दुपारची वेळ. घड्याळात ४.२० झाले आहेत. लेखनासाठी हाती वही व पेन घेऊन मी बसलोय पण लक्ष गॅलरीकडे आहे. बिल्डींगच्या भोवती झाडं लावलेली असल्याने हिरवळीखेरीज काही दिसत नाही आणि काही बघायचं म्हटलं तर ( नसत्या कल्पना मनात आणू नका !) बेडवरून उठायची आपल्याला इच्छा नाही. ( मुलखाचा आळशी आहेस ! - इति आमच्या सौ. ) सहज चाळा म्हणून टी.व्ही. लावला तर त्याच नीरस बातम्या, बातम्या देणाऱ्यांचे सुतकी चेहरे. गाण्यांचे चॅनेल्स पाहिलं तर अंगावर कपडे न टिकू देण्याची साथ हिंदीपासून मराठी पर्यंत पसरल्याचे दिसून येतंय. बघवत नाही हो हे ! ( असं म्हणायचं असतं. त्यामुळे समाज आपल्याला सभ्य समजतो.) कुठला तरी सिनेमा पहावा म्हटलं तर हल्ली ३ प्रकारचे पिक्चर बघावे लागतात. एक पूर्णतः कौटुंबिक, ज्यांची निर्मिती बडजात्या कुटुंबाने थांबवली आहे. दुसरे, पूर्णतः प्रौढ. ज्यावर एकेकाळी रामसे ब्रदर्स व भट कॅम्पची एकाधिकारशाही होती. आता हि सर्वत्र पोहोचलेली साथ आहे. तिसरे, दाक्षिणात्य. जे हिंदीमध्ये डब झाले आहेत.
' हम साथ - साथ है ' पाहिल्यापासून कौटुंबिक सिनेमा बघायचं आपण तर सोडून दिलं आहे. फार डोक्यात जातात हे असले पिक्चर ! सगळं कसं गोडगोड, छानछान असतं. वास्तवतेपासून कोसो दूर. ' असं कुठं असतं का ?' हा प्रश्न असे पिक्चर बघताना मनात वारंवार येत राहतो. पूर्णतः प्रौढ मुव्ही बघावा तर त्यात बिनडोकपणा अधिक असतो. आता इथे इमरान हाशमी आणि कंपनीची चर्चा होईल अशी अपेक्षा असेल तर ती साफ चुकीची आहे. यामध्ये पार रणवीर कपूरपासून ते शाहरुख खान आणि दीपिका पासून ते सोनाक्षी पर्यंतची नामावली आहे. मारहाण, रडारड आणि सेक्स इ. गोष्टी ठासून भरल्या की असला सिनेमा तयार होतो. बाकी, स्टोरीची गरज यांना तशी फारशी पडतच नाही. अर्थात, याला काही अपवाद आहेत. नाही असे नाही, पण ते म्हणजे दर्या में खसखस ! राहता राहिले दाक्षिणात्य. तर ते वरील दोन्ही सिनेमातील मसाले एकत्र करून त्याला आपला खास ' साऊथ टच ' देत अशी काही सिनेमाची भट्टी बसवतात कि बोलायची बात नाय ! त्यात स्टोरी नावाचा प्रकार बऱ्याचदा नसतो किंवा असला तरी डबिंगमध्ये तो वगळला जात असावा. बाकी, या दाक्षिणात्य सिनेमांचे एक वैशिष्ट्य म्हणजे हिरो वा व्हिलन कितीही हाय - फाय असले तरी लुंगी, कोयते, चॉपर याशिवाय यांची मारामारी कंप्लीट होत नाही !
