बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

आगामी आत्मचरित्राची पूर्वतयारी !

                 नाही नाही म्हणता अखेर साहित्यिक म्हणून आमच्या कपाळी टिळा एकदाचा लागला. ( साहित्य प्रकाराला आमच्या नावाचा कलंक लागला हि बात निराळी !) आता जर लेखक बनलो आहेच तर येत्या १५ - २० वर्षांनी प्रकाशित होणाऱ्या आत्मचरित्राची आत्ताच जुळणी करावी म्हणतोय !
                  
                तसे पाहता वय वर्षे ३० हे काही आत्मचरित्र लेखकाचे वय नव्हे ! पण आत्मचरित्राच्या पूर्वतयारीसाठी कुठे वयाचे बंधन असते म्हणा ! ३० वर्षांपूर्वी अस्मादिकांचा जन्म झाला. दैवी प्रतिभा लाभलेली असून देखील आमच्या जन्माच्या वेळी आकाशातून पुष्पवृष्टी करण्याची देवतांना आठवण राहिली नाही. ( अस्से काय ? मला एकदा वर येऊ द्या, मग बघतो एकेकाला !) त्याखेरीज शुभ - अशुभ असे काही संकेतही त्यावेळी कोणाच्या नजरेस पडले नाहीत. ( अरेरे ! कमीत कमी एखाद्या कावळ्याने तरी आपला गळा साफ करायला हवा होता.) जन्मानंतरचे पुढचे दिवस, महिने वर्षे सर्वसामन्यांप्रमाणेच पार पडले. ( मग आत्मचरित्रात बालपण कशाला द्यायचे होते ? त्यापेक्षा बालपणाचा काळचं त्यातून वजा करायला हवा !) नंतर यथावकाश शालेय जीवनात प्रवेश झाला. शालेय जीवनात देखील चरित्रनायकाच्या आयुष्यात काही फारसा फरक पडला नाही. वर्ग बदलले, तुकड्या बदलल्या आणि शिक्षकदेखील ! परंतु, ‘माझ्याइतका ‘ ढ ‘ विद्यार्थी पाहिला नसल्याची अध्यापकवर्गाची तक्रार मात्र कायम राहिली. त्यात अक्षर - अवाक्षराचाही फरक पडला नाही. नाही म्हणायला, एका नवीन गोष्टीचा मात्र शोध लागला व तो म्हणजे अस्मादिक तैमुरलंगाचे वंशज निघाले ! 

