नाबाद ४९ !

                                           



    ' खुनाला वाचा फुटते, कानून के हाथ लंबे होते है, अपराधी कितना भी शातिर क्यों न हो पुलिस के हाथों से कभी बचता नहीं, पोलिस सुतावरून स्वर्ग गाठतात ' अशी ठराविक टाईपची वाक्यं आपण वर्तमानपत्रं आणि टीव्ही - सिनेमाद्वारे अनेकदा वाचली आहेत. ऐकली आहेत. पण अनुभवली आहेत का ?

    दचकलात ना ? खरे तर प्रश्न दचकण्यासारखाच आहे. पोलिस - गुन्हेगारांच्या चातुर्य आणि बावळटपणाच्या कथा वाचताना, ऐकताना - पाहताना आपल्याला मजा येते पण असा एखादा अनुभव घेण्याची संधी जर चालून आली तर तुम्ही काय कराल ?

    सर्व सामन्य माणसांप्रमाणेच तुम्हीही ती संधी दवडाल. पण मी मात्र असे अजिबात केलं नाही. सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात अशा गोष्टी फार कमी घडतात. अगदी अपवादानेच. आणि मी तर सर्वसामान्य कधीच नव्हतो. तेव्हा माझ्या जीवनात अभावानेच येणाऱ्या अशा संधीला अव्हेरणं अजिबात शक्य नव्हतं.

    टीव्ही असो कि वर्तमानपत्र वा सिनेमा ! त्यांतील बावळट आणि मूर्ख गुन्हेगारांना पाहून - वाचून मला त्यांच्या सुमार दर्जाच्या बुद्धीची कीव येत असे. वर्तमानपत्रातील फरारी गुन्हेगारांना शोधून काढणाऱ्या, प्रसंगी ठार करणाऱ्या पोलीसांचे फोटो जेव्हा छापून येत तेव्हा या हुशार पोलिसांचा अजून खऱ्या बुद्धिमान गुन्हेगाराशी सामना न झाल्याचे मला राहून - राहून वाटत असे.

    असेच दिवस चालले होते. आसपास घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांचे प्रमाण जसे वाढत होते त्याचप्रमणे पकडल्या जाणाऱ्या गुन्हेगारांचेही प्रमाण लक्षणीय होते. पोलिसखात्याच्या कार्यक्षमतेचा, हुशारीचा सर्वत्र फारच गवगवा होऊ लागला होता. हि गोष्ट का कोणास ठाऊक पण माझ्या मनाला भयंकर अस्वस्थ करत होती आणि या अस्वस्थ, उद्विग्न स्थितीतीच मी मनाशी निर्णय घेऊन टाकला. पोलिसांना आव्हान देण्याचा !

    एकदा ठामपणे निर्णय घेतला कि, त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची माझी जुनीच सवय होती. त्यानुसार मी कामाला लागलो. सर्वप्रथम कोणत्या स्वरूपाचा सुनियोजित यशस्वी गुन्हा करायचा याचा मी विचार करू लागलो. आर्थिक फसवणूक, इस्टेट हडपणे, चोरी करणे, बलात्कार करणे वा समाजविघातक कृत्ये करणे इ. चा सखोल आणि डोकं दुखेपर्यंत विचार करून मी खून करण्याचे ठरवले. एक यशस्वी मर्डर करून पोलिसांना त्याची उकल करण्याचं चॅलेंज देण्याचं नक्की केलं. नियोजनपूर्ण अपराध करताना सर्वप्रथम घ्यायची खबरदारी म्हणजे आपल्या दैनंदिन कामात, व्यवहारात बिलकुल खंड पडून द्यायचा नाही. कसलाही चेंज करायचा नाही. उलट आपल्या दिनक्रमातच या गोष्टी उरकून घ्यायच्या असतात हे मला माहिती होतं.

    यादृष्टीने पाहता माझं रुटीन लाईफ यशस्वी गुन्ह्यासाठी अगदी आदर्श होतं. घरची आर्थिक परिस्थिती गडगंज सदरात मोडणारी. तरीही टाईमपास साठी मी एका ठिकाणी नोकरी करत होतो. तिथेही कामाचं स्वरूप काही खास नसल्यानं आणि माझ्याविना ऑफिसचं काही अडत नसल्याने महिन्यातून एक - दीड आठवडा माझा भटकंतीतच जात असे. बॉस तेवढ्या दिवसांचा पगार कापून घेण्यात धन्यता मानायचा. मलाही त्याचं फार काही वाईट वाटायचं नाही. उलट मला शक्य असतं तर बिनपगारी --- म्हणजे सर्वच पगार मी त्याच्या हाती दिला असता पण माणसाला अशी सवय कधी लावायची नसते, हे मी अनुभवाने शिकलो होतो.

