतं. त्याच्या सावलीत स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास खुद्द अमितकुमारला संघर्ष करावा लागत होता. अन्वरने रफीची जागा घेऊन सोडली होती तर तिथे पोहोचण्याचा शब्बीरचा प्रयत्न चालला होता. इंडस्ट्रीचं एक गणित आहे. जिथे आर्थिक लाभ दिसतो तिथे गुणवत्तेला कात्री लावली जाते. शब्बीरच्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन त्याला झेपतील अशी गाणी बनवण्यात येत होती.... अशा वेळी शब्बीरला रिप्लेस करण्याची मनमोहन देसाईने धमक दाखवत मोहम्मद अझीजला मुख्य प्रवाहात आणले. त्यानंतर म्युझिकचा ट्रेंड बदलला. शास्त्रीय संगीताचे ज्ञान असल्याने, क्लासिकल टच असलेली गाणी गाण्यास मुन्ना अझीजला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे थोडीफार सुरीली गाणी त्या काळात जन्माला येऊ शकली. अर्थात, हे केवळ एकट्या मुन्ना अझीजमुळे झाले असे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु हिंदी गाण्यांच्या सुवर्णयुगाचा जो काही अवशेष बाकी राहिला होता....त्याचा थोडाफार अंश टिकून राहण्यामागे ज्या मंडळींचे योगदान कारणीभूत ठरले त्यापैकी एक मोहम्मद अझीज होता, हे विसरता येत नाही.


https://www.youtube.com/watch?v=91K8Qn3_1V0

https://www.youtube.com/watch?v=ZCGRqbKl38U

https://www.youtube.com/watch?v=t0-_VhLeHv0


शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

वैदिकांचे हिंदू धर्मियांवर घाला घालण्याचे कारस्थान !



