शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

मी कोण ?


    लेखाचे शीर्षक वाचून कोणाला देशपांड्यांचा ' असा मी ' आठवेल किंवा अत्र्यांचा ' मी कसा झालो ? ' आणि त्यावरून माझाही अशाच पद्धतीने लेखन करण्याचा मनोदय असल्याचा अंदाज बांधला जाईल. परंतु तसे नाही. प्रस्तुत ठिकाणी मला -- मी कोणत्या धर्माचा, जातीचा आहे याचा शोध घ्यायचा आहे. वास्तविक हे कार्य मी पुढील पिढीतील संशोधकांवर सोडू द्यायला हवे होते खरे, पण माझ्यावर संशोधन किंवा चार ओळींचे ( शोकात्मक वा निंदात्मक ) लेखन करण्याइतपत मी मोठा ( छोटा ) होईन असे मला तरी अजिबात वाटत नाही. तेव्हा आपल्या जिवंतपणीच हे कार्य स्वहस्ते उरकून घेण्याचा माझा विचार आहे.  


    रुढार्थाने पाहिल्यास माझा जन्म हिंदू धर्मातील ' महार ' जातीत झाला. दाखल्यावर त्याची नोंद हिंदू - महार ते पुढे हिंदू - बौद्ध आणि नंतर नवबौद्ध अशी उत्क्रांती सिद्धांतान्वये बदलत गेली. अर्थात हा बदल व गोंधळ केवळ कागदावर घडला असे नसून मानसिक व बौद्धिक पातळीवर देखील घडून आला, घडत आहे व कदाचित पुढेही घडत राहील. बहुसंख्यांकांच्या सोबतीने अल्पसंख्यांक राहिल्यास एकमेकांच्या चालीरीती, परंपरा, श्रद्धा इ. अंगांवर परिणाम हा होतोच. थोडक्यात त्यांची देवाण - घेवाण होते. उदा :- भारतात हिंदू हे बहुसंख्य व त्या तुलनेने मुसलमान, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन हे अनुक्रमे अल्पसंख्यक आहेत. यांपैकी हिंदू धर्मीय अपवाद केल्यास उर्वरित धर्मियांवर हिंदूंच्या चालीरीती, परंपरा, श्रद्धा इ. चा फार मोठा प्रभाव पडला आहे तर या धर्मियांच्याही काही मुल्यांचा हिंदुंवर बऱ्याच प्रमाणात प्रभाव आहे. याबाबतीत अगदी तपशीलवार विभागणी करायची झाल्यास हिंदू, जैन, बौद्ध व शीख हे हिंदुस्थानात जन्मलेले ( तत्कालीन संज्ञेनुसार ) असून ख्रिस्ती व इस्लाम हे आयात केलेले / लादलेले धर्म आहेत. ( या ठिकाणी आयात / लादलेले या शब्दांचा शब्दशः अर्थ घेऊ नये. ) त्यामुळे हिंदू, बौद्ध, जैन व शीख यांच्यातील संस्कृती, धर्म, श्रद्धा, संस्कार इ. याच मातीतील असल्याने फार थोड्या प्रमाणातील भेद अपवाद केल्यास हे तसे हिंदूच आहेत. मात्र मुसलमान व ख्रिश्चन हे आनुवंशिकरित्या हिंदू असले तरी धार्मिकदृष्ट्या गैरहिंदू आहेत.  


    आता या गैरहिंदूंवर हिंदूंच्या चालीरीतींनी, संस्कृतीने, श्रद्धेने कसा परिणाम केला ते आपण थोडक्यात पाहू. या ठिकाणी आपण इस्लामचे उदाहरण घेऊ. पैगंबर प्रणित इस्लामधर्मियांचे वर्तन व सध्याच्या भारतीय मुसलमानांचे वर्तन पाहिल्यास त्यात जमीन - अस्मानचे अंतर असल्याचे दिसून येते. याबाबतीत एकच उदाहरण देतो. इस्लामच्या जन्मभूमीत मृत व्यक्तीच्या कबरीवर दर्गे उभारून त्यांची उपासना केली जात नाही तर आपल्याकडे निव्वळ दर्ग्यांवर न थांबता महालांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. त्याशिवाय हिंदूंची दुखवट्याची, दिवस पाळण्याची पद्धतही उचलण्यात आली. प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर भारतीय मुसलमानांतही हिंदूंप्रमाणे जातींची निर्मिती होऊन त्यांची उतरंड निर्माण झाली. या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते कि, अल्पसंख्यांक कितीही धर्मनिष्ठ असले तरी बहुसंख्याकांच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकत नाहीत. कित्येकांना हि चर्चा विषयांतर वाटत असेल तर कित्येकांना लेखाचा विषय काय व हा लिहितोय काय असा प्रश्न पडला असेल. परंतु मी अजून भरकटलो नाही एवढे येथे नमूद करून मूळ मुद्द्याकडे येतो.

    इस्लामधर्मियांचे उदाहरण तुलनेसाठी घेऊन मला इतकेच सुचवायचे होते कि, जिथे मुसलमान हिंदू धर्माच्या प्रभावापासून मुक्त होऊ शकले नाहीत तिथे माझी काय कथा ? कोणी भेटले कि त्याला मी " नमस्कार " असे अभिवादन करतो. याचा आमच्या नवबौद्ध मंडळींना राग येतो. त्यांच्या मते मी " जयभीम " म्हणायला पाहिजे. पण बालपणापासून माझ्या आयुष्याची २० - २५ वर्षे " नमस्कारात " गेल्यावर " भीमाचा जय " कसा म्हणणार ?  बाबासाहेबांनी धर्मांतर केले त्यावेळी धर्मांतर करण्याची बुद्धी आमच्या आजोबांना झाली होती कि नव्हती माहिती नाही. परंतु घरातील परंपरा पाहता ती झाली नसावी असे माझे अनुमान आहे. त्यामुळे विवाहविधी अपवाद केल्यास सर्व काही हिंदू पद्धतीने साजरे होते. मूर्तीपूजेवर, देवाधर्मावर आपली श्रद्धा नसल्याने या बाबतीत माझी मते नवबौद्धांशी ५०% जुळतात. पण ५०% नाही. कारण, ज्यावर आपली श्रद्धा नाही, विश्वास नाही त्यावर टीका का करायची ? श्रद्धा कोणावर ठेवायची व कोणावर नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या ठिकाणी नाहक जबरदस्ती का म्हणून ?

    गेल्या वर्षी एकदा एका गावी माझे जाणे झाले. पूर्वाश्रमीच्या महारवाड्यात ( उच्चारी ' म्हारवडा ' ) देखील एक फेरी झाली. तिथल्या एका घरात मला कमालीचे विसंगतीपूर्ण दृश्य दिसून आले. घराच्या प्रवेशद्वारी चौकटीवर घोड्याची नाल ठोकण्यात आली होती तर घरामध्ये प्रवेश करताच समोरच्या भिंतीवर बाबासाहेबांचा भलामोठा फोटो लावलेला होता. आता आणखी एक गोष्ट येथे नमूद करतो कि, सदर घर हे अशिक्षित ( सरकारी व्याख्येनुसार साक्षर -- कारण नाव लिहिता - वाचता येते.) व्यक्तीचे होते. पण हि स्थिती सुशिक्षितांची नाही असे थोडी ! माझ्या परिचयाचे एक दलित साहित्यिक आहेत. मुळात मला एक गोष्ट समजत नाही, ' दलित ' हा शब्द अभिमानाने का मिरवला जातो ? दलित समाज, दलित साहित्य - साहित्यिक इ. जसा हरिजन हा शब्द तिरस्करणीय आहे तसाच दलित हा देखील आहे असे माझे ठाम मत आहे. तर मी काय सांगत होतो कि, माझ्या परिचयाचे एक अतिकट्टर असे नवबौद्ध साहित्यिक -- जे चारचौघांत नवबौद्ध धम्माचा पुरस्कार तर हिंदू धर्माची नालस्ती करत असतात. प्रस्तुत महाशय जहाल आंबेडकरवादी आहेत. त्यामुळे हिंदूंची मूर्तीपूजा त्यांना अजिबात खपत नाही पण दरवर्षी नेमाने कुळाचार म्हणून कुलदेवतेच्या दर्शनाला गुपचूप जात असतात. हा विरोधाभास कशाचे प्रतिक आहे ?

