डिसेंबर अखेर जवळ
आला कि तथाकथित संस्कृतीरक्षकांचे नाताळविरोधी व आंबेडकर अनुयायांचे मनुस्मृति दहन
संबंधी मेसेज हातात हात घालून सोशल मिडीयावर फिरताना दिसतात. बेगडी संस्कृतीरक्षकांच्या
संबंधी या स्थळी लिहिण्याचा हेतू नाही परंतु मनुस्मृति संबंधी चार शब्द लिहिणे
आवश्यक वाटते.
डॉ. आंबेडकरांनी
मनुस्मृतिचे अभ्यासपूर्वक वाचन करून तिचे दहन केले. त्याप्रसंगी मनुस्मृति हा
हिंदू धर्मियांचा स्मृतिग्रंथ असल्याची त्यांची इतरांप्रमाणेच धारणा होती. परंतु
अलीकडच्या अभ्यासावरून व खुद्द वैदिक साहित्य तसेच डॉ. आंबेडकरांच्याच भगवान
बुद्ध आणि त्याचा धम्म तसेच शुद्र कोण होते ? या
ग्रंथांवरून सिद्ध होते कि, मनुस्मृति हा हिंदुंचा ग्रंथ नसून वैदिक धर्मियांचा
स्मृतिग्रंथ आहे.
यातील वर्णविभागणी व
शूद्रासंबंधीचे नियम हे हिंदूंना कधीच लागू नव्हते. तसेच वैदिक धर्मियांनी हे नियम
हिंदुंवर कधी लादले देखील नाहीत. कारण असे करण्यासाठी त्या त्या धर्माची राजसत्ता
येथे प्रस्थापित होणे आवश्यक असते व वैदिकांची एक पेशवाई अपवाद केल्यास येथे कोणतीच
राजसत्ता स्थापित झालेली नाही. व पेशवाईतही होळकरासारखे सरदार स्वतंत्र संस्थाने
स्थापून राज्यकर्त्याप्रमाणे राहत होते.
जर मनुस्मृति हि
हिंदूंची असती तर होळकराला सरदारकी प्राप्त झाली असती का ? किंवा तत्पूर्वीचे
प्राचीन, मध्ययुगीन दाखले पाहिले तर सातवाहन, नंद कोण होते ? नंदाची अखेर करणारा
चंद्रगुप्त मौर्य कोण होता ?
वैदिक ग्रंथात आढळणारा
ब्राह्मण शब्द व ऐतिहासिक साधनांत आढळणारे ब्राह्मण दान, देणगी, अग्रहार सारखे
उल्लेख, यावरून आम्ही येथे वैदिक धर्मीयांची राजसत्ता प्रस्थापित असल्याचा समज
करून घेतो व असा समज करून देण्यात वैदिक इतिहासकारांनी आपल्यावतीने यत्किंचितही
हलगर्जीपणा केलेला नाही. जिथे जिथे त्यांना दानपत्रात किंवा इतरत्र ब्राह्मण शब्द
आढळला तिथे तिथे त्यांनी त्या राजवटीला वैदिक राजसत्तेचे लेबल चिटकवले.
शिवाजीच्या बिरुदावलीत
गोब्राह्मण प्रतिपालक चिटकवण्यामागे त्यांचा मुख्य हेतू हाच होता. जो
प्रामुख्याने ब्रिगेडने कधी नाही ते शहाणपणा दाखवत उधळून लावला. परंतु वैदिक
क्षत्रियत्वाच्या गारुडातून मात्र ते सुटू शकले नाहीत व गोब्राह्मणप्रतिपालक हटवून
क्षत्रियत्वाचे जोखड त्यांनी आपल्या गळ्यात स्वखुशीने अडकवून घेण्याचा जोरदार
प्रयत्न चालवलाय. ज्याला खुद्द वैदिकांचाच प्रखर विरोध आहे.
मनुस्मृति वर्णव्यवस्थेचे
समर्थन करते म्हणून तिचे दहन आवश्यक आहे तर प्राचीन काळापासून ते आजतागायत या
स्मृतीनुसार देशात समाजरचना अस्तित्वात होती हे निर्विवादपणे सिद्ध करणारा एकतरी
पुरावा उपलब्ध आहे का ?
