दहशतवादाला धर्म नसतो असं म्हटलं जातं.
पण धर्मातूनच दहशतवाद निर्माण होतो याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. वस्तुतः
धर्म म्हणजे काय ? हे लक्षात न घेताच अशा प्रकारची कॅच लाइन तयार करून तिचा प्रचार
केला जातो व जास्त विचार करण्याची सवय नसलेली मंडळी अशा कॅची लाइन्सवर डोळे मिटून
विश्वास ठेवतात.
धर्म हि वास्तविक समाज नियमन करणारी
संस्था आहे. या संस्थेला बळ पुरवण्यासाठी अध्यात्म, पारलौकिक जग तसेच समाजाच्या
दृष्टीने पूज्य, पवित्र असलेल्या प्रतीकांची जोड देण्यात आली. जेणेकरून धर्म या
संस्थेला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला.
आपल्याकडे धर्म हा शब्द कित्येकदा नियम
याच अर्थाने वापरला जातो, त्यामुळे तो व्यापक मानला जातो. जसे पुत्रधर्म, राजधर्म,
पत्नीधर्म इ. परंतु धर्म शब्द इतक्या व्यापकतेने वापरूनही आपण धर्म हि संकल्पना,
संस्था तितकी व्यापक, निरपेक्ष मानतो का ?
व्यवहारात पाहिले असता याचे उत्तर
नकारार्थीच मिळते व धर्म हि संकल्पना आपणही इतरांप्रमाणेच संकुचित अर्थाने वापरत
असल्याचे सिद्ध होते.
यावरून धर्म हि संस्था व्यापक नसल्याचे
किंवा त्यास व्यवहारात मर्यादा असल्याचे स्पष्ट होते का ?
थियरीनुसार उत्तर द्यायचे झाले तर धर्म
हि संकल्पना व्यापक, निरपेक्ष पद्धतीने वापरता येणे सहजशक्य आहे. फक्त तिची
पारलौकिक, पूज्य - पवित्र घटकांशी घातलेली सांगड वेगळी केली तर. व प्रॅक्टिकली असे
करणे अशक्य असल्याने हि थियरी इथेच कोलमडून पडते.
असे का व्हावे ?
धर्माचं व्यापक बनलेलं स्वरूप लक्षात
घेता व्यक्ती तसेच समाजाचं कोणतंही अंग यापासून विभक्त पडू नये याची रचनाकारांनी
खबरदारी घेतल्याचे दिसून येते. यामुळे धर्मविहीन समाज हि कविकल्पनाच ठरते.
काहींच्या मते, साम्यवादी देशांत धर्म
हि संज्ञा नाही किंवा त्या देशात धर्मविहीन हि संकल्पना शक्य आहे. पण माझा त्यावर
असा आक्षेप आहे कि, साम्यवादी तत्वज्ञानावर श्रद्धा व पालन हि देखील एका धार्मिक संस्था
व समाजाचीच लक्षणे नाहीत का ?
धर्म दहशतवादाला थारा का देतो ?
कोणत्याही मानवनिर्मित संस्थेप्रमाणे
धर्म हि देखील एक संस्था असल्याने त्यावर अंमल गाजवणारे ज्या मनोविकारांचे असतात
तद्वत ती कार्यरत असते. सामान्यतः एक समजूत असते कि, धर्मसंस्था प्रमुखांना ऐहिक
सुखाचा, सत्तेचा मोह नसतो. परंतु हे अर्धसत्य आहे. आपली धर्मसंस्थेवरील पकड घट्ट
करण्यासाठी तसेच जनमानसात धर्मसंस्थेचे महत्त्व अबाधित राहावे याकरता त्यांना
राजसत्तेची आवश्यकता असतेच. कुठे ती ते थेट हाती घेतात तर कुठे अप्रत्यक्षपणे !
यामुळेच प्रतिस्पर्ध्यांना दडपण्यासाठी
--- यामध्ये धार्मिक संस्था ताब्यात घेण्याकरता विरोधात असलेले प्रतिस्पर्धी तसेच
धर्मसंस्थेविरुद्ध बोलणारे, या सर्वांचाच समावेश होतो -- दहशतीचा वापर केला जातो.
अशा दहशतीच्या मार्गापासून शांततेचा संदेश देणाऱ्या जैन - बौद्धादी धर्माच्या
अनुयायांनाही परावृत्त होता आले नाही हा इतिहास आहे.
धर्मग्रंथांतील आज्ञा - वचनांची
चिकित्सा का नाकारली जाते ?
धर्मग्रंथांतील आज्ञा - वचनांना
प्रत्यक्ष व्यवहारात, आचरणात आणण्याचा आग्रह योग्य आहे का ?
कोणत्याही लेखातील विधान कधीही सार्वकालिक
वा त्रिकालाबाधित नसते हा सर्वमान्य सिद्धांत फक्त धर्मग्रंथांबाबत अपवाद ठरतो. प्रथमतः
अशा ग्रंथांतील वचनांची चिकित्साच नाकारली जाते. कारण चिकित्सा होताच विधानं
कालबाह्य ठरण्याचा धोका असतो व विधानं कालबाह्य ठरली तर अशा ग्रंथांविषयी समाज
मनात निर्माण केलेली पवित्र, पूज्य, अलौकीक अशी भावना नष्ट होण्याची शक्यता असते व
हि भावना नष्ट झाली तर धर्माच्या अस्तित्वावरच घाला घातला जातो.
सामान्यतः शासन निर्मित कायदा समाजाचे
व्यापक हित लक्षात घेऊन बनवलेला असतो. कोणत्याही मानवनिर्मित रचनेप्रमाणे हा
संपूर्णतः निर्दोष नसतो व त्यातील त्रुटींवर चर्चा होऊन त्यास आव्हानही दिले जाते.
कारण हा मनुष्यनिर्मित आहे. परंतु हेच विधान धर्मग्रंथांबाबत चालत नाही. कारण एकतर
ते परमेश्वराने, परमेश्वराच्या दूताने अथवा साधारण मनुष्यांतील अलौकिक शक्ती
प्राप्त इसमाने ते रचल्याची भावना असते. व अशा ग्रंथांत मुळी त्रुटीच असू शकत नाही
हि भावना यामुळे प्रबळ होऊन चिकित्सा नाकारली जाते आणि अशा निर्दोष ग्रंथांतील
वचनांना अंमलात आणल्याने व्यक्ती - समाजाचे नुकसान ते काय होणार ? असा सवाल
उपस्थित केला जातो.
अर्थात हा प्रश्न वरवर जरी बिनतोड वाटत
असला तरी प्रत्यक्षात तो तसा नसतो परंतु, जशी तुम्ही न्यायालयीन वा शासननिर्मित
कायद्यांची चिकित्सा करता तशीच आम्हांलाही तुमच्या धर्मग्रंथांची चिकित्सा करायची
आहे असे म्हणण्याचे धाडस फार कमीजण करतात. यामागे कारणं काहीही असली तरी व्यक्तीच्या
मनावरील धर्म श्रद्धा, ईश्वरी संकल्पना यांचा नाही म्हटलं तरी थोडाफार प्रभाव हा
असतोच. या संदर्भात इस्लाम धर्मियांच्या कुराणाचे उदाहरण उद्बोधक आहे. याची
वस्तुनिष्ठ चिकित्सा करण्याच्या भानगडीत मुस्लीम विद्वान पडत नाहीत व जवळपास सात -
आठशे वर्षांचा निकट सहवास होऊनही हिंदू विद्वानांना याची बुद्धीनिष्ठ चिकित्सा
करता आली नाही.
धर्मसंस्था अविनाशी आहे का ?
याचे उत्तर १००% होकारार्थी देणे अशक्य
आहे. कारण एक व्यक्ती स्वयंप्रेरणेने नियमाचं पालन करू शकते. परंतु समाज स्वतःहून
नियमांचं पालन करण्यास केव्हाही नाखूष असतो. त्यामुळे त्यांस धाक दाखवून नियम पालन
करवून घेणे भाग पडते व यामुळेच सामाजिक शांतता, सुरक्षितता कायम राहते. आधी हि गरज
टोळी वा कुटुंब संस्थेने भागवली. पुढे तिचे विकसित रूप धर्म आणि शासनसंस्था बनले.
वस्तुतः या संस्था अमूर्त तसेच अमर्त्य
आहेत. तसेच यांच्या संज्ञा, स्वरूपात कितीही फरक असला तरी त्यांची कार्यपद्धती
समानच आहे. व्यापक समाज हित लक्षात घेता अशी एखादी सर्वोच्च नियंत्रक संस्था
अस्तित्वात असणे आवश्यक आहे परंतु त्याच व्यापक समाज हितास्तव अशी संस्था पूर्णतः
समाज नियंत्रणमुक्त असणेही घातक आहे. सद्य स्थितीत आपण धर्म व शासन संस्थेचे घातक
रूप अनुभवत आहोत. याचा पुढ्चा टप्पा काय असेल हे सध्या तरी माझ्यासाठी अज्ञात आहे.