    व्यक्तिगत उदाहरण द्यायचे झाले तर माझा विवाह बौद्ध पद्धतीने झाला. त्यावेळी उपाध्यायाने प्रथम मला अगम्य अशा भाषेत मंत्रांचे उच्चारण करून नंतर त्यांचे मराठी भाषांतर करून सांगितले व मला त्यांचा उच्चार करावयास लावला. वास्तविक लग्नाच्या वेळी उपाध्याय अथवा मंत्रोच्चारणाकडे लक्ष द्यायला कोण लेकाचा शुद्धीवर असतो ? पण अशा बेसावध क्षणीही मला हि विसंगती जाणवली. जी भाषा नवबौद्धांना अपरिचित आहे त्या भाषेत विवाहविधीचे उच्चार का ? हे कोडे आजही मला उलगडले नाही. पण त्याचवेळी हे देखील लक्षात येते कि, हिंदू विवाह पद्धतीतील मंत्रोच्चारणाचा अर्थ विवाह करणाऱ्या हिंदूंना तरी कुठे माहिती असतो ? वर्षाचे बाराही महिने हिंदूंच्या सणांनी - व्रतांनी व्यापलेले आहेत. त्यातील किती सण साजरे करण्याचे नवबौद्ध टाळतात ? हिंदूंची वटसावित्री नवबौद्ध करतात कि नाही ? दिवाळी देखील त्याज्य नाही कि राखी पौर्णिमाही ! मग गणेशोत्सवात घरात गणपती बसल्यास त्यावर नवबौद्धांचा आक्षेप का ?

    गेल्यावर्षी सहज दादरच्या चैत्यभूमीवर जाण्याचा योग आला. तिथे आतमध्ये गेलो. तेथील दृश्य आजही माझ्या नजरेसमोर तरळत आहे. मी त्या इमारतीत प्रवेश केला. गोलाकार भिंतीतील प्रवेशद्वारातून आत गेलो व उभा राहिलो. समोर बाबासाहेबांचा अर्धपुतळा असून त्यांच्या पाठीशी बुद्धाची मूर्ती होती. बाबासाहेब आपल्या चार डोळ्यांतून माझ्याकडे बघत होते तर मी दोन डोळ्यांतून त्यांना पहात होतो आणि बुद्ध आपल्या नेहमीच्या व जगप्रसिद्ध मंदस्मितहास्यमुद्रेने आमच्या दोघांकडे बघत होता. एखाद्या मंदिरात जसे भारावलेले वातावरण असते जवळपास तसेच तेथेही होते. त्या ठिकाणी एक गोष्ट माझ्या सहज लक्षात आली व ती म्हणजे या ठिकाणी अगरबत्ती ऐवजी मेणबत्तीचा वापर होतो आणि चर्चमध्ये देखील मेणबत्त्या वापरल्या जातात ! अगरबत्तीचा त्याग व मेणबत्तीचा स्वीकार हे कोडं काही मला उलगडलं नाही. चैत्यभूमीजवळच स्मशानभूमीअसून तिथे मृतदेहांना अग्नीच्या हवाली केले जाते. त्यात नवबौद्धांप्रमाणेच महारांचाही समावेश आहे ! मृतदेहावरील अंतिम संस्कारांच्या विधीत हिंदू व बौद्ध धर्मात काय फरक आहे ? माझ्या घरात मला माहिती असल्यापासून माझे दोन आजोबा व एक आजी असे तिघेजण ' बॅक टू पॅव्हेलियन ' गेले खरे पण एकालाही सरणावर जळताना पाहणे माझ्या वाट्याला आले नाही. त्यामुळे अखेरच्या विधीची मला तरी कल्पना नाही. पण अंतिम संस्कारानंतर कार्य / दिवस, श्राद्ध इ. परंपरांचे पालन केल्याचे मात्र मला माहिती आहे. अर्थात, आता या परंपरांचे पालन न करण्याकडे नवबौद्धांचा कल असल्याचेही दिसून येऊ लागले आणि हि खरेच आनंदाची व कौतुकाची बाब आहे. कारण हिंदू परंपरेच्या प्रभावापासून सुटका करून घेणे तितकेसे सोपे नाही. मात्र त्यांनी हे कार्य प्रबोधनाने, वैचारिक जागृतीने करावे अशी माझी अपेक्षा आहे. जबरदस्तीने नव्हे !

    व्यसनांचा जगभरातील सर्वच धर्मांनी जवळपास निषेध केलेला आहे. मात्र निषिद्ध मानलेले मद्यपान हे इतर धर्मियांप्रमाणेच नवबौद्धांनी देखील आपलेसे केले आहे. ज्याचा बाबासाहेबांनी देखील निषेध केला होता. बुद्धाच्या विचारसारणीशी अनुयायांची फारकत समजू शकते पण बाब्साहेबांच्या आवाहनावर इतकी विरुद्ध प्रतिक्रिया का म्हणून ? मनुष्याने स्थिर जीवनास आरंभ केल्यापासून किंवा मनुष्य जीवनास आरंभ झाल्यापासून ताण - तणाव हे त्याच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. ( आणखी एक हिंदू विधी ! ) या ताण - तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी माणसाने जे उपाय शोधले त्यातील एक जालीम उपाय म्हणजे मद्यप्राशन ! यांमुळे टेन्शनपासून माणसाची सुटका कशी होते काय माहित पण याचे सेवन करण्यास सर्वधर्मीय मांडली आपापले मतभेद विसरून आतुरतेने पुढे सरसावतात. दारूच्या ग्लासात सर्व जाती - धर्मातील भेद मिटले जातात. माणसांची एकी कुठे होते ? तर कोणत्या पवित्र स्थळी नाही तर दारूच्या अड्ड्यावर ! हा पराभव कोणाचा ? धर्मसंस्थापकांचा, महापुरुषांचा कि संस्कृतीचा ??

४ टिप्पण्या:

  1. mast lihle ahe....! asha lekhnachi samajala atyant garaj hoti.... aple likhan khupch kautukaspad ahe...! aapn je mudde likhanatun mandnyacha praytna kela ahe te sarvanach mahit ahe...parantu tari dekhil lokanchi mansikta badlat nahi mhnun samaj sudhrat nahi....parivartn zale trch samaj jivant rahil...!!!!!!!!!

    उत्तर द्याहटवा
  2. सर नेमके विवेचन केले आहे. वैचारिक विरोधाभास सामान्य माणसात असेल तर एक वेळ ठीक आहे. परंतू सुशिक्षित माणसंही त्यापासून अलिप्त नाहीत.
    ...................
    गमतीची गोष्ट म्हणजे पुण्यात बाबासाहेब आंबेडकर गणेश मंडळ आणि महात्मा फुले गणेश मंडळ पाहिले आणि प्रबोधन अजून कोसो दूर आहे असे वाटले.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रकाश साहेब, सर्वप्रथम अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
      प्रबोधनाची गरज असल्याचे आपले मत मला मान्य आहे. पण निव्वळ प्रबोधनाने हा प्रश्न सुटेल असे मला तरी वाटत नाही. कारण, पूर्वाश्रमीचा महार आणि आजचा नवबौद्ध समाज हा आत्यंतिक हिंदूधर्म द्वेषाने सध्याच्या भारतीय मुस्लिम समाजाच्या अवस्थेकडे वाटचाल करत आहे. ' आपण ' आणि ' ते ' या संकल्पना सध्या हिंदू - मुस्लिम एकमेकांच्या बाबतीत लावतात. बुद्धिस्ट व हिंदू देखील एकमेकांचा असा उल्लेख करतात, नाही असे नाही. परंतु, ज्या तीव्रेतेने हिंदू - मुस्लिम भेदभाव मानला जातो तितकासा तरी अजून नाही. माझ्या मते दोन्ही पक्षांनी आता ' झाले गेले विसरून ' आता नव्याने पुढची तयारी म्हणा, मांडणी म्हणा केली पाहिजे.

      हटवा