मनुस्मृतीत शुद्रविरोधी
वचनं आहेत म्हणून तिचे दहन करावे तर प्रथम हे शुद्र कोण आहेत याचा विचार होणे
आवश्यक आहे. या स्मृतिच्या अभ्यासावरून वैदिकांनी शूद्रांचे दोन वर्ग कल्पिल्याचे
स्पष्ट होते. प्रथमतः जे वैदिक नाही त्यांना ते शुद्र म्हणत. त्यानंतर वैदिक
धर्मात प्रवेशलेले तसेच वैदिकांच्या सेवेत असलेले ते शुद्र अशी त्यांनी
शुद्रत्वाची व्याख्या बनवली. आणि स्मृतिग्रंथातील शुद्र संबंधी कटू वचने या
दुसऱ्या वर्गातील शूद्रांना उद्देशून आहेत.
मग जर स्मृतिवचनं
वैदिक शूद्रांकरता आहेत तर गैर वैदिकांनी रडायची गरज तरी काय ? तसं बघायला गेलं तर
कुराणातही गैर इस्लामी तथा काफिर विरोधी वचनं आहेत. मग त्याची होळी कोण करतं का ?
डॉ. आंबेडकरांची
धर्मांतर घोषणा व त्यानंतर तसेच तत्पूर्वीही झालेले जात्युछेदनाचे हास्यास्पद
प्रयोग हा देखील विचारात घेण्यासारखा विषय आहे.
अशा प्रयोगात
सहभोजन, जानवं देणे वगैरे प्रकार होत. यांपैकी जानवं देण्याच्या निमिताने काही
वैदिकांनी धर्मान्तराची छुपी मोहीही चालवली होती ज्यामध्ये हिंदुत्वाचा बुरखा
घेतलेले सावरकरांसाखे कट्टे वैदिक धर्मीयही सहभागी होते. परंतु खुद्द
स्वधार्मियांनीच त्यांना याबाबतीत साथ न दिल्याने, त्यांच्या धर्मान्तरास मान्यता
न दिल्याने हिंदूंनी अस्पृश्य मानलेल्यांना वैदिक धर्मात घेण्याचा त्यांचा डाव
फसला.
डॉ. आंबेडकर देखील उपनयन,
वेदांचे शिक्षण इ. वैदिक संस्कारांचे महत्व मानत होते. कारण त्या काळात वैदिक हे
हिंदू धर्मातीलच एक घटक किंबहुना हिंदूच होत अशी भावना प्रबळ होती व तसा समजही
करून देण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात उपनयन करवून घेणे किंवा वेद शिकणे
म्हणजे सुंता करवून कुराण पठण करण्यासारखे आहे, हि वस्तुस्थिती आंबेडकरांच्या
लक्षात त्याकाळी येऊ शकली नाही तरी सद्यकालीन त्यांच्या अनुयायांना व हिंदूंना न यावी
हि मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.
कोण कुठल्या अफगाण
प्रांतात जन्मलेला वैदिक धर्म. ज्याची मुळे पारशी धर्मात आढळतात व त्या धर्मियांनी
मांडलेल्या उच्छेदामुळेच वैदिकांना देशांतराचा निर्णय घ्यावा लागला. आपली
जन्मभूमी, भाषा यांना ते कायमचे अंतरले. परंतु आपला धर्म, संस्कार, श्रद्धा वगैरेंना
जपण्याचा त्यांनी येथे आटोकाट प्रयत्न केला. आपलं अल्पसंख्यकत्व कमजोरी ठरू नये
म्हणून केवळ भाषिक साधर्म्याधारे ब्राह्मण शब्दाचा आधार घेत हिंदू धर्मात शिरकाव
केला. येथील साहित्य, संकृतीचे वैदिकीकरण करून त्यांनी कागदोपत्री स्वतःचे वर्चस्व
सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला व आजही करताहेत.
डोळस वृत्तीने, स्वतंत्र बुद्धीने त्यांचे हे डाव ओळखून हाणून पाडणे आपले कर्तव्य आहे. सुदैवाने त्यांच्यातील काहींनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीस जागून केंद्र सरकारकडे धार्मिक अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. त्यांस पाठबळ देऊन यांना सन्मानाने हिंदू धर्मातून बाहेर काढणे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्याखेरीज हिंदू धर्मीयांची व हिंदू धर्मातून बाहेर गेलेल्यांची स्थिती सुधारणे शक्य नाही !