दिवस चमत्कारांचे आहेत. दिवस नमस्कारांचे आहेत. आपल्या समोर नम्रपणे हात जोडून चरणस्पर्शासाठी वाकलेला मनुष्य आपणांस जमिनीशी कधी समांतर करेल याचा अंदाज देखील यायचा नाही. अशा या जगावेगळ्या ( मुलाखा वेगळ्या म्हणणार होतो पण परत ' मराठी माणूस संकुचीत वृत्तीचा ' असल्याची ओरड व्हायची ! ) जगात माझ्याबरोबरही चमत्कार होईल असे वाटले नव्हते. पण झाला. साधा सुधा नाही तो पण भयंकर मोठा असा चमत्कार घडला.
मला माझ्या गतजन्मातील स्मृती तुटक स्वरूपात आठवू लागल्या. त्या स्मृतीची माला गुंफल्यावर एके दिवशी रात्री मला दृष्टांत झाला. एक दिव्य ज्योत माझ्या नेत्रांसमोर तरळली व त्या ज्योतीतून काही शब्द उमटले. त्या शब्दांचा अर्थ लागेपर्यंत तो ज्योत अंतर्धान पावली आणि आम्ही खाडकन जागे झालो. आम्हांस कळून चुकले कि, आम्ही अवतारी पुरुष आहोत. आजवर ज्या काही प्रचंड घडामोडी घडून आल्या त्यामागे आमचीच ' कलागत वृत्ती ' कार्यरत होती. अर्थात, खुद्द प्रभुनेच मला सांगितले कि, " वत्सा तू निमित्तमात्र आहेस. कर्ता करविता मीच आहे ! " तेव्हा हातून घडून गेलेल्या कृत्यांचा आम्हांस अजिबात खेद वाटत नाही. अहो स्वकृत्यांचा खेद - खंत वाटेल तो अवतारी पुरुष कसला !
त्या दिवसापासून ( ' नेमक्या कोणत्या ' हे विचारू नये. आम्हांस सर्व दिवस - काळ समान ! ) आम्हांस, आमच्या हातून घडलेल्या महत् कृत्यांच्या आठवणी आठवण्याचा जणू छंदच जडला. परंतु, आमच्या स्मृतीशृंखलेत एक फार मोठी त्रुटी अशी आहे कि, गतकाल आम्हांस अगदी अल्प क्षण आठवतो. मागचा - पुढचा संदर्भ नसलेल्या स्थितीत. परंतु, जो काही आठवतो तो अगदी लख्खपणे नजरे समोर तरळतो. किती उदाहरणे म्हणून तुम्हांस मी सांगू ?
गोकुळातील कृष्णाला बासरी उत्कृष्ट वाजवता येते असे तुम्ही मानता. पण त्याला बासरी आणि ऊसातील फरक कोणी समजावून सांगितला माहिती आहे का तुम्हांला ? उत्तरी राम व दक्षिणी मारुतीमधल्या दुभाष्याची भूमिका कोणी बजावली हे कोणास ठाऊक आहे का ?
राम - रावण यांच्या अहिंसक युद्धांत रावणाच्या पोटाला गुदगुल्या करण्याची मसलत रामाला कोणी सुचवली ? आता हि गोष्ट वेगळी कि, हिंसाप्रिय मंडळींनी रावणाची बेंबीच उध्वस्त करण्याची कथा लिहिली. बाकी, स्त्रियांच्या नाभीकमलांशी खेळायचे सोडून पुरुषांच्या बेंबींशी खेळणारे महाभाग कोण होते कोणास ठाऊक ? जाऊ द्या. आम्हांस आत्मप्रौढीची वा प्रसिद्धीची अजिबात गरज नाही. पर्वा नाही. नाहीतर आज तुम्ही ज्या घटना अलौकिक मानता, त्या घडण्यामागील आमच्या हस्ताचा क्षेप तुम्हांस स्पष्ट दिसला असता.
