जातीसंस्थेच्या निर्मुलनाकरता आजवर अनेक प्रयत्न झाले. त्यातले यशस्वी किती झाले हे पहायचं असेल तर जातींचं आजच्या काळातील महत्त्व काय आहे ते बघावं लागेल. जातीसंस्था व्यवसायाधीष्टीत असून नंतर तिचे एकाहून अधिक मुख्य तसेच पोटजातींत क्रमशः विभाजन होत गेले. यामध्ये व्यवसायाचं, पर्यायाने आर्थिक आरक्षणाचे जे कवच होते ते आधुनिक जगतात हिरावून घेतले गेले. परंतु हा प्रकार आधुनिक काळातच घडला व पूर्वी नाही, असे नाही. तर आधुनिक काळात हा बदल झपाट्याने घडून आला. जो समाजाला एकदम पचण्यासारखा नव्हता. त्यात भर पडली ती स्वातंत्र्योत्तर समाजवादी धोरणाची. ज्यात श्रीमंतीचं विकृतीकरण व दारिद्रयाचं उदात्तीकरण हरप्रकारे, हरप्रयत्ने करण्यात आलं. साधी, भोळी भाबडी माणसं गरीब मग्रूर, घमेंडी, उलट्या काळजाची तेवढी अमीर !
लोकं मनोरंजनार्थ काय बघतात अथवा मनोरंजनार्थ काय करतात यावर सामाजिक मानसिकता, समाजाची बौद्धिक कुवत आजमावता येऊ शकते. त्यानुषंगाने स्वातंत्र्योत्तर काळातील, देशभरातील जाऊ द्या पण आपल्या मराठी साहित्यातील समाजजीवनाचे चित्रण बघा. त्याचबरोबर आपले हिंदी - मराठी चित्रपट, गाणी देखील जरा चाळून बघा. यातून जे एक समाजमन निर्माण झाले ते बरेचसे परावलंबी, परोपजीवी झाले. उपजीविकेसाठी मेहनत, कष्ट तर आलेच पण त्यासाठी नोकरी महत्त्वाची ! सरकारी वा खासगी नोकरी मिळताच गरीब कुटुंबात पसरणारं आनंदाचं वातावरण चित्रित करण्यास आपल्या सिनेमा जगतानं ५० ते ६० टक्के रिळांचा अक्षरशः अपव्यय केलाय. परिणाम काय ? तुम्ही आम्ही बघतच आहोत.
तुलनात्मकदृष्ट्या आजच्या सिनेमाचा ट्रेंड बघितला तर जवळपास समुद्रात भरकटलेल्या जहाजातील प्रवाशांप्रमाणे समाजाची स्थिती झालीय. बरंच काही गमावलंय आणि बरंच काही मिळवायचंय. पण ते कसं ? काय ? वगैरेंचा पत्ता नाही. यात आणखी भर म्हणजे जुनं ते सोनं म्हणत भंगारात पण टाकायच्या लायकीची नसलेल्या संस्कृतीचं उदात्तीकरण !
बरं हे सगळं चाललेलं असताना बुद्धीजीवी वर्ग कुठे आहे ? तो आपला कधी हा झेंडा या खांद्यावर तर कधी तो, या खांदेपालटीत रमलाय. काहींना तर या सर्वांशी देणंघेणंही नाही. काही आपल्याच कल्पनाविश्वात, गतवैभवात रममाण !
साहित्यातून क्रांती घडते हा प्रकार कधीकाळी घडलाही असेल पण आत्ताच्या काळात हे घडणं शक्यच नाही. लोकं चार ओळींच्या वर वाचायला थकतात, वैतागतात. याला मीही अपवाद नाही. मग ते भारंभार पानं काय वाचणार ?
बरं, त्यात आणखी सर्व आयतं, झटपट मिळण्याची सोय झालीय, सवय झालीय. त्यामुळे खांद्याच्यावर जो अवयव आहे त्यातील बुद्धीला चालना देण्याची सवयही राहिली नाही. जे काही आहे ते भारंभार पाठ करायचं, कागदावर उतरवायचं, मार्कं मिळवून मेरीटमध्ये यायचं व आयुष्यभर त्या बळावर खर्डेघाशी करत राहायचं. हेच आपलं आयुष्य. कोणी कर्जवाम काढून उद्योगधंदा करतो म्हटलं तर प्रथम त्याला वेड्यात काढायचं. नंतर जमल्यास त्याला तोंडावर आपटवायचं आणि यातून तगून तो यशस्वी उद्योजक बनला कि मग तोंड फाटोस्तर त्याची स्तुती करायची हा आपला स्वभावधर्म ! मिळून आर्थिक अवनतीचं जे काही संकट, दृष्टचक्र आहे ते आपणच निर्माण करून ठेवलंय. त्यात सरकारही आपलंच. ते तरी वेगळं काय करणार ?
आपला रामदेवबाबा राजाश्रयावर देशी उत्पादनं काढतोय पण गुणवत्तेपेक्षा प्राचीन थोर परंपरा, शास्त्रोक्त म्हणजे वेद - पुराणांत आलेल्या उल्लेखांवरून व देशभक्ती या बळावर मार्केटिंग करतोय. अरे, हे चाललंय तरी काय ?
यांत्रिकीकरण, संगणकयुगास विरोध करणारे आज सत्तेत बसले आहेत. विरोधात असताना विरोधासाठी विरोध करायचा असतो या तत्वाला जागून ते वागले व सरकारात असताना परिस्थितीला शरण जायचं या ब्रीदाला अनुसरून वर्तत आहेत. याला कोणीच अपवाद नसते.
आपण आपल्याच मानसिक अवस्थेतून चंगळवादाला वाईट ठरवत गेलो. परंतु हा चंगळवादच अनेकांना रोजगाराच्या संधी मिळवून देतो हे सोयीस्कररित्या विसरतो. रुपयाचं अर्थकारण वा त्याचं चक्र आपल्या कधी लक्षातच आलं नाही. लक्ष्मी म्हणून ते कुजवत ठेवण्यातच आपण कायम धन्यता मानली. याचा परिणाम काय ? देशाची अर्थव्यवस्था कुठेतरी मंदावण्यास आपणच कारणीभूत ठरलो. वर आणखी दामदुपटीच्या योजनांत वेड्यासारखी गुंतवणूक करत दुसऱ्याची धन करत राहिलो. मिळून आर्थिकदृष्ट्या साक्षरता आपल्याला कधी साधलीच नाही.
कधीकाळी इथे सोन्याचा धूर निघायचा म्हणत, तो सगळा साठा परक्यांनी लुटला म्हणत गळे काढायचे यापलीकडे आपण केलंय तरी काय ?
कोणत्याही समाजघटकाला, कोणत्याही काळात इतर सर्वांपेक्षा अर्थसुरक्षा महत्त्वाची असते. प्रिय असते. आज ती आपल्याकडे अजिबात नाही. याचा परिणाम म्हणजे लोकं पुन्हा एकदा आपापल्या जातींना कवटाळू लागली आहेत. आरक्षण नको म्हणणं आता सर्वांच्याच जीवावर येऊ लागलंय. ते याच कारणांनी व आरक्षणासाठी लोकं माती खाऊ लागलेत ते देखील याच कारणांनी.
या सर्वांचं खापर देश व राज्यातील सर्वाधिक काळ सत्ताधारी पद उपभोगलेल्या काँग्रेस पक्षावर फोडणं जितपत योग्य आहे तितकंच विरोधकांवर व त्याहून अधिक स्वतःवर ! आपले प्रश्न सोडवण्यासाठी इतरांचा सल्ला घेणे, मार्गदर्शन घेणे वेगळे व आपली समस्या सोडवण्यासाठी दुसऱ्याची मदत घेणे, अपेक्षा बाळगणे, अवलंबून राहणे वेगळे. आपण दुसऱ्या कॅटेगरीत मोडतो. जो दुसऱ्यावरी विसंबला म्हणायचं व व्यवहारात मात्र विसंबतच राहायचं. आपल्या वृतीत हि विसंगती का ?
आपले ज्ञात धर्म, ज्यावर आपण पोसलो जातो ते या मुळाशी नाहीत ना ? माझ्या मते, लिखित धर्मग्रंथ असलेले धर्म व्यक्तीची मानसिकता अशी बनवत असावेत. जे सगळं उच्च पण व्यवहाराशी विसंगत ते सर्व धर्मग्रंथात. मग बोले तैसा चाले हि वृत्तीही फक्त वचनात. नॉट आचरणात ! पण तिही अर्धीच. कारण वंदावी पाऊले वृत्ती आपल्यात भयंकर ! इतकी कि, वंदनीय चरणे पाण्यापेक्षा आमच्या लाळांनीच जास्त धुतली गेली असतील. पुढे पुढे तर लाळघोटेपणा इतका वाढला कि, फासटावे चरण वृत्तीच्या लोकांची देखील आम्हांला चाटुगिरी करण्याची सवय लागली. हे सर्व का ? तर केवळ असुरक्षित भावनेतून. इतरांवर विसंबून राहण्याच्या वृत्तीतून. हताश होण्याच्या मानसिकतेतून.
मला नेहमीच विचित्र वाटत आलंय कि, अशी सामाजिक मानसिकता असलेली लोकं क्रांतीच्या गोष्टी करतात. भाषा करतात. वडाची झाडं लावून वडापाव येण्याची वाट बघतात. ना वडापाव येतो ना वड पावतो !
क्रांती, बंडखोरीची भाषा/संकल्पना आपल्याला प्रिय आहे. रक्तरंजित ते रक्तहीन ! पण खरी क्रांती काय आहे ते कोणाच्या बापाला माहित्येय ? मी तर म्हणतो आपापल्या आदर्श, मान्य व्यक्तींची वैचारिक गुलामगिरी टाळणे हीच सगळ्यात मोठी क्रांती आहे. डोकं आपलं, आतला मेंदू आपला मग विचार का बरं त्यांचा ? बरं घ्यायचाच झाल्यास तो तपासून घ्यायला नको ? साधी भाजीची पाच धा रुपड्यांची पेंडी धा वेळा उलटीपालटी करून आपण बघतो व मग दरात घासाघीस करत ती घेतो, तर मग विचारांच्या बाबतीत हा चोखंदळपणा का नाही ? कशाला तो गांधी, आंबेडकर, फुले अन् टिळक, सावरकर पाहिजे ? कशाला तो शिवाजी पाहिजे ? हे सगळे होऊन गेले. ते परत येणार नाहीत व त्यांचा तुमचा काळ वेगळा असून त्यांचे विचारही तुमच्या कामी येणार नाहीत.
माणूस विचारांनी जिवंत राहतो पण किती वेळ ? नियमाला अपवाद असतात तसे काहींचे काही विचार असतीलही. पण म्हणून नियमालाच अपवाद करायचं हि कुठली वृत्ती ? बरं, हे नियमालाच अपवाद करणं तरी कुठवर चालतं ? जोवर आपल्याला पटणारे विचार येतात तोवर. अन्यथा हे महापुरुष रद्दीतच टाकले जातात. नाहीतर आजच्या काळात धार्मिक स्थळांवर प्रवेशासाठी आंदोलनं करण्याची वेळ आपल्यावर आली नसती.
बरं हि आंदोलनं तरी कशाकशावर करावी ? कुठल्या दर्ग्यात थडग्याजवळ एन्ट्री नाही तर कुठे शरीराच्या अमुक भागापर्यंत वस्त्राने देह आच्छादित असण्याची अट ! तर कुठे मासिक पाळ्यांच्या मोजणीचा, तपासणीचा अट्टाहास. वर आणखी हे शास्त्रांत, धर्मग्रंथांत सांगितलंय म्हणून जागोजाग दुकानं उघडून बसलेले बोकेसंन्यासी आहेतच !
अरे मुलीला पाळी आली तर ज्या देवाने तिला बनवलीय त्याच देवाच्या दर्शनाला ती जात आहे ना ? मला स्त्रियांचा स्पर्श चालत नाही हे शिंगणापूरच्या शनीने कोणाच्या कानात येऊन सांगितले ? बायका माझ्या थडग्याजवळ आल्या तर मी कबरीतून बाहेर येईन असं कुठल्या अवलियानं सांगून ठेवलंय ? सगळी साली बकवास. आणि हि बकवास कशी शास्त्राधारे आहे असं रसभरीत वर्णन करून सांगणारे भेटताच आपली बोलती बंद. वाचा, बौद्धीकता सारं काही खुंटीला टांगून ! का तर, शास्त्रवचन विरुद्ध वागू नये. पाप लागते. अनिष्ट फळ वाट्याला येते.
