राजकुमार.. हा फिल्म इंडस्ट्रीचा खरोखर राजकुमार होता. मूळ नाव कुलभूषण पंडित. प्रथम नोकरी पोलिस खात्यात. तिथून स्वारी अभिनयाकडे वळली म्हणण्यापेक्षा फिल्म इंडस्ट्रीत प्रवेशली म्हणणंच सयुक्तिक ठरेल. कारण अभिनयाच्या प्रचलित मापदंडात तो कधीच कुठे बसला नाही. ना तो दादामुनी अशोककुमार प्रमाणे घरातील एक बुजुर्ग सदस्य वाटला, ना दिलीपकुमार प्रमाणे ट्रॅजेडी किंग ना धर्मेंद्र प्रमाणे ही मॅन बनला. जितेंद्र प्रमाणे उड्या मारत नाचणे त्याला कधी जमलेच नाही. देव आनंद प्रमाणे हिरोईनच्या अवतीभवती फुलपाखरासारखा तो बागडला नाही की अमिताभच्या अँग्री यंग मॅन इतका तो भडक झाला नाही.
एवढं सगळं असूनही बॉलिवूडचा तो एक प्रतिथयश नट होता. त्याच्या नखऱ्यांचे खरे खोटे किस्से आजही चवीने चघळले जातात. तेही त्याने या दुनियेचा निरोप घेऊन जवळपास दोन अडीच दशके उलटल्यानंतर. यावरून लोकमनावरील त्याच्या गारुडाची कल्पना यावी.
राजकुमारने आपल्या सुरवातीच्या काळात केलेला अभिनय मला नेहमीच थोडासा लाऊड वाटला. पण वक्त मधल्या राजू / राजाच्या रोलपासून त्याची स्वतःची एक स्वतंत्र अभिनयशैली जन्मास आली.
खर्जातील आवाज आणि भाषेवरील कमांड. यांमुळे वेळ घेत एकेक शब्द मोजूनमापुन बोलण्याची त्याची अदा.. ती देखील अतिशय संयतपणे.. प्रेक्षकांना मोहून गेली.
कल्पना करा.. वक्त मधला " यह बच्चों के खेलने की चीज नहीं.." हा मदन पुरीला ( बलबीर ) उद्देशून म्हटलेला डायलॉग दिलीपकुमार किंवा अमिताभने म्हटला असता तर त्यातील उपहास, गर्भित धमकी आणि बेदरकारपणा ते दाखवू शकले असते का ? तीच कथा रहमानला ( चिनॉय सेठ ) उद्देशून बोललेल्या " जिनके अपने घर शीशे के हो.." या अजरामर संवादाची !
परंपरेनुसार राजकुमारलाही काही काळ नट्यांसोबत पडद्यावर रोमान्स करत गाणी म्हणावी लागली. पण त्यातील अपवाद वगळता त्याच्या पर्सनॅलिटीला फारशी सूट झाली नाहीत. बहुधा मन्ना डे खेरीज इतर कोणत्याच गायकाचा आवाज त्याच्या चेहऱ्याला फिट्ट बसला नाही, हेच त्यामागील कारण असावं. अपवाद हीर रांझा मधील यह दुनिया यह महफील गाण्याचा. पठ्ठ्यानं बहुधा फर्स्ट टाइम रफीच्या आवाजाला न्याय दिलाय !
राजकुमारचा फिल्मी डान्स देखील त्याच्या अभिनयासारखाच होता. त्यात कुठेही धर्मेंद्रसारखा अवघडलेपणा नाही की देवआनंद चंचलता नाही. मनात आलं.. थोडं थिरकलं की झाला नाच. पण त्यातही एक ग्रेस आणि अदब होती. जी त्याच्या पर्सनॅलिटीला मॅच व्हायची. उदाहरणार्थ,हिंदुस्थान की कसम मधील ' हर तरफ अब यही अफसाने है..' एक दोन ठिकाणीच जानीने पदन्यास केलाय.. पण तोदेखील उत्स्फूर्त वाटावा असा. त्यात कृत्रिमता अजिबात नाही.
राजकुमारच्या अभिनयाबद्दल बोलताना मला त्याचा एक सीन आठवतोय. पिक्चर तोच आपला..वक्त. क्लायमॅक्सला राजू ( राजकुमार ) लाला केदारनाथला ( बलराज साहनी ) त्याच्या मुलांची ओळख करून देत असतो. त्या सीनमध्ये राजकुमारने अक्षरशः जीव ओतून ऍक्टींग केलीय असं मला नेहमीच वाटत आलंय. पण त्याचं बॅडलक म्हणजे त्याच्यासमोर बलराज साहनी सारखा तगडा अभिनेता होता. ज्याच्या हरवलेल्या मुलांच्या भेटीसाठी व्याकुळ लाला केदारनाथ समोर जानीचा राजू साफ झाकोळून गेला.
एका टप्प्यावर आपण हिरोच्या भूमिकेत बसत नाही लक्षात येताच तो कॅरेक्टर रोलकडे वळला. पण खंगलेला बाप, आजा हे रोल त्याने क्वचितच केले असतील. मोस्टली तो खानदानी रईस किंवा सरकारी अधिकाऱ्याच्याच भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला. मग तो पुलिस पब्लिक मधला सीबीआय ऑफिसर जगमोहन आझाद असो की सूर्या मधील डिस्ट्रिक्ट कलेक्टर राजपाल चौहान !
तिरंगा मधील ब्रिगेडियर सुर्यदेव सिंह आणि सौदागरच्या राजेश्वर सिंग उर्फ राजुची मोहिनी अद्यापि कायम आहे.
राजकुमारने या दुनियेचा निरोप देखील आपल्या स्टाईलने घेतला. महाभारतातील भीष्माचे कल्पित इच्छामरण त्याला नव्हते पण आपण जाताना व गेल्यावर काय करावे हे ठरवण्याचे त्याच्या हाती निश्चित होते व त्याने तसेच केले. त्याचे निधन, अंतिम संस्कार घडून गेल्यावर कळलं की इंडस्ट्रीचा राजकुमार गेला !
राजकुमार हयात असताना व तो गेल्यावर त्याच्या फिल्मी उत्तराधिकाऱ्याचा शोध घेतला जाऊ लागला. काहींना मुकेश खन्ना त्याचा पडद्यावरील वारसदार वाटू लागला पण.. ती अदा, घमेंड, मग्रुरी, रग, बेफिकिरी आणि अदब.. मुकेश खन्नाच काय पण इतर कोणत्याही अभिनेत्यात परत दिसली नाही. कारण परमेश्वराने स्वतःच्या मर्जीने जगणारा व एक्झिटचे डिटेल्स ठरवणारा एकच अवलिया जन्माला घातला होता.. व तो म्हणजे राजकुमार !
जाता जाता… मराठी प्रेक्षकांत राजकुमारला पुन्हा एकदा भूतकाळातून वर्तमानात आणायचं कार्य झी मराठी वाहिनीवरील ' फु बाई फु ' च्या एका पर्वात अभिनेते सुनील तावडेंनी केलं. त्यांनी रंगवलेला राजकुमार व सागर कारंडेचा रजनीकांत. तुफान परफॉर्मन्स होता. त्याबद्दल या उभयतांचे मानावेत तितके आभार थोडेच आहेत !