आता सिनेमाचा विषय निघालाच आहे तर सध्याच्या चालू ट्रेंड विषयी बोललेचं पाहिजे. जुन्या जमान्यातील सिनेमांचे चाहते व आत्ताचे बरेचसे फिल्म समीक्षक दरवेळी नव्या - जुन्या सिनेमांची तुलना करत सध्याचा सिनेमा कसा रसातळाला जात आहे ( कलात्मक, अभिरुची संपन्न वगैरे दृष्ट्या ! ) ते ठासून सांगतात. पण तसली काही चर्चा इथे होणार नाही. कारण ; इतकाही मी काही जुना नाही. सध्या सिनेमात कमी कपड्यांचा जो ट्रेंड चालू आहे तो सर्वांच्या आवडीचा विषय बनला आहे. तोंडातून लाळ पडेपर्यंत असले सीन्स बघायचे आणि मग चारचौघात बोलताना किंवा लिहिताना यावर नाकं मुरडायची / टीका करायची हा देखील एक ट्रेंड चालू आहे. आता फिल्म मध्ये स्त्री - पुरुषांनी कमी कपडे घालण्याची परंपरा फार जुनी आहे. याला अपवाद असे फार कमी आहेत. पुलंच्या ' विरळा ' शब्दाइतकेचं !
आपला देशभक्त भारतकुमार उर्फ मनोजकुमारंच घ्या ! त्याचा कलर्स पिक्चरचा जमाना चालू झाल्यावर नट्यांचं अंगप्रत्यांग दाखवण्यात त्याने कधी कुचराई केली का ? मग सिनेमाचा विषय कोणताही असो ! अर्धनग्नता हि श्लील वा अश्लील आहे हा मुख्य प्रश्न नसून तिचे प्रदर्शन कसे केले जाते हा खरा प्रश्न आहे. ज्याला कलात्मक आणि समांतर सिनेमा असे म्हटले जाते -- असे मराठी व हिंदी पिक्चर्स बघा. त्यामध्ये खरोखर गरज म्हणून असे प्रसंग येतात. पण व्यावसायिक सिनेमात तसं नसतं. तिथे गरज असो वा नसो, बोल्ड सीन असलाच पाहिजे ! या बोल्डसीन स्पर्धेत मोठमोठ्या नायक - नायिका व दिग्दर्शकांनी सहभाग घेतला. त्यात प्रामुख्याने नावं घ्यायची झाली तर कोणाची घ्यावी अन कोणाची नाही हा मोठा प्रश्न आहे. डिंपलने आपली सिनेकारकीर्द गाजवली ती जवळपास याच बळावर. ' रुदाली ' सारखे किंवा ' अंगार ' प्रमाणे चित्रपटही तिने केले. पण ' सागर ' ची इमेज काही विस्मरणात गेली नाही. त्यात भर म्हणून ' जांबाज ' मध्ये फिरोझ खानने ' तबेला नाच ' घालायला भाग पाडले ! ' जांबाज ' च्या आधी मुमताजला घेऊन फिरोझ खानने याआधी असे प्रयोग केले होतेच म्हणा. पुढील काळात त्याला माधुरीची साथ मिळाली. ' दयावान ' हा तसाही आयात केलेल्या कथेवर आधारित सिनेमा होता. त्यात विनोद खन्नाचे भयंकर ' पॉज ' घेत ठोकलेले संवाद ! सिनेमा वाचवायला एक आयटम साँग आणि माधुरी - विनोद खन्नाची त्याला गरज होतीच. ' दयावान ' बहुतेक त्यामुळेच काही प्रमाणात चालला असावा. दीक्षितांच्या माधुरीला ' दयावान तो झांकि है, परिंदा बाकी है ' म्हणायचे होते. तिथेही नाना - जॅकी राहिले बाजूला आणि चर्चा झाली अखेरच्या अनिल - माधुरी दृश्याची ! परिंदा दोन गोष्टींसाठी आठवला जातो. नानाचा विक्षिप्त डॉन आणि अनिल - माधुरीचे अखेरचे दृश्य ! या मळलेल्या वाटेवरून अनेकजण पुढे गेले तर कित्येक मार्ग चुकले तर काही मोजक्यांनाच पुढे ' खरा अभिनय ' दाखवण्याची संधी लाभली.
