मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८

मोहम्मद अझीज.... खुदा हाफिज !


                                                                     


    हल्लीच्या पिढीला हे माहिती नसतं ते माहिती नसतं असं म्हणण्याचा एक ट्रेंड आहे. पण हि गोष्ट खरी आहे कि, काही काही गोष्टी हल्लीच्या पिढीला खरोखरच माहिती नाहीत. त्यापैकी एक म्हणजे मोहम्मद अझीझ !
     थोड्या वेळेपूर्वीच मोहम्मद उर्फ मुन्ना अझीजच्या निधनाची बातमी ऐकली आणि काही क्षण मन सुन्न झाले. क्षणभरात त्याची कितीतरी गाणी मनात तरळून गेली अन त्याचवेळी आम्हाला सर्व काही मिळालं पण फेस व्हॅल्यू काढील मिळाली नाही.. लोकं आवाजाने आम्हाला ओळखतात पण चेहऱ्याने नाही.. हि त्याने एका इंटरव्युव्हमध्ये बोलून दाखवलेली खंतही आठवली. ज्यावेळी तो कॅमेऱ्यासमोर बोलला होता तेव्हाही ऐकताना वाईट वाटत होतं आणि आता तर..
    रफीच्या निधनानंतर त्याच्या स्टाईलमध्ये गाणाऱ्यांना शोधण्याची इंडस्ट्रीने एक मोहीम आखली त्या मोहिमेत शब्बीर कुमार, मुन्ना अझीज सारखे गायक वर आले. तसे पाहिले तर मुन्ना अझीज बंगाली इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करतच होता. शिवाय इथे रफी असतानाच त्याच्या आवाजाच्या बऱ्यापैकी जवळ जाणारा अन्वरही पाय रोवून होता. तुलनेनं पाहता अझीज कुठेच नव्हता. आवाजाच्या बाबतीत पाहिलं तर त्याचा आवाज बऱ्यापैकी जड. त्यामुळे रफीच्या पश्चात अन्वरच इंडस्ट्रीवर राज्य करणार हे उघड होतं. पण तकदीर नावाची चीजच और असते.
    अन्वरला यश पचवता आले नाही. शब्बीर कुमारला चान्स मिळूनही त्याचे मनमोहन देसाईसारख्या डायरेक्टर सोबत खटके उडून ' मर्द ' च्या टायटल सॉन्गसाठी अन्नू मलिकने मुन्ना अझीजला आमंत्रित केलं.. .. बाकी मग इतिहासच आहे.
    स. १९८५ च्या मर्द पासून . १९९५  च्या करण अर्जुन पर्यंत अझीजने एक दशक गाजवलं. तसं पाहिलं तर . १९९० च्या ' आशिकी ' मधून जन्मला आलेल्या कुमार सानू या बंगालच्याच वादळाने इंडस्ट्रीतील आधीचे सगळे प्रस्थापित गायक उधळून लावले होते. केवळ स्वतंत्र धाटणीचा आवाज म्हणून उदित नारायण त्या वादळात आणि नंतरही टिकून राहिला. तुलनेनं मुन्ना अझीज, शब्बीर कुमार, अमितकुमार वगैरे मंडळी इंडस्ट्रीतुन बाहेर पडायच्या मार्गावर होती / बाहेर पडली होती.
    यादृष्टीने पाहिले तर अवघी पाच वर्षांची सांगीतिक कारकीर्द मुन्ना अझीजची म्हणता येईल. पण या अल्पावधीत देखील बऱ्यापैकी श्रवणीय गाणी तो गाऊन गेला. अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञीक, साधना सरगम सारख्या तेव्हाच्या नव्या दमाच्या तर लता मंगेशकर, आशा भोसले सारख्या दिग्गज पार्श्वगायिकांसोबतची त्याची बरीच गाणी गाजलेली आहेत.   त्याच्या काळातील जवळपास सर्वच पहिल्या फळीतील अभिनेत्यांसाठी त्याने पार्श्वगायन केले. त्याचप्रमाणे एक काळ गाजवून सोडलेल्या राजेश खन्ना, दिलीपकुमार, शम्मी कपूर सारख्या अभिनेत्यांकरताही त्याने प्लेबॅक दिला.
    विशेषकरून दिलीपकुमारसाठी कर्मा, इज्जतदार, सौदागर आणि किला या (बहुतेक) चार सिनेमांसाठी पार्श्वगायन केले. पैकी, कर्मा आणि सौदागर मधील गाणी बऱ्यापैकी गाजली आजही ती परिचित आहेत. फक्त त्यातले प्लेबॅक सिंगर नावाने किंवा चेहऱ्याने कोणाला माहिती नाहीत. ( उदा :- मनहर उदास ) असो.
    राम लखनचे टायटल सॉन्ग असो कि त्याच चित्रपटातील माय नेम इज लखन, त्रिदेव आणि विश्वात्मामधील सनी देओलच्या वाट्याला आलेली गाणी, चालबाज मधील कविता सोबतच्या तेरा बिमार मेरा दिल या गाण्यातील मुन्ना आणि कविताची जुगलबंदी मस्त आहे. तशीच ती गोविंदा - नीलमच्या ' चलो चले दूर कही ' मध्ये पण दिसून येते. अनुराधा पौडवाल सोबतचे ' 'तेरी मेरी प्यार भरी बातों में ' देखील सुश्राव्य आहे. खुदा गवाह माधील अमिताभच्या वाट्याला आलेल्या गाण्यांपैकी ' तु मुझे कुबुल ' पुन्हा एकदा गाजू लागलं आहे. लक्ष्मीकांत - प्यारेलालचा तो ऑर्केस्ट्रा, वाद्यांची अचूक निवड हे सारं जरी यामागे असलं तरी गायक - गायिकांची पुण्याईही नाकारता येत नाही. तीच बाब ' मय से मीना से ना साकी से ' गाण्याची. एक मध्यमवयीन इसम या गाण्यावर गोविंदासारखा नाचला आणि रातोरात या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल होऊन आठवणींच्या समृद्ध अडगळीत पडलेलं हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं. तसं पाहिलं तर मुन्ना अझीजच्या गाण्यांविषयी लिहिण्या - बोलण्यासारखं बरंच काही असलं तरी त्या सर्वच गाण्यांचा इथे परामर्श घेता येत नाही, हे खेदाने कबूल करावं लागत आहे. असो.
    एक पार्श्वगायक म्हणून मोहम्मद अझीजचं इंडस्ट्रीतील योगदान काय ? हा प्रश्न तसा सर्वांच्याच मनात आहे. ज्यांना रफीच्या आवाजावर प्रेम आहे त्यांना रफीची नक्कल करणारे नेहमीच प्रिय वाटत आले आहेत. ज्यांची रफीवर श्रद्धा आहे ते रफीच्या पलीकडे कोणाला गायक म्हणून मानायला तयार नाहीत. ज्यांना रफीच्या आवाजाचे वावडे होते त्यांना शब्बीर काय अन मुन्ना काय, नेहमीच बेसुरे वाटत आलेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर खरोखर प्रश्न पडावा कि मुन्ना अझीजचे या इंडस्ट्रीमधील नेमकं योगदान तरी काय आहे ?
    ज्या काळात मोहम्मद अझीज प्लेबॅक सिंगर म्हणून नावारूपास आला त्यावेळी इंडस्ट्रीवर किशोरकुमारचं साम्राज्य होतं. त्याच्या सावलीत स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास खुद्द अमितकुमारला संघर्ष करावा लागत होता. अन्वरने रफीची जागा घेऊन सोडली होती तर तिथे पोहोचण्याचा शब्बीरचा प्रयत्न चालला होता. इंडस्ट्रीचं एक गणित आहे. जिथे आर्थिक लाभ दिसतो तिथे गुणवत्तेला कात्री लावली जाते. शब्बीरच्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन त्याला झेपतील अशी गाणी बनवण्यात येत होती.... अशा वेळी शब्बीरला रिप्लेस करण्याची मनमोहन देसाईने धमक दाखवत मोहम्मद अझीजला मुख्य प्रवाहात आणले. त्यानंतर म्युझिकचा ट्रेंड बदलला. शास्त्रीय संगीताचे ज्ञान असल्याने, क्लासिकल टच असलेली गाणी गाण्यास मुन्ना अझीजला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे थोडीफार सुरीली गाणी त्या काळात जन्माला येऊ शकली. अर्थात, हे केवळ एकट्या मुन्ना अझीजमुळे झाले असे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु हिंदी गाण्यांच्या सुवर्णयुगाचा जो काही अवशेष बाकी राहिला होता....त्याचा थोडाफार अंश टिकून राहण्यामागे ज्या मंडळींचे योगदान कारणीभूत ठरले त्यापैकी एक मोहम्मद अझीज होता, हे विसरता येत नाही.


https://www.youtube.com/watch?v=91K8Qn3_1V0

https://www.youtube.com/watch?v=ZCGRqbKl38U

https://www.youtube.com/watch?v=t0-_VhLeHv0


शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

वैदिकांचे हिंदू धर्मियांवर घाला घालण्याचे कारस्थान !



आम्ही हिंदू सोशिक आहोत का ?
आम्ही हिंदू निरक्षर, अडाणी आहोत का ?
आम्ही हिंदू अशक्त, दुर्बल आहोत का ?
नाही ना.. .. मग आम्ही नेहमी इतरांचे गुलाम का बनतो ? हा प्रश्न प्रत्येक हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीने स्वतःस विचारला पाहिजे. दरवेळी परधर्मियाने यावं न् आपल्याला तुडवून टाकावं. त्यानंतर आपल्यातील एक मसीहा बनावा. त्याने त्याने दास्यत्वातून आपली सुटका करावी तोच त्याचा अंत होऊन पुन्हा गुलामीच्या शृंखला पायी पडाव्यात. हे चक्र कुठवर चालायचं ? एखाद्या गर्भश्रीमंताच्या घरी नादान व्यक्ती जन्मून त्यास भिकेचे डोहाळे लागावे, तसे आमचे का व्हावे ? आमची संशोधने, आमचा इतिहास, संस्कृती यांचे आमच्याच डोळ्यांदेखत अपहरण होत असता आम्ही स्वस्थ का बसून राहावे ?
घडून गेलेल्या गोष्टींवर काथ्याकुट काय करायचा असा जर आमचा भ्रम असेल तर तो साफ चुकीचा असून या भ्रमातून वेळीच बाहेर न पडल्यास आणखी एका गुलामीच्या चक्रात आपण अडकून पडणार आहोत.
कित्येकांना हि इस्लाम वा ख्रिस्त्यांची धार्मिक गुलामी वाटेल. अथवा परराष्ट्राची आर्थिक. पण तसे नाही. या क्षणी हिंदूंच्या अस्तित्वावर घाला घालण्यासाठी समस्त वैदिक धर्मीय आपले बाहू सरसावून पुढे येत आहेत. जरा उघड्या डोळ्यांनी, स्वतंत्र बुद्धीने विचार करून पहा..
राज्यघटना मान्य नाही म्हणत तिचे दहन करायचे व हे सर्व कृत्य राज्यघटनेनेच दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारात करून मोकळे व्हायचे.
न्यायदानाकरता असलेली निःपक्षपाती, निधर्मी न्यायसंस्था ठोकरून लावत हिंदू न्यायालयाच्या नावाखाली वैदिक न्यायालये उभारायची. जी वैदिक स्मृती शास्त्रांधारे न्यायदान करतील.
याच गोष्टी एखाद्या पर धर्मीय समुदायाने केल्या असत्या तर... ? हि वैदिक मंडळी नागडी नाचली असती. परंतु जेव्हा स्वतःच असे वागतात तेव्हा...
राष्ट्रप्रेम, देशभक्ती वगैरेच्या लंब्याचवड्या बाता माराव्यात तर यांनीच.. जणू काही आम्हांला राष्ट्रप्रेम वगैरे काही माहितीच नाही... परंतु त्यांचेही काही चुकत नाही. आम्हांला काही म्हणजे काहीच समजत नाही हाच तर खरा प्रॉब्लेम आहे.  
उदाहरणार्थ गांधी हत्या.