माझी आई पूर्वी वाद घालताना म्हणायची, " असल्या इंदिरा गांधीनं आपल्या सुनेला ग्रहण पाळायला लावलं होतं. " आता इंदिरा गांधीनं असलं काही केलं असलं तर तो तिचा मूर्खपणाच म्हाणायचा ! पण ती तिची व्यक्तिगत बाब जरी मानली तरी या कृतीतून किमान एक दोन पिढ्या भरकटवल्याच्या दोषातनं तिची सुटका आहे का ? उद्या एखादा बाप वा आई आपल्या लेकराला, असल्या देवेंद्र फडणवीसानं धर्मगुरूंच्या उपस्थितीत सुमुहूर्तावर शपथविधी केला म्हणून सांगेल तर त्यात चूक काय ते ठरेल !
महाराष्ट्राचे सगळेच मुख्यमंत्री बुद्धीवादी, परंपरावादी व जोडीला दैव आणि विज्ञानवादी. प्रत्येक बाबतीत यांचं विसंगत वर्तन. दुसरीकडे आपल्याकडे मोठमोठे थोर विद्वान वेदांत आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान असल्याचे रचून सांगण्यात मग्न. साधा प्रश्न. एवढं प्रगत तंत्रज्ञान होतं तर ग्रीक ते ब्रिटीशांच्या लाथा खात का बसला होता ?
हे आमचे मराठे तर, एक मराठा लाख मराठा न् नाद नाय करायचा म्हणत हिंडताहेत. एक शिवाजी काय जातीत जन्माला आला म्हणून. तत्पूर्वी यांच्या बायका मुली मुस्लीम व इतर आक्रमकांनी घरात घुसून पळवून नेल्या. पण यांच्या कमरेच्या तलवारी मात्र म्यानच राहिल्या. कमरेच्या तलवारी उपसायला शिकवण्यासाठी शिवाजी जन्मावा लागला. तोवर हे सारे .... आमच्या महारांचे देखील काही वेगळे नाही. क्षात्रवृत्ती म्हटली कि भीमा - कोरेगाव व बौद्धिक संघर्ष म्हटला कि आंबेडकर ! अधलं मधलं काही नाही. जर भीमा कोरेगाव तुम्ही जिंकला तर ब्रिटीश राजवटीतही अस्पृश्यता का राहिली ? हा साधा प्रश्न यांना नाही पडला. त्याकरता आंबेडकराला आयुष्य खर्ची पाडावं लागलं. यांना आंबेडकराचे विचार घेता आले पण व्यापक दृष्टी नाही. अन्यथा राज्यकर्ती जमात होण्याची जी संधी यावेळी चालून आलीय ती दवडण्याची नादानी यांनी दाखवली नसती.
बाकी मुस्लीम भाईजान तर आनंदीआनंद ! शेवटी तेही मूळचेच हिंदू. नमस्कार ऐवजी सलाम व पूजेऐवजी नमाज. इतकाच फरक. बाकी सारी वृत्ती इथून तिथून सारखीच. प्रत्येक समस्येचा उतारा तेही दैववादी बनत धर्मग्रंथांत धुंडाळतात. यांच्यात प्रबोधन करण्याची इतरांची छाती नाही व यांच्यातील लोकांची इच्छा नाही. एकूण इथे, म्हाराने मराठ्याला अक्कल शिकवू नये ( असं कोणीतरी हे वाचताना माझ्या बद्दल म्हणणारच आहे. ) तसंच हिंदूने वा गैरइस्लामीने मुसलमानाला, हेही सारखंचं !
इकडं हिंदू - वैदिकांचे पुराण - वेद तर तिकडे कुराण ! हेही अपरिवर्तनीय व तेही ! हेही अपौरुषेय व तेही !! मग हे अपौरुषेय मुळात आलं तरी कसं ? याचा नेमका अर्थ का होतो हे सांगणाऱ्याला तरी कळलं कसं ? सगळंच थोतांड !
कशाला हवेत धार्मिकस्थळांचे स्वतंत्र कायदे ? कशाला हवेत विशिष्ट राज्याच्या दर्जाचे कायदे ? कशाला हवेत धर्माधिष्ठित, जातीधीष्ठीत कायदे ? सर्व कायद्यांची पुनर्रचना करण्याइतपत काय आपल्यात बौद्धिक पात्रता, कुवत नाही ? कि त्याकरता पण कोणावर तरी अवलंबून बसण्याची आपली इच्छा आहे ? विचार आहे ?