    तर एकूण पाहता माझा दिनक्रम नियोजित कृत्यासाठी आदर्श असल्याने मी यशस्वी मर्डर करण्याचा प्लान आखू लागलो. त्यानुसार चालू महिन्याचे दोन - अडीच आठवडे ऑफिसात घालवल्यावर नेहमीसारखी दीड आठवड्याची सुट्टी घेऊन शहरातून बाहेर जाण्याची मी तयारी केली. नेहमीसारखी प्रवासाची सायंकाळची  वेळ निवडून आवश्यक वस्तू कारमध्ये टाकून मी हायवेच्या दिशेने निघालो. दरवेळीच्या नियमाप्रमाणे रात्री दहा - अकराच्या सुमारास रस्त्यावरील एका हॉटेल सदृश्य ढाब्यावर जेवण घेऊन मी पुढचा रस्ता कापू लागलो. गुन्ह्यासाठी वातावरण यावेळी अगदी यथायोग्य असलं तरी ' सावज ' अजून नजरेस न पडल्यानं ' आज तरी आपल्या हातून खून होत नाही ' असं मी मनाशी म्हणत होतो तोच, हेडलाईट्सच्या प्रकाशात रस्त्याच्या डाव्या बाजूला खांद्यावर बॅग घेतलेल्या एका व्यक्तीने लिफ्टसाठी इशारा केल्याचे मला दिसले. मी जाम खुश झालो. शिकार सापडल्याचा मला अत्यानंद जरी झाला असला तरी तो चेहऱ्यावर न दाखवण्याची कसरत करत मी गाडीचा वेग कमी करून त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन कार थांबवली. गाडी थांबल्याचे पाहून ती व्यक्ती लगबगीने जवळ आली. मी दरवाजा उघडून एक शब्दही न विचारता त्यांस आत बसण्याचा इशारा केला. बहुतेक त्याला हे विचित्र वाटलं असावं पण रात्री बाराच्या सुमारास लिफ्ट मिळणं मोठीच गोष्ट असल्याने त्यानेही निमुटपणे गाडीत बसणे पसंत केले.

    शिकार गाडीत बसताच आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. काही मिनिटांनी त्याने कुठे सोडायचे ते सांगितले. त्यानुसार त्याचं गाव यायला नाही म्हटलं तरी दोन - अडीच तासांचा अवधी होता व माझ्यासाठी तो पुरेसा होता. जवळपास अर्धा एक तासाचा वेळ उलटला. मधल्या काळात चोरट्या नजरेने मी त्याचं निरीक्षण केलं होतं. तीस - पस्तिशीचा तो तरणाबांड गडी माझ्याहून दुप्पट तब्ब्येतीचा होता. ' याला खपवायचं कसं ? ' या प्रश्नावर माझं डोकं एकसारखं विचार करत होतं आणि या अतिविचाराने मला भयंकर थकवा वाटू लागला. तेव्हा मी कार रस्त्याच्या डाव्या बाजूला घेऊन थांबवली. बाजूच्या सहप्रवाशाने शंकित, भयग्रस्त मुद्रेने काय झालं म्हणून विचारलं असता झोप येतेय असं सांगून मी थोडा वेळ स्टेअरिंग वर डोकं टेकवलं. पाचेक मिनिटांनी गाडीचा दरवाजा उघडून मी खाली उतरून मागच्या बाजूचा दरवाजा उघडला. आतमधील कपड्याच्या बॅगेशेजारी एका थैलीतील पाण्याची बाटली काढून चार दोन घोट घेऊन थोडं थोबाडावर मारून घेतलं. तोपर्यंत सहप्रवासी देखील खाली उतरला होता आणि त्याने पलीकडच्या बाजूचा दरवाजा उघडला होता. मी त्याच्याकडे सहज पाहिलं तर त्याचं लक्ष सीटवर पडलेल्या थैलीतील ब्रॅण्डीच्या बाटलीकडे होते. तेव्हा मी त्याला घसा ओला करून घेण्याची परवानगी मोठ्या मनाने देऊन टाकली. पडत्या फळाची आज्ञा मानत त्याने थोडंफार जलपान करून घेतलं. अर्थात मलाही त्याने घेण्याचा आग्रह केला पण गाडी चालवण्याचं सबळ कारण पुढे करत मी मोठ्या प्रयासाने त्यास नकार दिला. माझं फ्रेश होणं आणि त्याचं ब्रॅण्डी घेणं होताच आम्ही गाडीत बसून पुढील प्रवासास निघालो.

    सुमारे अर्धा - पाऊण तासाचा कालावधी उलटला होता. रात्रीचे दीड - दोन वाजून गेले होते. शेजारच्याची मान कधीच झुकली होती. माझे डोळे आता निर्जन भाग शोधत होते. तशीही हायवेवरील गाड्यांची वर्दळ कमी झाली असली तरी मला हवी तशी जागा काही सापडत नव्हती. अखेर एके ठिकाणी मला जसं पाहिजे होतं तसं ठिकाण दृष्टीस पडलं. थोडासा दाट झाडीचा भाग. मी तिथेच गाडी रस्त्यावरून शक्य तितकी खाली उतरवून थांबवली. खबरदारी म्हणून कारची पार्किंग लाईट चालू ठेवली नाही. नंतर खिशातून ग्लोव्हज काढून हातात चढवले. बाजूचा तर केव्हाच बेशुद्ध झाला होता. त्यामुळे त्याची आता मला अजिबात फिकीर नव्हती. गाडीचा दरवाजा उघडून मी उतरलो व डाव्या बाजूला येउन आसपास पाहिलं. गाड्यांची ये - जा खूपच मंदावली होती. तेव्हा हीच चांगली वेळ असल्याचे जाणून मी त्याला बाहेर काढून रस्त्याच्या खाली लोटले आणि आसपास परत एकदा पाहून घेतले. अजून तरी कोणीच नव्हते. मग त्याची बॅग घेऊन खाली गेलो.

    खाली उतरल्यावर त्याची बॅग त्याच्या शेजारी टाकून दिली आणि खिशातून इंजेक्शन व लहानशी टॉर्च काढून खाली बसलो. सुदैवाने त्याने हाफ शर्ट घातलेला असल्याने त्याच्या कपड्यांशी खेळण्याची माझ्यावर वेळ ओढवणार नव्हती. टॉर्च चालू करून तोंडात धरली आणि इंजेक्शनमध्ये मनसोक्त हवा भरून ती त्याच्या देहात सोडून दिली. पण एका इंजेक्शनने तो मरेल का ? माझ्या मनात शंका येताच लगेच दुसऱ्या हातातही मी सुई टोचली आणि धडधड्त्या अंतःकरणाने कंप सुटलेल्या हाता - पायांना व बेताल होणाऱ्या श्वासांना सावरत मी रस्त्यावर आलो. हातातील इंजेक्शन रस्त्यावर फेकून देणार होतो पण तो बेत रहित करून ते तसेच जवळ ठेवले आणि गाडीत बसून पुढच्या प्रवासाला निघालो. मध्येच सरकारी दवाखान्याचा बोर्ड दिसताच मी मर्डर वेपन फेकून दिले. आता शस्त्राची तर वासलात लागली होती पण त्याचं काय ?

    खून केल्यापासून त्या विशिष्ट परिसरातील अज्ञात / ज्ञात व्यक्तीच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रात येईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. ज्या दिवशी ती बातमी वाचनात आली त्यावेळी मला अगदी भरून आल्यासारखं झालं. उरातला आनंद अगदीच मावेनासा झाला असला तरी तो एका मर्यादेबाहेर वयक्त करणं मला शक्य नव्हतं. त्याहीपेक्षा आपण केलेल्या यशस्वी खुनाची कथा सांगण्याइतपत लायक मनुष्य आपल्या फ्रेंड  सर्कल मध्येच काय पण आसपासही नसल्याची मला खंत अधिक होती.

    ' चलो, जाने दो, लाईफ में कभी ऐसा भी होता है ' म्हणत मी मनातील निराशा झटकून टाकली. घटना घडून गेल्यावर अर्ध्यातून माघारी न फिरता नेहमीप्रमाणे भटकंती करून ठरलेल्या दिवशी कामावरही हजर झालो. त्यानंतर जवळपास महिना उलटला. दरम्यानच्या अवधीत त्या मृतदेहाची ओळख पटवणे आणि अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करणे यापलीकडे पोलिसांचं डोकं काही चाललं नव्हतं. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या अभूतपूर्व यशाने मी भयंकर उत्तेजित, उल्हसित झालो असलो तरी माझं डोकं आणि पाय अनुक्रमे ठिकाणावर आणि जमिनीवर होते. पहिल्या मर्डरमध्ये टाळता येण्या सारख्या कित्येक चुका माझ्या मनाला टोचणी लावत होत्या. इथून पुढे अशा चुका न करण्याचे मी मनाला व स्वतःला बजावून टाकले आणि काही दिवसांनी परत एकदा नेहमीसारखा एक - दीड आठवड्याच्या फिरतीच्या दौऱ्याची आखणी केली. मी महिन्याला निरुद्देशाने जी भटकंती करायचो त्याबद्दल कधी - कधी बॉस कुरकुर करायचा पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचो. खरे तर आजवर मलाही, मी वेड्यासारखं भटकतोय असंच वाटायचं. पण या पहिल्या मर्डरपासून माझी फिरस्ती निरर्थक न वाटता ध्येयप्राप्तीचा मार्ग वाटू लागली. काहीतरी साध्य करण्यासाठी आपण बाहेर पडतोय आणि कोणाच्या तरी नाकावर टिच्चून कृत्य करतोय हि भावनाच मनाला सुखावणारी होती.