' सेक्स ' किंवा ' शृंगार ' हा तसा नाजूक व कलात्मक विषय. पण हा विषय समर्थपणे मांडणे आधुनिक देशी लेखकांना जमले नाही तर सिनेमावाल्यांना काय जमणार ? याबाबतीत तद्दन फालतुगिरी बघायची तर त्यातल्या त्यात बऱ्या अशा ' रामसे ब्रदर्स ' च्या सो कॉल्ड हॉरर सिनेमात दिसून येते. त्यांचे बव्हंशी चित्रपट भूतांपेक्षा नायिकांवर जास्त चालले. ' वीराना ' मधील जास्मिन कोणाला आठवत नाही ? पण त्याआधीही ती विनोद खन्ना, गिरीश कर्नाड यांच्यासोबत चित्रपटांत झळकल्याचे बऱ्याच जणांना माहिती नाही व ' वीराना ' नंतर कुठे गेली त्याचा पत्ता नाही. रामसेंचे चित्रपट उतरणीला लागेपर्यंत हा ट्रेंड सर्वत्र पोहोचला आणि तीन तासांच्या सिनेमात पहिल्या दीड तासाने ' खरा सिनेमा ' असल्याचा अभिनव शोध लागला ! हा खरा सिनेमा म्हणजे एखादे हॉट आयटम साँग किंवा बोल्ड सीन ! अशा सिनेमांची एक प्रचंड लाट येऊन नुकतीच अस्तास गेली. या मार्गाने चित्रपट चालतो असा तेव्हाच्या सिनेनिर्मात्यांचा ठाम विश्वास होता. पण तो फारच अवास्तव निघाला. कारण, तेव्हाचे नायक - नायिका आता पार विस्मरणात गेले. मराठीमध्ये अभिनय करून कंटाळलेल्या वर्षा, अश्विनी प्रभूतींनी देखील याच वाटेने जायचा प्रयत्न करून परत घरचा रस्ता धरला. नाही म्हणायला कुलकर्ण्यांची ममता या स्पर्धेत काही काळ टिकून राहिली पण अभिनयाचे अंग नसल्याने ' चायना गेट ' झाल्यावर तिने फिल्म लाइन सोडली. ' नरसिंहा ', ' द्रोही ' पासून उर्मिलाने अभिनय दाखवायला पण त्या जोडीला थोडे देहप्रदर्शन लाभताच ' रंगीला ' नंतर तिने झेप घेतली. पिंजर, कौन, मैने गांधी को नही मारा, तहजीब इ. चित्रपटांमधून तिचा अभिनय प्रकर्षाने उठून दिसला. पण कुठेतरी ' रंगीला ' ची इमेज कायम राहिली ती राहिलीच ! अशी आणखी कित्येक उदाहरणे देता येतील. यापुढचा टप्पा म्हणजे मल्लिका शेरावत, राखी सावंत यांचा ! एक सिनेमामुळे तर दुसरी सिनेमासोडून इतर कारणांमुळे चर्चेत आलेली तारका !! मल्लिका प्रथम चर्चेत आली ती ' ख्वाहिश ' मुळे. परंतु प्रसिद्धीचे वलय तिला ' मर्डर ' पासून लाभले. आता ' मर्डर ' हि एका इंग्लिश सिनेमाची नक्कल आहे हा भाग वेगळा, पण ओरीजनल सिनेमात जसा अभिनयाला वाव आहे तसा या डूप्लिकेट मध्ये केवळ ' सेक्स ' ला चान्स आहे. जिथे शक्य आहे तिथे तो दिग्दर्शकाने कोंबून भरला आहे. याच मार्गाचे व परंपरेचे पाईक पुढे आले व आजही येत आहेत पण मर्डरची क्रेझ कोणाला लाभली नाही.
