रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

माणुसकी हरवत चाललेली माणसं… !


    काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात जवखेडे खालसा येथे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा खून करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्याचा प्रकार घडला. घटना घडून गेली. विछिन्न देहांवरील अंत्यसंस्कार उरकण्यात आले. मरणारे लोक स्वभावाने चांगले होते, गावात त्यांचे कोणाशी भांडण नव्हते असे सर्टीफिकेट पोलिसांनी देऊनही टाकले. नंतर अचानक मृत व्यक्तींपैकी एकाचे गावातील स्त्री सोबत प्रेमसंबंध असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्यामुळे या प्रकरणाला निराळेच वळण लागले. पोलिसांची प्रस्तुत प्रकरणातील भूमिका संशयास्पद वाटावी अशीच आहे. कोणाच्या तरी दबावाखाली उलट - सुलट विधानं करून पोलिस खाते या प्रकरणाविषयी समाजाची दिशाभूल तर करत आहेच पण सोबतीला संशयाचे वातावरण निर्माण करून तणावाला चालनाही देत आहे.

     पोलिसांनी या बाबतीत ढिलाई दाखवू नये याकरिता सामाजिक संघटना व लोकांचे उत्स्फ़ुर्त मोर्चे निघत आहेत. या मोर्च्यांना नक्षलवाद्यांनी पुरस्कृत केल्याच्या पुड्या सोडण्यात येत आहेत. याच न्यायाने पाहिल्यास गोध्रा, बडोदा, मुंबई येथील दंगेही नक्षलवाद्यांनीच केले होते असे म्हणायचे का ? माझ्या मते, लोकसत्ता व तत्सम वृत्तपत्रांच्या ' विशेष प्रतिनिधींनी ' या प्रश्नांची समाधानकारक अशी ' खरी ' उत्तरं देऊन आमचे अज्ञान दूर करावे.

     या जगात, देशात, राज्यात माणसं मारली जाणं यात फारसं धक्कादायक असं काही राहिलं नाही. दररोज कितीतरी जणांचे खून पाडले जातात. कितीतरी अपघातात मरण पावतात तर कित्येकजण आजारपण, आत्महत्या इ. कारणांनी आपले प्राण गमावतात. मग जवखेडे येथील तीन माणसांचं मारलं जाण्यात नाविन्य ते काय ? किंवा या तिघांचीच हत्या जणू काही या राज्यात / देशात घडणारी पहिलीच हत्या आहे असा देखावा का निर्माण केला जातोय ? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. या ठिकाणी आपण थोडं विषयानंतर करू.

     दिल्लीमध्ये बस बलात्कार प्रकरण होण्यापूर्वी या देशात / दिल्लीत बलात्कार घडत नव्हते का ? दिल्लीचे प्रकरण घडून गेल्यावर देखील तिथे बलात्कार घडायचे बंद झाले का ? मुंबईचे शक्ती मिल प्रकरण घडून गेल्यावर देखील शहरांतील बलात्कारांचे प्रमाण घटले आहे का ? यांची उत्तरे नकारार्थी आहेत. मग दिल्लीच्या प्रकरणाला हवा देण्याचे कार्य कोणी केले ? तो जनतेचा स्वाभाविक उद्रेक होता असे गुळमुळीत उत्तर देण्याचा प्रयत्न होईल पण ते सर्वांशी खरे नाही.

     लोकांनी मोर्चे काढण्यापर्यंत तो जनतेचा भावनिक उद्रेक होता, इथपर्यंतचा भाग खरा आहे. त्याला मेणबत्ती मोर्चा वगैरे संघटित निदर्शनांचे हेतुपूर्वक रूप देऊन व मिडीयाला हाताशी धरून त्याची व्यापकता वाढवण्यात आली. प्रिंट व टेलिव्हिजनचा वापर करून लोकांच्या मनी त्या गुन्ह्यातील आरोपींविषयी व त्या आरोपींचा तपास करण्यात ढिलाई दाखवणाऱ्या पोलिसांच्या विषयी तसेच पोलिस खात्याच्या ढिलाईला वाव देणाऱ्या काँग्रेस सरकारविरोधी चीड निर्माण करण्यात आली. यातून साध्य काय झाले ते जगजाहीर आहे. पण यात मूळ प्रश्न सुटलेला नाही हे मात्र उघड सत्य आहे व ते सत्य नजरेआड करण्याइतपत माध्यमं हुशार आहेत.

    दिल्लीतील बलत्कार प्रकरण व जवखेडे प्रकरणाची जर तुलना केली तर असे लक्षात येते कि, मिडीयाची या दोन्ही घटनांतील भूमिका परस्परविरोधी आहे. दिल्ली प्रकरणातील मोर्चे हे जनतेचे पुरस्कृत होते पण जवखेडेचे नक्षलवादी पुरस्कृत. त्याआधी खैरलांजीचेही तसेच होते. याचा अर्थ असा कि, आम्ही जे सांगू, दाखवू, छापू तेच तुम्ही ऐकायचे, बघायचे व वाचायचे आणि मान्यही करायचे. बरे, हि एकट्या मीडियाची अक्कल नाही. ते पिंजऱ्यातले पोपट. त्यांना जो खाऊ देईल त्याच्या इशाऱ्यावर पोपटपंची करणार व आपण लोकशाहीचा आधारस्तंभ असल्याच्या बाता मारणार !

    मिडीया जाऊ द्या, सोशल नेटवर्किंग साईट्सवरील सक्रीय विचारवंत - तरुणाईची यावरील प्रतिक्रिया काय आहेत ? जवखेडाचे मृत लोक तथाकथित ' दलित ' समाजाचे असल्याने फक्त ' दलितांनाच ' त्याविषयी सहानुभूती, चीड आहे. बाकीचे काय ? फार थोड्यांनी या घटनेविषयी निषेधाचा आवाज उठवला आहे. ज्यांनी आपले आत्मे विकले नाहीत, ज्यांच्यातील मनुष्यतव लोपलं नाही फक्त त्यांनीच ! बाकीचे मात्र बोटचेपी भूमिका घेऊन तटस्थ राहिले आहेत. हि घटना का घडली ? कशी घडली ? त्यामागील कारणं काय होती ? इ. प्रश्नांची उत्तरे जेव्हा मिळतील तेव्हा ते आपला निषेधरुपी वांझ संताप व्यक्त करतील. धन्य आहे अशा विचारवंतांची, तरुणांची !

    मारली गेली ती माणसं होती. मारणारीही माणसं होती. निषेध व्यक्त करणारीही माणसंच आहेत व निमूटपणे पाहणारीही माणसंच आहेत. हे सर्व पाहता खरोखर आपण सुधारत आहोत कि मागास बनत चाललो आहोत असा प्रश्न पडू लागला आहे. खून करण्यामागील कारणं काहीही असोत पण एखाद्याचा त्याच्या इच्छेविरुद्ध जीवन जगण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर मृतदेहांचे तुकडे करण्यात आले आहेत. अशा घटना दररोज घडतात हे मान्य करून देखील मी असे म्हणतो कि, जेव्हा अशा घटना आपल्या वाचनात येतात वा अवलोकनात येतात तेव्हा त्याविषयी फार काही नाही --- साधा निषेधाचा शब्द आपण नोंदवू नये ? देवी - देवतांचे व इतर फोटो Like करण्यासाठी जे हात तत्परतेने पुढे सरसावतात तेच हात अशा वेळी मागे का राहतात ?

    भ्रष्ट सरकार, प्रशासन व्यवस्था यांच्याविषयी तुमच्या मनात संताप, चीड आहेच ना ? या संतापाला, चिडीला वाट देण्याचे कार्य तुम्ही सोशल नेटवर्किंग साईट्सवरून करता. का ? तर या साईट्स शेवटी सरकारी खात्याच्या दृष्टीखालून जाऊन त्यांना जनतेच्या मनोभावना कळतात ते तुम्हांला माहिती आहे म्हणून ! मग जवखेडे करिता जेव्हा सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर केला जात आहे त्याकडे संशयाने का पाहिलं जात आहे ? उलट अशा प्रयत्नांना मनमोकळेपणाने ' One Click ' सहकार्य केल्यास सामाजिक सलोखा कायम राहण्यास मदतच होईल. परंतु हे आपल्याकडून घडून येणार आहे का ? नाही. कारण शेवटी ' आपण ' व ' ते ' हे भूमिका सहजासहजी बदलली जाणार नाही. या भूमिकेतील ' आपण ' कायम असून ' ते ' मात्र प्रसंगानुसार बदलतात. कधी मुसलमान. कधी ब्राम्हण. कधी दलित. कधी धनगर. कधी आदीवासी. तर कधी फासे पारधी !

     या भूतलावर माणसाचा जन्म / निर्मिती का झाली ? कधी झाली ? कशी झाली याचा शोध घेण्यात येत आहे. याची समाधानकारक उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील. पण माझ्या मते, या पृथ्वीवर माणसाइतका दुर्बल प्राणी दुसरा कोणी नाही. तो आता इतका दुबळा झाला आहे कि, आपल्या आदिम पूर्वजांप्रमाणे देखील जगू शकत नाही. अशा स्थितीत आपले जीवन अधिकाधिक सुखकारक व सुरक्षित व्हावे तसेच आपल्यातील दुर्बल ( शारिरिक अर्थाने ! ) घटकांचे देखील जीवन सुखमय व सुरक्षित व्हावे याकरता त्याने प्रयत्नशील राहाणे अपेक्षित आहे. पण वास्तव नेमकं उलट आहे. आपल्यातीलच रक्ता - मांसाच्या लोकांना काल्पनिक भेदांवर परकं मानून परस्परांचे अस्तित्व धोक्यात आणण्यचाच माणसाचा प्रयत्न सुरु आहे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा