सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

संजय म्हणाला ...! ( भाग – ७ )





(१) शासनयंत्रणा (२) कायदेमंडळ (३) न्यायव्यवस्था (४) प्रसारमाध्यमे यांना सामान्यतः लोकशाहीचे चार आधारस्तंभ वा खांब म्हटले जाते. या चार खांबांना आधार देण्याचे कार्य राज्यघटना करते. परंतु आपल्याकडे याबाबतीत बराच गोंधळ असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटनेचा जन्म हा स. १९५० चा तर भारतीय दंड संहितेचा --- ज्यावर न्याय व्यवस्था बऱ्यापैकी अवलंबून आहे --- स. १८६० साली जन्मलेली व टप्प्याटप्प्याने त्यात सुधारणा होत आलेली. यातून नेमका विरोधाभास लक्षात यावा.


    कायदेमंडळ हे घटनेनुसार बनलेले परंतु त्याची मुळची संकल्पना हि आधीच्या राजवटीतील. अर्थात, त्यामुळे कायदेमंडळ अविश्वासाच्या वर्तुळात येत नसले तरी भारतीय दंड संहितेच्या सुधारणांचा वेग पाहता कायदेमंडळाच्या कार्यक्षमतेविषयी थोडाफार प्रश्न उभा राहतोच.


    शासनयंत्रणा ही आधीच्या राजवटीची बहुमुल्य देणगी. तिला लोकशाहीचा बुरखा चढवण्यात मात्र आला. तसा तो इंग्रजांनीच चढवला होता म्हणा. तोच आपण पुढेही कायम ठेवला. त्यामुळे शासनयंत्रणा अधिकाधिक लोकाभिमुख न होता सरकाराभिमुख होत गेलेली दिसून येते. खरी लोकशाही ती --- ज्यामध्ये तुम्ही शासनयंत्रणेवर, सरकारवर देखील निर्भीडपणे दोषारोप करू शकता. जर त्यात तथ्य असेल तर. परंतु आपल्याकडे या गोष्टी अपवादानेच होताना दिसतात. साधा माहितीचा अधिकार देखील सामाजिक चळवळी करून आपणांस मिळवावा लागला त्या लोकशाही बाबत काय बोलायचे ? शिवाय माहिती अधिकारासाठी झटणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या घडवून आणली गेली तरी त्याची योग्य ती दखल न घेण्याचा पवित्रा शासनयंत्रणेने आपसूकच घेतला. याबद्दल आम्ही काय करू शकलो ? काही नाही. 


    साधी बाब म्हणजे नवीन मोटारगाडी विकत घेताना सरकार त्या व्यक्तीकडून आगाऊ रोड टॅक्स वसूल करून घेते. तरीही त्या व्यक्तीने परत राज्य – राष्ट्रीय महामार्गांवर टोलच्या पावत्या फाडायच्या ? का, तर सरकारी इंजिनियर नालायक. त्यांना रस्ते बांधता येत नाहीत वा सरकारकडे रस्ते बांधण्यासाठी पैसा नाही. मग तो रोड टॅक्स घेण्याचा सरकारला अधिकारच काय ? पण असे प्रश्न विचारायचे नसतात. शासनयंत्रणेच्या कोमल मनाला यातना होतात.


    तुम्ही या राज्याचे – देशाचे दोन पिढ्यांचे जरी निवासी नागरिक असलात तरी अधिवासाचा दाखला मिळवण्यात किती दिवस लागतात ? तोच दाखला एखाद्या व्यक्तीला इथे येऊन पाच पन्नास दिवस व्हायच्या आत लगोलग कसा काय हो मिळतो ? यांच्या वस्त्या रातोरात उभ्या होतात. सर्व सुविधा लगोलग दिल्या जातात. आणि निवडणुकीत हे असं कसं झालं किंवा बेकायदेशीर वसाहतींवर कारवाई करण्याची भाषा केली जाते. तशीच संरक्षण देण्याचीही ! यात शासनयंत्रणा जबाबदार नाही असं कोण म्हणेल ?


    जनतेच्या प्राथमिक, मुलभूत गरजा पूर्ण करण्याची मुख्य जबाबदारी कोणाची, तर शासनाची. पण शासन या उद्दिष्टपूर्तीत कितपत यशस्वी झालंय ?  जागतिक महानगरांमध्ये गणना होणाऱ्या मुंबईजवळच्या भागांत व मुंबईतही कुपोषित मुलांचा प्रश्न सुटलेला नाही. बहुधा याचमुळे मायानगरी मुंबईची दखल जागतिक पातळीवर घेतली जात असावी. वर्षानुवर्षे विविध योजना आखून, निधींची तरतूद होऊन देखील शासनयंत्रणा अपवाद केल्यास खऱ्या गरजूंचे क्वचितच कुपोषण दूर होत असावे असा संशय आता बळावू लागला तर त्याचा दोष कोणाच्या माथी मारावा ?


    शासनयंत्रणांचा भ्रष्टाचार हा तर सर्वत्रच आढळून येणारा प्रकार आहे. त्याला आपण तरी अपवाद कसे असणार ? पण थोडेफार नियंत्रण तरी असावं कि नाही ? हि एक अशी बाब आहे जिथे फक्त कसलाही विधिनिषेध न बाळगता निव्वळ पैसे खाण्यास प्राधान्य दिले जाते. वाढता भ्रष्टाचार लक्षात घेऊन मग सरकार वा पोलिस अधिकारी शे – पन्नास रुपड्यांची लाच घेताना काही कर्मचाऱ्यांना पकडतात. बाकी हजारो कोटींचे घोटाळे करणारे फक्त चौकशीस्तव येतात व उरलेला वेळ हॉस्पिटल अथवा आपल्या दैनंदिन जीवनात व्यतीत करतात.


    प्रशासन यंत्रणेचे दुसरे महत्त्वाचे अंग पोलिस. अर्थात ते न्यायव्यवस्थेशीही संलग्न आहेच यामुळेच कि काय, ते ना धड इकडचे ना तिकडचे झाल्येत ! शासनयंत्रणा, अर्थात सरकारी दबावाला बळी न पडता काम करण्याचे अधिकार कागदावर तरी त्यांच्याकडे आहेत. परंतु प्रत्यक्षात काय ? तसं पाहिलं तर कागदावर राज्यघटनेनुसार कोणत्याही कारणास्तव सार्वजनिक स्थळी भेदभाव करण्यास मज्जाव केला आहे. परंतु आजही कित्येक धार्मिक स्थळांवर प्रवेश देताना भेदभाव केला जातो व अशा स्थळांना केवळ कर्तव्य म्हणून पोलिस संरक्षण देतात. याहून मोठा विनोद वा विरोधाभास काय असेल ?  शासन यंत्रणेतील बऱ्या – वाईट गोष्टींचा याही क्षेत्रात बराचसा प्रादुर्भाव झाल्याचे आपणांस वेळोवेळी, पदोपदी दिसून येते. अनुभवास येते. कधी कायदा माहिती नाही, कधी अजाणतेपणी नियमभंग झाला अथवा केवळ कायद्याच्या रक्षकाची मनमानी यांमुळे आपली पिळवणूक व्हायची ती होतेच ! पोलिसांच्या अकार्यक्षमतेप्रमाणे अपुऱ्या सुविधा व मनुष्य बळाची कमतरता ह्या गोष्टीही लक्षात घेणे आवश्यक आहे. परंतु हा दोष लक्षात घेऊन या त्रुटी दूर करण्याचे शासनास कधीच गरजेचे वाटले नाही. यामागील कारणांचा आढावा प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार घ्यावा.


    व्यवस्थित व अव्यवस्थित कारभाराचा आदर्श नमुना म्हणून भारतीय न्यायव्यवस्थेची ओळख आता बनत चाललीय. न्यायालये अतिशय कूर्मगतीने चालतात. तशीच जलदगतीनेही. न्यायव्यवस्था कधी पारदर्शक असते तर कधी अपारदर्शक. एकच न्याय सर्वांना लागू होईल याचीही शाश्वती नाही. उदाहरणार्थ, नुकतेच घडलेले कॅम्पाकोला व दिव्यातील अनधिकृत बांधकामांचे प्रकरण. कित्येक प्रसंगी विशिष्ट व्याक्तीकरता वेगळाच न्याय, तरतूद केल्याची उदाहरणे तर इतकी सामान्य झाल्येत कि हीच खरी न्यायपरंपरा वा न्यायदानाची पद्धती असा सर्वसामान्यांचा समज होऊ लागलाय. अर्थात, पोलिस खातं ज्या गुणांनी बदनाम झालंय त्याचं प्रवृत्तींचा या संस्थेतही प्रवेश झालाय. त्यामुळे हे होणारच. शिवाय मनुष्यबळाची वानवा यांनाही जाणवतेच. कित्येक स्थळी तर न्यालायात पुरेशी आसनव्यवस्था वा स्वच्छतागृहांचीही सोय नसते. काही इमारती तर अशा दयनीय बनल्या आहेत कि, तिथे न्यायमूर्ती बहुधा जीव मुठीत घेऊन बसत असावेत.


    एकीकडे मानवी स्वभावातील प्रवृत्ती --- मग चांगल्या असो वा वाईट --- तर दुसरीकडे आवश्यक त्या सुविधा, निधींची वानवा. पर्यायाने न्यायव्यवस्थाही आपल्या मूळ हेतुंपासून हळूहळू डगमगू लागल्यास, त्यात नवल ते काय !


    यात आणखी मौजेची बाब म्हणजे, प्रचलित कायद्याबाहेर जाऊन न्यायदान करण्याची, प्रसंगी घटनेतील तरतुदींचा अन्वयार्थ लावण्याची मुभा न्यायाधीशांना आहे. पण तोच न्यायाधीश शबरीमल, हाजीअली अशा प्रार्थनास्थळांमध्ये कसलाही भेदभाव न करता प्रवेश देण्याचा हुकुम करू शकत नाही वा आदेश देऊ शकत नाही. कारण कायद्याची असलेली मर्यादा !

प्रत्येक प्रार्थनास्थळाची स्वतंत्र संहिता असून त्यानुसार कामकाज चालू असते. यामध्ये न्यायसंस्था इच्छा असूनही हस्तक्षेप करू शकत नसल्याचे अलीकडेच पुन्हा एकदा सिद्ध झालंय.


    लोकशाहीचा चौथा खांब म्हणजे प्रसारमाध्यमं. निर्भीडता हा गुण यांनी केव्हाच विकून खाल्लाय. हल्ली जी निर्भीडता असते ती बऱ्याचदा ‘ सुपारी ‘ सदराखाली मोडते. खरोखर लोकहितास्तव हे मध्यम राबवणे आवश्यक असल्याची समज, जबाबदारीचे भान प्रसारमाध्यमांतील फारच थोड्या लोकांकडे असल्याचे दिसून येते. अर्थात अशी माणसंही शोधूनच काढावी लागतात. बाकी मग, ‘ हि बातमी उजेडात आणल्यास आपला किती फायदा होईल, आपल्या हितसंबंधांवर परिणाम तर होणार नाहीत ना ‘, याचाच अधिक विचार केला जातो.


    हे सर्व लक्षात घेता चार खांबांची आपली लोकशाही हि कितपत मजबूत आहे किंवा हि खरोखर लोकशाहीच आहे का, याचा विचार करणे प्राप्त होते. आपली राज्यघटना खऱ्या अर्थाने सार्वभौम आहे. परंतु जेव्हा ती राबवणारी यंत्रणा जर अशी सदोष असेल तर दोष त्या राज्यघटनेला का द्यावा ? घटना सार्वकालिक मार्गदर्शक असू शकत नाही याच्याशी मी सहमत आहे. परंतु जोवर सामाजिक समता, बंधुता आपण प्रत्यक्ष आचरणात / अस्तित्वात कशी येईल यासंबंधी प्रयत्नच करणार नाही तोवर वाढत्या विषमतेबद्दल घटनेस कसे दोषी धरू शकतो ?


    उदाहरणार्थ, कोण कुठला मुठभर वैदिकांचा शंकराचार्य हिंदू दलितांना मंदिर प्रवेशबंदी असायला हवी अशा आशयाची विधानं करतो त्यावेळी किती हिंदूंना या समतेच्या मूल्याची जाणीव होते ? शबरीमल मंदिराचा कोण कुठला अधिकारी महिलांच्या शुद्ध – अशुद्धातेच्या बाता मारतो तेव्हा कुठे आपली समता जाते ? उद्या जर एखादा मौलवी वा इमाम वैदिकांना वेदांतील अमुक ऋचा म्हणू नका म्हटला तर हे वैदिक खपवून घेतील ? उलट हिंदूंची रिकामी माथी फिरवून इस्लाम खणून काढण्याची खटपट करतील. घटनेतील समतेच्या दृष्टीने या सर्व गोष्टी चुकीच्याच. परंतु जर व्यवहारात एकतर्फी फक्त अन्यायच होत असेल तर अशा घटनेला वा घटनेतील समतेच्या मूल्याला काय चाटायचे आहे ?


    काल – परवा शनीशिंगणापूरच्या दर्शनाकरता एका तरुणीने --- देवस्थानाने निश्चित केलेल्या मर्यादेच्या पुढे जाऊन थेट देवाची पूजा केली. आता ती वेडी होती वा तिचा अन्य हेतू होता का अशी भंपक चर्चा तेथील गावकरी व संस्थानचे लोक करताहेत. तिच्या जाती – धर्माचाही माग काढला जाईल. परंतु, तत्पूर्वी तिने शनी देवाला विटाळल्याने त्यावर पुन्हा अभिषेक करून --- बहुधा दुधाचा --- त्याचे शुद्धीकरण करण्यात आले. आता, ‘ मला बायकांचा विटाळ आहे ‘ असं या शनीने या देवस्थानच्या विश्वस्तांना कधी सांगितलं होतं बरे ? त्याच्या प्रत्यक्ष आदेशाचा किंवा शब्दाचा आहे काही पुरावा ? बरं, या शनिचा जन्म जरी कागदोपत्री कोणाच्या सुपीक मेंदूतून झाला असला तरी त्याचीही कोण तरी आई, बहिण, आत्या, मावशी वगैरे असेल का नसेल ? कि सगळेच .....!   


    लोकशाहीचे चारही खांब जरी सडलेले असले तरी सरसकट तेच तेवढे दोषास पात्र आहेत असंही म्हणून चालत नाही. मनुष्य हा समूहप्रिय प्राणी आहे. एकट्याने जगणे त्याला शक्यच नाही. यातून मग समूह वा टोळीजीवनाची कल्पना अस्तित्वात आली. यामागे प्रत्येकाचा स्वार्थ हा एकच होता. एकट्यानं कसं जगायचं ? मुळात स्वार्थी भावनेतून एकत्र आलेला हा समूह, समाज याच स्वार्थी भावनेतून यशाची, प्रगतीची नवनवीन शिखरं पालथी घालत गेला. प्रत्येक यशाबरोबर त्याच्या मुळच्या गुणावगुणांत सारखीच वाढ होत गेली. याच गुणावगुणांनी संपन्न असलेल्या समाजातूनच उपरोक्त लोकशाहीचे चार खांब उदयास आले. या संस्थांना अविरतपणे जो मनुष्यबळाचा पुरवठा होतोय तो समाजातूनच. मग सर्व चुकांचे, दोषांचे खापर या खांबांवरच का फोडायचे ?


    एक चारदोन दिवसांपूर्वी रेलेवेतून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. मरण्यापूर्वी तो डब्यात येण्याची धडपड करत होता पण जागेअभावी शक्य न झाल्याने तो अखेर खाली पडला व मेला. त्याची हि धडपड एकाने आपल्या कॅमेऱ्यात ( बहुधा मोबाईल ) रेकॉर्ड केली. तिकडे युरोपांत जन्माला येणाऱ्या बाळाचे चित्रण केले जाते असं म्हणतात आपल्याकडे हे ! असो. कोणाला कशाचं कौतुक वाटेल काय सांगावं !! अर्थात, हौसेखातर अशी चित्रण करणारी मंडळी काही कमी नाहीत. मध्यंतरी कुठल्यातरी स्वयंघोषित संस्कृतीरक्षक मंडळाने एका जोडप्याला बऱ्यापैकी मारहाण करून वर त्याचे शुटींग करत सर्वत्र प्रसारणही केले. त्यापूर्वी एका मद्यधुंद अवस्थेतील तरुणीशी लैंगिक चाळे करणारे चित्रणही असेक प्रसिद्ध झाले होते. काहींना तर महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये कॅमेरे लपवून चित्रण करावेसे वाटते. बरं, अशा कार्यातील सहभागी व्यक्तींना वयोमर्यादा बिलकुल नाही. कोणीही हे काम करते.


    याखेरीज ज्या भ्रष्टाचार निर्मूलनाकरता आपण गळा काढतो, त्याला चालना नेमकं कोण देतं ? भ्रष्टाचार निर्मुलन हे अशक्य असल्याचं माझं व्यक्तिगत मत आहे. परंतु त्यावर नियंत्रण तरी आणू शकतो ना ? पण त्यातही आपण अपयशी.


    तो वेडा गांधी, खेड्याकडे चला म्हणत होता. आम्ही त्याची टवाळी केली, करतोय. पण त्यातील गर्भितार्थ व मूर्खपणा आता लक्षात येतोय. खेडी ज्याप्रमाणे स्वयंपूर्ण व अल्पसंतुष्ट राहून विकास साधू शकतात त्याचप्रमाणे वागण्याचे, राहण्याचे त्याचे म्हणणे होते. प्रत्यक्षात झालं काय ? जे मिळेल ते आपण ओरबडत गेलो. जागतिकीकरणानंतर तर कसलाच सुमार राहिला नाही. आपली नेमकी गरज, आर्थिक कुवत लक्षात न घेता मार्केटिंगच्या भुलव्याला आपण भूलत गेलो. परिणामी अनावश्यक पण चैनीच्या गोष्टींवर आपला खर्च अधिकाधिक वाढून अत्यावश्यक गोष्टींकडे आपण दुर्लक्षच केले. शासनही आपलेच प्रतिनिधी. त्यानेही मग कंपन्यांच्या हितांना अधिकाधिक प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले. उलट याचवेळी जो खरा उत्पादक व अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी मात्र उपेक्षित राहिला. त्याच्या उत्पादनाचा --- उत्पादन खर्च वजा जाता बाजारभावाने मोबदला मिळालाय कधी ? याकडे आपणांस लक्ष देण्याची कधीच गरज वाटली नाही. अधून मधून कांदे, डाळी, भाज्यांचे दर वाढले कि, प्रत्येक किलोमागे वा पेंडीमागे शेतकऱ्याला मिळणाऱ्या काल्पनिक लाभाचे आपण चित्र उभं करतो खरं पण त्या शेतकऱ्याला खरोखर त्याचा लाभ मिळतो का, याचा कधी विचार वा पाठपुरावा केलाय ? स्वानुभवाने सांगतो, जो आंबा आम्ही साठ ते सव्वाशे रुपये डझनाने व्यापाऱ्यास देतो तोच आंबा मार्केटमध्ये अडीचशेच्या खाली विकला जात नाही. सांगा, फायदा कोणाचा व किती अन कसा ?

प्रश्न फक्त महिला, शेतकरी व दलितांचे आहेत असं नाही तर समस्त समाजाचे आहेत. आणि त्यांची उत्तरेही समाजातच दडलेली आहेत. उदाहरणार्थ, सुशिक्षित बेकार. 

     डिग्ऱ्या घेऊन काय भांगलनच करायची का वा एवढं शिकून पुन्हा हातात खुरपी धरायची का म्हणणारेही बघितले आहेत व जुजबी शिक्षण घेऊन यशस्वी व्यावसायिक बनलेलीही. दोन्ही आपल्या समाजातीलच उदाहरणे आहेत. योग्य मानसिकता असल्यास बव्हंशी समस्यांचे निवारण सहजासहजी होऊ शकते पण मानसिकताच नसेल तर ........ !

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

हिंदू एकत्रीकरण





    जागतिक दहशतवादाचे बदलतं स्वरूप लक्षात घेता देशातील तमाम हिंदूंनी एकत्र यावं, एकत्रित व्हावं अशी जर खरोखर इच्छा असेल तर हे एकत्रीकरण जातीभेद नष्ट झाल्याखेरीज होणार नाही, हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. 

    या स्थळी, कुठं आहे जातीभेद, इथून पुढे व्यवसायावर आधारित जाती बनतील अशी भोंगळ विधानं करण्याची तुम्हांला इच्छा होईल पण ती मनातच मारून टाका. कारण, तुम्ही ज्या स्वप्नीय जगात राहता त्यापेक्षा वास्तव जग खूप निराळं आहे. इथं जातीय अत्याचार होतात न होतात हा वादाचा मुद्दा मानला तरी अशा अत्याचारांची दखल घेताना प्रथम जात पाहिली जाते, याविषयी दुमत व्हायचं कारण नाही.

    कारणं काहीही असली तरी आपली सामाजिक मानसिकता हि जातीय असल्याचं वास्तव नाकारण्यात काहीही अर्थ नाही. जोवर हि मानसिकता नष्ट होत नाही तोवर हिंदू समाज एकत्रित येणं बिलकुल शक्य नाही. समाजाच्या नेत्यांना, धुरीणांना, विचारवंतांना या सत्याची कितपत जाणीव आहे, माहिती नाही. परंतु त्यांचे वर्तन पाहता याविषयी ते उदासीनच असल्याचे अधिक प्रकर्षाने दिसून येते. ख्रिस्ती धर्मांतराचा वा मुस्लीम दहशतवादाचा भरकटलेला प्रासंगिक मुद्दा पुढे करून समस्त हिंदूंना एकत्र आणण्याचं स्वप्न पाहणं हे वाळूचं घर बांधण्यासारखं आहे. याची प्रचीती आपण सर्वांनी वर्षानुवर्षे घेतलीय. पण आपण सर्वजण इतके बधीर झालोय कि वास्तवाची आपणांस बिलकुलही जाणीव होत नाही.

    हिंदू समाज अगदी मृतप्राय अवस्थेच्या नव्हे तर सरणावर जळून राख झालेल्या देहासारखा निर्विकार, थंड बनलाय. स. १९४७ च्या स्वातंत्र्याची आजकाल कोणाला आठवण होत नाही जितकी फाळणीची होते. ती फाळणी होण्यापूर्वी एकानं धर्मांतराची घोषणा केली होती. मुस्लीम लीगचा नंगानाच डोळ्यांसमोर दिसत असतानाही आमच्या नेत्यांनी काय केलं ? धर्मांतर करणाऱ्याला या धर्माकडून विशेष काही नाही तर बरोबरीचा दर्जा हवा होता. तो देखील आम्ही देऊ शकलो नाही. उलट समाजाच्या पचनी पडतील अशा सुधारणांचा पुरस्कार व उदोउदो करत राहिलो. पर्यायाने स. १९४७ फाळणीचा लढा मुस्लीम लीगच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या पाकिस्तान प्रेमी मुसलमानांशी विस्कळीत हिंदूंना निरर्थक, एकाकी प्रतिकार करून आपल्याच घरात आपली कत्तल उडवून घेण्याची नामुष्की ओढवली.

    फाळणीच्या जखमा त्यावेळी अगदी ताज्या असतानाही त्यानंतरचे दशकभरातले धर्मांतर आम्ही निमुटपणे पाहिलं. त्यानंतर मग फक्त एकच प्रतिक्रिया आम्ही व्यक्त करू लागलो. “ तुम्हांला हा धर्म वाईट वाटत असेल तर निघून जा. “

    ‘ चलेजाव ‘ चा महामंत्र एकानं पारतंत्र्यातील जनतेला दिला तोच आम्ही स्वधार्मियांना वर्षानुवर्षे --- अगदी आज, या क्षणीही देत आहोत आणि वर हिंदू एकीकरणाच्या पोकळ बाता मारत आहोत.

    एखाद्या किल्ल्यावर शत्रूचा हल्ला झाल्यावर सर्व सामर्थ्यानिशी शत्रूच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यापेक्षा किल्ल्यातील निष्ठावंत शिबंदीपैकी काही भागाला किल्ल्यातून बाहेर हाकलण्यासारखाच हा आत्मघाती प्रकार आहे.  

    सामाजिक सुधारणा वा समाजाची मानसिकता हि एका रात्रीत साध्य होणारी गोष्ट नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु, या सुधारणेची अंमलबजावणी करताना रोगाचे मूळ कायम ठेवून वरवर औषधोपचार करण्यासारखा जो काही प्रकार गेली कित्येक वर्षं चाललाय तो मला बिलकुल मान्य नाही.

    हे सर्व मी का लिहितोय ? खरं तर मलाही माहिती नाही. मी स्वतः कोणत्याही धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही. कारण, या फालतू व कल्पित गोष्टीवर माझा काडीमात्र काय पण केसभरही भरवसा नाही. परंतु, मूळ जन्म, वाढ याच धर्माच्या संस्कारात झाल्याने कुठेतरी निश्चित आत्मीयता आहे. यात वावगं ते काय व कबूल करण्यातही कसली लाज !

    त्यामुळेच या धर्मातील लोकांनी भेदरहित ( जाती या अर्थाने ) जीवन जगावे अशी मनोमन इच्छा आहे. त्यामुळेच हा लेखनप्रपंच. अर्थात, एका फुटकळ लेखाने काहीच साध्य होणार नाही याची मला पुरेपूर जाणीव आहे परंतु वारंवार याच विषयावर लिहिण्याची माझी आता बिलकुलही इच्छा नाही. कारण झोपलेल्या --- अगदीच काय तर मेलेल्यालाही जिवंत करता येईल पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं कसं करणार ?       

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

आमचेही खाद्यजीवन !





    तसं बघायला गेलं तर खाण्याचा व माझा अगदी छत्तीसचा नसला तरी त्रेसष्टचाही आकडा नाही. परंतु माझे सध्याचे विस्तारित आकारमान पाहता मी भलताच खादाड असल्याचा लोकांचा व माझाही एक गैरसमज आहे. पुलंच्या खाद्यजीवनाइतके वा कोणत्याही भटक्या प्रवाशाइतके माझे प्रवासी जीवन समृद्ध नसल्याने त्याला बरीच मर्यादाही आहे. परंतु या मर्यादेतही विविधता ही आहेच !

    खाण्याच्या बाबतीत एक महत्त्वाचे म्हणजे एखादा पदार्थ अन्न म्हणून तुमच्यासमोर आला तर त्याविषयी मनात असणारी भावना व औषधरूपाने आल्यावर त्याबद्दल वाटणारी भावना यात जमीन – अस्मानचा फरक असतो.

    उदाहरणार्थ, माझ्यावरील उपचारांचा भाग म्हणून पारवा, बकऱ्याच्या पायाचे सूप, घोरपड इ. प्रकार घरात आणून बनवण्यात आले खरे. पण मला ते कधीच चविष्ट वाटले नाहीत. परंतु तेच बकऱ्याच्या पायाचे सूप व पाय औषध म्हणून समोर न येता जेवणाचा एक भाग बनून आले तेव्हा मात्र चव समजून आली. बाकी पारवा तर आपण नंतर कधी ट्राय केला नाही व घोरपड दातांची सत्व परीक्षा बघत असल्याने तिलाही दुरूनच नमस्कार !

    मांसाहारातला दुसरा प्राणी म्हणजे कोंबडी किंवा चालू भाषेत चिकन ! गावठी अन् ब्रॉयलरच्या चवीत काय फरक असतो ते मला आजतागायत समजले नाही. परंतु चिकनचा मसाला, रस्सा वा बिर्याणीपेक्षा ती भाजून खाण्यात वेगळीच मजा आहे. गेली दीड – दोन वर्षे गावाकडे गेल्यावर आम्ही हाच उद्योग करतो. 
यानिमित्ताने आंबा, चिकू, नारळ, पारिजातक, अशोक इ. झाडांच्या जळणाचाही वापर केलाय. परंतु कडीपत्त्याच्या सरपणावर भाजलेल्या कोंबडीची दुसऱ्या कशालाही सर येणार नाही. इतकी अप्रतिम चव येते कि, माणूस जन्मात कधी परत भाजलेलीच काय पण शिजलेलीही कोंबडी खाणार नाही ! बाकी, अंडी व अंड्यापासून बनवलेले विविध पदार्थ म्हणजे निव्वळ पोट भरण्याचे साधन. त्यात चवीनं, आवडीनं खावं असं काही नाही.

    दशावतार घडल्याचे पुराणं सांगत असली तरी त्या कथांवर माझा बिलकुल भरवसा नाही परंतु त्यातील मत्स्य व वराह हे माझ्या जिव्हाळ्याचे विषय ! खाऱ्या पाण्यातील मासा अधिक चांगला कि गोड्या पाण्यातला हा वादाचा विषय होऊ शकतो. त्याचप्रमाणे खारवलेल्या माशांमध्ये अधिक लोकप्रिय कोण यावरही मतभेद होऊ शकतात. परंतु, मांसाहार करतो पण मासे खात नाही असं म्हणणारा मात्र या भूतलावर कोणी नसेल. मात्र माशांचे कालवण म्हणून जो प्रकार आहे तो मला बिलकुल आवडत नाही. हि जमात तळून / भाजून खाणंच अधिक चांगलं असं माझं प्रामाणिक मत आहे.

    माशांपेक्षाही अधिक चवदार असा प्रकार म्हणजे डुकराचे मटण ! अर्थात ते कोणत्या प्रकारचे आहे यावर बरंच काही अवलंबून आहे. रानडुकराच्या मटणाला जगात तोड नाही असं मी अभिमानाने सांगू इच्छितो. परंतु, अलीकडे पाळीव कोंबड्यांप्रमाणे पाळीव डुकरांचे जे मटण शहरांमध्ये मिळते ते मात्र तितकेसे चविष्ट नसते. डुकराच्या मटणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला असलेली भरपूर चरबी, ज्यामुळे मटणात अतिरिक्त तेलाचा फारसा वापर होत नाही. परंतु याचे पातेलंभर कालवण करण्यात काही मजा नाही. आणि जास्त तिखटही. अधिक रस्सा व अतिरिक्त तिखटाने डुक्कर शिजताना परत एकदा मरतं हा माझा खाद्यानुभव आहे !

    यावरून एक आठवण झाली गावच्या यात्रा – जत्रांची.  गावच्या यात्रेला वा जत्रेला कोंबडं – बकरं कापणं हि आपली खास मराठी परंपरा ! यावेळी घरात कधीही स्वयंपाकाच्या कामात हातभार न लावणारे पुरुष ज्या पद्धतीने मटण – चिकन बनवतात त्याला खरोखर तोड नाही. अतिशय कमी मसाल्यांत बनवल्या जाणाऱ्या त्या मटण – चिकनचे गूढ आजतागायत मला उकलेलं नाही. अगदी मुख्य आचाऱ्याच्या शेजारी बसून देखील !

    परंतु आचारी नावाचा प्राणी जेव्हा शाकाहार बनवतो त्यावेळी समोर वाढून आलेलं ताट कसंबसं संपवायचं, यापलीकडे आपल्या मनात दुसरी कोणतीही भावना नसते. प्रसंग कोणताही असू द्या. तेच वांगं, तोच बटाटा, तीच उसळ, तोच भात आणि तीच सरळसोट जिलेबी !

    यातलं वांगं व बटाट्याचा ओळखू येण्यापलीकडे संगम झालेला असतो. उसळीमध्ये उसळीशिवाय काही नसतं. इतकंच काय ती कशाची केलीय याचाही पत्ता अनेकदा लागत नसतो. भात बिचारा मसाल्याच्या पोकळ वजनाखाली मलूल होऊन पडलेला असतो. राहता राहिली जिलेबी ! सबंध जेवणात खाण्यालायक असा एकमेव पण जास्त खाता न येणारा पदार्थ !! जिलेबीची जाडी तिच्या चवीवरती बराच परिणाम करते. काही जिलेब्या चकल्यांनाही चकवणाऱ्या असतात तर काही पुऱ्यांच्याही तोंडात मारण्याइतपत फुगलेल्या असतात. खरी जिलेबी मध्यम प्रमाणातील. एका तुकड्यात तोंड खवळणारी व दोन कड्यांच्यावर खाऊ न देणारी !

    जिलेबी इतकाच मराठी मनाला भुरळ पाडणारा दुसरा पदार्थ म्हणजे कांदा भजी. हल्ली परप्रांतीयांनी या भज्यांचे भजिया – पकोडे करून पार वाट्टूळं करून टाकलं असलं तरी घराघरांत मात्र हा प्रकार आजही जिवंत आहे. फक्त हॉटेलांतून चवीने यांच्याशी काडीमोड घेतलाय. ठाण्यात चांगले भजी कुठे मिळतात माहिती नाही पण राम मारुती रोडवर साईबाबा मंदिराजवळ ‘ श्रद्धा ‘ नावाचं एक छोटसं उपहारगृह आहे. तिथे मिळणाऱ्या मुग भज्यांसारखे भजी इतरत्र कुठेच काय आख्ख्या दुनियेत मिळत नाहीत असं मी गर्वाने म्हणून शकतो. आता कित्येकजण मुगभजी बनवून विकतात खरे पण उपरोक्त उपहारगृहात या भज्यांची जी भट्टी बसलीय तशी काही इतरांना जमलेली नाही. हीच बाब वडापावची ! 