ज्याला तुम्ही आज राजा शिवाजी म्हणता, त्या शिवाजीला आगऱ्याहून निसटून जाण्याची युक्ती आम्हीच सांगितली. इतकेच नव्हे तर दक्षिणेतील तुरीच्या शेंगा शिवाजीच्या वतीने आम्हीच औरंगजेबाच्या हाती दिल्या व कच्च्या शेंगा न सोलता खाताना, " अशा शेंगा मी जन्मात कधी खाल्ल्या नव्हत्या " असे तो म्हटल्याचेही आम्हांस स्मरते. पण कोणा उपटसुंभ इतिहासकाराने तुरीच्या शेंगा खाण्याची गोष्टच अतिरंजित केली. मूर्ख लेकाचा ........ माफ करा. या जन्मीचे संस्कार सुटत नाहीत. मूढ बालक कुठला !
शिवाजीच्या परिवाराशी आमचा बऱ्यापैकी स्नेहसंबंध होता. संभाजी संस्कृत आमच्या समोरच शिकला. एकदा त्याने औरंगजेबाला संस्कृत भाषेत एक सुंदर असे खंडकाव्य लिहून पाठवले. मूढ औरंगला संस्कृत सारख्या देववाणीचे ज्ञान कुठे ? तो खंडकाव्य घेऊन दक्षिणेत आला व त्या खंड काव्याचे खंडित अर्थ लावत इथेच निजधामास गेला.
आमचा प्रिय औरंग देहत्याग करून परलोकवासी झाल्याने आम्ही उद्विग्न होऊन देशांतरास गेलो. तिथून थेट अवतीर्ण झालो ते पानपतावर. काय भयानक कुंड पेटलं होतं ते ! इकडे अब्दाली इस्लामचे दिव्यतेज आणखी प्रखर करण्याकरता अन्न - पाणी त्यागून उपास करत होता. दिवसातून पाच काय पन्नास वेळा तो व त्याचे अनुयायी नमाज पढत होते तर तिकडे सदाशिवराव पेटलेल्या हवनकुंडात समिधांवर समिधा टाकत होता. कोणत्याही परिस्थितीत हिंदू धर्माचे प्रज्वलित झालेले दिव्यतेज त्यांस लुप्त होऊन द्यायचे नव्हते. इकडे माथी जमिनीला टेकत होती तिकडे काटक्या यज्ञात पडत होत्या. अखेर, भुईला लागलेली मस्तके जिंकली. कारण समिधाच संपल्याने सदाशिवाने स्वतःचा देह एक समिधा कल्पून अग्निकुंडात झोकून दिला व आपसुक अब्दाली जिंकला !
तुमच्या जोतीबा फुलेने शाळा उघडली. म्हटलं, चला एका नव्या युगाची नांदी झाली. पण कोणतीही गोष्ट सहजासहजी घडून आली तर तिचे महत्त्व पटत नाही. म्हणून जोतिबाच्या शाळेवर बहिष्कार टाकण्यासाठी समाजास आम्हीच प्रवृत्त केले. सरळ चार चौघांत जाऊन आम्ही प्रश्न टाकायचो कि, " अहो, बायका जर लिहू - वाचू लागल्या तर त्या नोकऱ्या करतील. आणि त्या नोकऱ्या करू लागल्या तर पुरुषांनी काय त्यांची लुगडी धुवायची ? " बस्स !कोणत्या पुरुषाला हा अवमान सहन होईल ? लगेच त्यांनी हाती लागेल ते म्हणजे --- दगड - धोंडे, माती, चिखल व काहीच मिळेना म्हणून गायी - म्हशींना मा - मारून त्यांना शेण टाकायला लावून ते उचलून फुले दांपत्यावर फेकले. उगीच नाही जोतीबा ' महात्मा ' झाला ?