याच काळात समलिंगी संबंधांविषयी पण पिक्चर्स आले. त्यापैकी गाजले ते ' फायर ' आणि ' गर्लफ्रेंड '. एक अभिनय व वाद तर दुसरा निव्वळ वादावर ! दोन्ही चित्रपटांना विरोध करण्यास आमचे संस्कृतीरक्षक पुढे सरसावले खरे, पण त्याने फारसा काही फरक पडला नाही. मुळात, अशा प्रकारच्या विषयांवर आधारित सिनेमांची गरज असताना त्यांना विरोध करायचा व ज्यांची खरोखर गरज नाही अशा पिक्चर्सचा मिटक्या मारत आस्वाद घ्यायचा हि आमच्या संस्कृतीरक्षकांची व एकूणच समाजाची वाईट खोड आहे !
सिनेमात शृंगार हा भडक वा बीभित्स स्वरूपात दाखवायचा की सौम्य अथवा प्रतीकात्मक स्वरूपात, हा त्या क्षेत्रातील लोकांचा प्रश्न आहे. समाजाचा संबंध येथे केव्हा येतो तर सिनेमा जेव्हा असा सिनेमा प्रदर्शित होतो तेव्हा ! तत्पूर्वी, हे चित्रपट बनवणारे देखील याच समाजाचे घटक असतात. समाजाला -- लोकांना नेमकं काय हवं आणि काय नको याची गणितं त्यांनी मनाशी बांधलेली असतात. चारचौघात बोलता न येणारा विषय म्हणजे ' सेक्स ' ! एकवेळ तुम्ही कोणत्याही राष्ट्रपुरुषाचा, लोकप्रिय पक्षनेत्याचा चारचौघात उद्धार करू शकता, पण या विषयावर खुलेआम बोलायची चोरी. बरे, हि स्थिती सर्वत्र असल्याने वयात येणाऱ्यांची ज्ञानाअभावी वा अपुऱ्या माहितीमुळे होणारी कुचंबणा आणि त्यातून विकसित होणारी त्यांची मानसिकता याचे प्रतिक म्हणजे आजचा सिनेमा. कोणत्याही बोल्ड सीनचा निर्माणकर्ता हा त्या कुचंबलेल्या मानसिकतेतूनच गेलेला असतो आणि त्याचेच प्रत्यंतर अशा दृश्यांमध्ये अनेकदा दिसून येते. साधं उदाहरण आहे. सिनेमातील नायिका वा तत्सम आयटम पात्राच्या एन्ट्रीला तिच्या देहावरून कॅमेऱ्याची नजर जितकी फिरते तितकी, प्रत्यक्षातील वासूनाक्यांची देखील फिरत नाही !
' काम ' विषयावर वात्स्यायन लिहून गेला असं आम्ही जगाला मोठ्या अभिमानाने ओरडून सांगतो, मग तो वात्स्यायन घराघरांमध्ये योग्यवेळी मुलांच्या हाती का दिला जात नाही ? योग्य वेळी, योग्य वयात मुलांच्या हाती अनुरूप असे साहित्य देण्याची मुळात पालकांची जबाबदारी आहे. पण पालकांची वाढच जर कुचंबलेल्या परिस्थितीत झाली असेल तर ते तरी काय करणार ? अशा वेळी चोरून - मारून मिळवलेल्या ज्ञानावर आणि ' पिवळ्या पुस्तकांवर ' मुलं ज्ञान मिळवून नको त्या मार्गाकडे वळतात. बरं, हि अश्लील म्हणवली जाणारी पुस्तके किंवा कथांचे संग्रह तरी काय दर्जाचे असतात ? ज्या नातेसंबंधांना आज निषिद्ध मानले गेले आहे त्याच नातेसंबंधांवर आधारित कथांचा यात मारा असतो. बापाचा मुलीवर किंवा भावाचा बहिणीवर बलात्कार अशा बातम्या ८ - १५ दिवसांतून क्वचित वाचनात येतात. पण यावर आधारित साहित्य रस्त्या रस्त्यांवर पडलेलं आहे त्याचं काय ? या साहित्याचा एक फार मोठा वाचकवर्गही आहे. अगदी इंटरनेट देखील याला आता अपवाद राहिलं नाही. सुदैवाने, या विषयांवर अजून सिनेमा काढायची कोणाला ' सुबुद्धी ' झाली नाही. पण याचा अर्थ असा नाही की, असे पिक्चर्स येणारचं नाहीत. इतर देशांमध्ये या कथासूत्रांवर आधारित चित्रपट येऊन गेले आहेत. अजून आपल्याकडे त्याची लागण झाली नाही इतकेचं समाधान !