                माध्यमिक शिक्षणाच्या काळात इंग्रजी - गणित नामक शत्रूंनी माझे नसलेले [ टाईप करताना आधी ‘ नासलेले ‘ टाईप झाले होते. साला, आतल्या गोटातील ( डोक्यातील ) गोष्टी बाहेर पडतात तरी कशा ?] डोके अधिकचं फिरवून टाकले होते. त्यातल्या त्यात आधार विज्ञान, मराठी, हिंदी, इतिहास इ. विद्यांचा होता. मराठी हि आपली आवडती भाषा ! सदा सर्वकाळ ती वापरण्याचा मोह विद्यार्थ्यांना जितका होतो तितका खुद्द ‘ मनसे ‘ प्रमुखांस देखील होत नसेल ! तर अशी हि प्राणप्रिय ( जिव्हाप्रिय ) मराठी भाषा जेव्हा विषय बनून येते तेव्हा तिच्या हालांस पारावर राहत नाही. ( प्रिय वाचक, अर्थ मलाही समजला नाही. पण रचना भारदास्त आहे कि नाही ?) त्यामुळे या विषयांत ३५ च्या आत आणि ४० च्या वर मी कधी गेल्याचे मला आठवत नाही. हिंदी विषयांत गुण मिळवण्यात आमची प्रगती जरी असली तरी आमचे तेव्हाचे आणि आताचे हिंदी ऐकले तर उत्तर भारतीयांना चक्कर किंवा भोवळ न आल्यास आम्ही नाव बदलू ! ( अर्थात, दुसऱ्याचे ! स्वतःचे नाव कधीही बदलायचे नसते. यातून मला राजकारणांत देखील बऱ्यापैकी रस असल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलचं !)  राहता राहिले विज्ञान आणि समाजशास्त्र, तर मत पुछो भाई ! समाजशास्त्रात आपण नेहमीच आघाडी मारली. ( आमचा जन्मचं मुळी इतिहासासाठी झाला आहे, हे आम्हांस फार उशीरा कळले.) पण माझी खरी रुची विज्ञानात होती. त्यातील ते रसायनांचे गुणधर्म, संयुगे, अणु - रेणू प्रकरणे जर वजा केली तर उर्वरीत सायन्समध्ये मला जास्त रस होता. परंतु जसजसे १० वीच्या जवळ गेलो तसतसे या विषयात कमी पडत गेलो. ( हि गोष्ट वेगळी आहे की, विज्ञानापेक्षा विज्ञान शिकवणाऱ्या बाईंकडे आमचे अधिक लक्ष असायचे. राज कपूरचा ‘ मेरा नाम जोकर ‘ मी पण पाहिला आहे म्हटलं ! फरक इतकाच आहे की, आमच्या विज्ञान शिक्षिका सिमी गरेवाल सारख्या बदसुरत नव्हत्या. अर्थात, हि १४ - १५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता त्या आणि सिमी रूपाने बहिणी बहिणी शोभत असतील !) 

                     कोणत्याही चरित्रनायकाप्रमाणे आयुष्यात प्रेमप्रकरण देखील झालेचं पाहिजे. त्याचाही आरंभ याच काळात झाला. ( व शेवट देखील !) ‘ पहिले प्रेम कधी विसरलं जात नाही ’ या वचनावर माझी देखील श्रद्धा आहे. अर्थात, आपली प्रेयसी जरी बदलली तरी श्रद्धा मात्र बदलत नाही. ( अंदरकी बात ! मी कोणावर प्रेम केले हे फक्त मलाचं माहित. व्यक्त करण्याची वेळ कधी आलीच नाही !) 

                                 बोर्डाच्या कृपेने काठावर का होईना १० वी पास झालो आणि कॉलेज जीवनास आरंभ झाला. पहिल्या प्रथम १० वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्साहाने मी पण विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि हे आपले काम नाही हे लक्षात येताच १० - १५ दिवसांत गाशा गुंडाळून कला शाखेत तळ ठोकला. मात्र, कॉलेज जीवनाचा आनंद आपल्याला काही फारसा लुटता आला नाही. पुढे यथावकाश टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे इतिहास विषय घेऊन बी. ए. झालो खरा पण त्यावेळीही अर्थशास्त्र विषय घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. इतिहासापासून लांब जाण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा तिकडेचं येत होतो. ( लेखनाची शैली देशपांड्याकडून अत्र्यांकडे चालली आहे. याची नोंद घेतली पाहिजे. आपली शैली आपण कोणापासून उचलली हे वाचकांच्या लक्षात न येण्याची खबरदारी घ्यायला हवी !) 

