सिनेतारकांना जसं सौंदर्याचं वरदान आहे तद्वत वाढत्या वयाचा शाप देखील आहे. साधारणतः तिशीच्या आसपास येताच किंवा तिशीपार होताच अभिनेत्रींच्या निवृत्तीचे सर्वांनाच वेध लागतात. पण त्याचवेळी पडद्यावरील हिरोच्या वाढत्या वयाचा, मंदावलेल्या हालचालींचा सर्वांनाच सोयीस्कर विसर पडत असतो.
नटीच्या चेहऱ्यावरील वाढतं वय डोळ्यांना खुपतं. पण नटाच्या वाढत्या वयाकडे दुर्लक्ष करून त्याच्यातील परिपक्व अभिनयाकडे पद्धतशीरपणे लक्ष वळवलं जातं. एखादीच विजयाशांती, श्रीदेवी किंवा साऊथची ऍक्शन क्वीन मलश्री आपला रुबाब टिकवून राहते. बाकीच्यांची ड्रीमगर्ल, धक धक गर्ल म्हणून बोळवण केली जाते.
कधीकाळी इंडस्ट्रीत स्त्री प्रधान चित्रपट बनत होते. पण पुढे नायिकांचं स्थान चार दो आँसू बहाके, नाच - बागडके चल दिए… मराठीमध्ये तर याहून भयाण परिस्थिती.
ग्रामीण परंपरा दाखवणारा एक प्रवाह तर दुसरा शहरी सुधारकांचा. नंतर लाट आली तमाशापटांची. ती ओसरेपर्यंत माहेरच्या साडीने आसवांचे पूर वाहवले. सोशिक सून, कजाग सासू, ठसकेबाज नणंद, लंपट दीर आणि अंगानं वाढलेला डोक्यानं गेलेला नवरा. दोन अडीच तासांच्या रडारडीत खेळ खल्लास. नाही म्हणायला दादा कोंडके व नंतर अशोक - लक्ष्याचा विनोदी चित्रपटांचा सुखद आधार असला तरी पुढे पुढे त्यांचंही अति झालं न् हसू येईनासं झालं. या सगळ्या गदारोळात चित्रपटाला लागणारी एक चांगली सशक्त कथा व त्यातील नायिकेचं स्थान, हे मात्र दुर्लक्षित राहिलं...
बरं, आपल्याला काही फिल्म इंडस्ट्रीच्या हिस्ट्रीशी देणं घेणं नाही. आपण आपलं नट्यांपुरतंच बोलू.
फिल्मी नट्यांइतकं सोशिक जगात इतर कोणी असणार नाही.. असूच शकणार नाही. परदेशातील हाडं फोडणाऱ्या थंडीत अर्धवस्त्रांकीत अवस्थेत गाण्याचं शूटिंग करताना चेहऱ्यावर प्रणयातुर, लज्जित भाव दर्शवणे काय खायचं काम आहे !
त्यात दाक्षिणात्य सिनेमा असेल तर मग… हिरो गळ्यापासून पायापर्यंत पॅक असणार. नटीनं मात्र ट्रॅडिशनल हाफ साडी किंवा शॉर्ट स्कर्ट घालायचे. त्याच्या पायात बूट असले तरी तिच्या पायातील पैंजण दाखवण्यासाठी तिला बर्फात अनवाणी चालवणार किंवा चप्पल / सँडल देणार.
त्यामानाने मराठी तारका भाग्यवान असं जर तुम्ही म्हणणार असाल तर त्या भ्रमात राहू नका. जरी आपलं बजेट नट्यांना बर्फात नाचवण्याचं नसलं तरी गवतात, कुसळांत लोळवण्याचं जरूर असतं. आता बर्फ बरा की कुसळं… खैर, जाने भी दो.
मागे एकदा टीव्हीवर जॅकी श्रॉफ उर्फ जग्गु दादाची मुलाखत बघत होतो. बोलता बोलता भिडू बोलला की, हिरो का कोणत्या तरी मुव्हीतील गाण्याच्या शूटिंग वेळी मीनाक्षी शेषाद्री तापाने आजारी होती. पण त्याही अवस्थेत ते रोमँटिक गाणं तिनं शूट केलं. इथं आपल्याला ताप आल्यावर अंगावर थंड पाण्याचे चार दोन थेंब पडले तरी काटा मारतो आणि इकडे…!
पण हे वरवरचं झालं. इंडस्ट्रीतील तारकांची दुसरी बाजू याहून भयानक असेल का? म्हणजे महिन्यातील ते काही दिवस, शूटिंगसाठी त्या वेळी ब्रेक घेऊ शकतात का ? वयानुरूप त्यांना लग्नाची, संसाराची इच्छा झाल्यास त्यांच्यासमोरच का लग्न की करियर ? हा प्रश्न उभा राहावा.
लग्नानंतर नट्यांना रोमँटिक सीन देता येत नाही, त्यांना संसारामुळे कामाकडे लक्ष देता येत नाही असं म्हटलं जातं. पण मग मौसमी चॅटर्जी, करीना कपूरचं काय ? त्यांना तर रोमँटिक सीन देताना काही प्रॉब्लेम आल्याचे दिसत नाही. हां.. आता रोमॅंटिक सीनची परिभाषा म्हणजे स्मूच, हाफ न्यूड ही असेल तर मग विषयच खुंटला !
कारण आपली पुरुषप्रधान संस्कृती. विवाहितनट असे सीन देऊ शकतो पण नटी नाही. नटाच्या वैवाहिक जीवनावर फारसा परिणाम होत नाही पण नटीच्या होतो वगैरे वगैरे. असो.
हे जरा जास्तच सिरीयस झालं. चेंज द टॉपिक.. बॉलिवूड इंडस्ट्रीत काही मजेदार योगायोग असेही घडतात. बेताबमध्ये सनी देओल सोबत पदार्पण करणाऱ्या अमृता सिंगने स्वप्नात देखील विचार केला नसेल की, याच सनीच्या बापाबरोबर तिला हिरॉईनचं काम करावं लागेल. असाच योगायोग रीना रॉय, जयाप्रदा, श्रीदेवी, माधुरी सोबतही घडला आहे. पण कोणत्या नटाच्या बाबतीत असा योगायोग घडलाय का ? की त्याने रियल लाईफ आई - मुलगी सोबत रील लाईफमध्ये प्रियकराचा रोल केलाय. उत्तर मिळाल्यास जरूर कळवा. तोवर अलविदा.. टेक केयर !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा