शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

बलात्कारी मानसिकतेचा एक शोध :- मुक्त व स्वैर विचार मंथन


    दिल्लीतील कुप्रसिद्ध बस बलात्कार प्रकरण घडल्यानंतर भारतीय जनता, मिडीया व थोड्या प्रमाणात सरकार खडबडून जागे झाले. बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी खास कायद्यांची निर्मितीही करण्यात आली व येत आहे. परंतु एवढे सर्व होऊनही बलात्काराच्या घटनांत काही घट होताना दिसून येत नाही. उलट त्यात वाढच होत चालली आहे. उजेडात येणाऱ्या घटनांचे प्रमाण गुप्त प्रकरणांच्या तुलनेने तसे नगण्यच आहे. त्यामुळे हे प्रकरण कितपत भयावह आहे याची वाचकांना कल्पना येईलच. बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची नेमकी मानसिकता काय असते ? तो बलात्कारास प्रवृत्त का होतो ? बलात्काराची कृती केल्यानंतर वा करताना त्याचे मन विकृतीकडे ओढ का घेते ? या व अशा कित्येक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा हा एक अल्प प्रयत्न.  

    निसर्गाने मनुष्यांत स्त्री - पुरुष हे दोनच पण मुख्य भेद पाडले आहेत. यांच्यात जसे भेद आहेत तसेच यांना परस्परांविषयी कमालीचे आकर्षण देखील आहे. मानसिक व शारिरिक ! प्रचलित अर्थाने हिंदू शास्त्रे पाहिली तर जवळच्या नात्यातील स्त्रियांच्या सहवासातही फार काळ एकांत न  करण्याची सूचना आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. मनुष्य टोळी जीवनातून स्थिर जीवनाकडे वळला तसतशी मातृसत्ताक पद्धती पितृसत्ताक तर बनलीच पण सोबतीला स्त्री - पुरुषांचे लैंगिक व्यवहार देखील नियंत्रण करण्यात आले. यापूर्वी नात्यांचा विचार न करता --- कारण ' नातं ' हि संकल्पनाच अस्तित्वात नव्हती --- संबंध ठेवले जात. परंतु ' कुटुंब संस्था ' विकसित होऊ लागल्यावर ' नातं ' हि संकल्पना जन्माला येऊन विकसित होऊ लागली. त्यामुळे हे अनिर्बंध लैंगिक संबंध नियंत्रित करण्यात आले खरे, परंतु पूर्णतः बंद होऊ शकले नाहीत. तेव्हा धर्मशास्त्रांच्या आधारे यांना निषिद्ध म्हणून घोषित करण्यात आले. कुटुंब संस्थेत ' विवाह ' संकल्पनेचा शिरकाव होऊन तिला अनन्यसाधारण महत्त्व आल्याने व अनिर्बंध लैंगिक संबंधाने होणारे कलह नियंत्रित करण्यासाठीही विवाहपूर्व व विवाहबाह्य तसेच बळजोरीने संबंध प्रस्थापित करणे नीतिबाह्य मानले जाऊ लागले. शास्त्राकार व समाजनियमन करणाऱ्यांच्या दृष्टीने ते आदर्श समाज विकसित करत होते. मात्र, जगात सदासर्वकाळी सर्वच व्यक्ती विवाह करून शारिरीक सुख प्राप्त करू शकत नव्हते, नाहीत. अशा लोकांच्यासाठी एका खास वर्गाची निर्मिती करण्यात आली. ज्याला सध्या ' वेश्या ' हे नाव देण्यात आले आहे. यामुळे समाजातील विवाहाद्वारे शारिरीक सुख उपभोगण्यास असमर्थ अशा पुरुषवर्गाची सोय झाली परंतु, स्त्री वर्गासाठी अशी काही तरतूद करता आली नाही.  

    पुरुष वर्गाने आपल्या सोयीने स्वतःला उपयुक्त अशा नियमांची, संस्थांची निर्मिती केली. त्याचप्रमाणे स्वतःला बंधनकारक अशा कायद्यांची देखील निर्मिती केली. परंतु , असे असूनही --- म्हणजे कामवासना शमविण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असूनही त्यासाठी स्त्रीवर्गावर बळजबरी करण्याची त्याची वृत्ती काही बदलली नाही. बलात्कार हे आधीही होत होते, आताही होतात पण पुढे घडू नयेत अशी मनोमन इच्छा आहे !  

    पुरुषाची कामवासना प्रबळ व अनावर झाली कि दिसेल त्या स्त्रीला वासनाशमनार्थ यंत्र समजून जवळ ओढण्याची त्याची ' आदिम - पुरुषी - रानटी ' वृत्ती उफाळून येते. यावेळी नात्याचा, परिस्थितीचा, वयाचा कशाचाही विचार केला जात नाही. असे का व्हावे ? 

    पुराणांचा दाखला घेतला तर देवाधिदेव देखील बलात्काराचा मोह टाळू शकले नाहीत. मध्ययुगीन काळातील इतिहास देखील काही फारसा वेगळा नाही. यानंतर आधुनिक भारताचा इतिहास सुरु होतो. अव्वल ब्रिटीश राजवटीत बलात्काराच्या घटना घडतच होत्या. या घटनांचे समाजमनातील पडसाद / प्रतिबिंब नंतर कथा - कादंबऱ्यांमध्ये उमटू लागले. आर्थिक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील स्त्रीवर्गाकडे सामाजिक, आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गातील कामांध पुरुष आशाळभूत नजरेने पाहू लागले. दरम्यान औद्योगिकीकरणाने समाजाला एक वेगळीच दिशा / गती मिळाली. त्यामुळे आर्थिक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक देखील शहरांकडे धाव घेऊन या दृष्टचक्रातून आपली सुटका करून घेऊ लागले. परंतु, या दृष्टचक्रापासून संपूर्ण मुक्तता मिळणे शक्य नव्हते व नाही. कारण,  बलात्कार हि व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. विशिष्ट मानसिकता आहे. जी सर्वसाधारणतः सुप्त असते पण संधी मिळताच प्रकट होते.

    औद्योगिकीकरणाने समाज बदलला. प्रवृत्त्या बदलल्या नाहीत. त्यांनी फक्त कात टाकली. शहरांकडे धाव घेणाच्या वृत्तीने ' संयुक्त / एकत्र कुटुंबसंस्था ' एकप्रकारे मोडीत तर निघालीच पण ' छोटे कुटुंब ' हि संकल्पनाही पूर्णतः विकसित झाली नाही. शहरांत किंवा रोजगार असलेल्या ठिकाणी घर विकत अथवा भाड्याने घेऊन संसार थाटणे सर्वांनाच शक्य होत नाही. अशा वेळी विवाहित स्त्री - पुरुषांचे वर्षातून ठराविक काळ एकत्र येणे, दुरावणे हे प्रकार घडून येतात. या गोष्टींचा वा कारणांचा बलात्कार वृत्तीशी संबंध जोडता येईल का ? किंवा हे कारण या कृत्यामागे असावे का ?

    गावात विवाहबाह्य संबंध ठेवणे तसे सोपेही आहे व अतिशय अवघड देखील. मात्र शहरात तसे होत असावे का ? आत्ताच्या काळात हि गोष्ट राजरोसपणे होते, पण आधीच्या --- ५० वर्षांपूर्वीच्या काळात ते शक्य होते का ?

    ग्रामीण - शहरी माणसांचे मनोरंजन करणाऱ्या गोष्टींमध्ये साहित्य, सिनेमा, खेळ इ. प्रकारांचा समावेश होतो. वयात येणाऱ्या व एकलेपणा अनुभवणाऱ्या वर्गासाठी प्रेमकथा लिहिणारा वर्ग या काळात उदयास आला. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात हिंदी सिनेमाचे योगदान किती हा वादाचा मुद्दा असला तरी काळानुरूप बदलणाऱ्या भारतीय मानसिकतेचे प्रतिबिंब त्यात दिसून येते हे नाकारता येत नाही. सिनेसंस्कृती बाळबोध होती तेव्हा श्लील - अश्लील प्रकार त्यात होते वा नव्हते माहिती नाही. परंतु जसजशी ती विकसित होत गेली तसतशी हिंदी सिनेमातील स्त्री पात्राची भूमिका बदलत गेली. यशस्वी - अयशस्वी बलात्काराचा एक सीन हा आता सिनेमाचा अविभाज्य भाग बनूलागला. हि परंपरा स. २००० पर्यंत कायम राहून आता जवळपास नामशेष झाली. आत्ताच्या सिनेमात तर डायरेक्ट हिरो - हिरॉईनचा रोमान्स दाखवून बलात्काराला पूर्ण फाटा दिला आहे. म्हणजेच सेक्सचे स्वरूप बदलून ते पेश करण्यात येत आहे. असे का ? आधीचा सिनेमा ग्रामीण - शहरी भारताचे प्रतिनिधित्व करत होता. आत्ताचा फक्त शहरी भागाचे नेतृत्व करतो. काय आहे सध्याच्या शहरी भागाचे स्वरूप ?

    एकेकाळी विवाहपूर्व शारिरीक संबंध निषिद्ध मानणारा शहरी समाज आता बदलू लागला आहे. नव्या पिढीला जुन्या संस्था, नियमांची फारशी पर्वा नाही. आवश्यकताही वाटत नाही. इथे कोणाची वाट चुकली वा मार्ग फसला हे महत्त्वाचे नाही तर, प्रवृत्तीत बदल होत आहे याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शहरी तरुणाईचे प्रतिबिंब सध्याच्या सिनेमात दिसून येते इतकेच. पण असे असले तरी शहरात बलात्कार हे घडतातच. ते का ?

    सामान्यतः वृत्तपत्रे, बातम्या यांमधून ज्या काही बलात्काराच्या घटना उजेडात येतात त्यांचे दोन मुख्य भागपडतात . (१) नात्या अंतर्गत (२) नात्याच्या बाहेर. मात्र या दोन मुख्य भागांचे जे पोटभाग आहेत, त्यांत कमालीचे साम्य आहे व ते म्हणजे पीडित व्यक्तीचे अल्पवय असणे अथवा एका व्यक्तीवर अनेकांनी मिळून अत्याचार करणे.


    (१)    प्रथम आपण नात्याअंतर्गत घटकाचा विचार करू. जवळच्या नात्यातील संबंध सर्वत्र निषिद्ध मानले जात असले तरी ते अजिबात घडत नाहीत असे नाही. सहमतीने घडणाऱ्या संबंधांचा येथे विचार करणे योग्य नाही. मात्र बळजोरीने जे घडवून आणले जातात त्यांचा विचार करणे आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञांचे मत लक्ष घेत बालपणापासून एकत्र वाढलेल्या दोन विजातीय लिंगी व्यक्तींमध्ये शारिरीक आकर्षण फारसे नसते. पण नियमाला जसे अपवाद असता तसे इथेही आहेत. त्याशिवाय माणसाचा एक स्वभाव आहे व तो म्हणजे जी कृती करू नये असे त्यास बजावलेले असते ती कृती करण्याकडे त्याच्या अंतर्मनाचा ओढा असतो. याला ' बालसुलभ ' प्रवृत्ती देखील म्हणता येईल. त्यामुळेच अशा संबंधांचा विचार करण्याकडे व ते विचार कृतीत आणण्याकडे त्याचा कल झुकत असावा. सध्याचे सर्वत्र सहज उपलब्ध असलेले ई - साहित्य पाहिले तर इनसेस्ट रिलेशनवर आधारित कथांचे त्यात प्राबल्य दिसून येते त्यामुळेच ! आता या कथांची निर्मिती अशा विचारांना चालना देते कि, असे विचार अशा कथांना जन्म देतात हा भाग वेगळा. परंतु, जे तथ्य आहे, सत्य आहे ते स्वीकारले पाहिजे. 

    नैसर्गिक आकर्षण व निषिद्ध कर्म करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती यांमुळे नात्याअंतर्गत संबंधांच्या - बलात्काराच्या घटना घडून येतात. याचा उपभाग म्हणजे कमी वय असणे. सामान्यतः सहमतीपूर्वक संबंध हे समवयस्कांमध्ये तसेच चार दोन वर्षांचा फरक असलेल्यांमध्ये ठेवले जातात. मात्र, बलात्काराच्या घटनेत वयामध्ये कमालीची असमानता आढळते. पीडित व्यक्ती अत्याचारी व्यक्तीच्या बरोबरची, मोठी वा लहान असू शकते. समवयस्क वा वयाने मोठ्या व्यक्तीवरील अत्याचाराची मानसिकता थोडी समजू शकते परंतु अल्पवयीन --- ज्यात वय वर्ष दोन तीन पासून पुढे सुरु व वृद्ध --- वय वर्ष पन्नासच्या पुढील --- व्यक्तीवरील अत्याचार करणाऱ्याची मानसिकता नेमकी काय असावी ? वेगळेपणाचे ' थ्रील ' अनुभवणे हेच मुख्य कारण कि, प्रबळ वासना ? कि आणखी काही ? विवाह करून किंवा विवाहबाह्य संबंध ठेवण्यापेक्षा हा पर्याय काहींना कदाचित जास्त व्यवहारी देखील वाटत असावा. ज्यामध्ये कसलाही खर्च नाही कि जबाबदारी नाही. एकदा अत्याचार झाला कि, पीडित व्यक्ती लज्जेस्तव तो गुप्त ठेवते आणि मग पुढची सोय होऊन जाते. नात्याअंतर्गत ज्या बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या त्यामध्ये पहिला अत्याचार होऊन कित्येक महिने वा वर्षे  गेली होती हे लक्षात घेणे गरजेचे आहे.  

    नात्याअंतर्गत बलात्काराचा दुसरा उपविभाग म्हणजे एकावर अनेकांनी अत्याचार करणे. वास्तविक याच्या उजेडात येणाऱ्या घटना अतिशय नगण्य आहेत. मात्र तरीही हा प्रकार घडतो हे उघड आहे. यातील बव्हंशी घटना या मुख्य प्रकाराशी संबंधित आहेत. प्रथम यात पीडित व अत्याचार करणारी व्यक्ती अशा दोघांचा सहभाग असतो व तिसरी व्यक्ती घटनेची माहिती कळताच त्यात सहभागी होते. परंतु, सर्वांनी म्हणजे एकाहून अनेकांनी एकाचवेळी नात्याअंतर्गत व्यक्तीवर अत्याचार केल्याची घटना माझ्या वाचनात आल्याचे स्मरत नाही.  

    (२)     नात्याबाहेरच्या व्यक्तीवरील अत्याचाराच्या घटना घडतात त्यात देखील पीडीताचे वय अत्याचारी व्यक्ती इतके, कमी -- अत्यल्प व जास्त -- वृद्ध अशा स्वरूपाचे असल्याचे दिसून येते. विवाहाआधी शारिरीक सुख उपभोगण्यासाठी वासना शमनार्थ शय्यासोबतीसाठी पुरेसे पैसे नसल्याने, विवाहबाह्य संबंध ठेवण्याची इच्छा असून संधी न मिळाल्याने तसेच वासना शमनेचे सर्व मार्ग खुंटल्यावर व्यक्ती या थरास जात असावी का ? 

     ' खाली दिमाग सैतान का घर ' असे म्हटले जाते. या म्हणीचा शब्दशः अर्थ न घेता भावार्थ जर घेतला तर माणसाची विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे तिला इष्ट - अनिष्ट वळण लागल्यास अशी कृत्ये घडत असावीत का ? १० वर्षांखालील व्यक्तीकडे बघून वासना अनावर होतेच कशी हा भावनिक प्रश्न असला तरी १० वर्षांखालील व्यक्ती आपल्यावर घडलेल्या अत्याचाराचा बभ्रा करणार तरी कशी ? तिला भीती दाखवल्यास आपले काम सहज होऊ शकते हे व्यावहारिक कारण असू शकेल का ? आपल्या समवयस्क व्यक्तीवर बळजोरी केल्यावर ती बोंब ठोकेल वा तक्रार करेल. तेव्हा या कृत्यावर पडदा पाडण्यासाठी खुनाचा मार्ग अवलंबावा लागतो. म्हणजे आणखी एक गुन्हा आला. त्याऐवजी अल्पवयीन व अजाण बालक - बालिका यासाठी आदर्श ' लक्ष्य ' आहे. तीच मीमांसा वृद्ध व्यक्तीच्या बाबतीत देखील करता येईल. 

    बलात्काराच्या घटनेत एका व्यक्तीवर अनेकांनी मिळून अत्याचार करण्याच्या घटनांचे प्रमाण अधिक वाढले आहे. विशेष दखल घेण्याची बाब म्हणजे यात पीडित व्यक्ती फारच कमी प्रमाणात अल्पवयीन सदरात मोडणारे असून बव्हंशी घटनांत पीडित व्यक्ती व अत्याचारी व्यक्तींच्या वयात फारसा फरक नसल्याचे आढळून येते. तसेच सामुहिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अनेकदा अत्याचारी घटकांत अल्पवयीन व्यक्ती सहभागी असल्याचे दिसून येते. असे का ? समवयस्क व्यक्तीवर एकट्याने अत्याचार करणे आता अशक्य होऊ लागले आहे का ? कि समूहाचे मानसशास्त्र या ठिकाणी लागू पडते ? एकाचवेळी एकाच विजातीय लिंगी व्यक्तीविषयी एकाहून अधिक जणांना शारिरीक आकर्षण वाटू शकते का ? कि आपल्या सहकाऱ्यास त्याचे इच्छित लक्ष्य प्राप्त करून देण्यास्तव आरंभी सहभाग घेतला जातो व आपल्या सहकाऱ्याचे कामकृत्य पाहून इतरांची वासना प्रज्वलित होते ? सामूहिक अत्याचारात अल्पवयीन सहभाग का घेतात ? विजातीय लिंगी व्यक्तीविषयक नैसर्गिक आकर्षणाने कि समूहाच्या सोबतीने, अनुकरणवृत्तीने ? 

    सामूहिक अत्याचारात सहभागी असलेल्या अल्पवयीन व्यक्तीकडून पीडित व्यक्तीवर अत्याचाराहून अधिक भयंकर शारिरीक दुखापत करण्याचे प्रकरणही विशेष दखल घेण्याजोगे आहे. दिल्ली मधील कुप्रसिद्ध घटनेत बसमधील लोखंडी रॉड नाजूक भागातून शरीरात घुसवण्याचा प्रकार झाला. हि घटना तशी अलीकडची. पण जवळपास अशाच ' थीम ' वर आधारित बलात्काराची दृश्ये गैर भारतीय भाषांतील सिनेमात येऊन गेल्याचे किती जणांना माहिती आहे ? अशा प्रकारच्या दृश्यांचे लेखन करणाऱ्या व्यक्ती विकृत मानाव्यात कि अल्पवयीन, अज्ञ ? लहान मुल ज्याप्रमाणे रागाच्या भरात खेळण्यांची मोडतोड करते. तसेच अनेक विवाहबाह्य प्रकरणांत संबंध उजेडात आल्यावर प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी जेव्हा संबंध ठेवणारी व्यक्ती आपल्या प्रियपात्राच्या सहाय्याने / मूक संमतीने आपल्या पती / पत्नीचा खून करते तेव्हा तिरस्कार, घृणा, राग या व अशा कित्येक भावनांच्या आहारी जाऊन लैंगिक अवयवांचा विध्वंस देखील  करते. यामागील नेमकी मानसिकता काय असावी ? अशी व्यक्ती फक्त त्याच प्रसंगापुरती विकृत का बनावी ? 

     अल्पवयीन वा अजाण व्यक्ती हि शारिरीक हिंसाचारात अधिक निर्दयी असते. कारण, आपण जे कृत्य करत आहोत, त्याच्या परिणामांची त्यास कल्पना, पर्वा अजिबात नसते. परंतु अशीच कृत्ये जेव्हा परिपक्व वयातील सुजाण व्यक्ती करतात तेव्हा काय समजायचे ? 

    पीडित व्यक्तीने तोकडे कपडे परिधान केल्याने अत्याचारी व्यक्तीची वासना चाळवली जाते असे म्हटले जाते. हा खरोखर बिनबुडाचाच नव्हे तर बिनडोकपणाचा युक्तिवाद आहे. तोकडे कपडे घालणाऱ्या व्यक्तींपेक्षा अंगभर वस्त्रे परिधान करून देखील अत्याचारास बळी पडलेल्या पीडीतांची संख्या जास्त असल्याची वस्तुस्थिती लक्षात न घेत केलेलं हे विधान आहे.

    स्त्री - पुरुषांतील नैसर्गिक आकर्षण हे सर्वसंमत असेच आहे. मात्र कामभावनांचा निचरा ' दमन ' प्रक्रियेने न होता समाजमान्यमार्गांनी, नियमांनी व्हायला हवा. हेच सध्याच्या बलात्कार प्रश्नाचे एक उत्तर बनू शकते.



शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

मी कोण ?


    लेखाचे शीर्षक वाचून कोणाला देशपांड्यांचा ' असा मी ' आठवेल किंवा अत्र्यांचा ' मी कसा झालो ? ' आणि त्यावरून माझाही अशाच पद्धतीने लेखन करण्याचा मनोदय असल्याचा अंदाज बांधला जाईल. परंतु तसे नाही. प्रस्तुत ठिकाणी मला -- मी कोणत्या धर्माचा, जातीचा आहे याचा शोध घ्यायचा आहे. वास्तविक हे कार्य मी पुढील पिढीतील संशोधकांवर सोडू द्यायला हवे होते खरे, पण माझ्यावर संशोधन किंवा चार ओळींचे ( शोकात्मक वा निंदात्मक ) लेखन करण्याइतपत मी मोठा ( छोटा ) होईन असे मला तरी अजिबात वाटत नाही. तेव्हा आपल्या जिवंतपणीच हे कार्य स्वहस्ते उरकून घेण्याचा माझा विचार आहे.  


    रुढार्थाने पाहिल्यास माझा जन्म हिंदू धर्मातील ' महार ' जातीत झाला. दाखल्यावर त्याची नोंद हिंदू - महार ते पुढे हिंदू - बौद्ध आणि नंतर नवबौद्ध अशी उत्क्रांती सिद्धांतान्वये बदलत गेली. अर्थात हा बदल व गोंधळ केवळ कागदावर घडला असे नसून मानसिक व बौद्धिक पातळीवर देखील घडून आला, घडत आहे व कदाचित पुढेही घडत राहील. बहुसंख्यांकांच्या सोबतीने अल्पसंख्यांक राहिल्यास एकमेकांच्या चालीरीती, परंपरा, श्रद्धा इ. अंगांवर परिणाम हा होतोच. थोडक्यात त्यांची देवाण - घेवाण होते. उदा :- भारतात हिंदू हे बहुसंख्य व त्या तुलनेने मुसलमान, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन हे अनुक्रमे अल्पसंख्यक आहेत. यांपैकी हिंदू धर्मीय अपवाद केल्यास उर्वरित धर्मियांवर हिंदूंच्या चालीरीती, परंपरा, श्रद्धा इ. चा फार मोठा प्रभाव पडला आहे तर या धर्मियांच्याही काही मुल्यांचा हिंदुंवर बऱ्याच प्रमाणात प्रभाव आहे. याबाबतीत अगदी तपशीलवार विभागणी करायची झाल्यास हिंदू, जैन, बौद्ध व शीख हे हिंदुस्थानात जन्मलेले ( तत्कालीन संज्ञेनुसार ) असून ख्रिस्ती व इस्लाम हे आयात केलेले / लादलेले धर्म आहेत. ( या ठिकाणी आयात / लादलेले या शब्दांचा शब्दशः अर्थ घेऊ नये. ) त्यामुळे हिंदू, बौद्ध, जैन व शीख यांच्यातील संस्कृती, धर्म, श्रद्धा, संस्कार इ. याच मातीतील असल्याने फार थोड्या प्रमाणातील भेद अपवाद केल्यास हे तसे हिंदूच आहेत. मात्र मुसलमान व ख्रिश्चन हे आनुवंशिकरित्या हिंदू असले तरी धार्मिकदृष्ट्या गैरहिंदू आहेत.  


    आता या गैरहिंदूंवर हिंदूंच्या चालीरीतींनी, संस्कृतीने, श्रद्धेने कसा परिणाम केला ते आपण थोडक्यात पाहू. या ठिकाणी आपण इस्लामचे उदाहरण घेऊ. पैगंबर प्रणित इस्लामधर्मियांचे वर्तन व सध्याच्या भारतीय मुसलमानांचे वर्तन पाहिल्यास त्यात जमीन - अस्मानचे अंतर असल्याचे दिसून येते. याबाबतीत एकच उदाहरण देतो. इस्लामच्या जन्मभूमीत मृत व्यक्तीच्या कबरीवर दर्गे उभारून त्यांची उपासना केली जात नाही तर आपल्याकडे निव्वळ दर्ग्यांवर न थांबता महालांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. त्याशिवाय हिंदूंची दुखवट्याची, दिवस पाळण्याची पद्धतही उचलण्यात आली. प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर भारतीय मुसलमानांतही हिंदूंप्रमाणे जातींची निर्मिती होऊन त्यांची उतरंड निर्माण झाली. या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते कि, अल्पसंख्यांक कितीही धर्मनिष्ठ असले तरी बहुसंख्याकांच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकत नाहीत. कित्येकांना हि चर्चा विषयांतर वाटत असेल तर कित्येकांना लेखाचा विषय काय व हा लिहितोय काय असा प्रश्न पडला असेल. परंतु मी अजून भरकटलो नाही एवढे येथे नमूद करून मूळ मुद्द्याकडे येतो.

    इस्लामधर्मियांचे उदाहरण तुलनेसाठी घेऊन मला इतकेच सुचवायचे होते कि, जिथे मुसलमान हिंदू धर्माच्या प्रभावापासून मुक्त होऊ शकले नाहीत तिथे माझी काय कथा ? कोणी भेटले कि त्याला मी " नमस्कार " असे अभिवादन करतो. याचा आमच्या नवबौद्ध मंडळींना राग येतो. त्यांच्या मते मी " जयभीम " म्हणायला पाहिजे. पण बालपणापासून माझ्या आयुष्याची २० - २५ वर्षे " नमस्कारात " गेल्यावर " भीमाचा जय " कसा म्हणणार ?  बाबासाहेबांनी धर्मांतर केले त्यावेळी धर्मांतर करण्याची बुद्धी आमच्या आजोबांना झाली होती कि नव्हती माहिती नाही. परंतु घरातील परंपरा पाहता ती झाली नसावी असे माझे अनुमान आहे. त्यामुळे विवाहविधी अपवाद केल्यास सर्व काही हिंदू पद्धतीने साजरे होते. मूर्तीपूजेवर, देवाधर्मावर आपली श्रद्धा नसल्याने या बाबतीत माझी मते नवबौद्धांशी ५०% जुळतात. पण ५०% नाही. कारण, ज्यावर आपली श्रद्धा नाही, विश्वास नाही त्यावर टीका का करायची ? श्रद्धा कोणावर ठेवायची व कोणावर नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या ठिकाणी नाहक जबरदस्ती का म्हणून ?

    गेल्या वर्षी एकदा एका गावी माझे जाणे झाले. पूर्वाश्रमीच्या महारवाड्यात ( उच्चारी ' म्हारवडा ' ) देखील एक फेरी झाली. तिथल्या एका घरात मला कमालीचे विसंगतीपूर्ण दृश्य दिसून आले. घराच्या प्रवेशद्वारी चौकटीवर घोड्याची नाल ठोकण्यात आली होती तर घरामध्ये प्रवेश करताच समोरच्या भिंतीवर बाबासाहेबांचा भलामोठा फोटो लावलेला होता. आता आणखी एक गोष्ट येथे नमूद करतो कि, सदर घर हे अशिक्षित ( सरकारी व्याख्येनुसार साक्षर -- कारण नाव लिहिता - वाचता येते.) व्यक्तीचे होते. पण हि स्थिती सुशिक्षितांची नाही असे थोडी ! माझ्या परिचयाचे एक दलित साहित्यिक आहेत. मुळात मला एक गोष्ट समजत नाही, ' दलित ' हा शब्द अभिमानाने का मिरवला जातो ? दलित समाज, दलित साहित्य - साहित्यिक इ. जसा हरिजन हा शब्द तिरस्करणीय आहे तसाच दलित हा देखील आहे असे माझे ठाम मत आहे. तर मी काय सांगत होतो कि, माझ्या परिचयाचे एक अतिकट्टर असे नवबौद्ध साहित्यिक -- जे चारचौघांत नवबौद्ध धम्माचा पुरस्कार तर हिंदू धर्माची नालस्ती करत असतात. प्रस्तुत महाशय जहाल आंबेडकरवादी आहेत. त्यामुळे हिंदूंची मूर्तीपूजा त्यांना अजिबात खपत नाही पण दरवर्षी नेमाने कुळाचार म्हणून कुलदेवतेच्या दर्शनाला गुपचूप जात असतात. हा विरोधाभास कशाचे प्रतिक आहे ?

    व्यक्तिगत उदाहरण द्यायचे झाले तर माझा विवाह बौद्ध पद्धतीने झाला. त्यावेळी उपाध्यायाने प्रथम मला अगम्य अशा भाषेत मंत्रांचे उच्चारण करून नंतर त्यांचे मराठी भाषांतर करून सांगितले व मला त्यांचा उच्चार करावयास लावला. वास्तविक लग्नाच्या वेळी उपाध्याय अथवा मंत्रोच्चारणाकडे लक्ष द्यायला कोण लेकाचा शुद्धीवर असतो ? पण अशा बेसावध क्षणीही मला हि विसंगती जाणवली. जी भाषा नवबौद्धांना अपरिचित आहे त्या भाषेत विवाहविधीचे उच्चार का ? हे कोडे आजही मला उलगडले नाही. पण त्याचवेळी हे देखील लक्षात येते कि, हिंदू विवाह पद्धतीतील मंत्रोच्चारणाचा अर्थ विवाह करणाऱ्या हिंदूंना तरी कुठे माहिती असतो ? वर्षाचे बाराही महिने हिंदूंच्या सणांनी - व्रतांनी व्यापलेले आहेत. त्यातील किती सण साजरे करण्याचे नवबौद्ध टाळतात ? हिंदूंची वटसावित्री नवबौद्ध करतात कि नाही ? दिवाळी देखील त्याज्य नाही कि राखी पौर्णिमाही ! मग गणेशोत्सवात घरात गणपती बसल्यास त्यावर नवबौद्धांचा आक्षेप का ?

    गेल्यावर्षी सहज दादरच्या चैत्यभूमीवर जाण्याचा योग आला. तिथे आतमध्ये गेलो. तेथील दृश्य आजही माझ्या नजरेसमोर तरळत आहे. मी त्या इमारतीत प्रवेश केला. गोलाकार भिंतीतील प्रवेशद्वारातून आत गेलो व उभा राहिलो. समोर बाबासाहेबांचा अर्धपुतळा असून त्यांच्या पाठीशी बुद्धाची मूर्ती होती. बाबासाहेब आपल्या चार डोळ्यांतून माझ्याकडे बघत होते तर मी दोन डोळ्यांतून त्यांना पहात होतो आणि बुद्ध आपल्या नेहमीच्या व जगप्रसिद्ध मंदस्मितहास्यमुद्रेने आमच्या दोघांकडे बघत होता. एखाद्या मंदिरात जसे भारावलेले वातावरण असते जवळपास तसेच तेथेही होते. त्या ठिकाणी एक गोष्ट माझ्या सहज लक्षात आली व ती म्हणजे या ठिकाणी अगरबत्ती ऐवजी मेणबत्तीचा वापर होतो आणि चर्चमध्ये देखील मेणबत्त्या वापरल्या जातात ! अगरबत्तीचा त्याग व मेणबत्तीचा स्वीकार हे कोडं काही मला उलगडलं नाही. चैत्यभूमीजवळच स्मशानभूमीअसून तिथे मृतदेहांना अग्नीच्या हवाली केले जाते. त्यात नवबौद्धांप्रमाणेच महारांचाही समावेश आहे ! मृतदेहावरील अंतिम संस्कारांच्या विधीत हिंदू व बौद्ध धर्मात काय फरक आहे ? माझ्या घरात मला माहिती असल्यापासून माझे दोन आजोबा व एक आजी असे तिघेजण ' बॅक टू पॅव्हेलियन ' गेले खरे पण एकालाही सरणावर जळताना पाहणे माझ्या वाट्याला आले नाही. त्यामुळे अखेरच्या विधीची मला तरी कल्पना नाही. पण अंतिम संस्कारानंतर कार्य / दिवस, श्राद्ध इ. परंपरांचे पालन केल्याचे मात्र मला माहिती आहे. अर्थात, आता या परंपरांचे पालन न करण्याकडे नवबौद्धांचा कल असल्याचेही दिसून येऊ लागले आणि हि खरेच आनंदाची व कौतुकाची बाब आहे. कारण हिंदू परंपरेच्या प्रभावापासून सुटका करून घेणे तितकेसे सोपे नाही. मात्र त्यांनी हे कार्य प्रबोधनाने, वैचारिक जागृतीने करावे अशी माझी अपेक्षा आहे. जबरदस्तीने नव्हे !

    व्यसनांचा जगभरातील सर्वच धर्मांनी जवळपास निषेध केलेला आहे. मात्र निषिद्ध मानलेले मद्यपान हे इतर धर्मियांप्रमाणेच नवबौद्धांनी देखील आपलेसे केले आहे. ज्याचा बाबासाहेबांनी देखील निषेध केला होता. बुद्धाच्या विचारसारणीशी अनुयायांची फारकत समजू शकते पण बाब्साहेबांच्या आवाहनावर इतकी विरुद्ध प्रतिक्रिया का म्हणून ? मनुष्याने स्थिर जीवनास आरंभ केल्यापासून किंवा मनुष्य जीवनास आरंभ झाल्यापासून ताण - तणाव हे त्याच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. ( आणखी एक हिंदू विधी ! ) या ताण - तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी माणसाने जे उपाय शोधले त्यातील एक जालीम उपाय म्हणजे मद्यप्राशन ! यांमुळे टेन्शनपासून माणसाची सुटका कशी होते काय माहित पण याचे सेवन करण्यास सर्वधर्मीय मांडली आपापले मतभेद विसरून आतुरतेने पुढे सरसावतात. दारूच्या ग्लासात सर्व जाती - धर्मातील भेद मिटले जातात. माणसांची एकी कुठे होते ? तर कोणत्या पवित्र स्थळी नाही तर दारूच्या अड्ड्यावर ! हा पराभव कोणाचा ? धर्मसंस्थापकांचा, महापुरुषांचा कि संस्कृतीचा ??