म्हाताऱ्याने फाळणीला मन्यता दिली, पंचावन्न कोटी देण्यासाठी उपोषणाला बसला म्हणून त्याला उडवला. मान्य. पण एकट्या गांधीच्या मान्यतेनेच देशाची फाळणी झाली का ? सावरकरांचा द्विराष्ट्रवाद सिद्धांत कुठे गेला ? आंबेडकरांनीही तो मांडला होता. जिना वगैरे मंडळी तर लचकेच तोडायला बसली होती. मग एकटा गांधीच का ? गांधी हत्या झाली त्यावेळी पंडित नथुरामांचे ते व्यक्तिगत प्रेरणेतून घडलेलं कृत्य होतं न् आता मात्र संघटीत, नियोजनपूर्व असल्याचे म्हटले जाते. मग इतकेच संघटन, नोयोज्न होते तर स्वतंत्र पाकिस्तान मागणारी नेतेमंडळीही उडवून टाकायची ना ?
गांधी हत्या ना फाळणीच्या कारणावरून घडली ना पंचावन्न कोटींच्या उपोषणामुळे. ती होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे अखिल भरतोय हिंदूंचे एकमेव असलेलं राजकीय नेतृत्व संपुष्टात आणणे. आणि गांधी नंतरचा इतिहास डोळसपणे अभ्यासाल तर या हेतुत वैदिक मंडळी कमालीची यशस्वी झाल्याचे दिसून येते.
राज्यघटनेच्या जन्मापासून तर तिच्या वैदिकांचे वाकडेच आहे. त्यानंतर नंबर लागतो राष्ट्रगीताचा. मग ते कधी ते इंग्लंडच्या राजाच्या गौरवार्थ रचल्याचे किंवा त्यात उल्लेखलेला प्रदेश, नद्या आज भारताच्या ताब्यात नाहीत वगैरे बाबी उपस्थित करत जनसामान्यांच्या तोंडी बसलेलं जन गण मन वजा करून तिथे संस्कृतप्रचुर वंदेमातरम् वगैरेंची वर्णी लागावी याकरता धडपड करायची. म्हणजे पुन्हा तिथेही केवळ उच्चार चुकीचा होऊ नये म्हणून एकाधिकारशाही आलीच !
तिरंग्याचीही तीच तऱ्हा. त्यावर नंतर कधीतरी बोलू. आता न्यायसंस्था. मुस्लिमांची शरीयत वगैरे आहे हिंदूंची का नसावी ? लक्षात घ्या, यातली नेमकी खोच. मुस्लिमांची धार्मिक न्यायसंस्था असली तरी ती अगदीच कौटुंबिक वगैरे बाबत आहे. बाकी दिवाणी, फौजदारी तर आयपीसी नुसारच आहे ना ? आणि हिंदूंची स्वतंत्र न्यायालये नाहीत हा दिव्य शोध वैदिकांनी कधी लावला ?
पुरातन काळापासून चालत आलेल्या श्रेणीसंस्था -- ज्यांना आता आपण जात पंचायत, जाती संस्था म्हणतो, त्या मग काय आहेत ? ग्रामीण भागात आजही शेष स्वरूपात असलेली भावकी बसणे वगैरे स्वतंत्र न्यायसंस्थेचाच भाग नाही का ?
उलट हिंदू न्यायालयांच्या नावाखाली यांना आपली स्वतंत्र वैदिक न्यायालये काढायची आहेत जी पूर्णतः वैदिक स्मृती शास्त्रांवर आधारित असतील. त्यातील नियमांनुसार तुमचा न्याय होईल. त्यातील सामाजिक वर्तनाचे नियम तुमच्यावर लादले जातील. त्यातील वर्णव्यवस्था अंशतः, रचनात्मक वा रुपांतरीत पद्धतीने अंमलात आणली जाईल. आणि महत्त्वाचे म्हणजे जी मनुस्मृती आजवर भारतात गैर हिंदूंना कधीच लागू नव्हती... ती त्यांच्यावर लादण्यात येईल ! 



रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

प्रासंगिक ( ५ )



    भारतीयांना इतिहास लेखनाची प्रदीर्घ परंपरा आहे. आमच्या प्राचीन ऋषी - मुनींना इतिहास लेखन अवगत होते असं म्हणायचं असतं. बाकी हे ऋषी - मुनी तपश्चर्या सोडून इतिहास लेखन कधी करत होते हे मात्र विचारायचं नसतं. थोडक्यात आपली इतिहास लेखन परंपरा हि अर्धवट ज्ञान व अज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे इतिहास मांडणी, रचना सदोष असणे स्वभाविक आहे. उदा :- चोखोबाला बडव्यांनी मारले म्हणून त्याच्याच एका न रचलेल्या अभंगाचा आधार घेऊन उर बडवायचा व त्याचवेळी नंतरच्याच काळात झालेल्या नामदेवाकडून नैवद्य ग्रहण करत होता हे तुपकट चेहऱ्यानं सांगायचं असतं. मात्र मधल्या काळात विठ्ठल मंदिरातील चोखोबला मारणारे बडवे कुठे उलथले याचा सोयीस्कर विसर पाडायचा असतो.

    संत परंपरा जरी सोडली तरी इतरत्रही असाच गोंधळ असल्याचे दिसून येते. उदा :- बाबर स्थापित बादशाही तुर्कांची होती. पण इतिहासकारांनी तिला मोगल ठरवले. आता तैमुरी तुर्कांचा व चंगेजी मंगोलांचा इतिहासात नमूद असा एकच विवाहसंबंध घडून आला असला तरी तैमुरी वंशज स्वतःला तुर्कच मानत याकडे आमच्या इतिहासकारांनी सोयीस्कर डोळेझाक केली. काय करणार बिचारे ? प्रस्थापित मतांना धक्का लावण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. आणि ज्यांच्यात होते त्यांची तरी आम्ही काय वासलात लावली ?

    राजवाडेंना इतिहासाचार्य म्हणत  मराठेशाही, पेशवाईसंबंधी त्यांची मतं ब्रह्मवाक्य स्वरूप मानायची. पण तेच राजवाडे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास घेऊन आले कि, राजवाडे म्हणजे विक्षिप्त गृहस्थ.... खासगीमध्ये  ब्रह्मचारी म्हणजे तुंबलेला आणि प्रकट.. राजवाड्यांना संस्कृत शब्दांचा व्यवस्थित अर्थ लावता आला नाही. पण त्याचवेळी संस्कृत आधारे त्यांनी लावलेल्या शाब्दिक व्युत्पत्त्या मात्र उचलून धरायच्या. याचा अर्थ काय होतो ? हे सुज्ञांना सांगायची गरज नाही पण असे सुज्ञ तरी कितीसे आहेत ?

    भारतीय इतिहासलेखन परंपरेत हिंदू - मुस्लीम हा एक प्रवाह नेहमीच कायम राहिला असून यातही अनेक उपप्रवाह आहेत. परंतु त्यातील उभयतांच्या वैराचा विशेष !
    मुस्लिमांनी इथे किती अत्याचार केले, अनर्थ माजवले वगैरे आता नेहमीचं दळण झालंय. पण मुस्लिमांआधी येथे आलेल्या हुण, शक, कुशाण यांचं काय ? त्यांनी इथे येऊन काय दिवे लावले, विझवले याची चर्चा का केली जात नाही ? याबाबतीत आमच्या वैदिक मित्रांचा ' वेदात सर्व ज्ञान सामावले आहे ' हा दाखला विशेष उपयुक्त आहे.
    भारतावर ज्या इस्लामी टोळ्यांनी स्वाऱ्या करून नंगानाच घातला त्या तुर्की, पठाणी टोळ्यांची मुळे ऋग्वेद काळापर्यंत जातात. म्हणजेच एकेकाळचे हे वैदिकांचे भाषिक, धार्मिक, प्रादेशिक भाईबंद. वैदिकांचं सुदैव वा दुदैव म्हणा. त्यांना झरतुष्ट्रच्या पारशांनी लाथ घातली व ते अफगाणिस्तानातून उडून हिंदुस्थानात आले. पण पुढे इस्लाममध्ये कन्व्हर्ट झालेल्या तुर्क, पठाणांनी पारशांना हाकलून लावले. यामुळे हे दोन धर्म इतिहासजमा होता होता थोडक्यात बचावले. यावरून वैदिकांच्या मुस्लीम द्वेषाचे रहस्य लक्षात यावे. परंतु ज्ञानाचे आम्हांस इतके वावडे कि, स्वतन्त्र शोधक नजरेने आम्ही याकडे पाहिलेच नाही. जे काही पाहिले ते वैदिक नजरेने. त्यामुळेच ग्रीक, शक, हुण, कुशाणांपेक्षा मुस्लीम आम्हांला शत्रुवत वाटू लागले, जे मूळ हिंदू धर्माचाच भाग होते.