इतकेच काय, गंगाधररावांना त्यांच्या मुलाचे नाव ' केशव ' जरी असले तरी ' बाळ ' नावानेच पुकारण्यास कोणी सांगितले ? फार काय, तुमच्या त्या ' लोकमान्याला ', म्हणजे आमच्या बाळला आम्ही बोलता बोलता बोललो कि, " अरे बाळ, या इंग्रज सरकारचे डोकं काही थाऱ्यावर नाही बघ. दिवस भरलेत यांचे जणू ! " बाळ भलताच विद्वान. त्याने आमच्या संपूर्ण वाक्याचा अर्धा भाग घेऊन आपल्या वर्तमानपत्रात सरळ छापून कि हो टाकला ! तेव्हाच आम्ही ओळखले कि, प्रसार माध्यमं अर्ध्या हळकुंडाने पिवळी होण्याचा काळ लवकरच येणार आहे. त्याचीच प्रचीती सध्या तुम्ही घेत आहात !
पुण्यात आम्हांस फार काळ राहणं आवडलं नाही. आमही परत स्थानांतर केलं व एका तेजस्वी युवकाच्या गृहात प्रकटलो. तो तरुण इंग्रजांच्या विरोधात प्रचंड प्रमाणात करावयाच्या क्रांतीच्या उपाय योजनांची आखणी करत होता. परंतु त्याचे मराठी लेखन अतिशय अशुद्ध. तो ' इ / ई ' असे न लिहिता ' अि / आी ' असे लिहायचा. आम्ही त्यांस बजावले, " अरे, विनायका असे अशुद्ध लिहू नको." पण तो ऐकेल तर शपथ ! अखेर इंग्रजांनाच त्याच्या क्रांतीकार्या ऐवजी भ्रष्ट भाषिक लेखनाची दखल घ्यावी लागली व जोवर त्याची लेखनपद्धती सुधरत नाही तोवर त्याला अंदमानात एकांतवासाची शिक्षा सुनावली. विनायक पण मोठा हट्टी. अंदमानात त्याने एकांतवास पत्करला पण आपली लेखनपद्धती काही बदलली नाही.
त्या तरुणाचा सहवासात आम्ही अगदीच कंटाळलो. जेव्हा बघावं तेव्हा त्याला कशाचा तरी ध्यास असायचा. कसला ते माहिती नाही. पण तो सदोदीत आपल्याच कल्पनासृष्टीत रममाण असायचा. त्याला तसाच स्वप्नांच्या जगतात सोडून आम्ही दुसरीकडे प्रस्थान ठेवले.
एका ठिकाणी आम्ही अवतीर्ण झालो. नुकताच परदेशातून आलेला एक इसम चिंताक्रांत अवस्थेत बसला होता. त्याची ओळख करायला गेलो तर तो परिचित निघाला. किंबहुना त्याचे नाव देखील आम्हीच ठेवले होते. मोहनदास ! त्याला चिंतेचे कारण विचारले असता, त्याला देशाचे राजकीय नेतृत्व करण्याची महत्त्वकांक्षा असल्याचे समजले. आम्ही डोळे मिटले. मग उघडले. आणि त्यांस सांगितले, " वत्सा, तू सर्व प्रथम वस्त्रांचा त्याग कर. जैन मुनींप्रमाणे जन्मजात अवस्थेत न राहता फक्त लज्जा रक्षणार्थ वस्त्रं परिधान कर. आणि ' बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ' या उक्तीच्या विरोधात वाग. किंबहुना कोणत्याच शब्दावर कायम राहू नको कि सापडू नको. " आमच्या त्या उपदेशाचे अमृत मिळताच मोहनदासचे चार डोळे ( दोन चर्येवरचे व दोन चष्म्याचे ) लकाकले. पुढे तो अल्पावधीत ' बापू ' झाला.