आम्ही हिंदू सोशिक आहोत का ?
आम्ही हिंदू निरक्षर, अडाणी आहोत का ?
आम्ही हिंदू अशक्त, दुर्बल आहोत का ?
नाही ना.. .. मग आम्ही नेहमी इतरांचे गुलाम का बनतो ? हा प्रश्न प्रत्येक हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीने स्वतःस विचारला पाहिजे. दरवेळी परधर्मियाने यावं न् आपल्याला तुडवून टाकावं. त्यानंतर आपल्यातील एक मसीहा बनावा. त्याने त्याने दास्यत्वातून आपली सुटका करावी तोच त्याचा अंत होऊन पुन्हा गुलामीच्या शृंखला पायी पडाव्यात. हे चक्र कुठवर चालायचं ? एखाद्या गर्भश्रीमंताच्या घरी नादान व्यक्ती जन्मून त्यास भिकेचे डोहाळे लागावे, तसे आमचे का व्हावे ? आमची संशोधने, आमचा इतिहास, संस्कृती यांचे आमच्याच डोळ्यांदेखत अपहरण होत असता आम्ही स्वस्थ का बसून राहावे ?
घडून गेलेल्या गोष्टींवर काथ्याकुट काय करायचा असा जर आमचा भ्रम असेल तर तो साफ चुकीचा असून या भ्रमातून वेळीच बाहेर न पडल्यास आणखी एका गुलामीच्या चक्रात आपण अडकून पडणार आहोत.
कित्येकांना हि इस्लाम वा ख्रिस्त्यांची धार्मिक गुलामी वाटेल. अथवा परराष्ट्राची आर्थिक. पण तसे नाही. या क्षणी हिंदूंच्या अस्तित्वावर घाला घालण्यासाठी समस्त वैदिक धर्मीय आपले बाहू सरसावून पुढे येत आहेत. जरा उघड्या डोळ्यांनी, स्वतंत्र बुद्धीने विचार करून पहा..
राज्यघटना मान्य नाही म्हणत तिचे दहन करायचे व हे सर्व कृत्य राज्यघटनेनेच दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारात करून मोकळे व्हायचे.
न्यायदानाकरता असलेली निःपक्षपाती, निधर्मी न्यायसंस्था ठोकरून लावत हिंदू न्यायालयाच्या नावाखाली वैदिक न्यायालये उभारायची. जी वैदिक स्मृती शास्त्रांधारे न्यायदान करतील.
याच गोष्टी एखाद्या पर धर्मीय समुदायाने केल्या असत्या तर... ? हि वैदिक मंडळी नागडी नाचली असती. परंतु जेव्हा स्वतःच असे वागतात तेव्हा...
राष्ट्रप्रेम, देशभक्ती वगैरेच्या लंब्याचवड्या बाता माराव्यात तर यांनीच.. जणू काही आम्हांला राष्ट्रप्रेम वगैरे काही माहितीच नाही... परंतु त्यांचेही काही चुकत नाही. आम्हांला काही म्हणजे काहीच समजत नाही हाच तर खरा प्रॉब्लेम आहे.  
उदाहरणार्थ गांधी हत्या.
म्हाताऱ्याने फाळणीला मन्यता दिली, पंचावन्न कोटी देण्यासाठी उपोषणाला बसला म्हणून त्याला उडवला. मान्य. पण एकट्या गांधीच्या मान्यतेनेच देशाची फाळणी झाली का ? सावरकरांचा द्विराष्ट्रवाद सिद्धांत कुठे गेला ? आंबेडकरांनीही तो मांडला होता. जिना वगैरे मंडळी तर लचकेच तोडायला बसली होती. मग एकटा गांधीच का ? गांधी हत्या झाली त्यावेळी पंडित नथुरामांचे ते व्यक्तिगत प्रेरणेतून घडलेलं कृत्य होतं न् आता मात्र संघटीत, नियोजनपूर्व असल्याचे म्हटले जाते. मग इतकेच संघटन, नोयोज्न होते तर स्वतंत्र पाकिस्तान मागणारी नेतेमंडळीही उडवून टाकायची ना ?
गांधी हत्या ना फाळणीच्या कारणावरून घडली ना पंचावन्न कोटींच्या उपोषणामुळे. ती होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे अखिल भरतोय हिंदूंचे एकमेव असलेलं राजकीय नेतृत्व संपुष्टात आणणे. आणि गांधी नंतरचा इतिहास डोळसपणे अभ्यासाल तर या हेतुत वैदिक मंडळी कमालीची यशस्वी झाल्याचे दिसून येते.
राज्यघटनेच्या जन्मापासून तर तिच्या वैदिकांचे वाकडेच आहे. त्यानंतर नंबर लागतो राष्ट्रगीताचा. मग ते कधी ते इंग्लंडच्या राजाच्या गौरवार्थ रचल्याचे किंवा त्यात उल्लेखलेला प्रदेश, नद्या आज भारताच्या ताब्यात नाहीत वगैरे बाबी उपस्थित करत जनसामान्यांच्या तोंडी बसलेलं जन गण मन वजा करून तिथे संस्कृतप्रचुर वंदेमातरम् वगैरेंची वर्णी लागावी याकरता धडपड करायची. म्हणजे पुन्हा तिथेही केवळ उच्चार चुकीचा होऊ नये म्हणून एकाधिकारशाही आलीच !
तिरंग्याचीही तीच तऱ्हा. त्यावर नंतर कधीतरी बोलू. आता न्यायसंस्था. मुस्लिमांची शरीयत वगैरे आहे हिंदूंची का नसावी ? लक्षात घ्या, यातली नेमकी खोच. मुस्लिमांची धार्मिक न्यायसंस्था असली तरी ती अगदीच कौटुंबिक वगैरे बाबत आहे. बाकी दिवाणी, फौजदारी तर आयपीसी नुसारच आहे ना ? आणि हिंदूंची स्वतंत्र न्यायालये नाहीत हा दिव्य शोध वैदिकांनी कधी लावला ?
पुरातन काळापासून चालत आलेल्या श्रेणीसंस्था -- ज्यांना आता आपण जात पंचायत, जाती संस्था म्हणतो, त्या मग काय आहेत ? ग्रामीण भागात आजही शेष स्वरूपात असलेली भावकी बसणे वगैरे स्वतंत्र न्यायसंस्थेचाच भाग नाही का ?
उलट हिंदू न्यायालयांच्या नावाखाली यांना आपली स्वतंत्र वैदिक न्यायालये काढायची आहेत जी पूर्णतः वैदिक स्मृती शास्त्रांवर आधारित असतील. त्यातील नियमांनुसार तुमचा न्याय होईल. त्यातील सामाजिक वर्तनाचे नियम तुमच्यावर लादले जातील. त्यातील वर्णव्यवस्था अंशतः, रचनात्मक वा रुपांतरीत पद्धतीने अंमलात आणली जाईल. आणि महत्त्वाचे म्हणजे जी मनुस्मृती आजवर भारतात गैर हिंदूंना कधीच लागू नव्हती... ती त्यांच्यावर लादण्यात येईल !