                       बी. ए. ची पदवी मिळवली खरी. दरम्यानच्या काळात आपणही गायक बनू शकतो या अंधविश्वासावर गायनाचे क्लास लावले. दोन मास्तर बदलले पण मी काही सुरात आलो नाही. गायनाचे मास्तरचं बरोबर नव्हते दुसरे काय ? ( मी गाणं शिकणार हे आधीच समजल्यामुळे कि काय रफीने आपले कान आणि डोळे कायमचे बंद करून घेतले.) बाकी माझ्या आवाजाचे कौतुक मी काय करायला हवे ? आजही मी जेव्हा रियाजाला बसतो तेव्हा पशु - पक्षी आनंदाने मला साथ देतात. ( प्रत्यक्षात कावळे व कुत्री मोठमोठ्याने ओरडून, आम्ही तुझ्यापेक्षा अधिक सुरात आहोत हे सांगतात हि बात निराळी आहे. ) अशाच माझ्या उचापत्या स्वभावामुळे माझे प्रमोशन देखील झाले आणि तैमुरलंगाचे वंशज ज्याप्रमाणे तख्ते ताउस वर विराजमान झाले त्याचप्रमाणे आम्ही देखील फिरत्या आसनावर ( ज्यास दोन लहान व दोन मोठे चक्र आहेत अशा ) येऊन स्थिरावलो. शेतीचा शोध लागल्यावर ज्याप्रमाणे भटका मनुष्य स्थिरावला, तद्वत मी देखील या फिरत्या आसनाने स्थिरावलो आणि यातून ‘ पेशवेकालीन इतिहास ‘ नामक इतिहास घडवणाऱ्या ब्लॉगची निर्मिती झाली. एक ब्लॉग लेखक म्हणून लोकांची मला मान्यता मिळाली तर इतिहास लेखक म्हणून श्री. संजय सोनवणी यांनी माझी मराठी वाचक वर्गास ओळख करून दिली. 

                     अशा प्रकारे लेखक म्हणून तर कारकीर्दीस आरंभ झाला. आता लेखकराव बनण्याच्या तयारीस लागलो आहे. स्वतःचे लेख अपवाद केल्यास इतरांचे लेख हे निकृष्ट दर्जाचे असतात असे मी स्वतःचे ठाम मत बनवले आहे. स्वतःचे लेखन जितक्या आवडीने मी वाचतो तितके इतरांचे अजिबात वाचत नाही. अहो वाचायचे तर सोडा, तिकडे बघत देखील नाही. दुसऱ्याचे कौतुक करताना हल्ली मलाही माझी जीभ जड भासू लागते आणि उन्हाळ्यात हमखास आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे शब्दसंपदा लुप्त होते. चरित्रनायकाचे आणि त्यातूनही लेखकाचे चरित्र हे नेहमी वादळी असायला हवे यावर माझी नितांत श्रद्धा आहे. त्यासाठी स्वतःचे आयुष्य मुद्दाम वादळी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचकरिता श्री. संजय सोनवणी उर्फ वादळी व्यक्तिमत्व उर्फ भाऊ यांच्याकडे कोचिंग क्लास लावला आहे. काही वर्षांत प्रगती दिसून येईल अशी आशा आहे. 

                        चरित्रनायक व लेखक यांचे आयुष्य नेहमी उपेक्षित असले पाहिजे. लेखकाच्या लेखनाची उपेक्षा जेवढी वाचकसृष्टीत होत नाही तेवढी त्याच्या घरात होते हा सर्वचं लेखक मंडळींचा व माझाही स्वानुभव आहे. माझे पुस्तक तर सोडा पण ब्लॉगवरचा एखादा लेख देखील माझ्या घरच्यांनी आजवर वाचला नाही. माझी बौद्धिक संपदा पाहून माझ्या पत्नीला नेहमी प्रश्न पडतो कि याला लेखक कोणी केला ? आजवर मोजून ५० वेळा तरी तिने मला हा प्रश्न विचारला आहे. आणि याचे उत्तर मलाही अजून खरोखर सापडलेलं नाही. आत्मचरित्र लिहिणाऱ्याने शक्यतो आपल्या वैवाहिक जीवनाचा फारसा उल्लेख करू नये असा एक अलिखित दंडक आहे. अर्थात, रूढीपालनाच्या बाबतीत मी कट्टर भारतीय असल्याने हा संकेत पायदळी तुडवण्याचे पाप मी माझ्या हातून घडू देणार नाही. 

