सोमवार, १७ जून, २०१९

प्रासंगिक ( ८ )



लोकसभा निवडणूक निकालानंतर देशात, राज्यात बऱ्याच घटना घडल्या. काही सामाजिक तर काही राजकीय स्वरूपाच्या. परंतु त्या प्रत्येक घटनेने आपल्या एकूणच व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह मात्र उपस्थित करून ठेवले.


मनुष्य जीवन निर्मिती नंतर त्याची प्रगतीकडे वाटचाल सुरु झाली. आदीमानव ते आजच्या जगातील मनुष्य. साऱ्यांची धडपड केवळ अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी.
प्रगतीचा निकष लावू पाहता जगातील एकूणएक मनुष्यमात्राच्या या तिन्ही गरजा भागल्या आहेत का ?
ज्यांना आपण प्रगत राष्ट्र म्हणतो, त्यांच्या प्रगतीचे मापक काहीही असले तरी, स्वराष्ट्रातील एकूणएक व्यक्तीच्या मूलभूत गरजा भागवू शकलेत का ?
त्या तुलनेनं आपण तर विकसनशील राष्ट्रांत मोडतो. मग आपली प्राथमिकता कोणत्या गोष्टीस हवी ?

देश पातळीवर तेच राज्य पातळीवर या न्यायाने पाहता, राज्यात बऱ्याच ठिकाणी तीव्र पाणीटंचाई, चारा टंचाई आहे. हातातील सत्तेच्या बळावर वर्तमानपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांवरून या बातम्या दूर सारून राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू पाहत आहे. त्यातच विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मंत्रिमंडळ विस्तार व त्याकरता फोडाफोड करून जमवलेल्या आमदार - नेत्यांचे भपकेदार शपथविधी व त्यांच्या भरमसाठ वर्णनांनी भरलेली वर्तमानपत्रं अन् तासन् तास रसहीन वाळकं हाडूक चघळल्या प्रमाणे चालणाऱ्या वृत्तवाहिनीवरील चर्चा.
ज्यांच्या खांद्यावर लोकशाहीचा, किंवा हि पारिभाषिक संज्ञा जरी बाजूला ठेवली तरी ही जी सर्व माध्यमं आज उपलब्ध आहेत.. अगदी हे सोशल मीडिया देखील. त्याचा अंती उद्देश काय ? तर हाच कि, समाजातील एकूणएक घटकाची, मनुष्यप्राण्याची अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यास प्रयत्नशील राहावे. सरकारचे, सरकारवर अंकुश ठेवणाऱ्या जनशक्तीचे लक्ष वेधणे. प्रत्यक्षात दिसतं तर काय ?
मार्केटिंग कंपन्यांनी केलेल्या क्रिकेट मॅचेसच्या प्रचारातील उन्माद.
ज्या राज्यात लग्न ठरलेली मुलगी, लग्नाच्या दिवशी अंतरपाटाजवळ उभं राहायचं सोडून तशीच नववधुच्या वेशात तळ गाठलेल्या विहरीतून पाणी काढण्यासाठी धडपडत असते.. त्याच राज्यातील सरकारांत सहभागी पक्षाचे नेते परराज्यात राम मंदिर बांधावे याकरता केंद्र सरकारकडे अध्यादेश काढण्याची, कायदा करण्याची भीक मागतात. त्यांना या जनतेची, या आयाबहिणींची फिकीर नसते, ज्यांच्या पुढे ते मतांचा जोगवा मागत फिरलेले असतात. आणि हे केवळ सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षांतही तेच सुरू आहे. आणि या राजकीय बगळ्यांची जीहुजरी करणारेही तेच आहेत -- ज्यांना दुष्काळाच्या तीव्रतर झळा बसलेल्या आहेत. घरात नाही पाणी, आम्ही साहेबांचे इमानी हेच यांच्या आयुष्याचे सूत्र व हीच त्यांची कमाई.

अमुक एका जाती जमातीची व्यक्ती डॉक्टर झाली म्हणजे तिने मोठी सामाजिक क्रांती केली व या क्रांतीचे आपण एक साक्षीदार, भागीदार आहोत हे न समजता जणू काही तिने चोऱ्यामाऱ्या करून डॉक्टरेटची डिग्री मिळवली म्हणून तिला जीव देण्यास भाग पाडण्याइतपत आम्ही प्रगती केली आहे.
काल परवा कुठल्या तरी मंदिरात दानपेटीतील पैसे चोरल्याच्या आरोपावरून अल्पवयीन मुलास तापलेल्या फरशीवर नग्नावस्थेत बसवून त्याच्या पार्श्वभागाची सालटं काढण्यात आली. कोणत्या कारणास्तव मानवी क्रौर्याने ही मजल गाठली माहिती नाही पण जातीय स्वरूप लादून त्या मुलाच्या कोवळ्या मनात जे आयुष्यभराचं जातीयतेचं जहाल विष आम्ही कालवलंय त्याचा उतारा कोठून आणणार ?
सनदी अधिकाऱ्याची परीक्षा देणारे, सुशिक्षित समजले जाणारे तरुण अमुक एका धर्माच्या तरुणीवर बलात्कार करण्याची इच्छा मनोमन बाळगून राहतात. नव्हे ती चारचौघांत बोलून त्यावर कौतुकाचा वर्षावही प्राप्त करून दाखवतात.
हे सर्व पाहिल्या - ऐकल्यावर खरोखर विचारावं वाटतं स्वतःला कि, खरंच आपण कुठे चाललोय ?
जगण्याच्या स्पर्धेत काही गोष्टी क्षम्य असतात हे जरी मान्य केलं तरी इतक्या क्षम्य असाव्यात कि, जिथे मनुष्य व पशुतील सीमारेषा धुसूर व्हाव्यात ?
हीच जर का आपली प्रगतीची व्याख्या असेल तर यापेक्षा ती आदिम जीवनातील अधोगती बरी. निदान त्याला आपल्या मूलभूत गरजांची तर जाणीव होती. इथे मूळ संवेदनाच नसल्याने संवेदनशीलतेचा प्रश्नच नाही. ही मढ्यांची दुनिया आहे. जिवंत माणसाला इथे स्थान नाही !

शनिवार, ४ मे, २०१९

फिल्मी दहीवडा (१)





    इंटीमेंट सीन्स हा आपल्या फिल्मी दुनियेचा एक अविभाज्य घटक आहे. तुम्ही कितीही नाकं मुरडली तरी याच्याशिवाय तुमचा सिनेमा पूर्णच होऊ शकत नाही. मूकपट कि बोलपट हे माहिती नाही पण भारतीय सिनेमात पहिलं ऑन स्क्रीन चुंबन दृश्य देविकाराणीने दिल्याचं मानलं जात असलं तरी तिच्याही पूर्वी सीता देवी, ललिता पवार यांनी किसींग सीन दिल्याची माहिती मिळते.

    इंटीमेंट चित्रीकरणातही आपल्याकडे तसा भेदभाव असतो. म्हणजे हिरो हिरोईनच्या प्रणयात दोन फुलं एकमेकांवर आदळतात. जर त्यांची सुहागरात असेल तर घुंघट उठा के मुखडा दिखाकर बत्ती बुझ जाती थी... किंवा मग जास्तच धाडसी म्हणजे हाथों में हाथ असलेल्या स्थितीत बेड भोवतालच्या फुलांच्या माळांपैकी एक चार दोन तोडताना दाखवल्या कि समजायचं झालं याचं !
    त्याउलट व्हिलन आणि व्हॅम्प यांच्या प्रणयात शक्य तितका धसमुसळेपणा, खेचाखेची, गुडघ्यापर्यंत उघडे पाय.. हेलन, बिंदू, अरुणा इराणी ते शेवटी कुनिका लाल पर्यंत येऊन या प्रथेचा अंत झाला. आजकाल हिंदी सिनेमात पूर्वीसारखे रसिक व्हिलनच उरले नाहीत तर व्हॅम्प तरी कुठून येणार म्हणा !
    प्रणय प्रसंग वा कल्पना भारतीयांना नव्या नाहीत. जगाला कामसुत्राचे धडे एका भारतीयानेच दिले असे आम्ही अभिमानाने सांगत असलो तरी स्वतः मात्र संभोगाचे ज्ञान सध्या परदेशी बी पॉझिटिव्ह बघून, अतिशयोक्तीही झक मारेल अशा संभोगकथा वाचून घेत असतो. यावरून आमच्या उच्च अभिरुची संपन्नतेची कल्पना यावी.
    फिल्मी दुनियेतील मंडळीही या आमच्या समाजाचाच घटक असल्याने त्यांचीही मानसिकता फारशी वेगळी नाही. त्यामुळेच हिंदी सिनेमात जे जे आजवर इंटीमेंट सीन्स येऊन गेलेत त्यातील मोजके वगळता इतर सर्व वर्स्ट कॅटेगरीत मोडणारेच आहेत.          

    उदाहरणार्थ रेखा, स्मिता पाटील, नीना गुप्ता या इंटिमेट सीन्सच्या बाबतीत बेस्ट एक्ट्रेस होत्या असं माझं मत आहे आणि यांच्या वाट्याला तशी दृश्यंही आली. पैकी प्रथम आपण स्मिता पाटीलचे सीन्स विचारात घेऊ.
     

    जयाप्रदा, राजेश खन्ना आणि स्मिता पाटील यांचा ' दिल ए नादान ' नावाचा एक सिनेमा होता. पिक्चर आपण पाहिलेलं नाही. त्यामुळे स्टोरी माहिती असण्याचा प्रश्नच नाही. फक्त एवढं माहित्येय कि, जयाप्रदा राजेश खन्नाची हिरोईन असते. ( क्या नॉलेज है ! व्वाह !! ) तर सीन असा आहे कि, कुठल्या तरी कारणांनी राजेश खन्ना जयाप्रदाला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. तेही रात्री. आणि नेमकं त्याच वेळी जयाप्रदा घरात नसते. मग हिरो सभ्य माणसाप्रमाणे निघून जायच्या गोष्टी करतो तर अतिसभ्य संस्कारी स्त्री प्रमाणे स्मिता त्याला थांबवते... कुठे घडतं हे असं ?.. एवढ्यात पाऊस वगैरे चालू होतो आणि बाहेर मुसळधार पावसात नाचकाम आणि रोमान्सची कसरत करत एक युगुल गाणं म्हणत असतं... आणि राजेश खन्नाला स्मिताच्या जागी जयाप्रदा दिसू लागते. ( इथं खरं तर डोक्यावर हात मारून घ्यायला पाहिजे पण.... समोर जया आणि स्मिता लागोपाठ दिसत असतील तर.. कोण एवढा विचार करतो ! ) गाण्यासोबत याचं जे काय व्हायचं ते होऊन जातं. या घटनेला आमचं काही ऑब्जेक्शन नाही. पण... इंटीमेंट सीनमध्ये रोमँटिक म्हणून राजेश खन्नाच्या चेहऱ्यावर जे भाव येतात ना.. ते पाहून स्वाभाविक मनातून प्रतिक्रिया उमटते.. बाबारे ! तू काही करतोयस कि तुला काही होतंय ?  
    सेम आराधनातील रूप तेरा मस्ताना प्रमाणे. समोर शर्मिला सारखी अर्धवस्त्रांकित ललना समोर असूनही राजेश खन्नाने चेहऱ्यावर सॅड + रोमान्स सम भाव दर्शवत गाण्याची वाट लावून टाकली होती.  पण... आराधना हा फिल्मी भाषेत बीता कल था.. तिथे राजेश खन्ना यंग होता तर इथे त्याच्या डोक्यावरचे केस विरळ होऊ लागलेले. समोर ऐन ज्वानीतली स्मिता पाटील आणि याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे सो कॉल्ड रोमँटिक भाव.. जे पाहिल्यावर मोठ्याने विचारावसं वाटतं.. बाबा  रे ! तू रोमान्स करतोय कि तुला काही होतंय..  मी तर म्हणतो याच्यापेक्षा बॉलीवूडचा आद्य इम्रान हाश्मी धर्मेंद्र बरा. इस बंदे को कोई फर्क नही पडता सामने कौन है.. बस अपना एन्जॉयमेंट चले.... असो.
              

    स्मिता सोबत याहून वर्स्ट इंटीमेंट सीन देणारा दुसरा हिरो म्हणजे ओम पुरी. हा आर्ट फिल्मचा इम्रान हाश्मी. पिक्चरचं नाव आक्रोश. टिपिकल आर्ट फिल्म परंपरेतला. सीनमधील कपडे आणि डायलॉग्ज वरून दोघेही दारिद्र्यरेषेखालील वाटतात. ( मी पिक्चर पाहिला नाही, हे आधीच सांगून ठेवतोय. ) सुरवातीला भांडण, शिवीगाळ, मारहाण व नंतर प्रणय, हा फॉर्म्युला डायरेक्टरने वापरलाय. कदाचित बिचाऱ्याची, गरिबांच्या प्रणयाविषयी हीच कल्पना असावी. मोजून दीड दोन मिनिटं ओम पुरी व स्मिता पाटील इंटीमेंट, प्रणय म्हणून जे काही करतात.. ते पाहिल्यावर साला सेक्स या शब्दाशीच आपली नफरत होऊन जाते. एवढ्यासाठीच का केला होता हा सारा अट्टाहास असं काहीसं मनात येऊन जातं.

