बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

प्रासंगिक ( ९ )

सध्या देशात जे काही चालू आहे, त्यामागे धार्मिक वर्चस्ववाद आहे. तुम्हांला कदाचित धक्का बसेल की आत्ताच्या काळात आणि धार्मिक वर्चस्वतावाद ! मग नक्कीच तो मुसलमानांचा असणार !! पण नाही. 

मुस्लिमांचा वर्चस्वतावाद स. १९४७ ला फळणीसोबतच संपुष्टात आला. जरी त्यांच्यातील काही माथेफिरूंच्या मनात या वर्चस्वतावादाच्या कल्पना घोळत असल्या तरी ती दिवास्वप्नं आहेत. कधीही साकार न होणारी.

ख्रिश्चनांमध्ये असा उपद्व्याप करण्याइतका जीव नाही. जैन, बौद्ध, पारसी, शीख इ. आपापल्या टापूत समाधानी आहेत. तसे वर्चस्वतावादापासून हेही अलिप्त नसले तरी मुळातच शक्ती क्षीण असल्याने यांच्या स्वप्नांना कवडीइतकी किंमत नाही. मग हा धार्मिक वर्चस्वतावाद आहे तरी कोणाचा ?


स. १९४७ पर्यंत या देशावर हिंदू राज्य करणार की मुसलमान ? या तंट्याकडे दोन गट काठावर बसून बघत होते. एक इंग्रज, जे राज्यकर्ते असल्याने हिंदूंच्या तुलनेने मुस्लिमांची तळी उचलून धरणारे व दुसरे वैदिक ! 

या धर्मियांची संख्या अत्यल्प. परन्तु हिंदू धर्मसाहित्यात यांनी अशी काही घुसखोरी करून  ठेवलीय की अद्यापि हिंदूंना हे आपल्यातीलच एक वाटतात. यामुळेच यांच्या हिंदुत्ववादी आवाहनास -- जे प्रत्यक्षतः वैदिकवादी असते -- मूर्ख हिंदू सहजी बळी पडतात. 


स. १९४७ पूर्वीही ते राजकीय पटलावर होते. त्यावेळी काँगेस त्यांच्या ताब्यात होती. पुढे गांधीयुगात तिचे वैदिक स्वरूप मावळून त्यास हिंदू चेहरा येऊ लागला. गांधीला लाख तुम्ही शिव्या घाला, पण त्याच्या राजनीतीमुळे -- मग भले ती हेकेखोर, विचित्र का असेना -- या देशाला निधर्मी राज्यघटना लाभली. पुढे गांधी हत्येनंतर काँग्रेसही रूप बदलत गेली. तिचे अवनत स्वरूप आज आपल्या समोर आहेच.


दुसऱ्या महायुद्धात सावरकरांनी भारतीय तरुणांना सैन्यात जाण्याचा संदेश दिल्याचे सांगितले जाते. ज्याचे उद्दिष्ट सावरकर समर्थक सावरकरी संदर्भाने स्पष्ट करत असतात. सावरकरांचा हा मंत्र वेगळ्या अर्थाने त्यांच्या वैदिक धर्मबांधव संघटनेने -- अर्थात संघाने अंमलात आणला. जेणेकरून संघीय विचारांचे तरुण प्रशासकीय सेवेपासून ते गल्ली बोळातील संघ विरोधी पक्ष - संघटनांमध्ये जाऊन बसले. त्याचे विकसित रूप आपल्यासमोर आज असे आहे की, देशात वैदिक संघाच्या प्रभावाखाली नसलेल्या पक्ष - संघटना अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत राहिल्या आहेत.


आज देशातील बहुतेक प्रमुख सूत्रं वैदिक संघाच्या हाती एकवटली आहेत. लोकशाहीचे खांब यांनी जवळपास पोखरून टाकले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की आपल्या मनसुब्यात ते यशस्वी झाले आहेत.


राजकीय पटलावर जोराने बाऊन्स बॅक करण्याची हिंदूंना अद्यापी संधी आहे. या कामी आपले विचार, भूमिका, तत्व त्यांनी पुन्हा एकदा घासून पुसून स्वच्छ करून पाहिले पाहिजेत. तुमच्यावर लादली जाणारी विचारसरणी, नेतृत्व तुम्ही लाथाडलं पाहिजे. तुमच्या प्रतिनिधीवर त्याच्या पक्षाचे वा प्रमुखाचे नव्हे तर तुमचे वजन, दडपण असले पाहिजे. 


मुठभरांची हुकूमशाही म्हणजे लोकशाही, हे सध्याचे चित्र तुम्हांला बदलायचं असेल तर थोडाफार त्याग करण्याची ; संयम, धैर्य राखण्याची शिस्त तुम्ही बाळगली पाहिजे. दुसऱ्याने लादलेल्या भावनिक मुद्यांकडे तुम्ही वास्तव नजरेने पाहिले पाहिजे. लक्षात घ्या, वैदिकांचे आजचे यश ही जवळपास चार दोन पिढ्यांच्या संघर्ष त्यागाची कहाणी आहे. मूठभर वैदिक जर हे कर्म करू शकतात तर बहुसंख्यांक हिंदू का नाहीत ? की आयुष्यभर पिढ्यान् पिढ्या गुलाम म्हणून जगण्यासाठी व ऊर बडवून घेण्याकरताच आपण हिंदू बनलोत याचा विचार व्हावा !