                  ५० - ६० वर्षांपूर्वी आत्मचरित्र लिहिणाऱ्या लोकांचे एक बरे होते. स्वदेशभक्ती आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान यावर आधारीत एक - दोन प्रकरणे त्यांच्या चरित्रात असायची. आमच्या पिढीची ती सोय गेली. ( या कारणासाठी स्वातंत्र्यलढ्यातील तमाम नेत्यांचा -- त्यात हिंसक अहिंसक दोन्ही आले --- जाहीर सभेत तीव्र निषेध करण्याचा माझा मानस आहे. ) त्यामुळे आता कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायचा हा माझ्यासमोर एक प्रश्न पडला आहे. 

                चरित्रनायकाच्या आयुष्यात हाणामारीचा प्रसंग -- त्याने इतरांना मारण्याचा राहू द्या पण मार खाण्याचा तरी --- असला पाहिजे. पण त्याही आघाडीवर आम्ही अपयशी आहोत. समोरच्याला मारायचे राहिले पण मार खाण्याची देखील वेळ अजून माझ्यावर आली नाही. ( नाही म्हणायला, भाऊ मला उलटे टांगायची धमकी देत आहेत खरे, पण प्रत्यक्षात ते कधी होणार काय माहित !) मनात एक विचार येतो कि , इतिहासकार असल्यामुळे ज्याप्रमाणे छ. शिवाजी महाराजांनी आपल्या बालपणी कसायाच्या हातून गाय वाचवली तसले एखादे प्रकरण आपल्या आत्मचरित्रात घुसडून द्यावे.  आत्मचरित्रात असला खोटारडेपणा नाही म्हटला तरी आवश्यक आहे. त्याशिवाय आत्मचरित गाजणार कसे ? आणि गाजले नाही तर खपणार कसे ? याबाबतीत आपण देशी - परदेशी आत्मचरित्रकारांना आणि विशेषतः मंगेशकर कुटुंबियांना मानतो बुवा !  ( महाराजांनी खरोखर गाय कसायाच्या हातून वाचवल्याचे ज्याने प्रत्यक्ष पाहून लिहून ठेवले आहे त्याचे नाव कोणी सांगेल का ?) प्रत्यक्ष वर्णन लेखनास जोर येण्यासाठी मी मुद्दाम एका खाटकाच्या दुकानाला भेट दिली. पण तिथे गाईच्या ऐवजी कोंबडी आणि बकऱ्याचे आत्मे आपल्या देहाचे जीर्ण वस्त्र फेकत असल्याचे दिसून आले. तेव्हा काहीसा निराश होऊनच मी त्या स्थळाहून मागे फिरलो.

              सारांश, वय वर्ष ३० च्या हिशेबाने बऱ्यापैकी आत्मचरित्राची सामग्री जमली आहे. इतिहास संशोधनातील गंमती जमती नावाचे एक प्रकरण लिहिण्याचा माझा मनोदय आहे. त्यात माझ्याखेरीज इतर सर्व इतिहासकार कसे मूर्ख आहेत हे मी साधार सिद्ध करणार आहे. याबाबतीत मी राजवाडे, शेजवलकर प्रभूतींचा कट्टर अनुयायी आहे. बाकी, अजून बऱ्याच लहान - मोठ्या गोष्टी आहेत पण त्या यथावकाश माझ्या आत्मचरित्रातचं वाचकांना वाचावयास मिळतील. बाकी, माझे आत्मचरित्र मी लिहिले तर ते छापणार कोण हा एक प्रश्नचं आहे म्हणा ! ( माझे ‘ पानिपत असे घडले ‘ प्रसिद्ध झाल्यावर प्रकाशकाचे वजन आणि मनोधैर्य दोन्ही एकदम  खचल्याची दाट जनवार्ता आहे.)  त्याहीपेक्षा ते वाचणार कोण हा संशोधनाचा विषय आहे. पण त्याची काळजी आपण का करावी ? लोकं एका मुंगीचे महाभारत नाहीत का वाचत ? मग मी तर माणूस आहे ! ( बाकी, ‘ एका मुंगीचे महाभारत ’ पण वाचनीय आहे असे म्हणतात !)