   
सेम स्टोरी रेखाची. उत्सव मधील रेखाचे प्रणय प्रसंग किती कुशलतेने चित्रित केलेत. या संपूर्ण चित्रपटात रेखा जितकी सुंदर दिसलीय तितकी दुसऱ्या कोणत्याच नाही. तर अशा एव्हरग्रीन रेखाला घेऊन आस्था मध्ये अनुक्रमे नवीन निश्चल व ओम पुरी सोबत दोन प्रणयदृश्यं चित्रित करण्यात आली.
    
    पहिल्या प्रसंगात नवीन निश्चल एका आर्थिकदृष्ट्या गरजू, विवाहित स्त्रीचे काही तास विकत घेऊन तिला कामकलेचे धडे देतो व नंतर ती गरजू स्त्री आपल्या प्राध्यापकसम नवऱ्यास ते धडे देते. अशी बऱ्यापैकी देवाणघेवाण असलेले दोन इंटीमेंट.
    
पहिल्याच्या बॅकग्राउंडला कुठलं तरी एक अध्यात्मिक भजन टाकून त्याची वासलात लावलेली असते. उरलेली कसर रेखाला अतिशय वाईट पद्धतीने चित्रित करून भरून काढली जाते. आपलं आणि रेखाचं दुदैव इतक्यावर थांबत नाही. ओम पुरी सोबत रेखाला परत तेच रिपीट करावे लागते. हे बघत असताना आपण फक्त WTF एवढचं म्हणत असतो.
    ओम पुरीचं एक बरंय. स्मिता, देबाश्री, रेखा ते मल्लिका शेरावत ! म्हणूनच मी याला आर्ट फिल्मचा इम्रान हाश्मी म्हणतो. एक मल्लिका सोडली व देबश्री अर्धी धरली तर अडीच नट्यांसोबत पठ्ठ्याला स्क्रीन एन्जॉय करता आली.
             
  
 देबाश्री रॉय वरून आठवलं. तिचा आणि कंवलजीत सिंगचा एक सिनेमा होता. नाव आठवत नाही.. पण कंवलजीत आठवतोय... तोच जो सत्ते पे सत्ता मधील अमिताभच्या सहा भावांपैकी एक आणि अमिताभ बच्चनपेक्षा ऊंच. अमिताभहुन अधिक ऊंच कोणी असू शकत नाही या माझ्या बालपणीच्या कल्पनेला सुरुंग लावणारा दुष्ट राक्षस.... तर या कंवलजीतने देबाश्री सोबत अर्ध्या एक मिनिटाचा इंटीमेंट दिला आहे. तो पाहिल्यावर.. आपल्या दोन्ही हातांच्या मुठी घट्ट आवळल्या जाऊन जोराने आपल्याच कपाळावर आदळतात.
    
असाच एक आपल्याच हातांनी आपलं थोबाड बडवून घेण्यास भाग पाडणारा सीन सुचित्रा पिल्लई आणि  अनुप सोनीने -- तोच तो, जो सोनीवरच्या क्राईम पेट्रोलमध्ये येतो -- दिला आहे. हे असले सीन्स पाहिल्यावर.. हि लोकं अशी का वागतात.. का करतात ? वगैरे बालसुलभ प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाहीत.

    इंटीमेंट सीन्स उत्सव प्रमाणे -- नीना गुप्ताचा अपवाद करता -- कलात्मकरित्या रंगवला जाऊ शकतो किंवा आपल्या जुन्या प्रतीकात्मक पद्धतीनेही. याचे एक उदाहरण म्हणजे वीराना तील तो फेमस सीन. जो देशातील पंचविशीपार तरुणांच्या मनात घर करून राहिला आहे. पण निव्वळ कलात्मकतेचाच निकष लावायचा झाल्यास द ग्रेट शोमन राज कपूर शिवाय पर्याय नाही. त्याचं पांढऱ्या ओलेत्या साडीतील आरस्पानी सौंदर्याचं वेड सोडलं तर सत्यम शिवम सुंदरम चं टायटल song त्याने ज्या प्रकारे चित्रित केलंय त्याला तोड नाही. म्हटलं तर ते भक्तीगीत आहे. म्हटलं तर प्रणयगीत !
       तसं पाहिलं तर इंटीमेंट सीन्स देणे काही खायचे काम नाही. समोरच्या एक्ट्रेसला कुठेही असुरक्षित वाटणार नाही, अवघड वाटणार नाही याची दक्षता बाळगूनच असे सीन्स द्यावे लागतात. हां.. आता क्वचित नटांकडून मर्यादा उल्लंघनही झालंय किंवा गैरफायदा घेण्याचे प्रकारही घडलेत. पण त्याची चर्चा परत कधीतरी... तूर्तास इतकेच !

गुरुवार, २५ एप्रिल, २०१९

प्रासंगिक ( ७ )



                                        



    आपल्या प्रत्येक सभेत राज ठाकरे, नरेंद्र मोदी व अमित शहा यांना राजकीय क्षितिजावरून हद्दपार करण्याची मतदारांना आवाहन करतात, त्यांच्या या अवहानामागील राज काय आहे ? त्यांना या जोडगोळीकडून नेमकी कशाची भीती वाटत आहे ? 
    या प्रश्नांची उत्तरे शोधायची असल्यास आपल्या भूतकाळात दूरवर मागे जावे लागते. अगदी स. १८५७ च्या उठवापर्यंत. या सत्तावनच्या बंडाचे अनेक पदर आहेत. त्यापैकी एक म्हणजे, ब्रिटीश राजवटीत हिंदू आपल्या बरोबरीस आले किंवा हिंदू व आपण एकाच लेव्हलला आलो हे काही मुस्लिमांच्या पचनी पडले नाही. अगदी सेम हीच स्थिती स. १९५० मध्ये स्वतंत्र भारताची राज्यघटना अस्तित्वात आल्यावर वैदिक धर्मीयांची झाली. वैदिकांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या धार्मिक संघटनेने नेहमीच राज्यघटनेसं आपला विरोध दर्शवला. तिला मान्य करण्याचे नाकारले. यामागील मुख्य कारण म्हणजे, अगदी ब्रिटीश राजवटीतही भारतीय समाजात वैदिकांचे जे श्रेष्ठ स्थान होते, ते घटनेतील समतेच्या तत्वाने हिरावले गेले.

     तत्पूर्वी कॉंग्रेसकडून अस्पृश्यता निवारणाचा ठराव मंजूर करून घेऊन म. गांधीने या समतेचा पाया घालण्याचे काम केलेच होते. परंतु गांधींची हि कृती खुद्द कॉंग्रेसमधील बऱ्याच वैदिकांच्या पचनी पडली नव्हती. अगदी आजही जेव्हा गांधी हत्येची चर्चा होते, तेव्हा नथुराम समर्थक या हत्येच्या कटासाठी कॉंग्रेसकडे बोट दाखवतात ते यामुळेच. आणि हि गोष्ट स्वाभाविक आहे. पक्ष आणि धर्म या दोन गोष्टी वेगवेगळ्या असून व्यक्तीचा अल्पसा का होईना  आपल्या धर्माकडे ओढा असतोच. अन्यथा, गांधीयुगापूर्वी टिळकांच्या काळात ज्यावेळी प्रथम राजकीय कि सामाजिक सुधारणा ? हा प्रश्न चर्चेत आला त्यावेळी टिळकांनी जाणीवपूर्वक राजकीय सुधारणांची बाजू उचलली नसती. सामाजिक सुधारणेखेरीज राजकीय सुधारणांचा काडीइतकाही उपयोग नाही, हे टिळकांनाही चांगलेच ठाऊक होते. परंतु त्यामुळे वैदिकांचा जन्मजात सामाजिक वर्चस्वाचा हक्क बाधित होत होता, जे त्यांना नको होते. परिणाम, आज आपल्यासमोर आहे.

     वैदिक संघाला मान्य असो नसो, राज्यघटनेत समतेचे तत्व समाविष्ट होऊन भारतीय जनतेने ते स्वीकारले. मात्र राजकीय सत्ता हाती येताच राज्यघटना बदलण्याची संघाची भाषा कायम राहिली. परिणामी संघाच्या राजकीय व्यासपीठास, भाजपला एकहाती सत्तेचे फळ कधी चाखता आले नाही. परंतु स. २०१४ च्या निवडणुकीत हा मुद्दाच सपशेल वगळण्यात आला. भाजपने टाकलेली कात कॉंग्रेस व इतर राजकीय पक्षांनाही पचली नाही व सर्वांचा धुरळा उडवत मोठ्या दिमाखात भाजप सत्तेत आली. त्यानंतर खऱ्या अर्थाने संघाची राजकीय सत्ता सुरु झाली.

    राज्यघटना तर मान्य नाही, पण ती बदलताही येत नाही. तेव्हा तिला हात न लावता त्यातील लूप होल्सचा फायदा घेत घटनात्मक संस्थाच गुंडाळून टाकत लोकशाहीचा देखावा कायम ठेवत हुकुमशाही आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हाच प्रयोग यापूर्वी कॉंग्रेस सर्वेसर्वा इंदिरा गांधीनी केला होता. पण त्यावेळी त्यांनी आणीबाणीचे शस्त्र उपसले होते. भागवत and कंपनीला अशा शस्त्राची गरजच भासली नाही.

    जागतिकीकरणाची फळे चाखू लागलेल्या -- विशेषतः स्वस्त इन्टरनेट लाभलेल्या व दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांत प्रथमच भाग घेणाऱ्या युवा पिढीला एका कार्यक्रम हवा होता. राष्ट्रभक्तीने प्रेरित जनतेला मोदींनी कार्यक्रम दिले. प्रचारसभांत वारेमाप घोषणा झाल्या. तोवर आघाड्यांचे सरकार चालवून मेटाकुटीस आलेल्या कॉंग्रेसचा ढिसाळ कारभार सगळ्यांच्याच डोक्यात बसला होता. परिणामी, मतपेट्यांतील जादुई राक्षसाने कॉंग्रेस विरोधकांची धुळदाण उडवत भाजपला खांद्यावर घेतले.

    यानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या नवमतदारांसाठी जुन्या योजना नावं बदलून चालू केल्याची घोषणा केली. वाजपेयी - महाजन काळातील इंडिया शायनिंग बाजूला ठेवत स्टार्ट अप आणि मेक इन इंडियाची घोषणा केली. खेरीज, भ्रष्टाचार व दहशतवादविरोधी लढ्यासाठी नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईकचा धडाका लावला. यातूनही लोकांना उसंत मिळू नये यासाठी विरोधात असताना ज्या आधार कार्ड योजनेस भाजप विरोध करत होती, ती आधार कार्ड योजना सक्तीची करून टाकली. स्वच्छता अभियानाच्या नावाने लोकांच्या हाती मोबाईल कॅमेरे व झाडू दिले. एकूण लोकं येनकेनप्रकारे मान वर काढूच नयेत अशी धोरणे आखत सर्वांना लायनीत उभे करून धक्क्याला लावले.

    हे सर्व एकीकडे चालू असतना दुसरीकडे दडपशाहीचे धोरण आखून टाकले. हिंदू समाज आपल्या अधीन राहावा, आणि मुसलमानांनी मान वर करू नये यासाठी बीफबंदीचा कायदा पास करणात आला. आता या कायद्याला भाजपचे व्यावसायिक मित्रच घोडे लावतात हि गोष्ट वेगळी. परंतु केवळ कत्तलीकरता जनावराची वाहतूक होते या संशयावरून डेयरी चालक, भाकड जनावरांचे मालक तसेच नैसर्गिकरित्या मृत जनावरांचे कातडे सोलणारे बडवले गेले, मारले गेले. हा सर्व हैदोस घातला जात असताना केंद्रातील मोदी सरकारने तेच धोरण स्वीकारले जे गोधरा घडत असताना वाजपेयींनी स्वीकारले होते.

    सामाजिक कलहास अंतस्थरित्या प्रोत्साहन देत असताना न्यायसंस्था, आरबीआय आणि आता तर निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक स्वायत्त संस्था धाब्यावर बसवण्यात येऊ लागल्या. देशभर जी स्थानिक आणि विधानसभा पातळीची इलेक्शन्स झाली, त्यात प्रामुख्याने हातातील सत्तेचा वापर प्रतीपक्षातील भ्रष्टाचारी पण वजनदार नेत्यांना धमक्या देऊन गप्प बसवण्यात वा खरेदी करण्यात झाला. जर विरोधकच उरले नाहीत तर विरोधी पक्ष तरी कसा उरेल ? महत्त्वाचे म्हणजे, स. २०१४ पासून भाजपात प्रवेश केलेल्या बव्हंशी नेत्यांवर खुद्द भाजप नेत्यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. असो.

    या सर्व गोष्टींचे सार इतकेच आहे कि, तुमची राज्यघटना वगैरे सर्व काही अबाधित राहिल. परंतु तुमची राजकीय भूमिका, तुम्हांला उपलब्ध असलेलं राजकीय व्यासपीठ निवडण्याचं स्वातंत्र्य मात्र हिरावलं जाईल. राज ठाकरे हाच धोका व्यक्त करत आहेत. पण वेगळ्या तऱ्हेने. त्यांची भूमिका निव्वळ राजकीय आहे. त्यामुळेच ते भाजप वा संघा ऐवजी मोदी - शहांना टारगेट करताहेत. परंतु सामाजिकदृष्ट्या, एक स्वतंत्र देशाचा सुजाण व जागरूक नागरिक म्हणून आपल्याला या धर्मांध वैदिक संघ व भाजपला राजकीय क्षितिजावरून हद्दपार करणे भाग आहे !  
                                                                (समाप्त) 


रविवार, ३ मार्च, २०१९

प्रासंगिक ( ६ )




    सगळं कसं ठरवून केल्यासारखं झालं नाही.. पुलवामा हल्ला मात्र तेवढा अनपेक्षित होता. एका क्षणात ४० हुन अधिक जवान भारताने शत्रू राष्ट्र पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात क्वचितच गमावले असतील. सीआरपीएफ जवानांची ने - आण करताना अक्षम्य चुका झाल्याची कबुली वगैरे दिली गेली, जात आहे. गुप्तचर खात्याने मात्र आपले हात यापूर्वीच झटकत दोष सीआरपीएफवर ढकलून दिलाय, ते मात्र या गदारोळात फारसं कोणाच्या लक्षात आलेलं नाही. चालायचंच.. छोट्या छोट्या गोष्टी विसरण्याची आपल्याला सवयच आहे.. आम्हांला सोस आहे भव्यदिव्यतेचा.. नेमकं हेच हेरून एयर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. यामध्ये हळूच तीनशे, साडेतीनशे दहशतवादी मारले गेल्याची पुडी सोडण्यात आली. सगळे कसे हुरळून गेले.. पाकिस्तानचा सूड घेतला वगैरे.. पण त्याच वेळी काश्मिरात दहशतवादी हल्ले सुरूच असल्याचे मात्र दुर्लक्षित करण्यात आले, किंबहुना आत्ताही ते चालूच असतील पण त्यात मरणारे / मारणारे कोणाच्या खिजगणतीतही नाहीत. हेही चालायचंच.. बॉर्डरवर हे सगळं चालू असताना देशभरात एकप्रकारचं उन्मादी वातावरण क्रिएट केलं जात होतं.. युद्धज्वर तसा प्रत्येक देशातील जनतेत हा असतोच.. किमान युद्धजन्य स्थिती अनुभवण्याची एक सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनी असते अन् ती यावेळी बव्हंशी पूर्णही झाली. मुंबईसारख्या पाकिस्तान निकट शहरांना रेड अलर्ट देण्यात वगैरे आले. याचा फायदा घेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अधिवेशनच गुंडाळले.. इथे आठवण येते विन्स्टन चर्चिलची.. जर्मनीच्या विमानांनी इंगलंडवर बॉंम्बफेक चालवली होती. त्यावेळी पठ्ठ्याने ना राजधानी सोडली ना नेहमीचं प्रशासकीय कामकाज थांबवलं. हिटलर तर मरेपर्यंत बर्लिनमध्येच राहिला.. मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने हा भेकडपणा का दाखवावा ?
   
    पण मुख्यमंत्रीच का ? सध्याच्या घडीचे देशातील पोलादी पुरुष म्हणून स्वतःचा गौरव करून घेणारे स. पंतप्रधानांनी तरी काय वेगळं केलं ? नुकतीच भारत पाकिस्तान फाळणी झाली होती, का होणार होती ते मला आता आठवत नाही. तेव्हाच्या बंगालमध्ये जातीय दंगली पेटल्या होत्या. पेटता बंगाल विझवण्यासाठी मोहनदास गांधी नावाचा वेडा मनुष्य .. ( हवं तर टकल्या म्हणा, थेरडा म्हणा किंवा त्याच्या आई माईचा उद्धारही करा. ) हातात फक्त एक काठी ( ती पण चालताना आधार म्हणून बरं का ! ) घेऊन गेला होता. अर्थात, छुपे अंगरक्षक वगैरे प्रकार सोबत असेल हा तर्क जरी ग्राह्य धरला तरी म्हातारा अशा प्रसंगी जीवावर उदार होऊन गेल्याचे मान्य करावेच लागेल.  या धर्तीवर जर खुद्द पंतप्रधान अगदी आपल्या ए टू झेड बॉडीगार्ड्स आणि लष्करी ताफ्यासह काश्मिरात जाऊन तळ ठोकून राहिले असते तर .... ? स्वतःचं समर्थ नेतृत्व करण्याची जी संधी होती, ती नेमकी हीच होती. जी पंतप्रधानांनी दवडली. पण... असो. ते जाहीर सभांमधून आपल्या दंडातील बेटकुळ्या फुगवून दाखवू लागले अन् तिकडे इम्रान खानने तीच संधी साधत एकीकडे शांततेची बोलणी करत दुसऱ्या हाताने पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या भारतीय वैमानिकाच्या प्रत्यार्पणाची भाषा करत तिसरीकडे काश्मिरातील दहशतवादी कारवाया कशा चालू राहतील याकडे लक्ष पूरवले. चाणक्य, मास्टरस्ट्रोक, चतुरस्त्र राजकारणी कोण ? इम्रान कि नरेंद्र ?? सुरवात होते पुलवामा घटनेपासून. नंतर मग जाणीवपूर्वक वातावरणनिर्मिती करत एयर सर्जिकल स्ट्राईक आणि त्यात भव्यदिव्य यश मिळाल्याची जाहिरात करत हळूच काही दिवसांनी असं काही आम्ही बोललोच नव्हतो.. म्हणजे हल्ल्यात तीनशे दहशतवादी मेले वगैरे.. भारत हा एक देश आहे. या देशाला आंतरराष्ट्रीय राजकारणात थोडीफार किंमत आहे, प्रतिष्ठा आहे किमान ती राखण्यासाठी तरी माणसाने आपली तोंडं उघडावी / आवळावी ? आयटी सेल चालवल्या प्रमाणे केंद्रातील मंत्र्यांनी, सत्तेत सहभागी पक्षाच्या नेत्यांनी केवळ लोकप्रियेस्तव भरपूर वलग्ना केल्या. काश्मीर पर्यटनावर बहिष्कार टाकण्याची घोषणाही त्यापैकीच एक.

    काश्मीरचे अर्थकारण मुख्यतः या पर्यटनावर चालते. तेच बंद झाले तर बेकार, बेरोजगारांचे तांडे कुठे जातील आणि काय करतील हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. आणि नेमकं त्यांना हेच हवं. यानिमिताने पुन्हा आवडता हिंदू - मुस्लिम वाद त्यांना जिवंत करता येईल. जेणेकरून यांचे महत्त्व राहावे. तुलनेनं विचार केला तर मग नक्षलवाद्यांना सामील होणाऱ्यांचे काय ? ज्या ज्या शहरात, गावात नक्षलवादी समर्थक, हस्तक मिळालेत ती ती गावं, शहरं यांच्या योजनेनुसार क्लीन केली तर.. खरंच करायला पाहिजेत ना.. एकजात मारून टाकली पाहिजेत सगळी.. अगदी हिटलरही लाजला जाईल अशी.. पण मग राज्यातील विविध मंत्री, आमदार, खासदारांचे काय ? तेही नक्षली गावं, शहरांचं प्रतिनिधित्व करतात. अगदी आपले मुख्यमंत्री देखील ! खेरीज प्रत्येक गाव - खेड्यांत, शहरात विखुरलेला आयटीसेल वर्गही.. केवळ मुस्लिम अथवा कश्मिरी द्वेषापोटी त्यांच्या कत्तलीची भाषा करून आपण कोणत्या भस्मासुराला जन्म देतोय हे आता तरी लक्षात येतंय का ? याच धर्तीवर मग नागालँड, ओरिसा, पंजाब.. कुठे आणि किती ?? अंती देश म्हणून काय शिल्लक तरी राहील का ? राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक प्रदेश नाही तर व्यक्ती म्हणजे राष्ट्र हे आत्ता तरी आपण समजावून घेणार आहोत का ?

    खैर.. हे सगळं असंच चालायचं.. निवडणूका होईपर्यंत.. नंतर निवडणूक झाल्या म्हणून.. कायमस्वरूपी तोडगा काढण्याची इच्छा असल्यास काढता येईल पण त्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्तीच आज आपल्यात नाही. लोकं अद्यापही आपल्या हक्कांबाबत जागरूक आहेत, कर्तव्यांप्रती नाहीत. ज्या दिवशी लोकांना आपल्या कर्तव्याची जाणीव होईल, त्या दिवशी सामाजिक प्रश्न सोडणवण्याची राजकीय इच्छाशक्तीही अस्तित्वात येईल. तोवर.. चलता है,चलने दो ...!