मधल्या काळात आम्ही असेच भ्रमंती करत असताना आमच्या भीमाची भेट झाली. महाभारतातल्या भीमाप्रमाणेच हाही विशाल देहाचा स्वामी ! पण देहाप्रमाणे बुद्धीही विशाल. कुंती त्या बाबतीत कमनशिबी निघाली ! आम्ही भीमास म्हटलं, " काय रे बाबा, काय चाललंय तुझं ? " तेव्हा नवीन ग्रंथलेखनाच्या विचारात असल्याचे त्याने सांगितले. पण लेखनास विषय मिळत नव्हता. तेव्हा आम्ही म्हटलं कि, " भीमा तू वर्णव्यवस्थेच्या विरोधात आहेस तर शूद्र - अतिशूद्रांवर ग्रंथ लेखन कर. " आमचे बोल ऐकताच भीमाचे नेत्र अत्यानंदाने चमकून उठले.
तेथून आम्ही थेट केशवरावांकडे गेलो. तिथे पहिले तर ते आपल्या लेखन कार्यात मग्न. त्यांचा एक मुलगा काहीतरी तंतुवाद्य वाजवत होता तर दुसरा कागदावर रंगरंगोटी करत होता. आम्ही त्या चित्रकाराकडे गेलो व विचारले, " बाळ, तुझं नाव काय ? " तो आमच्याकडे रोखून बघत उद्गारला, " माझं नाव ? बाळ ! " तेव्हाच आम्ही ओळखलं ' बोले तैसा चाले ..' या उक्तीतला हा पुरुष आहे. आणि नाव ' बाळ ' असल्याने याच्या पावलांची व बडबडीची दखल तशीच घेतली जाणार !
मुंबईचा कंटाळा आल्याने देशावर आम्ही प्रस्थान ठेवले. एका गावाच्या धर्मशाळेत आम्ही मुकाम ठोकला व त्या गावची तालीम पाहण्याचा विचार आमच्या मनात आला. आम्ही तडक तालमीच्या दिशेने गेलो. तिथे पाहतो तर आबालवृद्ध पुरुष मंडळी अंगाला तेल - माती लावून एकमेकांना घट्ट आलिंगनं देत त्यातून सुटण्याची धडपड करत होते तर, एक पोरगं अंगावरील कपडे न काढता हातात तेल घेऊन जिभेला लावत होतं. आम्ही त्यांस त्याचे कारण विचारले असता उत्तर आले नाही पण, त्याच्या बाजूला असलेला मुलगा म्हणाला, " आवं म्हाराज, त्यो तसाच हाय. हि मान्सं आंगाला त्येल लावत्यात - त्यो जीबंला. पन फरक म्हंजी आंगाला त्येल लाव्ल्येली एक येळ सापडत्यात पण जीबंला त्येल लावल्येला ह्यो पठ्ठ्या काय सापडत न्हाय ! " आम्हांस त्या मुलाच्या शब्दांची प्रचीती लवकरच आली. जिभेला मनसोक्त तैलस्नान घालून ते पोरगं आखाड्यात उतरलं आणि पाचच मिनिटांत पाच - पन्नास जणांना उताणं पाडून घरी पण निगुन गेलं. जाताना तोंडातल्या तोंडात " शरदांच चांदणं ..." असं काहीतरी पुटपुटत गेलं.
तर अशा ह्या आमच्या अवतारी जीवनातील काही स्मृती. तूर्तास इतक्याच स्मरतात. बाकी, आठवताच जगासमोर मांडण्याचा आमचा मानस आहे. काय आहे, दामोदरदासला मुलाचे नाव विवेकानंदाच्या मूळ नावावर नाव ठेवण्यास सांगितल्यापासून आमच्यातील सिद्धी हळूहळू लुप्त होऊ लागल्याने चरितार्थासाठी आपल्या पुर्वानुभावांचे व कर्मांचे लेखन प्रसिद्ध करून चार मोहरा गाठीशी बांधण्याचा विचार आहे. दिवस अन् काळ किती भर्रकन उलटतो. नाही !