पोर्नोमूव्ही किंवा ब्लू फिल्म हा एक आपला अत्यंत आवडीचा पण चारचौघात न बोलण्यासारखा विषय ! आज या महाराष्ट्रात देवदर्शन न घेणारा व अजिबात ब्लू फिल्म न पाहिलेला मनुष्य सापडणे दुर्मिळ आहे. पूर्वी लोकं दुसऱ्यांच्या चोरून बघायचे, कारण आपल्याकडे बनायच्या नाहीत. आता स्वतःच्याच बनवून किंवा चोरून तयार करून इंटरनेटच्या माध्यमातून जगभर प्रसारित केल्या जात आहेत. आपल्याकडे हा व्यवसाय करण्यास कायद्याने बंदी आहे पण, परदेशात बहुतेक यास राजमान्यता आहे. त्यामुळे आपल्याकडे विदेशी मालाची आयात जोरात चालू आहे. विदेशातील आधीच्या पोर्नोमूव्ही पाहिल्या तर त्या अतिशय भयंकर, बीभित्स आणि ओबडधोबड अशाच होत्या पण आता त्या कमालीच्या सौम्य व यांत्रिक बनल्या आहेत. देश - विदेशांतील कामशास्त्रांतील आसनांचे प्रात्याक्षिक करून दाखवणे एवढेच आता त्यांचे कार्य राहिले आहे. आपल्याकडे सनी लिओन आली तेव्हा ब्लू फिल्मची चर्चा जोरजोरात सुरु झाली आणि थंडावली देखील. बरं, या चर्चेत सहभाग घेण्याची आतुरता का तर ती भारतीय वंशाची आहे म्हणून ! ती भारतात येण्याआधी ' भक्त प्रल्हाद ' ( ब्लू फिल्मचा देशी फुल फॉर्म ! ) च्या प्रेक्षकांनाच तिची माहिती होती. आणि तिच्या सिनेमांचा खपही मर्यादित होता. पण ती जेव्हा भारतात आली तेव्हा मात्र तिची प्रसिद्धी आणि तिच्या सिनेमांचा खप या दोन्हीत वाढ झाली. हे कशाचे प्रतीक आहे ?
काळ बदलतो. तशी संस्कृती व तिची मूल्येही बदलली जातात. किंबहुना, बदल हि काळाची गरजच आहे. त्यामुळे हा बदल आपल्याला पचेल व जमेल इतपत घडवून आणणं गरजेचं आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा प्रगत देश आपल्यापुढे कमीत कमी पन्नास वर्ष होते. जोवर संपर्कमाध्यमं मर्यादित होती तोवर जग मोठं होतं. पण आता मुंबईत बसून अमेरिकेतील नातलगाशी व्हिडीओ चॅट करावे इतकं छोटं झालं आहे. त्यामुळे हा ५० वर्षांचा गॅप भरून काढताना आपली बरीच दमछाक होत आहे. आर्थिक सुरक्षितता मिळवण्याच्या नादात सांस्कृतिक संवर्धनाला आपण विसरत चाललो आहोत. काळाच्या सोबत धावण्याच्या फंदात आता सर्व नीतीमूल्यं पायदळी तुडवायचे चालले आहेत. जुनं ओल्ड फॅशन असल्याने चारचौघात मिरवता येत नाही आणि नवं पचायला जड असल्याने स्वीकारता येत नाही अशी आपली गत आहे. अर्थात, यातून मार्ग काढला पाहिजे वगैरे फालतू विधानं मी करणार नाही. कारण ; गरज हि शोधाची जननी असते, पण नेमकी गरज कशाची हा प्रश्न पडण्याची देखील तितकीच आवश्यकता असते !