    हा प्रकार मी बऱ्याच ठिकाणी खाल्लाय पण सतरा – अठरा वर्षांपूर्वी आमच्या शाळेजवळ मिळणाऱ्या वडापाव सेंटरमधील वड्यापावासारखा वडा आजतागायत मी खाल्ला नाही. आता इथे लुईसवाडीत मॅक बनवतो तो देखील चांगलाच आहे. पण ती सर नाही. अर्थात, राजमाता वगैरे ठाण्यातील तथाकथित प्रसिद्ध सेंटर आपली मुळची चव कधीच हरवून बसल्याने त्यांचा विचार करण्याची गरज नाही.       

    पण बटाटा वड्यांपेक्षाही माझ्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे दहीवडा ! पूर्वी गावदेवी मैदानाजवळच्या एका हॉटेलात आठवड्यातून एकदा का होईना माझी फेरी व्हायची, ती याकरताच. आता तिथं ते हॉटेल आहे कि माहिती नाही. पण तिथे मिळणारे दहीवडे व इतरत्र मिळणाऱ्या दहीवडयांत जमीन – अस्मानचे अंतर होते. आता मात्र दहीवड्यांची पार कळाच गेलीय. एकतर यांना मुळात दहीवड्यातला वडा बनवता येत नाही. त्यात वर आणखी चाट मसाला. यामुळे दह्याची वाट लागते. त्यात भर म्हणून डाळिंबाचे दाणेच टाक, बारीक शेवची पेरणी कर इ. बकवास प्रकारांनी दहीवड्याचं त्यांनी भलतंच काहीतरी बनवून ठेवलंय ! गेल्या वर्षी तर दही वड्याकरता वडलांना मी तीन चार तास ठाण्यात फिरवलं होतं. पण मला हवा तसा प्लेन दहीवडा काही कुठंच मिळाला नाही.

    हि झाली टाईमपास खाण्याच्या पदार्थांची यादी. आता आपण जरा जेवणाचं बघू. मांसाहारप्रिय मंडळींच्या दृष्टीने शाकाहार म्हणजे नुस्ता झाडपाला ! पण तसे नाही. ताकाची कढी – भात किंवा ताकाची कढी अन् भजी विथ चपाती / भाकरी कधी खाऊन पाहिलीयं ? बाजरीची भाकरी व वांग्याचं भरीत जेव्हा गरमागरम असते तेव्हा तमाम नॉनव्हेज डिश एक तरफ और वांगे का भरीत एक तरफ !

    चण्याची डाळ भरडून केलेलं पिठलं देखील काही कमी नाही. परंतु ते जरूरीपेक्षा पातळ कधीच करू नये. अन्यथा चवीत बदल होतो. निव्वळ कांद्याची पात खाऊन कंटाळा आल्यास चवीत बदल म्हणून पिठल्यात थोडी पात टाकून बघा. कांद्याच्या पातीवरून आठवलं. मिरचीच्या खर्ड्यापेक्षा ( पक्षी : ठेचा ) लसणाच्या पातीचा खर्डा अधिक टेस्टी असं माझं प्रांजळ मत आहे. ( मत असण्याशी मतलब. बाकी, प्रांजळ म्हणजे काय ते मलाबी म्हायती न्हाय ! ) खर्ड्यासारखा आणखी एक प्रकार म्हणजे कोशिंबिरीचा !

    मूळ कोशिंबीर दही, कांदा – मीठ यांचीच. बाकी मग तुम्ही त्यात काहीही टाका. पण कांद्याविना कोशिंबिरीची कल्पना करवत नाही. कांद्यावरून आठवलं. मटक्या, डाळी, उसळी खायचा वैताग आल्यास एक अख्खा कांदा व चपाती / भाकरी खाऊन बघावी. चवीत तर बदल आहेच पण खाण्यात एक वेगळीच मजा. अर्थात, कांदा फोडलेला असावा पण धुतलेला नसावा. धुतल्यावर त्यातील तिखटपणा जाऊन निव्वळ साल शिल्लक राहते. याच कांद्याला मीठ व चटणी लावूनही तुम्ही खाऊ शकता.

    भात एक असा प्रकार आहे जो कोणत्याही पदार्थाबरोबर खाता येऊ शकतो. याच भातात हरभरे, मटकी वा मोड टाकून शिजवल्यास व्हेज बिर्याणीचा प्रकारही जमून येतो. किंवा नुसत्या हिरव्या वा काळ्या पावटयांचाही भात चांगला लागतो. पण मटार अर्थात वाटाणा भात हा प्रकार अतिशय बेचव असल्याचं माझं मत आहे. किंबहुना वाटाणा हा पदार्थच मुळी माझ्या नावडीचा आहे. ना याची उसळ चांगली लागते ना कालवण ना भात ! तरीही याचं कोडकौतुक ! वाटाण्याचा न् माझा इतका छत्तीसचा आकडा आहे कि, याच्यामुळे मी समोस्यावर बंदी घातलीय.

    फळभाज्यांचा विषय आहे आणि तुरी वा चवळीचा उल्लेख नसेल तर मग त्या लेखनाला अर्थ काय ? तूर वा चवळीच्या कच्च्या, हिरव्यागार शेंगा नुसत्या खाण्यात जी मजा आहे भुईमुगाच्या शेंगा खाण्यात बिलकुल नाही. आणि भेंडी म्हणाल तर देशी, काटेरी भेंडीचे शेंगदाण्याचे कूट टाकून केलेलं कालवण व भात. फक्त कूट आणि तिखटाचं गणित जुळायला हवं. नाहीतर मग त्याच्याइतका बेचव पदार्थ दुसरा कुठला होणार नाही. बाकी घेवडा, शेवगा, पडवळ, दोडका, दुधी या फक्त पोट भरण्यासाठी खायच्या फळभाज्या असल्याची माझी प्रामाणिक समजूत आहे.

    पालेभाजी म्हणाल तर अंबाडी, मेथी, पालक, माठ, तांदळी इ. आहेतच. पण भाज्यांवर फारसे प्रयोग करा येत नाहीत. प्रयोगावरून आठवलं रात्रीची भाकरी दुसऱ्या दिवशी तव्यात टाकून तिचा चिवडा करून खाल्लाय का कधी ? कांदा, तेल, तिखट – मीठ. यातला कांदा जरी वजा केला तरी चालेल. पण तेल मात्र हवंच. आणि हो भाकरी पण घरचीच पाहिजे. पोळी – भाजी केंद्रातला कागद आणून असं काही कराल तर तोंडाची उरली सुरली चव घालवून बसाल. आदल्या दिवशीच्या मटणाच्या शिल्लक कालवणात शिळ्या भाकरीचे तुकडे शिजवून खाऊन बघा. पण फक्त मटणाच्याच. चिकन वा माशाच्या नाही.

    व्हेज मधलं नॉनव्हेज म्हणजे सुरण ! सुरणाचे कप तळून खाणं कधीही चांगलं पण त्याची भाजी तितकीशी चांगली लागत नाही. तसाही हा प्रकार इकडे कोकण साईडलाच बघायला मिळतो. सातारा – सांगली भागात सुरण बघायला तरी मिळतं का याची मला शंकाच आहे. शिवाय पोळी – भाजी केंद्रे वगळल्यास हॉटेलांमध्ये देखील हि भाजी क्वचित आढळून येते.

    हॉटेलवरून आठवलं. गुजराती वा काठीयावाडी हॉटेलांमधील जेवण मला कधीच आवडलं नाही. स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांचा क्रमांक अव्वल असेल पण चवीच्या बाबतीत खालून पहिले ! इथे ठाण्यात मल्हार सिनेमाच्या समोरचं आधीचं संजीवनी ( आता संजीवना ) कधी काळी चांगलं होतं. नंतर मात्र त्याचं मुळचा दर्जा खालावला. त्याउलट मल्हार  शेजारची दुर्गा मधील अजूनही आपला नावलौकिक टिकवून आहे. अर्थात, टेस्टच्या बाबतीत ‘ गेले ते दिन गेले ! ‘ मल्हारच्या जरा पुढे असलेलं वेलकम नाष्ट्यासाठी ठीक होतं. तिथलं जेवण मात्र मला कधीच आवडलं नाही. स्टेशन जवळच अलोकचा बोलबाला आहे पण तिथे फक्त नावलौकिकचं आहे !
मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेवरील फूड मॉल्स म्हणजे पाट्या टाकण्याची कामं ! अव्वाच्या सव्वा किंमतीने खाण्यासारखे दिसणारे पदार्थ तिथं विकले जातात. एक्स्प्रेस हायवे सोडून पुढे आल्यावर नीरा नदीच्या पलीकडे बहुतेक ‘ सागर ‘ नावाचं हॉटेल जेवणाच्या बाबतीत चांगलं होतं. ज्यावेळी तो फक्त ढाबा होता, तेव्हापासून त्याच्या जेवणाचा दर्जा चांगला होता. पण पुढे तोही आपलं मूळ स्वरूप हरवून बसला. तिथून पुढे मग सातारा रोडवर सारा आनंदी आनंद !

    साताऱ्याजवळ ‘ शिवानी ‘ चा दबदबा आहे खरा पण मेनू कार्डावरील पदार्थ ताटात येतील याची शाश्वती नसते. आणि आलाच तर चवीनं खाण्यालायक काहीही नसतं. बाकी हॉटेल्समध्ये तसंही चवीनं काय खाल्लं जातं म्हणा ! कोल्हापूर हायवेवर निव्वळ चिकन तंदुरीसाठी ‘ वारणा ‘ हॉटेल पूर्वी चांगलं होतं. आता तिथे व्हेज चांगलं मिळतं. त्या तुलनेने ‘ संगम ‘ मला भिकारचं वाटलं.
कराड एसटी स्टँडच्या समोरच्या गल्लीत एक छोटेखानी हॉटेल आहे. आहे म्हणजे आधी होतं. आत्ताच माहिती नाही. परंतु त्या ठिकाणी चांगलं शाकाहारी जेवण मिळत होतं. एकदा कराड सोडून तुम्ही विटा रोडने पुढे निघाला कि मग सगळा आनंदी आनंद !

    हल्ली चिकन आणि चायनीज खाद्य संस्कृती या भागात चांगलीच रुजल्याचे हॉटेलगणिक आपल्या लक्षात येते. पण एकदा भेट दिल्यावर परत त्या ठिकाणी जायची आपण कल्पनाच करू शकत नाही. या ठिकाणी मला विट्याच्या पुढे खानापूर जवळ असलेल्या एका ढाब्याची आठवण नमूद करावीशी वाटते. सात – आठ वर्षांमागे खरसुंडीला गेल्यावर दुपारी जेवणासाठी त्या ढाब्यावर थांबलो होतो. देवदर्शन ( घरच्यांचं ) झाल्यामुळे नॉनव्हेज मागवण्यास काही हरकत नव्हती. पण हॉटेलमधल्या नॉनव्हेजपेक्षा घरातील बरं अशी माझी विचारसरणी असल्याने सुरवातीला मी नकार दिला. तरीही वडलांनी बळजबरीने मटण फ्रायची ऑर्डर दिलीच. नाईलाजाने केवळ टेस्ट पाहण्यासाठी पहिला पीस तोंडात टाकल्यावर मग मात्र जे तोंड खवळलं ते दोन चार प्लेट रिचवूनच शांत झालं ! त्यानंतर पुढल्या वर्षी जेव्हा खरसुंडीला गेलो तेव्हा त्याच ढाब्यावर जेवण्याचा बेत आखला होता पण वर्षभरात होत्याचं नव्हतं होऊन ढाब्याची जागा मोकळी पडली होती.