    भारतीय मुस्लीम समाज हा देखील एका अज्ञानी परंपरेतलाच आहे. आपण इथले एकेकाळचे राज्यकर्ते होतो, हि त्यांची भावना. पण वेड्यांना हे कधीच कळले नाही कि, इथे राज्य करणारा एक खुश्रूखान सोडला तर एकही भारतीय वंशाचा मुसलमान राज्यकर्ता बनला नाही. पगडी सारखे विद्वान तुर्की बादशहांनी हिंदू धर्मीय -- विशेषतः राजपूत स्त्रियांशी लग्नं केल्याने त्यांची संतती कशी भारतीय वा मिश्र रक्त / वंशाची बनली हे सांगण्याचा निरर्थक प्रयत्न करतात. मात्र खुद्द मिश्र रक्त / वंशाचे औरंग सारखे शहजादे - बादशहा आपणांस अस्सल तुर्की समजत याचा त्यांनाही विसर पडतो.

    वीरता, आत्मत्याग, पराक्रमाचे प्रतिक बनलेले राजपूतही काही फारसे वेगळे नाहीत. मूळ हि शक - सिथियन टोळी. जी मध्य आशियात वावरणारी. इथे आश्रित वा आक्रमक बनून आली याची स्पष्टता नाही. इथे राहून बव्हंशी हिंदू बनले तर चार दोन घराणी वैदिक धर्माचे आश्रयदाते. त्यामुळे वैदिकांनी आपल्या परंपरेनुसार त्यांना ' साहित्यिक क्षत्रियत्व ' दान देऊन टाकले. वर भर म्हणून अग्निकुलोत्पन्न !
    या अग्निकुळाचेही एक वैशिष्ट्य आहे. स्त्रीच्या योनिपेक्षा -- थेट अग्नीकुंडातून जन्म / उत्पन्न झाल्याचे म्हटल्याने कसे भारी वाटते. मग भलेही ते अनैसर्गिक का असेना. तसेही वैदिक संपर्कामुळे आम्हां भारतीयांना अक्षतयोनी, अयोनीसंभव वगैरे कल्पनांचा भारी सोस. त्यातलेच हे एक खूळ. मग या खुळापायी शिवाजी एकाच वेळी राजपूतही असतो व मराठाही बनतो याचे आम्हांला विशेष असे आश्चर्य वाटेनासे होते. एकीकडे मराठे या महाराष्ट्रभूमीतील प्राचीन रहिवासी, शासक म्हणायचे व दुसरीकडे आपले राजपुती -- पक्षी शक - सिथियन मूळ शोधायचे, हा दुटप्पीपणा यातूनच जन्मलेला.

    बरं हे झालं प्राचीन - मध्ययुगीन. आधुनिक पिढीचे काय ? ती आपल्या जुनाट, बुरसटलेल्या व विसंगतीने भरलेल्या तत्वज्ञानावर पोसली जातेय. स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय ? व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय ? असे बरेच प्रश्न या विसंगतीतून जन्माला आलेत पण त्याची उत्तरं शोधता आली नाहीत. व येणारही कशी ? ज्या तत्वज्ञानातून हे अपत्य जन्माला आलं त्याचीच चिकित्सा मुळात नाकरली जाते.
   
    व्यक्तिपूजा हा समाजाचा मोठा दोष व या दोषापासून जाती - धर्माचे लेबल असलेला एकही भारतीय समुदाय अलिप्त नाही. एकानं गांधी उचलला कि लगेच दुसरा टिळक, तिसरा आंबेडकर. चौथा आणखी कोण घेऊन आलाच.
   
    गांधी म्हणाला ' खेड्यांकडे चला ' आता यामध्ये किती गुढार्थ भरलाय हे आमचे विद्वान मोठ्या गांभीर्याचा आव आणून सांगतात. पण तो गांधी विसाव्या शतकाच्या प्रथमार्धात बोलला. त्याचे आता काय ? चालू शतकात, दशकात गांधी असता तर काय बोलला असता.. याचा विचार कोणी केला ? केवळ गांधीच नव्हे तर थोर म्हणवले जाणारे महापुरुषही याच परंपरेतले. सगळ्यांना सरणावर जाऊन किमान चार दोन  पिढ्या उलटून गेल्या. पण त्यांचेच खरे म्हणत आम्ही नवी आधुनिक पोथी / मढीनिष्ठा जोपासतोय. प्रत्येक घरात बाप - मुलाच्या पिढीतील विसंवाद सर्वांच्या परिचयाचा. पण त्याचा या स्थळी मात्र सोयीस्कर विसर पडतो.

    सारांश, आमचं तात्त्विक - व्यावहारिक जीवन वेगवेगळं असून  या विसंगतीतून निर्माण होणाऱ्या अज्ञानाचे आम्हास विलक्षण आकर्षण आहे.