    खैर, अशा प्रकारे माझी दर महिन्याला होणारी प्रवास यात्रा कोणाला तरी जगाच्या आणि जगण्याच्या चिंतेतून मुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरू लागली होती. माझ्या या अखंडित आणि सातत्यपूर्ण वारीने ४९ जणांना या दृष्ट जगतातून मुक्त केले होते. एकोणपन्नास. चारावर नऊ. या ४९ जणांच्या मध्ये अगदीच आठवणीत राहतील असेही काही नग भेटले होते. त्यापैकी एक म्हणजे ' ती ' ! तिचे नाव माझ्या लक्षात नाही आणि गाव माहिती असूनही सांगणार नाही. गाडी चुकल्याने तिला माझ्या कारचा आसरा घ्यावा लागला होता. पण प्रत्यक्षात तिची वेळ चुकली होती. मला जसं हवं होतं तसं तिला ठार केल्यावर का कोणास ठाऊक, मला तिच्या ओठांचे चुंबन घेण्याची इच्छा झाली. मनात आलेली गोष्ट मी लगेच करून बसलो खरे पण जी मजा, गोडी त्या चुंबनात होती ती मला जिवंत व्यक्तीच्या सहवासात कधीच अनुभवता आली नव्हती. तर असेही काही अनुभव आहेत पण सगळेच इथे सांगायचे म्हणजे …. !

…. तर सांगायचा मुद्दा म्हणजे ४९ लोकांना मी ठार केले होते आणि आमचं दक्ष पोलिसखातं अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात मग्न होतं. कारण, माझ्या खून करण्याच्या पद्धती एकदम वेगवेगळ्या होत्या. पण सावज टिपण्याची पद्धत अगदी पहिल्या खुनासारखीच. त्यामुळं संशयाची काय पण कसलीच सुई माझ्याकडे वळण्याची सुतराम शक्यता नव्हती. खुनासाठी बाजारात मिळणारी शस्त्रास्त्रे वा पदार्थ न वापरता शक्य तो निसर्गात आढळणाऱ्या विषारी वनस्पती --- ज्या कोणाच्याही दैनंदिन जीवनात सहज आढळणाऱ्या होत्या --- त्यांचा मी वापर करत होतो. शिवाय आरंभीचे खून केल्यावर त्यात आणखी कलात्मकता, आधुनिकता आणण्यासाठी विज्ञानाचाही उपयोग करत होतो. उदाहरणार्थ, माझ्या सहवासात येणाऱ्या व्यक्तींच्या हातांचे ठसे मिळवून त्यांच्या प्रतिकृती बनवून मी वापरत होतो. त्यामुळं कधी कधी एकाच खुनात दोन ते तीन व्यक्ती सहभागी असल्याचा पोलिस दावा करत होते आणि बिनडोक मिडीया ते ऐकून जनतेला सांगत होता. जनताही या कानाने ऐकून त्या कानाने सोडत होती. ती तरी काय करणार बिचारी ! दर महिन्याला महामार्गावर होणाऱ्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण पाहता राज्याच्या विविध जिल्ह्यांत हायवेलगत दरमहिन्याला घडलेल्या खुनांची दखल ती काय घेणार ? मुळात स्मरणशक्तीच तिची अल्प आहे ना !

सलग एकोणपन्नास खून करण्यात मी यशस्वी झाल्यावर आता मला वेध लागलेत अर्धशतकपूर्तीचे. आजच दीड आठवड्याची सुट्टी घेऊन संध्याकाळी प्रवासाला निघणार आहे. जमल्यास आजच ५० वा मर्डर करायचा आहे. रस्ता आणि सावज दोन्ही अनोळखी. ओळख फक्त आकड्याची. कृत्याची …. !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा